Friday, August 19, 2022

#सुभाषित-सहजोक्त.


ईक्षणं द्विगुणं प्रोक्तं भाषणस्येति वेधसा।

अक्षिणी द्वे मनुष्याणां  जिव्हात्वेकैव निर्मिता॥

दोन-दोनदा नीट बघावे. (परिपूर्ण विचार करून मगच)  बोलावे. यासाठीच ब्रह्मदेवाने मानवाला डोळे दोन दिलेत पण जीभ मात्र एकच दिली. 

सध्याचा जमाना स्मार्ट व फास्ट आहे.  या सुभाषितालाही काळानुरूप स्पष्ट करणं गरजेचं आहे.

कानांनी ऐकणे , डोळ्यांनी पहाणे ,  वाणीने  बोलणे , नाकाने सुंघणे , त्वचेने स्पर्शणे ही सर्व ज्ञानप्राप्तीची साधनं आहेत. यासर्वांच्या यथायोग्य  मदतीने मन+बुद्धी यांच्याद्वारे  अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व विकसित होते.   

दिसलं काही , वाचलं काही , कोणाचं ऐकलं की चट्दिशी आपली एक्सपर्ट कॉमेंट ठोकणं वा (शब्द वा कृतीतून) भडक प्रतिक्रिया देणे अजिबात योग्य नाही.  पाचही ज्ञानेंद्रियांच्या प्रक्रियेतून बुद्धीने निर्णय घेवून बोलले , वागले  तरच सार्थक होतं . नाही तर , 'बोल बोल नाऱ्या........' अशी अवस्था होते.  


 दोन हात , दोन पाय  ,  उपस्थ (जननेंद्रिय)  , पायु( गुदद्वार)   आणि जीभ   हे  पाच कर्मेंद्रियं आहेत. मुखातील वाणी जशी ज्ञानेंद्रिय आहे तशी मुखातील जीभ कर्मेंद्रिय आहे.

 जीभने चव कळते , उच्चारण नीट होण्यासाठी जीभ हवीच हवी.  तर ही जीभ एकच असून कधी कधी  बत्तीशीला पुरून उरते.  कधी ?  जेव्हा ,"क्रियेविण वाचाळता" घडते तेव्हा. 

 हातांनी सतत कार्यरत रहावे . म्हणजे कार्यकुशलता , कार्यमग्नता अत्यावश्यक आहे. ज्याचे पाय स्थिर  (म्हणजे नुसते बसून रहातात),  त्याचं मन सतत फिरत रहाते (अस्थिर असते) .  म्हणून पायांनी  सतत फिरत रहावे.  मन भिरभिरण्यापेक्षा हात-पाय जास्त क्रियाशील ठेवावे.

असे वागले तर जीभ योग्य प्रमाणातच उचकटेल ; नाही तर ठरलंच आहे ,' उचलली जीभ लावली टाळ्याला'! 


बत्तीशी जबड्यात घालाणे , बत्तीशी दाखवणे  वगैरे लीला जीभेच्या फाजीलतेने घडून निष्क्रिय माणसाची फजिती होऊ शकते. 

म्हणून , दोन-दोनदा पहा , विचार करा , पहिले कृती करा मगच बोला.  "आधी केले , मग सांगितले" , हेच वागणं योग्य.

'बोलून विचारात पडण्यापेक्षा  विचार करून बोलावे' हे सतत ध्यानात ठेवावे. 

 समर्थांनी सांगूनच ठेवलंय , "केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे". 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

3 comments:

  1. समययोक्त.

    ReplyDelete
  2. आपल्या शरीरातही हीच पाच तत्वे संतुलित राहणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत हे निर्मितीच्या वेळेसच निश्चित झाले आहे. पंचमहाभूतांचे जसे संतुलित प्रमाण ठरवले आहे तशा त्यांच्या मर्यादांचे नियमन ही ठरलेले आहे.

    ReplyDelete