Monday, September 21, 2020

#सहजोक्त


विष्णुदास ~कविराज 

भारतात देविभक्ती सर्वत्र प्रचलित आहे.

बंगालची दुर्गा/काली , गुजराथेत दुर्गा , काश्मीरात शारदा , एकूणच भारतीय उपखंडांत ५१ शक्तिपीठे पसरलेली आहेत. ही सर्व शक्तिपीठे देवि-उपासनेच्या अतूट  धाग्याने जोडलेली आहेत. विभिन्नतेतही एकजिनसीपणा टिकवून ठेवण्याच्या अनेक कारणांपैकी हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे. 


 शाक्तपंथ म्हटला की 'तंत्र/तांत्रिक' यांचे जंजाळ आलेच असे सामान्यांना वाटते. वामाचतंत्राने भारतीयांच्या मनात गूढ व जुगुप्सित भाव निर्माण केले आहे. त्यामुळे शक्ति-उपासनेकडे बघण्याची सामान्यांची दृष्टी गढूळ झाली. परंतु 'सत्यं शिवं सुंदरम्' हे भारतीयांच्या गुणसूत्रातील शाश्वत सत्य आहे. वात्सल्य-प्रेम-भक्ती यांच्या द्वारे शक्तीची उपासना करणारे अनेक तीर्थक्षेत्रही भारतीय उपखंडात भरभराटीला आले आणि त्यांनी वामाचाराला गुप्त-लुप्त होण्यास हातभार लावला. 


 भागवत् धर्मातील प्रेमभक्ती विष्णुदासांच्या रचनेतून दिसते. अन्य पंथ मोक्षाला अंतीम ध्येय मानतात मात्र भागवत्धर्म मोक्षाहूनही भगवत्भक्ति व भगवत्प्रेम यांना अधिक महत्त्व  देतात.

 विष्णुदासांच्या रचनेतून आपल्याला हीच  वात्सल्यरसयुक्त अनन्यसाधन भक्ती दिसून येते.


इथे विष्णुदास रचित एक आरती देत आहे. हीच आरती पहिले कां निवडली ? तर माझ्या सास-यांना ती फारच आवडायची. महालक्ष्म्यांना आवर्जून हीच आरती म्हणायचे . या आरतीतील लयबद्ध ,पुनरुक्त ठेका मनाला आनंदित करतो. 


जय जय जगदंबे श्री अंबे 

रेणुके कल्पकदंबे

 जय जय जगदंबे ॥ध्रु॥

 अनुपम स्वरूपाची  तुझी धाटी 

 अन्य नसे या सृष्टी 

 तुजसम रुप दुसरे परमेष्ठी 

 करिता झाला कष्टी 

 शशी रस रसरसला वदनपुटी

  दिव्य सुलोचन दृष्टी 

  सुवर्ण रत्नाच्या शिरिमुकुटी

   लोपति रवि शशि कोटी 

   गजमुखि  तुज स्तविले हेरंबे 

   मंगळ सकाळारंभे ॥१॥ 

    कुंकुमचिरि शोभे मळवटी

     कस्तुरी टिळक लल्लाटी

      नासिक अतिसरळ, हनुवटी 

      रुचिरामृतरस ओठी 

      समान जणु लवल्या धनुकोटी

      आकर्ण  लोचन भ्रुकुटी

       शिरि  निट भांग वळी 

       उफराटि कर्नाटकाची धाटी 

       भुजंग निळरंगा परि शोभे 

       वेणी  पाठीवर लोंबे ॥२॥

        कंकणे कनकाची मनगटी 

        दिव्या मुद्या दश बोटी

         बाजूबंद नगे बाहवटी 

         चर्चुनी केशर उटी 

         सुगंध पुष्पाचे हार कंठी

          बहु मोत्यांची दाटी 

          अंगी नवी चोळी जरीकाठी

           पित पितांबर तगटी

       पैंजण पदकमली अति शोभे 

       भ्रमर धावती लोभे ॥३॥ 

           साक्षप तू क्षितिच्या तळवटी

            तूच स्वये जगजेठी 

       ओवाळिती आरती दीपताटी         घेऊनी करसंपुटी 

       करुणामृत  हृदये संकटी

       धावसि भक्तांसाठी 

            विष्णुदास सदा बहुकष्टी

             देशिल जरी निजभेटी 

             तरी मग काय उणे या लाभे

             धाव पाव अविलंबे ॥૪॥

             

