Monday, February 27, 2017

Sanskrit poem


"तो" ज्याच्यामुळे माझं अस्तित्व  आहे ,
जो  प्रेरक -तारक आहे ,
त्याला समर्पित....

२७.०२.२०१७
🌹🌹🌹🌹🌹
कर्गज-लेखनी।

 प्रिय ,तव गुणानालेखितुं य़द्यहं
 सिद्धाsस्मि खलु लेखनीं धृतकरा ॥


खिन्ना नु  धरिणी यतो हि तदा
   मम कृते सा यदा कर्गजीभूता ॥


  चिन्तने निमग्ना सपदि  तवैव
  असमर्था लेखितुं तव स्मरणेनैव ॥
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रिय देवा ,
जेव्हा मी तुझे गुणवर्णन करण्यासाठी हाती लेखनी घेऊन सज्ज झाली.

स्वत: धरती कागद होऊन तयार होती ,पण ती निराश झाली .

कारण तुझ्या स्मरणात दंग मी समोर लिहूच शकले नाही.

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Saturday, February 25, 2017

२६.२.२०१७ व २७.२.२०१७

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी.
उद्या कुसुमाग्रजांची जयंती.म्हणजे मराठीदिवस.

या तीन प्रसंगांवरून एक कविता सुचली.
आज ती एका काव्यमैफ़िलीत म्हणायची आहे.
ती कविता ........
२६.२.२०१७
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

बरे झाले स्वातंत्र्यवीर
आता तुम्ही नाही.
जेव्हा होतात तेव्हा
 तुमची उपेक्षाच होती॥

तुम्हाला आपले सतीचे
वाण घ्यायची हौस
आम्हाला  मात्र सेल्फ़ी ,
फोटोसेशनि मौज॥

तुम्ही देशभक्त तर होताच
क्रांतिकारक ही होतात
मराठीगौरवाचा  जाज्वल्य
 असा अभिमान होतात॥

तुमचे कवित्व,
 तुमचीध्येयासक्ती,
 तुमची विद्वत्ता,
तुमचे तेज ,
तुमची ज्ञान-संवेदना,
तुमची ती प्रखरता ।।

सारे सारे कल्पनातीतच
बुद्धीलाही
 सामान्यांच्या
नि असामान्यांच्याही॥

 जिवंतपणीच तुमची
 दंतकथा केली
 मृत्युनंतर तर
 राष्ट्रिय  मरगळच अाली.॥

 आज भाषाच कळत
नाही अनेकांना खरी
 त्यात तुमचे बोजड
संस्कृतप्रचूर मराठीभारी!॥

म्हणतातात संस्कृतजोखडातून
करा की मुक्त
 इंग्रजी-फ़ारसी-अरेबी-
हिंदीने  मराठीयुक्त॥

प्रयत्न आज तुमचे
 ठरवतात आहे व्यर्थ.
 जरी दिले अनेक करून
 शब्द मराठी समृद्ध॥

 इंग्रजी सोपे नि प्रभावी
 वाटू लागले
 मराठी व्याकरणाला
 जे ते टोकू लागले॥

 तुमचे ते बलिदान अन्
मराठीचा अभिमान
 राहू द्या तसेच ,
असाल तुम्ही तेव्हा महान॥

 आज आम्ही आहोत
मराठीचे समर्थक खंदे
 मराठी कशाला म्हणायचे
ते ठरविणारे बंदे॥

 आमची मराठी ,सोपी
 इंग्रजी-फारसी युक्त
इतिहासही आमचा
आमच्या सोईने युक्त॥

कशाला हवीत ती
सहाच सोनेरी पाने
संमेलनात लुटतो
आम्ही खरे खरे सोने॥

विद्वत्ता-लायकी वगैरे
सोडा जुनी बात
समीक्षण करू आम्ही
आमच्या परि खास॥
सोशल-नेटिझन्स-ग्लोबल
-थिंकरांची मॉडर्न नशा
आम्ही ठरवू ती दिशा
आमच्या विना पहा की दशा॥

उगाच घेतले वाण तुम्ही
केली ससेहोलपाट
 स्वत:ची ,कुटुंबाची ,
कुळाची करून वाताहात॥

 सातशे अधिक दिडशेचा
प्रभाव करण्या नष्ट
 घालविली तुम्ही अख्खी
हयात उपसून कष्ट॥

 मिळालेले आयते घबाड
आम्हाला जपताही येत नाही
 कणाहीन आमच्याने
भाषिकगुलामगिरी
सोडवत नाही॥

 राहिले असते इंग्रज
अथवा  राजवट तुर्की
जागतिक  असती ना
 भाषा आमची बेरकी ॥

आम्ही भक्त तुमचे
असे उच्चरवाने सांगतो
टिशर्ट,मोमेंटोमधून तुमचे
विचार वानवतो॥

तुमचे आचार-कर्तृत्व
 अंगी बाणायचे म्हणतो फक्त
प्रसिद्धी-मोठेपणा-दिखावा
 यातच आम्ही आसक्त॥

एक मात्र खात्री देतो ,
चिरंतन तुमचे विचार
 रुजतील पहा नक्की
त्यासाठी खरच वाट पाहावी
 लागेल जन्मोजन्माची पक्की॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, February 23, 2017

पत्र

२३.२.२०१७
पत्र लेखन.=व्यक्तिप्रकटीकरण.

