अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च
अजापुत्रं बलिं दद्यात् , देवो दुर्बलघातकः॥
एक भक्त होता. 'माझं कामं करून दे , मग तुला हवं ते बळी देईल' असं देवाला कबुल करतो. काम झाल्यावर देवाला विचारतो ,
भक्त = 'तुला बळी कशाचा देऊ? घोडा देऊ कां ?'
देव = नको .
भक्त = हत्ती देतो.
देव= नको, नको.
भक्त= मग वाघ देऊ कां ?
देव = नको रे बाबा , अजिबात नको.
भक्त = मग काय द्यावं बळी म्हणून ?
देव = शिंगही नसलेलं बकरीचे पिलू दे.
यावरून सुभाषितकार म्हणतात की देव हा दुर्बलांचा घातक असतो.
'God helps those who help themselves' अशी इंग्रजी म्हण आहे.
स्वतःच स्वतःचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण देव करतो . 'दे गा घरी ,खाटल्यावरी' म्हणणाऱ्याला देव काहीच देत नाही.
आत्मरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. 'शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम् ।' म्हणजे 'याचि दही याचि डोळा' सर्व प्राप्त करायचे असेल तर स्वतःवरच निर्भर रहावे. आत्मनिर्भरता फारच महत्त्वाची. स्वतःचे आत्मरक्षण , आत्मसन्मान वगैरे आपल्यालाच करावे लागते. देवही ते करू शकत नाही मग ग्रह-तारे वगैरें फारच दूरचे आहेत.
मग ? देव आहे की नाही ? जगात चांगुलपणा नाहीच कां ? कोणावरच विश्वास ठेवू नयेच कां ? असे विचार आणू नये मनात.
देव आहे व त्यानेच सर्वोत्तम रचना म्हणून आपल्याला मानवी देह-बुद्धी दिली. त्या बुद्धीचा वापर करून , शरीराने कष्ट करून हवं मिळवायला देवानेच सक्षम बनवले आहे.
जगात सर्वत्र चांगुलपणा आहे पण त्यासाठी आपण फारच चांगले असणं गरजेचे आहे. 'जैसी दृष्टी , वैसी दृष्टी' हेच खरे.
आत्मविश्वास ठासून भरला असेल तरच दुसऱ्यावर विश्वास ठेवावा पण विसंबून राहू नये , कारण 'जो दुसऱ्यावरी विश्वासला , त्याचा कार्यभाग बुडाला' हे खरेच आहे.
"Survival of the fittest" हे जगाचे तत्त्व आहे. याबाबत जग फारच निष्ठुर असते. म्हणून
"ख़ुदी को कर बुलंद इतना
कि हर तक़दीर से पहले
ख़ुदा बंदे से ख़ुद पूछें
बता तेरी रज़ा क्या है।"
जगाच्या या विशाल पसाऱ्यात आपलं अस्तित्व देवाने निर्माण केलं . आता ओळख निर्माण करणे हे आपल्याच हातात आहे. आपल्या कर्तृत्वाने असे कार्य करायला हवे की देवालाही त्याची दखल घेणं भाग पडेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
विचारांमध्ये स्वच्छता व पारदर्शकता येण्यासाठी हे सर्व नकारात्मक विचार बाजूला टाकून आपल्या मनाच्या आतल्या आवाजाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी राग, भीती, द्वेष, अहंकार, असूया अशा नकारात्मक भावनांचा त्याग करून आनंद, प्रेम, वात्सल्य, निर्भयता अशा भावनांना आपल्याला जवळ करायला शिकले पाहिजे. हे सर्व करताना आपण आजपर्यंत आपले सुख, दुःख, आनंद हे दुसऱ्यावर अवलंबून ठेवले होते, हे तुमच्या लगेचच लक्षात येईल.
ReplyDeleteबरोबर
Deleteसुभाषितांचे निरुपण यथार्थ आहे. 👌
ReplyDelete"स्वकर्तृत्वाने व स्वबळावर मार्गक्रमण" हा युक्तिवाद मान्य 👌
धन्यवाद
ReplyDelete