Saturday, September 26, 2020

#सहजोक्त.

 #आई अंबे तू झोपी नको जाऊ .....

कवी कविता करतात , ते अंतःप्रेरणेने. ती अंतःप्रेरणा बहुतेकदा त्यांच्या भावविश्वातील व्यक्ति-वस्तु-प्रसंग वगैरे असते. एकदा कां त्यांच्या इप्सिताची प्राप्ती वा पूर्ती झाली की कवींची काव्य-झरणी लुप्त होते. संतांचे अंतःकरण ईशप्रेरणेने भारलेले असते.  कविता करावी ,  या हेतूने त्यांच्या रचना नसल्यामुळे काव्य-निर्झर अखंड वाहता असतो म्हणून त्यांचे वाङ्मय "अभंग" ठरते. शब्दसंग्रह करून , यमकादी अलंकार जोडून काव्य करण्याकडे कवींचा कल असतो . हेच संतांच्या रचना चिरंतनातून आल्यामुळे  शब्द , अलंकार , वृत्त-छंद वगैरे , त्यांच्या रचनेत  उत्स्फूर्त येतात.  सहज बोली भाषेतील शब्द रचणे , सोपी रचना करणे ही तर संतांच्या रचनेची विशेषताच असते. समजायला सोपी पण आचरायला कष्टसाध्य रचना संतांची असते.


आता हीच रचना बघा ना  - 


माझी पतिताची पापकृती खोटी 

तुझी पावन करण्याची शक्ती मोठी समजवता मी काय समजावून 

उठ अंबे तू झोपी नको जाऊ ॥१॥

जरी गेलीस तू माय बाई झोपी 

तरी बुडतिल भवसागरात पापी

ब्रह्मज्ञानीही लागतील वाहू ॥२॥

काम क्रोधादिक चोरटे गृहात 

शिरुनी पडले ते दृष्ट आग्रहात 

लुटू म्हणती हणू , मारू जीव घेऊ॥३॥ 

काळसर्प मुख वासुनी उशाला

टपत बसला तो, भिईना कशाला कितीतरी या निर्वाणी तुला वाहू ॥૪॥

कृपा सोडूनि निजलीस यथासांग उपेक्षीसी मज काय अता सांग 

कृपावंते निष्ठूर  नको होऊ ॥५॥

तुझ्याविण मी कोणाशी हात जोडू

 आई म्हणुनी, कोणाचा पदर ओढू

  तुझे पाय सोडुनि कुठे जाऊ ॥६॥

  जगी त्राता तुजविण कोणी नाही 

  माझी कोणी कळवळ जाणी नाही

  तूच जननी तू जनक बहिण भाऊ ॥७॥

    नको सांड करू माझ्या जीवाची

     तुला एकविरे आण भार्गवाची 

     नको सहसा जगदंबे अंत पाहू ॥८॥

      जरी माझी ना करिसी तू उपेक्षा 

      तरी वाढेल तुझे नाव याहीपेक्षा विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ ॥९॥

      

विष्णुदासांचे रेणुकेशी आईचे नाते आहे. अवखळ वयातील मुले कमीच झोपतात.  आई  संसाराची सगळी कामे करून दमते , तिला झोप येते. आई झोपली की लेकरांना करमत नाही , आई तू उठ ना म्हणून मागे लागतात. ह्याच मूळभावाने  ही रचना झाली आहे. प्रत्येकच कडवे इतके लडिवाळ पण गभीर (आशयघन व सखोल) आहे की ज्याचे नाव ते !  


 आईपणाचा स्नेह व क्षमेचा पदर  इतका मोठा  असतो की मातृवत्सल बाळे  आडवळणाला जायला धजावतच नाही. वात्सल्याची हीच खरी कसोटी असते की  स्नेहानी बालकाचे अपराध लीलया संपून जातात. "मुलाचे कल्याण व्हावे" ही तीव्र इच्छा व कृती कायमच असते. शिवाय निखळ वात्सल्यामुळे बालकाच्या 'पापराशी' सहज वितळून जातात. जसा उजेड जास्त होत गेला की अंधार संपवावा लागत नाही , तो आपोआप संपतो.  म्हणूनच कवी विष्णुदास म्हणतात माझ्या सारख्या पतिताच्या पापराशींहूनही  , तुझी  पावन करण्याची क्षमता अतिशय जास्त आहे.   