एकदा जन्म झाला ,जगात अस्तित्वात आलो तेव्हापासून दरोज वाढतो आपण. पण वर्षातून एकदा जन्मदिन साजरा करण्याची प्रथा आहे.
आज मी अतिशय खुश आहे.कारण माझा
 वाढदिवस , हे नसून माझा मुलगा खुप सुरेख व्यक्त झाला पत्रातून,हे आहे.तसा तो इंग्रजीतून लेख उत्तमच लिहितो.पण पहिल्यांदाच , आज आयुष्यात  त्याने आईला पत्र लिहिले.

 तसेही आपल्या भावना प्रांजळपणे -नि:संदिग्ध-स्पष्ट व्यक्त करणे आवश्यकच असते.प्रत्येकवेळी समोरच्याला कळेलच न सांगता,असे गृहित धरणे योग्य नाही. बरेचदा समोरच्याबद्दल खूप छान,शुद्ध  भावना असतात आपल्या पण योग्यवेळी,योग्य शब्दात त्य‍ा मांडता न आल्यामुळे किंवा नको तेच मांडल्यामुळे  आपण अनेकदा समोरच्याला गमावून बसतो. व्यक्त होण्याची सवय नसणे हेच खरे कारण. म्हणून व्यक्त व्हायला शिकणे जरूरी आहे .  
व्यक्त होण्याने कमीपणा येत नाही उलट आपण निखळ होत जातो. कोणतीही भावना सौम्यशब्दात -संयत पद्धतीने, विधायक रित्या मांडायला पाहिजे.
     तसेच कोणी सुयोग्यपद्धतीने व्यक्त झाले तर त्याचे कौतुक पण करणे आवश्यक आहे व त्याला कळवणेही महत्वाचे अाहे.
@ ईशान ,
माझ्या मुला ,

आज जसा माझ्यासाठी व्यक्त झालास तसा वेळ-प्रसंग पाहून सगळ्यांसाठी व्यक्त होत जा.
 ईशान, तुझे पत्र मी इथे तुला न विचारता देतेय.

 You are breathtakingly beautiful with each year you age, and I promise I’m not just saying this because it’s your birthday.

Once again, I find myself with no words to express how much you mean to me on this special day. But you know me better than I know myself, so I’m sure you already know. Have the best birthday ever!

So, maybe you always burned dinner and purchased store bought birthday cakes, you still managed to make a wonderful family. Happy birthday to an amazing mom who just keeps getting better.

The older I get, the more I realize that mom is always right. It really is true that people get better with age. Don’t let another birthday get you down when you just improve with every year.

I love you from the bottom of my heart. You are very special, aai! Happy birthday!

-tujach pillu-
-
अो रे माझ्या पिल्या....😘
-एक लक्षात ठेव ,शब्दात कमी-जास्त चालेल एखाद्यावेळी .
-पण हेतू शुद्ध असावा, भावना प्रामाणिक असाव्यात, व्यक्त होताना नेहमीच.
-
 मला खात्री आहे ,एक उत्तम व्यक्ती म्हणून तू स्वत:ला असाच व्यक्त करत जाशील.
 तुझी आई.

 ©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, February 21, 2017

पुनश्च हरि अोम् .

२२.२.२०१७
पुनश्च हरि अोम् .......
आज दोन महिन्यांनंतर कॉलेजात जाणर.
बारावीचे विद्यार्थी वाट बघतायत.
त्यांच्या  मराठी-संस्कृतच्या मौखिकपरीक्षा घ्यायच्या आहेत.
 दोनदशकांपासून सतत कार्यरत असलेली मी अचानक अपघातग्रस्त होऊन घरी बसली,दोन महिने. वाटलं होतं कसे जातील दोन महिने?बोअर होईल? क्रियाप्रवणता जाईल? स्थानबद्धता येईल?......

  पण देवाच्या कृपेने असे काही झाले नाही.
या दोन महिन्यात खूप काय काय झाले. खूप छान छान गोष्टी झाल्या. सगळ्या बाबी "काम-काळ-वेगाच्या" मापाने मोजणारी मी सामान्य व्यक्ती.काळाचे अनंतत्व समजू लागले. "जे जे उत्तम-उदात्त-मंगल आहे तेच माझ्यापर्यंत येते" याची जिवंत प्रचिती घेतली या दिवसात.

