यस्यास्ति वित्तं सः नरः कुलीनः,
सः पण्डितः सः श्रुतवान् गुणज्ञः ।
सः एव वक्ता सः च दर्शनीयः,
सर्वे गुणाः काञ्चनम् आश्रयन्ते ॥
या श्लोकाचा भावार्थ थोडक्यात असा - ज्या व्यक्तीजवळ पैसा आहे तोच कुलीन , तोच विद्वान् , तोच ज्ञानी , तोच वक्ता , तोच दिसायलाही उत्तम कारण सर्वेच सद्गुण सोन्याच्या (श्रीमंतीच्याच) आश्रयाने रहातात.
"असेल पैसा , तोवर बैसा" ,
"दाम करी काम , बिबी करे सलाम"
'बाप बडा न भय्या , सबसे बडा रुपय्या'
असे अनेक वाक्प्रचार समाजात प्रसिद्ध आहेत .
त्याला कारणही तसेच आहे. जनसामान्यांना तसाच अनुभव असतो.
सुभाषितेही समाजातील वास्तव आपल्या समोर उलगडतात. सुभाषिते समाजनीती शिकवतात. समाजाची रीतभात दखवितात तसेच समाजवृत्तीचेही सामान्यीकरण दर्शवितात.
ह्याच श्लोकाच्या समर्थनार्थ अजून एका श्लोकाचा दाखला देता येईल.
किं वाससा तत्र विचारणीयम्
वासः प्रधानं खलु योग्यतायाः ।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्याम्
दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥
समुद्राने विष्णुने नेसलेले रेशमी पीतांबर बघून त्याच्या सांपत्तिक स्थितीचा अंदाज घेऊनच आपली कन्या लक्ष्मी त्याला दिली. या उलट दिगंबरावस्थेतील शंकराला पाहून विष दिले . श्लोक जरी गमतीदार पद्धतीने मांडला असला तरी लग्नाच्या बाजारात आजही स्वभाव- कुलीनतेपेक्षा पॅकेजचे पारडे जड नाही ; असं कोण म्हणेल ?
"पैसा" महत्त्वाचा नाही , असे म्हणणारे एकतर स्वतःचे पोट पूर्ण भरलेले असल्यामुळे वास्तवापासून अनभिज्ञ असतील किंवा पक्के दांभिक असतील किंवा ठार व्यवहारशून्य तरी असतील.
फक्त लग्नाच्याच बाजारात ,'बडा रुपय्या' असे चित्र आहे कां ? नाही . साधारणपणे नातेवाईकांत , समाजातही हेच दिसते की मोठे पद , मोठी संपत्ती वगैरे असेल तर मानसन्मान मिळतो. गरीब नातेवाईक असेल तर आला काय गेला काय ? कोणी फारशी दखल घेतच नाही. श्रीमंतांचा जन्मदिवस , छोटी-मोठी अचिव्हमेंट भरभरून साजरी केल्या जाते. या उलट गरीबाचे होते.
गरीबाचे सद्गुण लपतात , न् श्रीमंताचे दुर्गुण! गरीबाचे अल्पसे न्यूनही मोठ्ठ्या स्कॅमसारखे बढवून चढवून सांगितले जाते तर श्रीमंताचे भले मोठे लफडेही , त्याची कौतुक-लीला ठरते. पैसा समाजात प्रतिष्ठा मिळवून देतो , हे त्रिवार सत्य आहे. दोन्हीही श्लोक समाजमानसिकता विशद करतात , यात शंकाच नाही.
आजकाल तर या मानसिकतेला संघटितपणाची जोड मिळाली आहे. म्हणजे जे कोणी एकदा उच्चभ्रू-स्तरात गेले की त्यांचा गट तयार होतो. ते अशा गटात सहसा कोणाला प्रवेश देत नाहीत , उलट एखाद्यामध्ये समोर येण्याची चुणूक दिसली तर मुळापासून त्याला हतोत्साही वा मार्गविचलित करायची कुठलीच संधी सोडत नाहीत. यातूनही तो प्रगती करू लागला तर कुभांड , बदनामी , कुटाळक्या करून समाजात त्याच्या लौकिकावर लांछन आणतातच आणतात. (सुशात सिंह राजपूत , हे थोडे याच प्रकारातील उदाहरण होते.) या मानसिकतेवरही सुभाषित असेलच असेल. शोधावे लागेल.
सुभाषित-भांडागारातील अनेक श्लोक आजही कालसुसंगत आहेत. ह्यातून संस्कृतसुभाषितांची महती आधोरेखित होते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.