Monday, October 17, 2022

#सुभाषित-सहजोक्त..

 


यस्यास्ति वित्तं सः नरः कुलीनः, 

सः पण्डितः सः श्रुतवान् गुणज्ञः ।

सः एव वक्ता सः च दर्शनीयः,

 सर्वे गुणाः काञ्चनम् आश्रयन्ते ॥

 

या श्लोकाचा भावार्थ थोडक्यात असा -  ज्या व्यक्तीजवळ पैसा आहे तोच कुलीन  , तोच विद्वान् , तोच ज्ञानी , तोच वक्ता , तोच दिसायलाही उत्तम कारण सर्वेच सद्गुण सोन्याच्या (श्रीमंतीच्याच) आश्रयाने रहातात.  


"असेल  पैसा , तोवर  बैसा" , 

"दाम करी काम , बिबी करे सलाम" 

 'बाप बडा न भय्या , सबसे बडा रुपय्या' 

 असे अनेक  वाक्प्रचार समाजात प्रसिद्ध आहेत .

त्याला कारणही तसेच आहे. जनसामान्यांना तसाच अनुभव असतो. 

सुभाषितेही समाजातील वास्तव आपल्या समोर उलगडतात. सुभाषिते समाजनीती शिकवतात. समाजाची रीतभात द‍खवितात तसेच  समाजवृत्तीचेही सामान्यीकरण दर्शवितात.  


ह्याच श्लोकाच्या समर्थनार्थ अजून एका श्लोकाचा दाखला देता येईल. 

किं वाससा तत्र विचारणीयम् 

वासः प्रधानं खलु योग्यतायाः । 

पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्याम् 

दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥

समुद्राने विष्णुने नेसलेले रेशमी पीतांबर बघून त्याच्या सांपत्तिक स्थितीचा अंदाज घेऊनच आपली कन्या लक्ष्मी त्याला दिली. या उलट दिगंबरावस्थेतील शंकराला पाहून विष  दिले .  श्लोक जरी गमतीदार पद्धतीने मांडला असला तरी लग्नाच्या बाजारात आजही  स्वभाव- कुलीनतेपेक्षा पॅकेजचे पारडे जड नाही ; असं कोण म्हणेल ? 

  "पैसा" महत्त्वाचा नाही , असे म्हणणारे एकतर स्वतःचे पोट पूर्ण भरलेले असल्यामुळे  वास्तवापासून अनभिज्ञ असतील किंवा पक्के दांभिक असतील किंवा ठार व्यवहारशून्य तरी असतील. 

 फक्त लग्नाच्याच बाजारात ,'बडा रुपय्या' असे चित्र आहे कां ?  नाही . साधारणपणे नातेवाईकांत , समाजातही हेच दिसते की मोठे पद , मोठी संपत्ती वगैरे असेल तर मानसन्मान मिळतो. गरीब नातेवाईक असेल तर आला काय गेला काय ? कोणी फारशी दखल घेतच नाही. श्रीमंतांचा जन्मदिवस , छोटी-मोठी अचिव्हमेंट भरभरून साजरी केल्या जाते. या उलट गरीबाचे होते.

गरीबाचे  सद्गुण लपतात , न् श्रीमंताचे दुर्गुण!  गरीबाचे अल्पसे न्यूनही  मोठ्ठ्या स्कॅमसारखे बढवून चढवून सांगितले जाते तर श्रीमंताचे भले मोठे लफडेही , त्याची कौतुक-लीला ठरते.   पैसा समाजात प्रतिष्ठा मिळवून देतो , हे त्रिवार सत्य आहे.  दोन्हीही श्लोक समाजमानसिकता विशद करतात , यात शंकाच नाही.  

आजकाल तर या मानसिकतेला संघटितपणाची  जोड मिळाली आहे. म्हणजे जे कोणी एकदा उच्चभ्रू-स्तरात गेले की त्यांचा गट तयार होतो.  ते अशा गटात सहसा कोणाला प्रवेश देत नाहीत , उलट एखाद्यामध्ये समोर येण्याची चुणूक दिसली तर मुळापासून त्याला हतोत्साही वा मार्गविचलित करायची कुठलीच संधी सोडत नाहीत. यातूनही तो  प्रगती करू लागला तर कुभांड , बदनामी , कुटाळक्या करून  समाजात त्याच्या लौकिकावर लांछन आणतातच आणतात.  (सुशात सिंह राजपूत , हे थोडे याच प्रकारातील उदाहरण होते.)  या मानसिकतेवरही  सुभाषित असेलच असेल.  शोधावे लागेल. 