अनेक रखडलेली कामे मार्गी लागली. तीन वर्षांपासून विसरणीत गेलेला मोठाप्रकल्प आता पारच विसरावा लागेल असे वाटत असतांना चक्क चमत्कार झाला.नि घरी बसल्या बसल्या त्यावर काम करतेय ,नि तो पुढील तीन-चार महिन्यात पूर्ण होईल अशी खात्री झाली.दोन रखडलेली पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अनेक वर्षांपासून आंंतरिक इच्छा आहे "वेगळं" काही पुस्तक लिहिण्याची. कच्चा आराखडा तयार आहे. ते ही लवकरच मार्गी लागतय. आजवर आठ पुस्तके प्रकाशित झालीय.
बघू काय काय होईल ते.
इतक्या दिवसांत हे नक्की जाणलय.."निमित्त मापासि बैसविलो आम्ही ,बोलविता धनी वेगळाची" .हे आतून जाणवलं की ' त्याची इच्छा असेल तर घरबसल्या सारं सुरळीत होतं'.

माझीच एक रचना इथे देतय.....

आता मला उमगे सख्या की
माझ्या सवे तू असतोस ना!!!१।।

श्वासात,ध्यासात,हृदयात,प्राणात
वसूनी सदा असतोस ना !।२।।

मी जात येथे सदा संगतीने
सहचरा सम असतोस ना॥३।।

मी पाही जेथे तिथे तूच दिसशी
सर्वत्र तू वसतोस ना।।४।।

जे रूपसौंदर्य हे लाभलेले
तू मांगल्यरूपी असतोस ना।।५।।

मी गंध जे घेई प्राणापनाने
प्राणस्वरूपी असतोस ना।।६।।

मी अक्षराते वदे वाणीमात्रे
गिरा बोलवीता असतोस ना!।७।।

जिथे माझी जाई सदा वासना रे
अस्तित्व तूझे तेथ असतेच ना ।।८।।

मी भोग आणि उपभोग घेते
तया भोगवीता तू असतोस ना।।९।।

माझ्यांतरंगी नि बाह्यांगरूपी
व्यापून सर्वत्र असतोस ना।।१०।।

जे पंचप्राणा किंवा पंचकोशी
चिदानंदरूपी असतोस ना?।११।।

हे ईश्वरा,परमेश्वरा,सर्वेश्वरा
तू,मी नश्वरा,असतोस ना।।१२।।

लहानपणापासून नेहमीच जाणवायचे
पण या "विपश्यनाकाळात" प्रत्यक्ष अनुभवतेय
की "मी"एकटी नाही,सतत "तो" आहेच पाठीशी-सोबत.

म्हणून पुनश्च हरिअोम्........

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Monday, February 20, 2017

#शब्दचिंतन


#शब्दचिंतन

दोला,दोलन,आंदोलन,हस्तांदोलन,भक्ति-आंदोलन

डोला रे डोला ,दिल डोला,मन डोला ....गाणं ऐकून पायही ताल धरू लागतात.
 हा 'डोला" अपल्या मराठीतही डोलणे या अर्थी आहे ना! हो तोच अर्थ.

डोलणे,झुलणे,हिंदोळे घेणे ,झोके घेणे,झोपाळा ...किती किती शब्द आहेत.
साधारण एका अर्थाचे पण छटा वेगळ्या.
संस्कृतमध्ये दोला ,दोलिका असे (नाम) शब्द आहेत .त्यापासून "दोलायते" असा नामधातू तयार झालाय.
मराठीत नाही कां ?,'हाताळणे,रक्ताळणे'असे नामधातू आहेत.(म्हणजे नामापासून बनलेले क्रियापद) तसा .

तर दोला म्हणजे झोपाळा ,तोही दोरी किंवा पारंबीचा.बंगईला(पाऴणा,लाकुड वगैरेचा) "प्रेंखा" म्हणतात. दोन्ही झोकेच घेतात.पण गतीत ,,पद्धतीत फरक आहे.
भौतिकशास्त्रानुसार त्याचे विश्लेषण करता येईल,पण मी भाषिकअंगानेच विचार करणार.

दोरीचा झुला जसा "स्विंग" घेतो,वर जाऊन खाली येतो,त्याला झोका म्हणतात.तोच खरा दोला/डोला.
तो जसा हिंडकळतो ,झुलतो तसंच माणसाचे मन आशा-निराशेच्या आवर्तात भरकटते.मनाची गती अन् झुला सारखाच. कोणताही 'भाव'(मुड) एकसारखा नसतो.
दोलन म्हणजे डोलण्याची क्रिया सुरू असलेली अवस्था.
आंदोलन - यातही  दोलन आहेच. पण एका ठैरावासह. हस्त-आंदोलनातही तोच दिसून येतो. दोलनात सतत गतिमानता आहे ,हस्तांदोलनात थोडं थांबत,गती आहे. भक्ति-आंदोलनात सुद्धा
आवर्त-प्रत्यावर्त असतात.एका टप्प्यापर्यंत गती मग ठैराव मग पुन्हा गती ...असा हा प्रकार.

दोला-दोलन-आंदोलन...सारे सारे मनाच्या/भावनांच्या अवस्थांना लागू होतात.
दोला>डोला>हिंदोळ>झुला ...सुंदर मराठी शब्दश्रीमंती..........

