Saturday, January 16, 2021

#सहजोक्त

 #मातृतीर्थ.

माहूर म्हणजे मातापुर . प्राचीन काळापासून  पुण्यनगरी. आई रेणुकेचे पवित्र स्थान . तसेच अनेक ऋषिमुनींची तपोभूमी. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक स्थान. डोंगरराजींमध्ये  कीर्र वनराईत आईचे वसतीस्थान . 


मधल्याकाळात जंगलतोड , शहरीकरण , रस्तेविकास  आदींमुळे  जंगल विरळ झाले होते.  भूजलपातळी न् पर्यावरणावरही याचा कुप्रभाव पडत असणारच. याची प्रत्यक्षाप्रत्यक्ष झळ माहूरवासी  न्  यात्रेकरूंनाही बसत होती.  माहूर गडावरील  मंगल्याला या बाबींमुळे मरगळ येत होती. 


'देवालाच काळजी सर्व संसाराची '! 

या उक्तीनुसार  गेल्या दशकापासून माहूरदेवस्थानाचे विश्वस्तमंडळ , माननीय  तहसीलदार  वरणगावकर साहेब न्  सामाजिक बांधिलकी जपणारे  केदार गुरुजी या सर्वांच्या द्रष्ट्या प्रयत्नांतून वृक्षारोपण , संगोपन , वनसंवर्धन , जलस्तर संवर्धन , जलकुंडांची सफाई न् देखभाल , प्राचीन वारस्यांची जपणुक व सौंदर्यीकरण आदी सातत्याने सुरु आहे.

या सर्वांच्या प्रयत्नांना अात्ता आत्ता जरासे फळ दिसू लागले आहे. 



 सुदैवाने याची दखल  संवेदनशील प्रशासनाने घेतली. माननीय  जिल्हाधिकारी नांदेड , माननीय  सहायकजिल्हाधिकारी किनवट यांनी आवर्जून या क्षेत्राकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आता या तीर्थक्षेत्राचा कायापलट नक्कीच होणार  व तीर्थाची महती वृद्धिंगत होणार , यात शंका नाही.


प्रशासनानी  माहूरवासींच्या मदतीने  मधील मातृतीर्थ , भानुतीर्थ  वगैरे पुनरुज्जीवित करण्याचे तसेच  डोंगरावर न् कुंडांच्या आजुबाजूला वृक्षारोपण , स्वच्छता वगैरे नियमित करणे सुरु केले.  त्याचा परिणाम म्हणजे  आज मातृतीर्थ ,  माहूर परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ झाले आहे .  हा  सुखद दर्शनीय बदल आहेच . या शिवाय अजून एक मानाचा तुरा माहूरकरांच्या शिरपेचात खोवल्या गेला आहे.


दीपकजी मोरताळे यांच्या पुढाकाराने  "गोदावरी नदी सांसद" या संस्थेमार्फत माहूरमधील  मातृतीर्थ, भानुतीर्थ, काशीकुंड, ऋणमोचन कुंड जलाशयातील  जलस्त्रोतांचे परीक्षण करण्यात आले होते .  मातृतीर्थातील  पाण्यात विरघळलेल्या प्राणवायुचे (ऑक्सिजनचे)  प्रमाण 11.00 ppm आढळून आले.   भानुतीर्थातील पाण्यात प्राणवायुचे प्रमाण १०.५० तर  ऋणमोचन कुंडातील पाण्यात १० इतके आहे. इतके उच्च असे प्रमाण    हिमालयातील नद्या  व गंगा नदीच्या उगम क्षेत्रात आढळते.  असे पाणी मानवी शरीरास निश्चितच लाभदायक ठरेल. 


आपल्या ऋषिमुनींनी हे सगळे फायदे लक्षात घेऊनच या स्थानाची  तपोभूमी म्हणून निवड केली असावी की काय न कळे! शिवाय  आपल्या वाडवडिलांनी या स्थानांचे पावित्र्य टिकवण्याचे काम इमाने-इतबारे केले आहे. भौतिक विकास व आधुनिक साधनसामग्री नक्कीच हवी पण  समृद्ध-पर्यावरणीय वारसा जपणे हे आपले परम कर्तव्य आहे. कोणत्याही तीर्थक्षेत्राचे पावित्र्य याच निरोगी पर्यावरणावर अवलंबून असते. 

सुदैवाने माहूरला त्याचे पर्यावरणीय वैभव मिळवून देण्यासाठी आई रेणुका नक्कीच माहूरवासीयांना  ,  प्रशासनाला सद्बुद्धी देत आहे , असेच म्हणावे लागेल. 

लवकरच माहूरला  साडेतीन पिठामधील आपले जागरूक न् अग्रगणी स्थान परत मिळावे  , अशी  आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना .🙏  शुभं भवतु ॐ 🙏 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment