Thursday, October 26, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त
पावलांना भार होईल येवढे नको वजन
प्रसादावर लक्ष जाईल नको लांबट भजन ॥
अडगळीत भर पडेल अशी नको साठवण
हृदयाला चरे पडेल तशी नको आठवण ॥
निराशमन पल्लवेल  असे असावे भाषण
प्रेरक -सन्मार्गदर्शक असे असावे वर्तन ॥
कोलाहलात स्वस्थ रहावे असे लागावे ध्यान
आपुलकीची ज्योत जागवी तो खरा सन्मान ॥
कायम मन प्रसन्न व्हावे असे असावे जगणे
सारं जग खुशीत रहावे हेच असावे मागणे॥
अवघ्या आयुष्याचे व्हावे परोपकारी चंदन
चराचरात परमेश दिसावा हेच खरे वंदन ॥
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




#सहजोक्तं संस्कृतेन ।


दृष्टान्तकथा ।
कस्मिञ्चित् नगरे
प्राचीन: देवालय: आसीत् ।
तस्य महिमा जनेषु ख्यात:। सर्वे भक्ता: तत्र गच्छन्ति स्म ।  नगरजना: सोत्साहं ,स्वयंप्रेरणया देवालये विविधान् भक्त्युपक्रमान्  प्रचालयन्ति स्म । न कोऽपि नेता आसीत् न वा अनुयायी तत्र । सर्वे समानत्वेन कार्यं कुर्वन्ति स्म । नगरजनानां निरपेक्षसेवया प्रसन्ना आसीत् देवता ।देवालयकारणात् नगरजनेषु एकता अवर्धत। सर्वे जना: श्रद्धावन्त: भूत्वा संघशक्तिमनुभूतवन्त:।नगरस्य कीर्ति: दिशि दिशि प्रसृता ।
एवं दिनानि व्यतीतानि ।
एकदा केचन परदेशीया: जना: नगरकीर्तिं श्रुत्वा नगरमागतवन्त:। तत्रत्यं वातावरणम् अनुभूय प्रभाविता: ते मनसि चिन्तितवन्त ,"कथम् एतस्य मंदिरस्य महत्वं न्यूनं भवेत् येन नगरस्य प्रसिद्धि: अल्पीभवेत् ।  जनेषु अस्माकं प्रभाव: वर्धेत ? "
नगरवासिन: तु तेषां हेतुं  न अवगतवन्त:।
नगरजनानां  प्रशंसां कुर्वन्त: ते देवालयं निरीक्षितवन्त: । ते दृष्टवन्त: केचन भक्ता: स्वमहिमानं वर्धयितुमिच्छन्ति । अवसरं प्राप्य परदेशीया: तान् भक्तान् तीर्थाटनार्थं तेषां नगरे आहूतवन्त:। तीर्थाटनात् प्रत्यागत्य स्वाभिमानवर्धिता: भक्ता: नूतनदेवालयं निर्मितवन्त:। अधुना नगरे द्वौ देवालयौ अभवताम् ।
अधुना जनानां पुरत: पर्याय: उपलब्ध:। केचन जना: पुरातनं देवालयम् एव  अगच्छन् । केचन तु नुतनं मंदिरम् एव  अगच्छन् । केचन तु द्वे स्थाने   अगच्छन्। स्वमहात्म्यं वर्धुकामा: नुतनदेवालयकारा: अधुना संतुष्टा:।
शनै: शनै: एकता क्षीणा जाता । एकमेवाद्वितीयदेवालयकारणात् लब्धा ख्याति: अपरदेवालयकारणात् अपगता । नगरस्य एकमेवाद्वितीयस्थानं तु लुप्तम् । यत्र संघे शक्ति: अनुभूता  जनै: तत्र भेदे नाश: अपि अनुभूत:। देवालयभेदत्वात् विभक्ता भक्ति: ।
घटनाक्रमं निरीक्षमाणा: सामान्यपर्यटका: मनसि चिन्तितवन्त: यत् ,
" सर्वे यत्र विनेतार:
सर्वे पण्डितमानिन:।
सर्वे महत्त्वमिच्छन्ति
राष्ट्रं तदवसीदति ॥  "
©डॉ. प्रज्ञा देशपांडे .
नागपूर .

