Monday, January 9, 2017

भक्तिरसाचे प्रियकरत्व !

भक्तिरसाचे प्रियकरत्व !
भजन,भक्ती,भक्ती,भक्तिभाव,भजनी लागणे इत्यादि इत्यादि फुरसतीत करण़्याच्या ,म्हाता-यांच्या फारच झाले तर प्रौढ महिलांच्या आवडीचा, सवयीचा,टाईमपासचा विषय नव्हे का?
 उलटपक्षी बॉलिवुडसाँग त्यातही रोमँटिक, सर्वांना भावणारे हवेहवेसे, गुणगुणण्या योग्य वाटतात. कुठे भजन अन् कुठे हे रोमँटिक गाणे!
एकाने इह सोडून परमार्थाच्या शोधात रहावे तर
 दुस-याने प्रियेतच परम अर्थ आहे हेच ठाम समजावे !
दोघांचा कुठेच काही मेळ बसत नाही.

 बॉलिवुड गीत सर्व जनमानसात प्रसिद्ध तर सत्संग-भजनीमंडळाची गाणे तुलनेत डाऊनमार्केट !
मग काय ?काहीजण कुठे कुठे हिंदी चित्रपट गीतांच्या
 चालीवर भजन लिहितात,म्हणतात.
उदा. बिडी जलायलेच्या चालीवर," दिया जलायले ",सावन का महिना पवन करे सोरच्या चालीवर " सावन का महिना मंदिरमे है शोर ", परदेसी परदेसी जाना नही च्या चालीवर" शिरडी के शिरडी के साईबाबा दरशन दो दर्शन दो". इ इ.
 असे शाब्दिक लटपटी-खटपटी करीत शब्दांशी कुस्ती, शब्दांचे चितपट करीत भजनं बेतली जातात. "भिन्नरुचिः लोकः " म्हणून काही लोकांना ते आवडतात. कोणाकोणाचे त्यामुऴे मनोरंजन होते तर कोणाला ती बाजारुभक्ती वाटते.असो.
मध्यंतर (चुकून) एका बाबांचे प्रवचन (की बोलबचन) कानी आले. प्रवचन सुरू होते ते ' तू इस त-हा से मेरी जिंदगी मे शामील है ' या गाण्यावर पहिले दचकलेच ,मग हसू आले. चिंतन करु लागले आणि एक वेगळच आयाम लक्षात आला.पिक्चरचे गाणं सगऴे जण अनन्यभक्तिभावाने एकाग्रतेने म्हणत होते. अभंग,श्लोक,आरती,भक्तिगीत ऐकलेल्या माझ्या कानांना,नवविधा भक्ती पाहिलेल्या माझ्या  डोळ्यांना अन् परंपरावादी मनाला हे सर्व झेपतच नव्हते. घरी आल्यावर  किती तरी वेऴा तेच तेच दृश्य मनःचक्षुंपुढे उभे रहात होते.
मन विचार करू लागले .......पिक्चरच्या ते ही रोमँटिक गाण्यात भक्ती(?) असते ??? मग बसल्या बसल्या जुन्या-नव्या हिंदी गाण्यांची उजळणी केली


1)एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है ......
2)तू मंजिल तू ही मेरी पूजा तुम ही देवता हो......

3)तेरी आखों के सिवा दुनिया मे रक्खा क्या है.......

4)जब कोई बात बिगड जाये जब कोई मुश्किल पड जाये ......

5)जिया लागे ना ,तेरे बिना मेरा कही ...........

6)तुम जो मिल गये हो तो ये लगता है .......

7)तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही........

8)हमे और जिने की चाहत ना होती .......

9)तुम बिन जाऊ कहा ,ये दुनिया मे आके ........

10)ये दिल तुम बीन  कही लगता नही हम क्या करे.....

11)तुम से ही दिन होता है ,सुरमयी शाम आती है, तुमसे ही ,हर घडी सांस आती है ,जिंदगी कहलाती है...............

12)आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये तो बात बन जाये........