सुभाषित-भांडागारातील अनेक श्लोक आजही कालसुसंगत आहेत.  ह्यातून संस्कृतसुभाषितांची महती आधोरेखित होते.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


 

Monday, October 10, 2022

#सहजोक्त.

.


तुकोबांच्या अभंगांचे मनन करताना , 'कसं वागावं?' ह्याचं  अवचित मार्गदर्शन घडते. आपलं वागणं , परत सुधरवण्याची  बुद्धी होते. दुसऱ्यातील न्यून बघण्यापेक्षा आपल्या स्वतःला घडविण्यासाठी हे अभंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

संत तुकाराम महाराज म्हणजे  त्रिकालदर्शी , सर्ववंद्य , जगद्गुरु  आहेत ;  यात शंकाच नाही.  

आता हाच अभंग बघा ना . 

૪९ ) ढालतलवारें गुंतले हे कर ! 

म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!

पेटी पडदळे सिले टोप ओझे ! 

हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!

बैसविले मला येणें अश्वावरी !

 धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!

असोनि उपाय म्हणे हे अपाय !

 म्हणे हायहाय काय करू !!४!!

तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! 

मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!

 (अभंग क्र. ४३४८)

  स्वतः विषयी भयंकर अभिमान असलेल्या सैनिकाला युद्धावर पाठवण्यासाठी ढाल , तरवार ,  पेटी-पडदळे ,  सिलेटोप वगैरे  घालून घोड्यावर चढवूनही दिले .  त्याला या सर्व साधनांचे ओझे वाटू लागले.  जे जे उपाय सांगितले ते सगळे त्याला अपाय वाटू लागले.   तो सारखा  नाराजी द‍ाखवू लागला  व  तक्रारी करू लागला की ,  "मी झुंजार आहो पण लढूच कसा?" 

  या सैनिकासारखेच ,  जीवनात बरीचशी सुखं मिळाली असूनही आपल्या तक्रारी कमी होत नाहीत.   दुसऱ्याला काय चांगलं मिळालं  न्  आपल्याला काय कमी मिळालंय ,  ह्याच्याच संशोधनात  आपली आपल्या आयुष्यातील सुख उपभोगण्याची क्षमता संपते. 

   तुकाराम  महाराज म्हणतात ,  खरे तर  'आपण परब्रह्म आहोत' ,  ह्याची जाणीव होण्यासाठी सद्गुरुला शरण जायची बुद्धी असावी लागते.  

  जिज्ञासा , समर्पण , विनम्रता , कृतज्ञता  तसेच सातत्य  हे दैवी गुण आहेत.   हे गुण जिथे , ज्याच्यात आढळतील त्या व्यक्तीला उपरोल्लिखित सैनिकासारखा अनुभव येणारच नाही. 

  हा अभंग वाचल्यावर साधारणतः आपल्या अवती भवती अशा प्रवृत्तीचे कोण कोण आढळतात ,  हेच बघण्यात वेळ जातो.  पण जरा स्वतःतच सखोल बघितले तर ? कितेक प्रसंगी आपण असे वागतो ना ?  असं नेमकं केव्हा वागतो  ?  असे परखड निरीक्षण केले तर ?  

 आपलच आयुष्य सुखावह , समाधानकारक होईल  हे निश्चितच . 

  संतसाहित्य वाचण्यापेक्षा वागण्यासाठी आहे, होय ना ?

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे . 

Friday, October 7, 2022

#सहजोक्त-सुभाषित.


विपदि धैर्यमथाभ्युदये क्षमा  

सदसि वाक्पटुता युधि विक्रमः ।

यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ

 प्रकृतिसिद्धमिदं हि महात्मनाम् ॥

  महात्मा कोणाला म्हणावं ? महात्मा नेमका कसा असावा ? यावर चर्चासत्र घडू शकतील आजकाल. 

  संस्कृत सुभाषिते म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्लीच असतात.   मानवी बुद्धी , वर्तन व भावना यांचे व्यक्तिसापेक्षता बघून त्या त्या स्तरावर उन्नयन करण्याची विलक्षण क्षमता सुभाषितांमध्ये आहे. 

  आता वरचाच श्लोक बघा ना ! 