#सहजोक्त

#सहजोक्त

कधी कधी काही सुचतं ,स्फुरतं नि शब्दबद्ध होतं , मग ते काव्य असो वा लेख. सहज ,सुप्त मनाच्या  तळाशी असले नसले काही भाव व्यक्त होतात. ते सारे अनुभूत वा अपेक्षित नसतात उलट बरेचदा  कल्पनारम्य असतात वा सहानुभूतीतून उमटलेले ईषत्स्फूट  असतात.
एकदा सहजोक्त मध्ये  काही लिहिले. नेहमी सारखे दोनशे-अडीचशे नियमित वाचकांना पाठवले. त्यातील एका सर्जक-कवी-लेखकाचा उत्स्फूर्त प्रतिसादाचा फोन  आला.  माझ्या कवितेतील अभिव्यक्तीवर  ते बराच वेळ बोलत होते. जे ही बोलत होते ते ऐकतांना मलापण माझ्या न कळत तो विचार,  विचारप्रवृत्त करीत होता.

भारतीय  संस्कृती पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पुरुषांना बरेचदा अमर्याद स्वातंत्र्य सहज मिळते. पुरुषांना अनेक गोष्टी अनायास करायला मिळतात. भ्रमरवृत्ती ही पुरुषाच्या रसिकतेशी जोडली जाते. पूर्वी बहुपत्नीत्व हे मर्दपणाशी जोडले जायचे . आजही पुरुषाचे बाहेरख्यालीपण वा लफ़डेबाजपणा अपवादात्मक विकृती म्हणून पाहिली जाते , गुन्हा नव्हे. सौ चूहियाँ खाऊन समाजात स्वच्छ प्रतिमेने जगणारे अनेक बिल्ले आजूबाजूला सहज दिसतात. 'इज्जत ही स्त्रिलाच असते पुरुषांना नाही', असा सर्व समाजाचा सामान्यग्रह आहे. त्यामुळे महिलांना बंधने तर पुरुषांना मोकाटपणा अोघाने येतोच . पुरुषाचे  गंभीर गुन्हेही "भूल" ठरते. तर स्त्रीची अनवधानाने झालेली भूल मोठ्ठा गुन्हा ठरते.  याच सर्व पार्श्वभूमीमुळे स्त्री ही अबला ठरते.  बरेचदा बिच्चारी ठरते . नाते कोणतेही  असो -पत्नी, सवत ,रखेल ,आजकालचं गोंडस नाव गर्लफ्रेंड वा मैत्रीण - बरेचदा ती शोषित ठरते. समाजाची सहानुभूती तिला मिळतेच .
या अशाच विचारातून "रुक्मिणीभावातून" मी कविता लिहिली होती.
पण त्या वाचकांच्या फोनने मला वेगळा विचार करायला भाग पाडले.
रुक्मिणी-सत्यभामा यांना राधा-मीरा यांच्यामुळे अवहेलना सहन करावी लागली असेल. त्यांच्या सहनशीलतेवर व सत्शीलतेवर  अनेक साहित्य रचले गेले. कृष्णाचे राधेशी वा मीरेचे कृष्णाशी असलेले नाते कृष्ण पत्नींना बिचारेपणाच देणारं आहे. जगात साहित्यातून त्याांना तशी सहानुभूती मिळतेही.
पण त्याच वेळी राधेच्या पतीच्या मनाचा विचार कां कोणी करीत नाही? परस्त्रियांना लुटणारा नरकासूर जाणूनच  राक्षस होता. पण राधेच्या पतीचे नशीब किती खराब की त्याला देवापासून वाचवायचे होते स्वत:च्या पत्नीला ! काय मानसिक यातना होत असतील त्याला की आवडती पत्नी परपुरुषाच्या प्रेमात आकंठ बुडालीय ,तो पुरुष सामान्य नसून पुरुषोत्तम म्हणविणारा आहे! तीच बाब मीरेची . अनय राजा होता. समाजात त्याचे श्रेष्ठ स्थान होते. अनेक स्त्रियांना तो हवहवासाही असेल पण त्याची पत्नी कृष्णार्पण झालेली!
परस्त्रीशी संबंध ठेवणं जसे गृहस्त्रीशी प्रतारणा आहे व जे चूक आहे तसेच परपुरुषाची अभिलाषा ही स्वपुरुषाशी प्रतारणाच आहे नि तीपण  चूकच अाहे. होय ना? देव असो वा मानव ; पुरुषप्रधान असो वा स्त्रीप्रधान ! समाजात काय चालले आहे ते ज्याची त्याची मर्जी वा स्वातंत्र्य !  पण साहित्यचित्रण करतांना तरी किमान व्यक्तीच्या भावनांचा समतोलपणे विचार करावा ना? फसवले गेल्याचे ,वंचना झाल्याचे ,लुबाडल्या गेल्याचे दुःख  स्त्रीला जास्त नि पुरुषाला कमी असे कसे होईल ? 
किमान संवेदनशील ,सर्जक लेखन करतांना येवढे भान ठेवावे ना !
त्या वाचकाच्या मनापासून मांडलेल्या विचारांनी मी अंतर्मुख झाली. नेहमी व्यक्त होणा-या भावनांच्या पेक्षा अगदी वेगळा  दृष्टिकोण माझ्या समोर उघड झाला होता.