"आई" केवळ शरीर-प्रक्रियेने घडत नाही तर मन-भावनांनी घडते.  "आई" होणे अपघातही असू शकतो पण "आईपण" मात्र संस्कारांनी  बाणवावा लागतो.   

आईला परोपरी समजावत आहे की तू झोपू नको ना गं ! पण आई ही मुळातच समजदार असते तिला समजवावे कसे ? हे ही मुलाला कळत नाही ना !  


आई झोपी गेली की चुकार , व्रात्य मुले नको त्या खोड्या करतात न् शहाणी मुलेही उगाच गमजा करतात.  जगदंबा जर झोपी गेली तर जगात भवसागर पार करूच शकणार नाहीत. ब्रह्मज्ञानीसुद्धा त्यांच्या ब्रह्मज्ञानापासून चळतील. 


 गृहकृत्यदक्ष आई गाढ झोपली तर चोरटे लूटपाट , प्रसंगी जीवहत्याही करू शकतात. जगदंबेच्या झोपण्याने कामक्रोधरूपी षड्रिपु  घरात शिरतील आणि सन्मार्गी साधकालाही आडमार्गी नेतील न् जीवाची अवनती करतील . 


जुन्या काळी घरात साप , विंचू  निघणे सामान्य असायचे. झोपलेल्याला वा गाफील असलेल्याला  दंश करायचे. जगदंबा झोपली तर  टपून बसलेला काळसर्प जीवात्म्याला दंश करणारच.  त्याला कोणाचीही भीती उरणार नाही.   अतिशय आर्ततेने , परोपरीने आईला विनवीत आहे की तू झोपी जाऊ नकोस.


आई ग , तू निष्ठूर होऊ नकोस , तू तर कृपाळू ,कनवाळू आहेस . माझी उपेक्षा कां ग करतेस ?  मुलांना कायमच वाटतं की आईने फक्त माझ्याच कडे लक्ष द्यावे , फक्त माझाच लाड करावा. सतत माझ्याच अवती भवती असावे. 


  आजकालच्या भाषेत "मी ममाज् बॉय" आहे .  शिवाय  'तुजविण अंबे मज कोण तारी' हे तर सत्यच आहे ना ? तुलाच अनन्यशरणागत आहो मी , जगदंबे तूच मला सांभाळ. आईचा पदर म्हणजे बाळाचे अभयस्थान असते.  मायच्या पदराची ऊब मोठ्ठ्या व्यक्तिमत्त्वालाही तान्हं करते.(अभिमानाच्या /बडेजावपणाच्या  झुला ,आईच्या ऊबदार  मायेत गळून पडायलाच हव्या.) 

  

  "त्वमेव माता च पिता त्वमेव , 

  त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव

   त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ,

    त्वमेव सर्वं मम देव देव " ॥  

     तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो ।

तुमही हो बंधू, सखा तुमही हो ॥

तुम ही हो साथी, तुम ही सहारे ।

कोई ना अपना सिवा तुम्हारे ॥

ह्याच  भावनेला किती सुरेख खुलवले आहे ना  या कडव्यातून ?  मराठी वाङ्मयाची महत्ता इथेही दिसून येते. आईशिवाय जगात इतर कोणालाही खरा कळवळा नसतो , हे खरेच आहे. 