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Sunday, February 19, 2017

शब्दचिंतन

20.2.2017
#शब्दचिंतन

अर्थ-सार्थ--निरर्थ-अनर्थ.-व्यर्थ-स्वार्थ-परार्थ-परामार्थ-यथार्थ-कृतार्थ......वगैरे वगैरे...

एकाच मूळापासून तयार झालेले शब्द.
अर्थ हा मूळ कृदन्त. "अर्थ्"या मूळधातूपासून झालेला.
त्या मुळधातूचा अर्थ "इच्छा करणे" हा आहे.
तसेही जिथे इच्छा असते त्यातच अर्थ असतो.
अर्थ चा एक अर्थ पैसा हाही आहे .
अन् तो तर स्वत: सिद्धपण आहे.
 "जोवर पैसा तोवर बैसा" खरेच असते व्यवहारात. पैसा नाही म्हणजे काहीही अर्थ नाही.

शब्दांना अर्थ असावा ,ही जुनी,भाबडी समजूत आजकाल खोटी ठरतेय.
जुन्याकाळी 'नामकरण' करतांना अर्थपूर्ण नाव बघून मग ठेवायचे. आता 'नेट लावून'अर्थ शोधतात.....प्रगती...दुसरे काय?

देवादिकांपासून चराचरातील प्रत्येक नाव सार्थच होते. वानगी दाखल काही नामे पाहू.
राम- रम् म्हणजे रमणे ,ज्यात मन रममाण होते ,तो राम.
कृष्ण- कृष्-कर्ष् =ओढणे ,खिचणे . जो चित्त खेचून घेतो ,तो कृष्ण.
राधा-राध् म्हणजे ऐश्वर्य . जिच्यात ऐश्वर्य आहे ती राधा.
माधच-मा म्हणजे लक्ष्मी. धव म्हणजे पती. माधव म्हणजे लक्ष्मीपती.
विष्णु -विश् म्हणजे शिरणे. जो चराचरात शिरलाय ,,भिनलाय तो विष्णु.
शंकर -शम् म्हणजे शांत/कल्याण . जो शमन करतो,कल्याण करतो ,तो शंकर.
दुर्गा- "दुर् "उपसर्गाचा अर्थ 'कठिण' असा आहे. जी जाण्यास कठिण ती दुर्गा. (जिला पटवणे सोपे नाही, ती दुर्गा.)
खग- ख म्हणजे आकाश. ग म्हणजे जाणारा. आकाशातून जाणारा खग.
गंगा- जी सतत गतिशील आहे ती. समोर समोर जाणारी.
अरुन्धती -जिला कोणी अडवू शकत नाही , नि जी कोणासाठी अडत नाही.

अश्या प्रकारे पाहात गेले तर प्रत्येक शब्द सार्थ ठरतो. खरेच सार्थच असतात शब्द.फक्त समजून घ्यायला इच्छा -पात्रता असावयास हवी. अर्थाचेही तीन स्तर असतात.सामान्यांना पहिल्याही स्तरातील अर्थ कळला तरी त्यांचे आयुष्य "सार्थ" होऊ शकते.प्रत्येकाने सखोल असणे गरजेचे नाहीच.

तर अर्था सह म्हणजेच स-अर्थ म्हणजे सार्थ.

मग अर्था विना म्हणजे निर-्अर्थ म्हणजे निरर्थ.

अन्-अर्थ चा मात्र अर्थ संकट / धोका असा रूढ झालाय. अनर्थकारी चिंतन नकोच.

व्यर्थ- वि-अर्थ म्हणजे ज्यातून अर्थ निघून गेलाय तो.यावरही व्यर्थ कशाला चिंता ?

स्वार्थ- हा फ़ारच महत्वाचा. "स्व" म्हणजे आपण. स्व साठी अर्थ ,म्हणजे स्वार्थ . "आप मर गये, डूब गयी दुनिया"आपणच नसू तर कशालाच काही अर्थ नाही ना! म्हणून स्वार्थ पहिले साधावा...(काहींना उपजत जमतो.)

परार्थ- पर म्हणजे परका. दुस-यासाठी करणे म्हणजे परार्थच ना. परोपकार..

परमार्थ- परम् म्हणजे श्रेष्ठ . ज्यातून मोठा,गहन अर्थ निघतो, तो परमार्थ.

यथार्थ- यथा म्हणजे जसे अहे तसे. म्हणजे वास्तव. म्हणून यथार्थ ज्ञान गरजेचे.

कृतार्थ - कृत म्हणजे केलेले. जे केले त्यामुळे श्रेय मिळाले की कृतार्थ होणारच ना!

अर्थ शोधता शोधता इतके शब्दार्थ उकलले. अर्थात यासाठीच तर शब्दचिंतन आहे. शब्दांचा अर्थाशी सार्थ संबंध असतोच. अर्थाचे अनर्थ करण्यापेक्षा  चिंतनातून प्रत्येकाने शब्दातील सार्थकत्व शोधावे. हा व्यर्थ खटाटोप नाही.
 "केल्याने होत आहे रे ,आधी केलेचि पाहिजे. "!