  चार कडव्यांची ही आरती रेणुकाभक्तामध्ये प्रसिद्ध आहे. काव्यगुणांचा विचार करता यात यमक , अनुप्रासादी अलंकारांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. आजच्या दैनंदिन (प्रमाण) मराठीतून काहीसे हद्दपार झालेले अनेक शब्द या आरतीत आहेत. जसे धाटी , चिरी , उफराटी , मनगटी ,नगे ,मुद्या  वगैरे. 

  आई ही ऐश्वर्यवती , सौभाग्यसंपन्न असून  सौभाग्यदायिनी आहे. त्यामुळे तिच्या दागदागिन्यासह भरजरी वस्त्रांचे वर्णन येथे केले आहे . रत्नांचे मुकूट  , दहाही बोटांत अंगठ्या , सोन्याच्या बांगड्या , हि-याचे बाजुबंद  , मोत्यांच्या हारांची दाटी , पैंजणे , जरीकाठी चोळी न् पितांबरी (रेशमी व पिवळ्या रंगांचे) पिवळे पातळ असे वर्णन आहे.

  उपमा , रूपकदी अलंकारयुक्त समास यांचाही सुयोग्य उपयोग केला आहे. पदकमल ,करुणांमृत , शिरीमुकुटी  वगैरे वगैरे.

  होयसळ-राजवटींच्याकाळी दक्षिणेकडे भारतीय संस्कृती व प्रगती अतिविकसित झालेली होती. कर्नाटक हे  तेव्हाचे प्रगत साम्राज्य होते. होयसळ कालीन मूर्ती ह्या अतिशय देखण्या व सौदर्यांचा परिपाक होत्या. मूर्तिकला व इतरकलांसाठी ते होयसळयुग अतिशय परमोत्कर्षाचे होते. या आरतीत देवीचे वर्णन करताना कर्नाटकाची धाटी (built)  म्हटले आहे.

   देवीच्या केसांचे वर्णन करताना,  'डोक्याचा नीट भांग पाडला आहे ' असे सांगून  ' निळसर , जाड , सापासारखी (एकसारखी) वेणी पाठीवर लोंबते आहे' ,  असे म्हटले आहे. निळसर झाक असलेले केस हे पतिव्रता स्त्रीचे लक्षण मानले जाते .

      आईच्या भुवया (दोन्ही) धनुष्याच्या टोकासारख्या तीव्र , अणुकुचिदार न् वक्र आहेत. (धनुकोटी = धनुष्याच्या टोकासारखे)  आकर्ण लोचन म्हणजे डोळे मोठे व लांब असे सुंदर आहेत.  

      

 कपाळावर कुंकुम (केसर) चिरी (रेष) आहे. कस्तुरीचा टिळा आहे. (शाक्तपंथाची खूण म्हणजे टिळा)   नाक सरळ आहे. खाली हनुवटी आटोपशीर आहे. अोठ रसरसित (तजेलदार) आहेत. (शुष्क निस्तेज नाहीत)  सर्वांगाला केशराची उटी लावली आहे.

 

  अशा आईची महती गात विष्णुदास दीपयुक्त  ताटानी (तबकानी ) अोवाळत आहेत. आईने लगेच येऊन  (अविलंब) हात धरून घ्यावेत न्  नीजभेट द्यावी.  

  

  अशा प्रकारे आईची विनवणी करताना तिच्या संपूर्ण स्वरूपाचे अत्यंत उत्कट व बारकाव्यांसह वर्णन , करून तिने बालकाला जवळ घ्यावे  हा या आरतीचा मूळ सारांश होय.

   या आरतीतून शक्तीची मातृरूपाने आळवणी केली आहे. 

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

   

  

             

No comments:

Post a Comment