     अजूनही रेणुका-आई म्हणावं तसं लक्ष देत नाही , आर्जवाला जुमानत नाही ; हे बघून विष्णुदास म्हणतात की तुला परशुरामची शपथ आहे , माझी आबाळ करू नकोस . ( परशुराम हे भार्गव गोत्रोत्पन्न म्हणजे भृगु ऋषींच्या चौतीसव्या पिढीत जन्मले , असे म्हणतात . शिवाय परशुरामाचे वडील- जमदग्नी हे भार्गव वशांचे प्रवर प्रमुख आहेत . )  

     

लहान मुलां इतके मानसशास्त्र कोणालाही येत नाही. आईला वळविण्यासाठी रडतील , पडतील ,  काय काय शपथा घालतील , कोणा कोणाचा धाक दाखवतील सांगता येत नाही. इथं बालमानसिकता छानच व्यक्त झाली आहे.



      'तुझ्या शिवाय मी किती पोरका आहे' हे सांगून झाले. तू दुर्लक्ष केल्यावर  घोर दुर्गती होईल , हे  ही सांगून झाले.  निर्वाणीचा इशारा देऊन झाला ,  आर्जव झाले , अनन्यशरणागती झाली , धाकही दाखवून झाला. आता मात्र  तिच्याच कर्तव्यपरायण लौकिकाला साद घालणे हेच शेवटचे शस्त्र ठरते. 

      "तू जर मला जवळ केलेस तर तुझीच कीर्ती वाढेल , माझे काय ? मी तर भक्ती करीनच ! तुझे नाव तूच सांभाळ ग बाई !" 

      The ball in your court madam , असाच काहीसा भाव यातून व्यक्त होत आहे. 

      आई-लेकराचा अनुबंध विष्णुदासांच्या लेखणीतून सहज उतरतो न् तो वाचकांच्या मनाचा ठाव घेतो. शिवाय अध्यात्माची आवड असलेल्यांना चिंतन करण्यास भाग पाडतो तर सामान्य वाचकांनाही भावविभोर करतो , यात शंका नाही. 

      ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

      नागपुर 


Tuesday, September 22, 2020

#सहजोक्त.

 माझी रेणुका माऊली....


'माझी रेणुका माऊली' ऊषा मंगेशकरांनी गायलेलं हे गाणं नवरात्रामध्ये बरेच ठिकाणी ऐकायला येते . अतिशय सुरेख चाल आणि  मंगेशकरी स्पर्श यामुळे हे गाणं लोकप्रिय तर होणारच ना !  गुगलवर शोध घेतला तर गीतकार म्हणून विष्णुदास हे नाव दाखवतात ! बिचारे विष्णुदास महाराज ! त्यांना काय कल्पना ? की भक्तशिरोमणी  , प्रसिद्धिपराङ्मुख असे ते पुढे  'गीतकार' म्हणून पडद्याच्या मागे राहतील न् आवाज देणारे त्यांची प्रसिद्धी करतील !  कालाय तस्मै नमः । 


माझी रेणुका माऊली।

कल्पवृक्षाची साउली ॥१॥

जैसी वत्सालागी गाय ।

तैसी अनाथाची माय ॥२॥

हाके सरसी घाई घाई ।

वेगे धावतची  पायी ॥३॥

आली तापल्या उन्हात ।

नाही आळस मनात ॥૪॥

खाली बैस घे आराम ।

मुखावरती आला घाम ॥५॥

विष्णुदास आदराने ।

वारा घाली पदराने ॥६॥ 


हे गाणं भक्तिगीत म्हणून  सर्वत्र गाजते . 

शाक्तपंथात देवीला स्त्री-ऊर्जा म्हणून पूजतात . इथे मात्र देवीच्या मातृरूपाची पदोपदी अाळवणी दिसते.  


  ' मानव' जर निसर्गाची उत्तम निर्मिती असेल तर स्त्री ही नक्कीच  सर्वोत्तम निर्मिती होय , यात शंका नाही. पण याच स्त्रीचे मातृत्वरूप हे जगातील सर्वोच्च व श्रेष्ठ अशी अवस्था असते. मातृत्व ही वृत्ती आतून येणारी न् सर्व विश्वाला   वात्सल्यधाग्यात बांधणारी असते. 