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, February 18, 2017

नैसर्गिक

आज सहज फिरता फिरता
   रस्त्यांवर गळलेली पाने पाहिली,

हिरव्यां सह पिवळी सुद्धा
 वा-यासंग फिरत होती.।।१।।

 काय गंमत आहे निसर्गाची!
दोन्ही रंग एकमेकांना

 खुलवून रस्ता शोभवित होती.
आपल्याच धुंदीत मिरवत होती।।२।।

पिवळ्या-हिरव्याची रंगसंगती
निसर्गनिर्मित छानच होती

पिवळ्याला ना वैषम्य  होते
ना हिरव्याला तो खेद ।।३।।

निसर्ग नेहमीच स्वाभाविक अन्
नैसर्गिकच असतो ना!

कोवळेपण-बहर-पानगळ
 सर्व सहज किती झेलतो ना !।।४।।

कोवळेपणाची नवलाई नाही
बहराचा माज नाही

पानगळ होता कुठे म्हणून
जराशीपण खंत नाही।।५।।

निसर्गाचा क्षण न् क्षण
म्हणजे एक उत्सव असतो

प्रत्येक स्थिति-स्थित्यंतरे
चैतन्ययुक्त प्रतिसादच असतो।।६।।

जे जसे पडले दान
त्यातून तसे घेतले भान

परिस्थिती काही असो
कधी खंत ना अभिमान।।७।।

काय हरकत आहे मानवांनो
होऊ या की आपण नैसर्गिक

जे म्हणून समोर येईल
प्रतिसाद द्या की स्वाभाविक।।८।।

चूक-बरोबर,योग्य-अयोग्य
अपेक्षित -अनपेक्षित सोडा सारे

ओझे फेका अन् मुखवटेही
न्यायाधीश बनणे सोडा रे।।९।।

आतल्या सादेला प्रतिसाद द्या
निसर्गाला दाद द्या

तीळ-तीळ मरणापेक्षा
कण-कण उजळू द्या।।१०।।

निसर्गाच्या निसर्गलीला
डोळे उघडून बघा ना

निसर्गाकडून तुम्ही देखिल
काही तरी शिका ना ! ।।११।।
©Dr.PRADNYA DESHPANDE

Tuesday, February 14, 2017

रजनीगंधा फुल तुम्हारे..

रजनीगंधा फुल तुम्हारे....

जुनं गाणं,अवचित कानी आलं ,मन स्मृतीत रेंगाळले.
निशिगंधाचे फुलं ,अंगणात ताटव्यात डोलाने बागडतात ,हवेच्या झुळूकीसरशी गंधेंद्रियांच्या माध्यमातून मनाला गंधाळतात .मन सुगंधित ,प्रसन्न ,हळुवार,रसिक होते .
झुळूक अलवार-अचानक येते. सतत एकसाारखी नाही. तरी मनात तो स्मृतिगंध रेंगाळत राहतो ,मनाला ताजं-तवानं करत राहतो.
आठवणीतीलही  रजनीगंध  धुंद करतो-चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो.अगदी अशीच सजणाच्या प्रेमाची जाणिव तिच्या अनुरक्त मनाला शांतवते.
शब्दबद्ध होत गाणं फुलतं..................
"रजनीगंधा फुल तुम्हारे ,महके यू ही आंगन मे..यू ही महके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमे ..."

तिचे मन अनुरक्त आहे .ती त्याच्या प्रेमात आहे.तिच्या मनात त्याच्याविषयी मधुर भावना आहेत.म्हणून तिच्या मनात  त्याची प्रीत महकते आहे ,
तिला सुगंधित करते आहे.
"तस्यतदेव हि मधुरं
 यस्य मनो यत्र संलग्नम्" ,
त्याची तिच्या विषयी भावना काय?
 हे कळायला मार्ग नाही .कारण हे तिने म्हटलेले गीत आहे. तसेही...... कोणाला काय वाटते?....... पेक्षा आपल्याला जे वाटते तेच सगळीकडे अनुभूतीला येते.

आजच्या इन्संट जमान्यात कोणाच्या आठवानेही चित्तवृत्ती प्रसन्न व्हाव्यात ,हे आश्चर्यच!
मनाने ,भावनेने एखाद्यात खोल गुंतल्या शिवाय
असे "महकणे" समजायला अवघडच !
पुढचे कडवे तर आजकालच्या व्यवहारात समजण्याच्या पलीकडचेच आहे.

"अधिकार ये जबसे साजन का
हर धडकन पर माना मैने
मै जब से उनके साथ बंधी
भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधन  मे"!