   "महात्मा"  होण्याची नैसर्गिक , स्वाभाविक लक्षणे या श्लोकात सांगितली आहेत. 

   संकटात  धैर्य (धीर धरण्याची क्षमता) 

   भरभराटीच्या काळात क्षमाशीलता ,

   सभेमध्ये वाक्पटुत्व , 

युद्धप्रसंगी पराक्रम  गाजवणे , 

 यश मिळाल्यावर अभिरूचीसंपन्नता ,  ज्ञानसंपदानाचेच व्यसन अथवा छंद

  हे गुण ज्याच्यात उपजत वा सहज अंगीकृत आहेत , तोच महात्मा. 

   संकट म्हणजे अस्मानी-सुलतानीच नाही 

तर  व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक किंवा 

आर्थिक-शारीरिक-मानसिक वगैरे कोणतेही कां असेना ?  'धीर सोडू नये',  कळत  असून वळत नाही ;  असे सामान्य लोकं. तर अशाही परिस्थितीत स्वतःला शांत ठेवू शकणारे दृढसंकल्पित लोकं , नक्कीच महान असतात.  

   (डाऊन फॉल) अडचणीच्या  काळात  निरुपायाने समायोजन करणारे अनेक सामान्यजन असतात. पण परिस्थिती अनुकूल असून , सत्ता हाती असल्यावरही दुसऱ्यांविषयी  क्षमाशीलता , थोरपणाचेच लक्षण आहे. 

   चारचौघांमध्ये  वा जाहीर कार्यक्रमात , आपले मत वा भूमिका संयत शब्दांतून ठामपणे मांडण्यात थोरवी आहे.

    युद्धासाठी  शत्रुदेशच हवा असे नाही. सामान्यांच्या संसारात युद्धप्रसंग नेहमीच येतात.   आपल्या मानसिकतेच्या बाहेरची कोणतीही विचारधारा , आपल्याला युद्धप्रवण करते. वेगळ्या विचारधारेचा आपण (अज्ञान-अहंकार) नेहमीच विरोध करतो. मानसिक-कायिक-वाचिक विरोध कायमच सुरु असतो आपला मनातल्या मनात.  या मानसिक-युद्धात सर्वात जास्त खच्चीकरण होते ते आपल्याच स्वास्थ्य व  सर्जनशीलतेचे!  हेच जिंकणे इथे विक्रम या शब्दांतून अभिप्रेत आहे. 

     यशस्वी (सक्सेसफुल) व्यक्ती सदभिरुचिपूर्ण असाव्यात.  "पद राजाचे न् डोहाळे भिकेचे" असं व्हायला नको. 

     ज्ञानार्जनाचे व्यसनच हवे. कोणत्याही वयात औपचारिक वा अनौपचारिक शिक्षण , हे वृत्तीतच असायला हवे.  

     

वर सविस्तर सांगितलेले गुण ज्याच्यात आहेत (उपजत अथवा अर्जित, संपादित)  तोच खरा महात्मा. 


आता  हे डोक्यात ठेऊन  किती महात्मे वा किती टक्के महात्मपणा ,आपल्या आजूबाजूला शोधा बरं  दिसते  ?  आले कां कोणी डोक्यात /डोळ्यासमोर ?  शोधा शोधा ....

आता जरा स्वतःला शोधा . यातले किती गुण आपल्यात आहेत ? किती सहजसाध्य आहेत न् किती कष्टसाध्य आहेत ?  याचा प्रामाणिक विचार करा. 

महात्मा होणं आता आपल्याच हातात आहे , नाही कां ?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 

Tuesday, October 4, 2022

सहजोक्त.

 #सहजोक्त 

नको खंत बाळगू , जगात सुवर्णाचीच परीक्षा केली जाते !

 सतत लोखंड-पितळ बाळगण्याचीच हैसियत आहे त्यांची

 कदाचित म्हणून संशय घेतात तुझ्यावर ।

 ‎खरे तर तुझ्यावर अविश्वासाचा विषयच नाही ,

 ‎ त्यांच्याच लायकीवरचा त्यांचा संशय आहे तो.

 ‎इतकं चांगलं अापल्याला मिळेलच कसे ?   याच्याच खात्रीसाठी काढलेले हे चिमटे आहेत ते !

 ‎म्हणून खंत नकोच बाळगू ,परीक्षा 

 ‎घेणा-यांची , 

सोनंच आहेस तू, हे तुलाही माहितच आहे !!

 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