  " स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची आई असते"  या उक्तीला देवीही अपवाद नाही.  बाळाचे रक्षण करण्याच्या वेळी स्त्री अतिशय कठोर व सामर्थ्यशाली होते .  बाळासाठी संपूर्ण जगाशी ती वैर घेऊ शकते न् कोणत्याही परिस्थितीत बाळाला राखण्याचा आटोकाट प्रयत्न करते. 

  

 कल्पवृक्ष म्हणजे कल्पना करू ते सर्व सत्यात आणणारा वृक्ष . प्रत्येकच आई आपल्या बाळासाठी कल्पवृक्षच असते. तिच्या क्षमतांच्याही जास्त मुलांना मिळावे यासाठी झटत असते.  

गाय जशी धावत वासरापाशी येते , वासराला मिळावे म्हणून पान्हा चोरते , तशी रेणुकासुद्धा  सर्व अनाथांसाठी धावून येते. 

बाळाचा टाहो ऐकला की हातचे काम सोडून आई धावते , तशीच रेणुकाही येते. भक्ताने आर्ततेने आळवले की ती उन्हातान्हात  धावत येते. विदर्भातले उन्ह तेव्हाही प्रसिद्ध असावे.  

बाळासाठी आई सतत जागरुक असते . बाळाच्या संगोपनात  आळस , कामचुकारपणा याला थाराच नसतो.  तशी रेणुकाही  धावत आली. 


आईचे कर्तव्य रेणुका पुरेपूर पार पाडतेच . 'क्वचिदपि कुमाता न भवति।' हे त्रिवार सत्य आहे.  


आईने तर आईपण जागे ठेवले , आता बाळाची वेळ आली. "माझ्यासाठी आई इतके ताप न् कष्ट सहन करते" , याची जाणीव असलेला सुपुत्र इथे विष्णुदासांच्या पदांतून दिसतो.


"आई , तू उन्हात घाईने आलीस , तुझ्या मुखावर घाम आला , तू जरा बस , आराम कर "  इतके म्हणून विष्णुदास थांबत नाहीत , तर उपरण्याच्या पदराने वारा घालत आहेत.  आईच्या वात्सल्याला स्वतःच्या जाणीवेतून प्रतिसाद देत आहेत. आई आणि मुलाचे मनोबंध जगात अद्वितीय असतात.  ते या अभंगातून  उलगडलेले  दिसतात. 


बरेचसे धार्मिक वा संत वाङ्मय  प्रमाणभाषा-बोलीभाषा , प्रस्थापित साहित्य-विद्रोही साहित्य इत्यादी इत्यादी   कोणत्याही  वादात न फसता ,  या रचना सर्वतोमुखी होतातच आणि रचनांचा आशयही सर्वांना कळतो.  हेच या साहित्याचे मांगल्य आहे. 

  मला नेहमी विस्मय  होतो की कोण्या एका कोप-यात रचलेले हे  संत वाङ्मय असो वा धार्मिक वाङ्मय , संपूर्ण मराठी विश्वात वाणवल्या जाते. 

इतक्या सोप्या , आशयघन तरीही उच्च साहित्यिक मूल्य असलेल्या रचना या अभ्यासानी घडतात की तपाने ? हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

Monday, September 21, 2020

#सहजोक्त


विष्णुदास ~कविराज 

भारतात देविभक्ती सर्वत्र प्रचलित आहे.

बंगालची दुर्गा/काली , गुजराथेत दुर्गा , काश्मीरात शारदा , एकूणच भारतीय उपखंडांत ५१ शक्तिपीठे पसरलेली आहेत. ही सर्व शक्तिपीठे देवि-उपासनेच्या अतूट  धाग्याने जोडलेली आहेत. विभिन्नतेतही एकजिनसीपणा टिकवून ठेवण्याच्या अनेक कारणांपैकी हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे. 