गाणे म्हणून पहावे. देवाला,ईश्वराला प्रियकर/प्रेयसी
( समजून)कल्पून पाहिले........तर खरंच ...भक्तिगीतच वाटले सर्व गाणे ,तेही खोल आध्यात्मिक अर्थासह... ! ! मग एक एक पुराणकथा आठवल्या.... ......मीराबाई ' मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई... ' असे म्हणत कृष्णाच्या प्रेमात बुडल्या होत्या. कान्होपात्रा ,जनाबाई,सखुबाई इ.इ. सर्वजणी विठ्ठलभक्त होत्या. एकनाथांच्या गवळणी, ज्ञानेश्वरांच्या विराणी,लावणीचे काही प्रकार इ.इ. वर वर श्रुंगाररस अन् आंतरिक आध्यात्मच होत्या ना! प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचे मधुराद्वैतवाद काय किंवा कात्यायनी व्रत काय किंवा ब्रह्माकुमारीज् काय ..सर्वांना ईश्वर प्रियतम म्हणूनच भावतो ना ! सुफीसांप्रदाय बहुधा याच धारणेतून निघालाय.

भजन,भक्ति या मध्ये मूळ संस्कृत धातू आहे भज्. ,ज्याचा अर्थ आस्वाद घेणे,उपभोगणे,भजन करणे हा होतो.कोणत्याही  गोष्टींचा आपण शरीर-मन-भावना याद्वारे आस्वाद घेतल्या शिवाय ,उपभोग घेतल्या शिवाय त्या गोष्टींच्या भजनी आपण लागू शकतो कां ?
 रामं रमेशं भजे किंवा भज गोविंदम् यातून काय कळतं तर रामाचे भजन करा ,गोविंदाचे भजन करा ,पण भजन करण्या अगोदर त्यात रममाण होता आले पाहिजे ना ,तर रममाण होण्यासाठी मुळात रस असला पाहिजे ना ,
अन्यथा भजन कसे शक्य होणार ?

एक संस्कृत श्लोक आहे, ' तमाखुपत्रं राजेंद्र भज माज्ञानदायकम्''  ,या एकाच ओळीचे दोन वेगवेगळ्या प्रकारे विभाजन केले की दोन अर्थ निघतात.
 1) हे राजेंद्र गुंगी आणणारे तंबाखुचे पान तू खाऊ नकोस.
(2) हे राजेंद्र पैसे अन् ज्ञान देणा-या गणपतीचे तू भजन कर.

 म्हणजे पहा .खाणे अन् भजन करणे यासाठी एकच धातू तो आहे'' भज्  "
 
साहित्यामध्ये नऊ रस मानतात.त्यामध्ये श्रुंगाररस हा महत्त्वपूर्ण रस आहे.श्रुंगाररसाचा मूळभाव ' रती '  म्हटल्या जातो . देवताविषयक वाटणा-या रतीतून भक्ती निर्माण होते तर पुत्रसदृश्यांच्या विषयी
 वाटणा-या रतीतून वात्सल्य निर्माण होते.

भारतीय संसकृतीच्या गौरवशाली परंपरेत अनेकांनी देवाला पुत्र ,पिता,बंधू,सखा,प्रियकर,पती,स्वामी इ .इ.रूपात पाहिले आहे.मग हे म्हणणे वावगे ठरणार नाही की श्रुंगाररसाचेच विस्तारित रूप म्हणजे भक्ती आणि वात्सल्य . मग श्रुंगाराचेच विस्तारित प्रगटीकरण म्हणजे देशभक्ती,देवभक्ती, गुरुभक्ती,मातृभक्ती,पितृभक्ती नव्हे काय?
कोणी देवाला प्रियकर मानावे की प्रियकराला देव ,हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य नव्हे कां ? गाण्यातून आध्यात्म शिकावे की  आध्यात्माचे गाणे  हे सुद्धा ज्याचे त्याचे स्वातंत्र्य नव्हे कां ?
                                 
  डॉ. सौ. प्रज्ञा शरद देशपांडे
                                      pradnyadeshpande1@yahoo.com

3 comments:

  1. खुपच छान मॅडम।
    पण नेहमी प्रश्न पडतो कि देवाला महिलांना प्रियकर पती मानता येते मग पुरुषांना ही मुभा का नाहीं??

    नक्किच अशी खुप गाणी आहेत।

    ReplyDelete
  2. मान ना मग.इतिहासात उदाहरणं आहेत तसी.

    ReplyDelete
  3. छान माहिती, अभिनंदन

    ReplyDelete