आज जिकडे तिकडे मुक्तीचे वारे वाहात आहेत. स्त्रीमुक्ती ,सांस्कृतिक मुक्ती ,आर्थिक मुक्ती वगैरे वगैरे.. अशा वेळी "बंधनात सुख"!!!
 विडंबनच वाटावे ,होय ना?
ती म्हणते जेव्हापासून मी माझ्या श्वासावर त्यांचा अधिकार आहे हे मानलं तेव्हा पासून मी बंधनात पडली नि बंधनात काय सुख आहे ते मला उमगले"!!

अरेरे काय पुराणमतवादी विचार बरे या स्त्रीचे !! लग्न झाल्यावर नव-याचेही बंधन न मानणा-या
 मुक्त स्वातंत्रवादी बायका कुठे नि ही लग्न न होता केवळ मनाने वरलेल्या प्रियकराचे बंधन श्वासावर  आहे. हे चक्क कबुल करते वर बंधन सुखदायक वाटते तिला !!! अगदीच निराशाजनक हो !!

"आशा नाम मनुष्यानां काचिद्भूत श्रुंखला।
यया बद्धा प्रधावन्ति ,मुक्ता तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥

काळ कोणताही असो *आशा* बलवत्तर असते.  आशेने जे बांधले गेले ते धावतात .मात्र मोकळे असलेले निराश लोकं पंगु प्रमाणे थांबून जातात.

"प्रियकर माझा आहे . तो कायम मला जपेल. सुखात ठेवेल.प्रेमबंध नीट जपेल. जगाच्या आक्रिताला सामोरा जाईल तो. मला सगळ्या संकटातून काढेल तो".असे आशेचे मनोरे तिच्या मनात उभारले जात असतील.आणि याच आशेच्या बंधनामुळे ती सुख अनुभवत असेल.
 ज्यांना ही आशा नाही ,प्रिय अशी सुखस्वप्ने नाहीत ते  *बंधन* म्हणजे जोखडच समजणार ना!

आज प्रथमिक वर्गांमध्ये फस्टक्रश होतं ,माध्यमिक वर्गांमध्ये डिपलव्ह , कॉलेजात जाईपर्यंत रिलेशनशीप न् खरे लग्नाच्या वेळेपर्यंत सर्वबंधमुक्त...............
असे वातावरण असतांना हे गाणे म्हणजे दिवास्वप्नच ना!
पण खरच !
ज्यांनी ख-या प्रेमाचे मोरपीस ह्रदयावर हळुवार फिरलेले अनुभवलेय ,
ज्यांनी स्वत:ला अातून उमललेले बघितले आहे
 नि ज्यांनी हे बंधन कोणत्याही परिस्थितीत आनंदाने सांभाळले.
भाळणे ते सांभाळणे या प्रवासात ज्यांनी प्रत्येक क्षण उत्सव रूपाने साजरा केलाय.........
 त्या सर्व भाग्यवंत युगलांना शतश: प्रणाम  !

©डॉ. प्रज्ञा देशपांडे..

Monday, February 13, 2017

जीवनम् ।(संस्कृत कविता)

जीवनम् ।(संस्कृत कविता)

जीवनं जीवनं,जीवनं हि तदा
त्वं मयाहं त्वया सहितं नु सदा ॥

जीवितं जीवितं जीवनं त्वया विना
कथं तु जीविता इयं वंचना साहना ॥

त्वया सह क्षणैकं मे संजीवनमिव सदा
फुल्लतरलचित्तरङ्गैर्व्यापृतं मन: सर्वदा ॥

वरं वनं सह त्वया  विना काननं  हि गृहम्
आवृता परिवृता सदा त्वयास्म्यहम् ॥

सदैव सङ्गतो भव सदानुरक्तो मयि
जीवनमिदं मम समर्पितं मया त्वयि ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

काल एके ठिकाणी "अमराठीकाव्यस्पर्धेत"ही माझी रचना पाठवली. प्रथमक्रमांक आला.
संस्कृत ,भाषा आहे .त्यामुळे सगळ्या भावना तिच्यातून व्यक्त करता येतात.
अतिशय नियमबद्धभाषा असूनही नवनिर्मिती शक्य आहे.
इतर भारतीयभाषांप्रमाणेच लक्षपूर्वक वाचले तर अर्थ कळतो.
तरीही कवितेचा सारांश असा
(१)जेव्हा तू माझ्य़ा व मी तुझ्या सोबत असू तेव्हाच जीवन खरे जीवन असेल.

(२)तुझ्याशिवाय जे जगले ती वंचना नि सहनाशक्ति होती

(३)तुझ्यासह एक क्षण नवसंजीवक असून मन प्रफुल्लित-तरल-प्रसन्न करणारा असतो.

(૪)तुझ्यासह वनवास सुखाचा तुझ्याविना घर जणु वनवासच.

(५)माझ्यावर अनुरक्त तू नेहमी सोबत रहा .माझे जीवन तुला समर्पित आहे.