 शाक्तपंथ म्हटला की 'तंत्र/तांत्रिक' यांचे जंजाळ आलेच असे सामान्यांना वाटते. वामाचतंत्राने भारतीयांच्या मनात गूढ व जुगुप्सित भाव निर्माण केले आहे. त्यामुळे शक्ति-उपासनेकडे बघण्याची सामान्यांची दृष्टी गढूळ झाली. परंतु 'सत्यं शिवं सुंदरम्' हे भारतीयांच्या गुणसूत्रातील शाश्वत सत्य आहे. वात्सल्य-प्रेम-भक्ती यांच्या द्वारे शक्तीची उपासना करणारे अनेक तीर्थक्षेत्रही भारतीय उपखंडात भरभराटीला आले आणि त्यांनी वामाचाराला गुप्त-लुप्त होण्यास हातभार लावला. 


 भागवत् धर्मातील प्रेमभक्ती विष्णुदासांच्या रचनेतून दिसते. अन्य पंथ मोक्षाला अंतीम ध्येय मानतात मात्र भागवत्धर्म मोक्षाहूनही भगवत्भक्ति व भगवत्प्रेम यांना अधिक महत्त्व  देतात.

 विष्णुदासांच्या रचनेतून आपल्याला हीच  वात्सल्यरसयुक्त अनन्यसाधन भक्ती दिसून येते.


इथे विष्णुदास रचित एक आरती देत आहे. हीच आरती पहिले कां निवडली ? तर माझ्या सास-यांना ती फारच आवडायची. महालक्ष्म्यांना आवर्जून हीच आरती म्हणायचे . या आरतीतील लयबद्ध ,पुनरुक्त ठेका मनाला आनंदित करतो. 


जय जय जगदंबे श्री अंबे 

रेणुके कल्पकदंबे

 जय जय जगदंबे ॥ध्रु॥

 अनुपम स्वरूपाची  तुझी धाटी 

 अन्य नसे या सृष्टी 

 तुजसम रुप दुसरे परमेष्ठी 

 करिता झाला कष्टी 

 शशी रस रसरसला वदनपुटी

  दिव्य सुलोचन दृष्टी 

  सुवर्ण रत्नाच्या शिरिमुकुटी

   लोपति रवि शशि कोटी 

   गजमुखि  तुज स्तविले हेरंबे 

   मंगळ सकाळारंभे ॥१॥ 

    कुंकुमचिरि शोभे मळवटी

     कस्तुरी टिळक लल्लाटी

      नासिक अतिसरळ, हनुवटी 

      रुचिरामृतरस ओठी 

      समान जणु लवल्या धनुकोटी

      आकर्ण  लोचन भ्रुकुटी

       शिरि  निट भांग वळी 

       उफराटि कर्नाटकाची धाटी 

       भुजंग निळरंगा परि शोभे 

       वेणी  पाठीवर लोंबे ॥२॥

        कंकणे कनकाची मनगटी 

        दिव्या मुद्या दश बोटी

         बाजूबंद नगे बाहवटी 

         चर्चुनी केशर उटी 

         सुगंध पुष्पाचे हार कंठी

          बहु मोत्यांची दाटी 

          अंगी नवी चोळी जरीकाठी

           पित पितांबर तगटी

       पैंजण पदकमली अति शोभे 

       भ्रमर धावती लोभे ॥३॥ 

           साक्षप तू क्षितिच्या तळवटी

            तूच स्वये जगजेठी 

       ओवाळिती आरती दीपताटी         घेऊनी करसंपुटी 

       करुणामृत  हृदये संकटी

       धावसि भक्तांसाठी 

            विष्णुदास सदा बहुकष्टी

             देशिल जरी निजभेटी 

             तरी मग काय उणे या लाभे

             धाव पाव अविलंबे ॥૪॥

             

  चार कडव्यांची ही आरती रेणुकाभक्तामध्ये प्रसिद्ध आहे. काव्यगुणांचा विचार करता यात यमक , अनुप्रासादी अलंकारांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. आजच्या दैनंदिन (प्रमाण) मराठीतून काहीसे हद्दपार झालेले अनेक शब्द या आरतीत आहेत. जसे धाटी , चिरी , उफराटी , मनगटी ,नगे ,मुद्या  वगैरे. 

