Sunday, January 22, 2017

सक्ति विश्रांतिचि...

२२.१.२०१७
आज २६ दिवस झालेय ,घरात सक्तीचा आराम करतेय .
अजून १९ दिवस बाकी आहेत.
पावलाचे फ्रॅक्चर हे निमित्त कारणीभूत ठरले या सक्तीच्या विश्रांतीला.
रोज रोज घर>शाळा> संस्कृत परिवार>सामाजिक संस्था>सोशलमिडिया >बोर्डाची कामे अशा अनेक आघाड्यावर एकाच वेळी वावरण्याची सवय.
'आपण केलेच पाहिजे' ही कर्तव्यभावना स्वस्थ बसूच देत नव्हती. शिवाय व्यक्त होण्यासाठी स्वान्तसुखाय लेखन ...एकूण "नाच ग घुमा" ही मी माझी स्वत:हून केलेली "खुदखुशी"च आहे.
चोविस तासातील १०/१२तास प्रत्यक्ष कामं नि उरल्या वेळात झोप येई पर्यंत  मनन-चिंतन- लेखन .
या दैनंदिन चर्येचा कधी कधी वैताग यायचा.वाटायचे सगळं सोडून द्यावे ,लपून जावे ,,पळून जावे. पण "जिना यहा ,मरना यहा ,इसके सिवा जाना कहा..."
अपरिहार्यपणे स्वीकारावीच लागलेली नि मग त्याचीच सवय झालेली गतिमानजीवन शैली.

पाय तुटायचे निमित्त काय झाले ,चालत्या गाडीला खिळच बसली.आराम करायची संधी चालून आली.
पण खरं सांगू ?
 सक्तीचे काहीही ......मनाला मानवतच नाही. सक्तीचा रामराम , सक्तीचे कामं ,सक्तीची हमाली ,सक्तीची वसूली ,सक्तीचे मनोरंजन , सक्तीचा आराम .......नको ,नको,नकोच.

 खरे तर या काळात - वेळेशी स्पर्धा नाही. काळ-वेळ-वार काही काही बघाचे काम नाही. धावपळ नाही. दगदग नाही. गोंगाट-गोंधळ नाही. शांत - सरळ- सात्विक -नियमित दिनचर्या सुरु आहे.
तसा विचार केला तर मनाजोगं वागायला मिळतय खरं आता.पण म्हणतात ना....मूळ स्वभाव बदले ना.
ही अशी दिनचर्या सक्तीने मिळाली, हे एक उगाचचे मोठं दु:ख.
असो , वेळे अभावी काही अपूर्ण राहिलेली कामं आता पूर्ण करायची संधी मिळाली.
 या सक्तीच्या एकांतामुळे माझ्यातल्या मला नव्याने जाणण्याची संधी मिळाली." विपश्यना" करणे सुरु झाले.
"मी केलेच पाहिजे नाही तर कसं होईल?" या भावनेचे पार निराकरण झाले. सगळे जग तसेच सुरळीत गतिमान आहे ,माझ्यावाचून काहीही फरक पडत नाहीय हे पाहून पहिले धक्का बसला ,मग वैताग झाला ,,मग फार वाईट वाटले ,मग कुढत कुढत स्वत:ला शोधायला लागले. चिंतन वाढवले. मग कुठे सत्य स्वीकारायला मन तयार झाले. अाता स्पष्ट जगण्याचे तंत्र कळले ( वळते किती ते काळच ठरवेल. )
सूर्य तळपतील,चंद्र झळकतील
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुन्हा वाहतील
होईल काही काय अंतराय??
रामकृष्ण ही आले गेले
त्याविन जग कां अोसची पडले
कुणी सदोदित सुतूक धरले
मग काय अडकले मज शिवाय??
मी जाता राहिल कार्य काय?
जन पळ भर म्हणतील हाय हाय !!

ही कविता शाळेत चाफेकर बाईंनी अप्रतीम शिकवली होती.
 या शांत- आत्ममग्नतेच्या काळात तिच्यातील आर्तभाव हृदयाला भेदून गेले.

खरच मध्ये मध्ये सिंहावलोकन करण्यासाठी असा पॉज मोड गरजे आहे ,नाही?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

4 comments:

  1. समर्पक लेखन मॅडम। आपण लवकरात लवकर बरे व्हावेट5 हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।

    ReplyDelete
  2. मस्त...पडु आजारी मौज हीच वाटे भारी!चिंंतन शील चिंंतन आवडले..पाठवा...मी वाचते मनापासुन!

    ReplyDelete
  3. तुझा हा पॉज मोडच तुला लवकर पळायला लावेल बघ... लवकर बरी हो.

    ReplyDelete
  4. मॅडम। आपण लवकरात लवकर बरे व्हावेट5 हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।

    ReplyDelete