माझी रेणुका माऊली....
'माझी रेणुका माऊली' ऊषा मंगेशकरांनी गायलेलं हे गाणं नवरात्रामध्ये बरेच ठिकाणी ऐकायला येते . अतिशय सुरेख चाल आणि मंगेशकरी स्पर्श यामुळे हे गाणं लोकप्रिय तर होणारच ना ! गुगलवर शोध घेतला तर गीतकार म्हणून विष्णुदास हे नाव दाखवतात ! बिचारे विष्णुदास महाराज ! त्यांना काय कल्पना ? की भक्तशिरोमणी , प्रसिद्धिपराङ्मुख असे ते पुढे 'गीतकार' म्हणून पडद्याच्या मागे राहतील न् आवाज देणारे त्यांची प्रसिद्धी करतील ! कालाय तस्मै नमः ।
माझी रेणुका माऊली।
कल्पवृक्षाची साउली ॥१॥
जैसी वत्सालागी गाय ।
तैसी अनाथाची माय ॥२॥
हाके सरसी घाई घाई ।
वेगे धावतची पायी ॥३॥
आली तापल्या उन्हात ।
नाही आळस मनात ॥૪॥
खाली बैस घे आराम ।
मुखावरती आला घाम ॥५॥
विष्णुदास आदराने ।
वारा घाली पदराने ॥६॥
हे गाणं भक्तिगीत म्हणून सर्वत्र गाजते .
शाक्तपंथात देवीला स्त्री-ऊर्जा म्हणून पूजतात . इथे मात्र देवीच्या मातृरूपाची पदोपदी अाळवणी दिसते.
' मानव' जर निसर्गाची उत्तम निर्मिती असेल तर स्त्री ही नक्कीच सर्वोत्तम निर्मिती होय , यात शंका नाही. पण याच स्त्रीचे मातृत्वरूप हे जगातील सर्वोच्च व श्रेष्ठ अशी अवस्था असते. मातृत्व ही वृत्ती आतून येणारी न् सर्व विश्वाला वात्सल्यधाग्यात बांधणारी असते.
" स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची आई असते" या उक्तीला देवीही अपवाद नाही. बाळाचे रक्षण करण्याच्या वेळी स्त्री अतिशय कठोर व सामर्थ्यशाली होते . बाळासाठी संपूर्ण जगाशी ती वैर घेऊ शकते न् कोणत्याही परिस्थितीत बाळाला राखण्याचा आटोकाट प्रयत्न करते.
कल्पवृक्ष म्हणजे कल्पना करू ते सर्व सत्यात आणणारा वृक्ष . प्रत्येकच आई आपल्या बाळासाठी कल्पवृक्षच असते. तिच्या क्षमतांच्याही जास्त मुलांना मिळावे यासाठी झटत असते.
गाय जशी धावत वासरापाशी येते , वासराला मिळावे म्हणून पान्हा चोरते , तशी रेणुकासुद्धा सर्व अनाथांसाठी धावून येते.
बाळाचा टाहो ऐकला की हातचे काम सोडून आई धावते , तशीच रेणुकाही येते. भक्ताने आर्ततेने आळवले की ती उन्हातान्हात धावत येते. विदर्भातले उन्ह तेव्हाही प्रसिद्ध असावे.
बाळासाठी आई सतत जागरुक असते . बाळाच्या संगोपनात आळस , कामचुकारपणा याला थाराच नसतो. तशी रेणुकाही धावत आली.
आईचे कर्तव्य रेणुका पुरेपूर पार पाडतेच . 'क्वचिदपि कुमाता न भवति।' हे त्रिवार सत्य आहे.
आईने तर आईपण जागे ठेवले , आता बाळाची वेळ आली. "माझ्यासाठी आई इतके ताप न् कष्ट सहन करते" , याची जाणीव असलेला सुपुत्र इथे विष्णुदासांच्या पदांतून दिसतो.
"आई , तू उन्हात घाईने आलीस , तुझ्या मुखावर घाम आला , तू जरा बस , आराम कर " इतके म्हणून विष्णुदास थांबत नाहीत , तर उपरण्याच्या पदराने वारा घालत आहेत. आईच्या वात्सल्याला स्वतःच्या जाणीवेतून प्रतिसाद देत आहेत. आई आणि मुलाचे मनोबंध जगात अद्वितीय असतात. ते या अभंगातून उलगडलेले दिसतात.
बरेचसे धार्मिक वा संत वाङ्मय प्रमाणभाषा-बोलीभाषा , प्रस्थापित साहित्य-विद्रोही साहित्य इत्यादी इत्यादी कोणत्याही वादात न फसता , या रचना सर्वतोमुखी होतातच आणि रचनांचा आशयही सर्वांना कळतो. हेच या साहित्याचे मांगल्य आहे.
मला नेहमी विस्मय होतो की कोण्या एका कोप-यात रचलेले हे संत वाङ्मय असो वा धार्मिक वाङ्मय , संपूर्ण मराठी विश्वात वाणवल्या जाते.
इतक्या सोप्या , आशयघन तरीही उच्च साहित्यिक मूल्य असलेल्या रचना या अभ्यासानी घडतात की तपाने ? हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
मस्त लिहिलं स ....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete🙏🙏
ReplyDelete