  आई ही ऐश्वर्यवती , सौभाग्यसंपन्न असून  सौभाग्यदायिनी आहे. त्यामुळे तिच्या दागदागिन्यासह भरजरी वस्त्रांचे वर्णन येथे केले आहे . रत्नांचे मुकूट  , दहाही बोटांत अंगठ्या , सोन्याच्या बांगड्या , हि-याचे बाजुबंद  , मोत्यांच्या हारांची दाटी , पैंजणे , जरीकाठी चोळी न् पितांबरी (रेशमी व पिवळ्या रंगांचे) पिवळे पातळ असे वर्णन आहे.

  उपमा , रूपकदी अलंकारयुक्त समास यांचाही सुयोग्य उपयोग केला आहे. पदकमल ,करुणांमृत , शिरीमुकुटी  वगैरे वगैरे.

  होयसळ-राजवटींच्याकाळी दक्षिणेकडे भारतीय संस्कृती व प्रगती अतिविकसित झालेली होती. कर्नाटक हे  तेव्हाचे प्रगत साम्राज्य होते. होयसळ कालीन मूर्ती ह्या अतिशय देखण्या व सौदर्यांचा परिपाक होत्या. मूर्तिकला व इतरकलांसाठी ते होयसळयुग अतिशय परमोत्कर्षाचे होते. या आरतीत देवीचे वर्णन करताना कर्नाटकाची धाटी (built)  म्हटले आहे.

   देवीच्या केसांचे वर्णन करताना,  'डोक्याचा नीट भांग पाडला आहे ' असे सांगून  ' निळसर , जाड , सापासारखी (एकसारखी) वेणी पाठीवर लोंबते आहे' ,  असे म्हटले आहे. निळसर झाक असलेले केस हे पतिव्रता स्त्रीचे लक्षण मानले जाते .

      आईच्या भुवया (दोन्ही) धनुष्याच्या टोकासारख्या तीव्र , अणुकुचिदार न् वक्र आहेत. (धनुकोटी = धनुष्याच्या टोकासारखे)  आकर्ण लोचन म्हणजे डोळे मोठे व लांब असे सुंदर आहेत.  

      

 कपाळावर कुंकुम (केसर) चिरी (रेष) आहे. कस्तुरीचा टिळा आहे. (शाक्तपंथाची खूण म्हणजे टिळा)   नाक सरळ आहे. खाली हनुवटी आटोपशीर आहे. अोठ रसरसित (तजेलदार) आहेत. (शुष्क निस्तेज नाहीत)  सर्वांगाला केशराची उटी लावली आहे.

 

  अशा आईची महती गात विष्णुदास दीपयुक्त  ताटानी (तबकानी ) अोवाळत आहेत. आईने लगेच येऊन  (अविलंब) हात धरून घ्यावेत न्  नीजभेट द्यावी.  

  

  अशा प्रकारे आईची विनवणी करताना तिच्या संपूर्ण स्वरूपाचे अत्यंत उत्कट व बारकाव्यांसह वर्णन , करून तिने बालकाला जवळ घ्यावे  हा या आरतीचा मूळ सारांश होय.

   या आरतीतून शक्तीची मातृरूपाने आळवणी केली आहे. 

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

   

  

             

Sunday, September 20, 2020

सहजोक्त

 #कवि विष्णुदास.

माहूर हे साडेतीन शक्तिपीठातील एक जागृत-तीर्थक्षेत्र आहे.

शक्तिपीठांचा स्वतःचा असा एक इतिहास असतो , संस्कृती असते. माहूरलाही ती आहे. माहूर बाबतील अजून एक  खास वैशिष्ट्य आहे.  रेणुका देवीचे अभंग , जोगवे , पदे , आरत्या आदी विपुल भक्तिसाहित्य सर्वत्र सहज उपलब्ध आहे.

