Sunday, September 20, 2020

सहजोक्त

 #कवि विष्णुदास.

माहूर हे साडेतीन शक्तिपीठातील एक जागृत-तीर्थक्षेत्र आहे.

शक्तिपीठांचा स्वतःचा असा एक इतिहास असतो , संस्कृती असते. माहूरलाही ती आहे. माहूर बाबतील अजून एक  खास वैशिष्ट्य आहे.  रेणुका देवीचे अभंग , जोगवे , पदे , आरत्या आदी विपुल भक्तिसाहित्य सर्वत्र सहज उपलब्ध आहे.

 धार्मिकसाहित्याकडे 'साहित्य'  म्हणून बघण्याचा कल नसतोच. धार्मिकसाहित्यावर श्रद्धेचा असा काही पगडा असतो की त्या साहित्याचा रसास्वाद घेण्यापेक्षा , त्यातील भाषिक सौंदर्य आस्वादण्यापेक्षा , निव्वळ भक्तिभावाने ते साहित्य म्हणणे , यातच सगळे भाविक समाधानी असतात.  आणि इतर अभ्यासक या साहित्याच्या वाटी जातच नाहीत. यामुळे  पद , पाळणा , शेजारती , विडा , प्रसाद , जोगवा , आरती वगैरे वगैरे  रचणारे रचनाकार  साहित्यक्षेत्रात तसे अप्रसिद्ध राहतात. 

आरती संपवून प्रसादाची घाई जास्त असल्यामुळे आरतीच्या शेवटच्या चरणातील कवीची नाममुद्रा वाचूनही त्या पलीकडे काहीच माहीत नसते. याच वागणुकीने , अत्यंत धार्मिकपणा असूनही  धार्मिक साहित्यिकांना अज्ञातवास सोसावा लागतो.  नावापलीकडे ते बरेचसे अज्ञातच असतात.

रेणुकेसंबंधी दर्जेदार , अत्युच्च साहित्यिकमूल्य असलेले विपुल लेखन करणारे  "विष्णुदास"  हे ही तसे अज्ञातच  ठरले .  अहमदनगरातील धांदरफळ हे मूळ गाव असलेले  विष्णुदास यांचे मूळ नाव कृष्णाजी रावजी धांदरफळे होते. त्यांचा जन्म  सन 1844  सातारा येथे  झाला तर   माहूर (मातापुर)  येथे सन1917  मध्ये समाधीस्थ झाले.   शेवटच्या काळात  त्यांनी संन्यास घेतला होता त्यामुळे  त्यांचे   नाव परिव्राजकाचार्य  पुरुषोत्तमानंद सरस्वती असे  झाले होते. सर्व साहित्यात मात्र "विष्णुदास" हीच त्यांची नाममुद्रा होती. 

विष्णुदास यांच्या रेणुके विषयक काही निवडक रचना अशा....

  •आली आई भवानी स्वप्नात 

  •माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साउली

  •जय जय जगदंबे श्रीअंबे रेणुके कल्प कदम्बे॥

  •जय जय रेणुके आई जगदंबे ।अोवाळू आरती मंगलारंभे ॥

•विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबरा श्री रेणुके वो । 

•जय जय रेणुके ,सदा सदय तू प्रसन्न रूपमूर्ती 

•जय जय नदिपती प्रिय तनये ।भवानी महालक्ष्मी माये 

•जय जय श्री रेणुके , अंबे मुळपीठनायके हो ,अोवाळू आरती सौभाग्य दायके हो ॥

•अखिल पतितांची दुरित कृति केली।

•लक्ष कोटी चंडकीर्ण सुप्रचंड विलपती

•श्री मूळपीठ शिखर स्थळ कोटी लक्ष।

•सदा सर्वदा मोरया शारदाही ।

•जय जय विश्वपते हिमालयसुते सत्यव्रते भगवते ।

•माझि पतिताची पापकृति खोटी। 

•आम्ही चुकलो जरी तरी काही , तू चुकू नको अंबाबाई ॥

•अंबाबाई माहूर, आता राहिले दूर ।

•दीनअनाथांची आई, तुला म्हणती अंबाबाई ॥

विष्णुदास हे भक्त म्हणून थोर होतेच . ते अत्यंत अधिकारी संतपुरुष होते.  त्यांच्या साहित्यातून त्यांना जाणून घ्यावे ,  साहित्यातून भक्तीसह भाषावैभव समजून घ्यावे आणि  जे आपल्याला गवसले ते सर्वांना कळवावे या भावनेतून लेखन आरंभले आहे.

 🙏श्रीरेणुकार्पणमस्तु ।🙏

 डॉ. प्रज्ञा देशपांडे 

  















No comments:

Post a Comment

सहजोक्त.

  . शिवी ... अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते. मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे? मराठी भाषेतील ...