संस्कृतमध्येही रचना/ निर्मिती होते. भाषा ,कोणतीही असो गोडच असते. मग जुनी म्हणून हिला कां सोडा ?? म्हणून कविता रचली.
 🙏🏼

Saturday, February 11, 2017

शब्दचिंतन

#शब्दचिंतन

काल नवा शब्द कळला...."अपैशुन्य"!  पिशुन म्हणजे  रानटी,हिस्र हा संस्कृतमध्ये अर्थ माहित होता.
पण माऊलींच्या शब्दकळा नि अर्थगर्भता अद्वितीयच. मराठीतील  भरजरी महावस्त्र म्हणजे "ज्ञानेश्वरी".

माऊली म्हणताता.......

तैसे आपुले निगुणे।पुढीलांचे उणे।फेडूनिया पाहणे ।तयाकडे॥
वाचूनि न विंधिजे वर्म।नातुडविजे अकर्मी।न बोलविजे नामी।सदोष तिही॥
वरी कोणे एके उपाये।पडिले ते उभे होये।तोचि किजे परीघाये नेदावे वर्म॥
(ज्ञानेश्वरी १६.१૪९.५)

सरलार्थ....
त्याच प्रमाणे आपल्या चांगुलपणाने दुस-यांचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्या कडे पाहावे.
ए-हवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये.पापकर्मामध्ये कोणास गुंतवू नये.आणि ज्या नामामध्ये याच्या दोषांचा उल्लेख होतो अशा नामांनी यास हाक मारू नये.

खरोखर "माऊली" माऊलीच आहेत.  संस्कृतनुसार "अपैशुन्य"चा अर्थ दुष्टपणा/जनावरपणा नसणे किंवा संस्कारित असणे इतकाच होईल.
पण माऊलीच्या अमृतस्पर्शाने मराठी संपन्न झाली.
अपैशुन्यचा अर्थ (माऊलींच्या नुसार) =दुस-याच्या दोषांवर टीका न करता त्याला सन्मार्गी लावण्यासाठी आपल्या गुणांचा उपयोग करणे.

खरोखर जेथे इतकी सहज शब्दश्रीमंती योजली जाते तेथे वात्सल्यपूर्ण निर्मळ मन असणारच.
दुस-याचे दोष दाखवू नये उलट त्याला कमीपणा न आणता आपल्या चांगुलपणाने ते दूर करून त्याला मोठे करावे.....केवळ थोरच...
.छानच ....मननीय...चिंतनीय...वर्तनीय........

माऊली अजोड आहेत. पसायदान तेच मागू शकतात.
🙏🙏🙏
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

शब्दचिंतन

#शब्दचिंतन

काल नवा शब्द कळला...."अपैशुन्य"!  पिशुन म्हणजे  रानटी,हिस्र हा संस्कृतमध्ये अर्थ माहित होता.
पण माऊलींच्या शब्दकळा नि अर्थगर्भता अद्वितीयच. मराठीतील  भरजरी महावस्त्र म्हणजे "ज्ञानेश्वरी".

माऊली म्हणताता.......

तैसे आपुले निगुणे।पुढीलांचे उणे।फेडूनिया पाहणे ।तयाकडे॥
वाचूनि न विंधिजे वर्म।नातुडविजे अकर्मी।न बोलविजे नामी।सदोष तिही॥
वरी कोणे एके उपाये।पडिले ते उभे होये।तोचि किजे परीघाये नेदावे वर्म॥
(ज्ञानेश्वरी १६.१૪९.५)

सरलार्थ....
त्याच प्रमाणे आपल्या चांगुलपणाने दुस-यांचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्या कडे पाहावे.
ए-हवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये.पापकर्मामध्ये कोणास गुंतवू नये.आणि ज्या नामामध्ये याच्या दोषांचा उल्लेख होतो अशा नामांनी यास हाक मारू नये.

खरोखर "माऊली" माऊलीच आहेत.  संस्कृतनुसार "अपैशुन्य"चा अर्थ दुष्टपणा/जनावरपणा नसणे किंवा संस्कारित असणे इतकाच होईल.
पण माऊलीच्या अमृतस्पर्शाने मराठी संपन्न झाली.
अपैशुन्यचा अर्थ (माऊलींच्या नुसार) =दुस-याच्या दोषांवर टीका न करता त्याला सन्मार्गी लावण्यासाठी आपल्या गुणांचा उपयोग करणे.

खरोखर जेथे इतकी सहज शब्दश्रीमंती योजली जाते तेथे वात्सल्यपूर्ण निर्मळ मन असणारच.
दुस-याचे दोष दाखवू नये उलट त्याला कमीपणा न आणता आपल्या चांगुलपणाने ते दूर करून त्याला मोठे करावे.....केवळ थोरच...
.छानच ....मननीय...चिंतनीय...वर्तनीय........