 धार्मिकसाहित्याकडे 'साहित्य'  म्हणून बघण्याचा कल नसतोच. धार्मिकसाहित्यावर श्रद्धेचा असा काही पगडा असतो की त्या साहित्याचा रसास्वाद घेण्यापेक्षा , त्यातील भाषिक सौंदर्य आस्वादण्यापेक्षा , निव्वळ भक्तिभावाने ते साहित्य म्हणणे , यातच सगळे भाविक समाधानी असतात.  आणि इतर अभ्यासक या साहित्याच्या वाटी जातच नाहीत. यामुळे  पद , पाळणा , शेजारती , विडा , प्रसाद , जोगवा , आरती वगैरे वगैरे  रचणारे रचनाकार  साहित्यक्षेत्रात तसे अप्रसिद्ध राहतात. 

आरती संपवून प्रसादाची घाई जास्त असल्यामुळे आरतीच्या शेवटच्या चरणातील कवीची नाममुद्रा वाचूनही त्या पलीकडे काहीच माहीत नसते. याच वागणुकीने , अत्यंत धार्मिकपणा असूनही  धार्मिक साहित्यिकांना अज्ञातवास सोसावा लागतो.  नावापलीकडे ते बरेचसे अज्ञातच असतात.

रेणुकेसंबंधी दर्जेदार , अत्युच्च साहित्यिकमूल्य असलेले विपुल लेखन करणारे  "विष्णुदास"  हे ही तसे अज्ञातच  ठरले .  अहमदनगरातील धांदरफळ हे मूळ गाव असलेले  विष्णुदास यांचे मूळ नाव कृष्णाजी रावजी धांदरफळे होते. त्यांचा जन्म  सन 1844  सातारा येथे  झाला तर   माहूर (मातापुर)  येथे सन1917  मध्ये समाधीस्थ झाले.   शेवटच्या काळात  त्यांनी संन्यास घेतला होता त्यामुळे  त्यांचे   नाव परिव्राजकाचार्य  पुरुषोत्तमानंद सरस्वती असे  झाले होते. सर्व साहित्यात मात्र "विष्णुदास" हीच त्यांची नाममुद्रा होती. 

विष्णुदास यांच्या रेणुके विषयक काही निवडक रचना अशा....

  •आली आई भवानी स्वप्नात 

  •माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साउली

  •जय जय जगदंबे श्रीअंबे रेणुके कल्प कदम्बे॥

  •जय जय रेणुके आई जगदंबे ।अोवाळू आरती मंगलारंभे ॥

•विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबरा श्री रेणुके वो । 

•जय जय रेणुके ,सदा सदय तू प्रसन्न रूपमूर्ती 

•जय जय नदिपती प्रिय तनये ।भवानी महालक्ष्मी माये 

•जय जय श्री रेणुके , अंबे मुळपीठनायके हो ,अोवाळू आरती सौभाग्य दायके हो ॥

•अखिल पतितांची दुरित कृति केली।

•लक्ष कोटी चंडकीर्ण सुप्रचंड विलपती

•श्री मूळपीठ शिखर स्थळ कोटी लक्ष।

•सदा सर्वदा मोरया शारदाही ।

•जय जय विश्वपते हिमालयसुते सत्यव्रते भगवते ।

•माझि पतिताची पापकृति खोटी। 

•आम्ही चुकलो जरी तरी काही , तू चुकू नको अंबाबाई ॥

•अंबाबाई माहूर, आता राहिले दूर ।

•दीनअनाथांची आई, तुला म्हणती अंबाबाई ॥

विष्णुदास हे भक्त म्हणून थोर होतेच . ते अत्यंत अधिकारी संतपुरुष होते.  त्यांच्या साहित्यातून त्यांना जाणून घ्यावे ,  साहित्यातून भक्तीसह भाषावैभव समजून घ्यावे आणि  जे आपल्याला गवसले ते सर्वांना कळवावे या भावनेतून लेखन आरंभले आहे.

 🙏श्रीरेणुकार्पणमस्तु ।🙏

 डॉ. प्रज्ञा देशपांडे