यद्यपि खदिरारण्ये
गुप्तो वस्ते हि चम्पको वृक्षः ।
तदपि च परिमलमतुलं
दिशि दिशि कथयेत् समीरणस्तस्य ॥
सुभाषिते ही संस्कृतभाषेने दिलेली अनमोल संपत्ती आहे. मानवी व्यक्तिमत्त्वाला निव्वळ परिपूर्त करते असे नाही तर समृद्धही करते. जीवनाला आवश्यक परंतु नगण्य अशा अनेक छोट्या छोट्या पैलुंवर अत्यल्प शब्दांतून मार्मिक भाष्य करण्याचे कसब सुभाषितात असते. या मार्मिक भाष्यातून आपलं जीवन समृद्ध करावं की वाचून सोडून द्यावं , हे पात्रावर अवलंबून आहे.
आता वरचेच सुभाषित बघा ना !
खैराच्या (ज्याच्यापासून काथ/कात बनवतात ते झाड) जंगलात चाफ़्याचे झाड लपून जरी बसले तरी त्याच्या फुलांचा अतुलनीय सुगंध , वारा दिशा दिशांना सांगत सुटतो.
चाफ्याच्या झाडाला फुले येई पर्यंतच ते झाड गुप्त राहू शकते. कारण त्याच्या पाने-शाखा वगैरेंना सुवास नाही. पण फुले बहरली की त्याचा वनवास , अज्ञातवास संपतोच संपतो. मग त्याला लोकमान्याता , लोकप्रियता मिळते . चाफ्याला फूलं तर येणारच ना ! मग 'तावत्काल प्रतीक्षस्व'।
फुलं येण्या इतपत पोषण स्वतःचे स्वतः मिळवावेच लागते , फुले येण्या इतकी प्रौढता लाभावी लागते आणि हे सर्व होण्यासाठी बरेच वर्ष धीर-शांततेने काळ जाऊ द्यावाच लागतो.
संत कबीराचा दोहा आहे -
धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय।
शंभर घागरी पाणी टाका , खत टाका , वज करा पण झाडाला फळ त्याचा ऋतु आल्यावरच येईल. त्यामुळे शांत समाधानाने वाट बघत स्वतःला कणाकणाने समृद्ध करत राहणे , योग्य ठरते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
छान्.
ReplyDelete🙏🙏🙏
Delete