माऊली अजोड आहेत. पसायदान तेच मागू शकतात.
🙏🙏🙏
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Thursday, February 9, 2017

I love you म्हणणे

किती सोपं आहे आजकाल ,
आय लव्ह यु म्हणणं
 नेमकं मनात काही असो ,
तोंडावर फक्त सांगणं
 लहान-मोठं कोणीही असो,
 लव्ह यु म्हणतात
भावनेचा पत्ता नाही,
शब्दच्छल मांडतात।।१।।
जबाबदारीचे दुसरे नाव
 म्हणजे असते प्रेम
जिवापाड एखाद्याला
 जपणे असत प्रेम
काळजी घेत फुलवत ठेवणं
 याला म्हणतात प्रेम
खाचखळग्यातून अलगद
 तारणे हेच खरे प्रेम ।।२।।।
 आय लव्ह यु म्हणत
 प्रदर्शनाची गरज काय?
जातीच्या सुंदरा
आरश्याची गरजच काय??
न म्हणताच ,वागण्यातून
हळुवारपणे कळून येते
फुलाचे उमलणे झुळकी
सरशी आसमंत दरवळतो।  ।।३।।
नजरेतून स्नेह
 कायमच पाझरतो
स्पर्शातून वात्सल्य
 ओसंडून वाहाते
बोलण्यातून माया
 तशीच व्यक्त होते
आपसूकच जपणे
 कृतीतून सिध्द होते ।।४।।
हृदयात प्रेम रुजले
 की दुनिया आनंदी होते
कण न कण उजळून
जणु नवा जन्मच लाभतो
क्षणोक्षणी चैतन्य बहरून
 शरीराला वेढून असते
जगणे म्हणजे केवळउत्सव
तनामनात साजरा होतो ।।५।।
ख-या प्रेमात शब्दच
 जणु निश्शब्द होतात
दूर-जवळ  भौतिक अंतर
आपोआप लोपते
भावनिक एकतानता
सहज साधून जाते
मी -तू नुरून पूर्ण
 आकाश -पृथ्वी एकवटते।।६।।
किती सोपं आहे
 तसं वरपांगी जगणं
लव्ह यु म्हणत
गावभर वाण वाटत फिरणं
 दोन ग्रॅमचे दागिने
 चलनी अन् मस्त
तरी सुद्धा बाजारात
 सोनं नाही स्वस्त ।।७।।
©Dr. Pradnya Deshpande

Friday, February 3, 2017

पुषादितवार


आज रथसप्तमी.
आठवण आली लहानपणाची.
कॉलनीत घरोघरी आज लगबग असायची.
सूर्य-रथ अशी रांगोळी तुळशीजवळ काढायची. चुलीवर बोळक्यात खिचडी शिजवायची.
आज हळदी-कुंक कार्यक्रमाचा शेवटचा दिवस.
आता एकदम चैत्रातील हळदीकुंकवाची वाट बघणे.आज माघ महिना लागला.
पण पौषात मकरसंक्रमणापासून घरोघरी सूर्यपूजन होत असे.
दर रविवारी आजी तुळशीजवळ रांगोळीने  सूर्यनारायण काढायची.
त्यावर तिळ-गुळ,बोर,ऋतूद्भव फळे ठेवायची. सुगड्यात कोरडी खिचडी ठेवायची.
दुपारी सगळी कामधामं आटपून आजी तुळशीपाशी बसायची . तिच्या मैत्रिणी पण जमायच्या ,तिजारे आजी,बैतुले आजी वगैरे. मग मी माझ्या मैत्रिणी तिथे येऊन बसत असू.
 मग आजी "पुषादितवाराची कहाणी" सांगायची.
 . सुरवात अशी असे "एका राणोबाई तुमची कहाणी...." पाचसहा कहाण्या आजी सांगायची. प्रत्येक रविवारी त्याच त्याच कहाण्या.
त्या कहाण्या वैज्ञानिक- तार्किक-वास्तविक वगैरे नव्हत्या.बोध- मर्म वगैरे पण नव्हतं त्यात काही. म्हातारी - गावखेडं-झाडं हेच वर्ण्य विषय.सूर्याच्या कृपेने काय मिळाले त्यांना ...ते रसाळ पद्धतीने वर्णन व आजीची सांगण्याची हातोटी. मज्जा यायची ऐकायला. दरवर्षी हाच उपक्रम -तिच्या भाषेत व्रत अखंड सुरु असे.
 आज विचार करते, काय मिळाले त्यातून ? नकळत भाषिकसंस्कार झाले ,कल्पनाविश्व समृद्ध करण्याचे कारण झाले ,कहाणी सांगण्याचे बीज रोवले गेले,,नियमिततेने केलेला उपक्रम म्हणजे व्रत हे कळले,भाषेची गोडी लागली..........अजून बरच काही जे शब्दांच्या पलीकडले आहे.
 आज वाटते ,आम्ही नशिबवानच . ट्युशन-क्लास-करियर,असे काहीच आमच्या पालकांच्या डोक्यात नव्हते. "फुंकर मारून फ़ुल उमलवण्याची घाई कोणालाच नव्हती" .आमच्या गतीने-कुवतीने आम्ही जात होतो ........खरच सुखीच होतो...
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
३.२.२०१७