आता तरी मला भेदभावरहीत व्यक्तिवादी-समतोल विचार करता येईल काय ?  परंपरा-रुढींनी बनविलेले एक पक्के मत इतक्या लवकर तसे बदलेल कां?  समतोल मत संवेदनशीलपणे शब्दातून सहजोक्त मांडता येतील काय?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, October 23, 2017

#सहजोक्त



परवा खूप दिवसांनी लहानपणीची मैत्रिण दिवसभर रहायला आली . इतके वर्षांचे साठवलेले ,मनाच्या कोप-यातले अनेक विषय अलगद  निघत होते ,गप्पा रंगत होत्या . ती पत्रकार मी  शिक्षक .  त्यामुळे फंडू आदर्शवादापासून व्यवहारिक वास्तवापर्यंत सर्व स्तरावरील सर्व विषयांच्या सगळ्या पातळ्यांवर गप्पा हाणत होतो. अनायासे अद्वैत नि शरद बाहेर गेले होते. म्हणजे "होल वावर वॉज अवर्स "!   कोण कसे रिऍक्ट होतात.यावर गाडी आली. कोणी उगाच स्पर्धा करतात , अकारण  वैर करतात. कोणी अकारण मन दूषित करतात . कोणी टोळकं बनवून वाळीत टाकतात असे एक ना अनेक  विषयांवर मस्त मनमुराद चर्चा झाली.
 बोलतांना ती म्हणाली ,," अग ,आपण आपलं सरळ ल्यूडो खेळल्यासारखं  आयुष्यात आलेलं दान समजून ,स्वीकारून पुढे जात असतो. पण काही लोक ठरवून बुद्धिबळाचा पट मांडून प्यादे जमवतात , वजीर स्वत: होतात , कोणाला घोडा,कोणाला उंट ,कोणाला काय काय करून वापरतात नि आपल्याला टॅकल करून  संपवण्याचा डाव आखतात. आपण गाफिल कधी सापडतोच यांच्या कटात मग आपले अतोनात नुकसान होते ."
तिचे बोलणे ऐकून मी विचारात पडली. खरच कितीदा आपण असे अवचित फसलो ? याचा हिशेब करू लागली. लख्ख  दिसू लागले एकेक प्रसंग. खरोखर सगळ्यांना आपुलकीने ,समानतेने ,न्यायाने वागवतांना ,सांभाळून घेण्याच्या नादात आपण  स्वत:लाच कितीदा डावलले ? याची मोजदाद कठीण होऊन बसली. मी चिंतनात व्यग्र झाली. तशी ती परत  म्हणाली ,"काय मिळतं त्यांना असे वागून ?" "अ ? हो ना!,खरेय!" असं काहीतरी बोलली नि पुन्हा विचारविवर्तात गढून गेली.. . . . . . .      .
इतकी बुद्धिमत्ता, येवढं कर्तृत्व केवळ दुस-याची रेष कमी करायला वा त्याला अपमानित करायला किंवा स्वत:च्या जपणूकीसाठी दुस-याचा बळी द्यायला वापरतांना यांचे मन कसे धजावते ? इतकं कसं सरावतं निर्ढावलेपण कि संवेदनाच संपून जातात. कोणतं यश मिळतं असं दुस-याला असहाय, लाचार करून  स्वत:चा मोठेपणा मिरवण्यात?  खरच हीच कर्तृत्वाची परिसीमा आहे कि मानसिक विकृती ? ... .. . .  . .
पुन्हा तिने तंद्री भंग केली . "काय विचार करतेय?" तिने विचारले. मी म्हटलं ,"अगं प्रयत्न करूनही आपल्याला ते बुद्धिबळ जमेल कां? निरपेक्ष सर्जनशील मन असे कारस्थानं करेल तर सर्जनशीलता संपणार नाही कां? आपण आपलं आपल्या स्वभावानुसार  वागावं ग साधं सरळ ,सकारात्मक  . . त्यांचे संस्कार ,त्यांचे वर्तन ,त्यांचे डावपेच त्यांना लखलाभ .. .  त्यांनी कितीही मात दिली ,तात्कालिक फायदा लुटला . . सोड आपण त्यांचा विचारच करू नये. . आपण आपली मुंगीची गती नि प्रयत्नवाद कधीच सोडू नये. .  . . हे केवळ तत्त्वज्ञान नाही हं सांगत.  . .  अनेक प्रसंग आले नि गेले .  . मी याच पद्धतीने वागते. कधी मला पण  निराशा येते , सारं व्यर्थ आहे वाटतं मग .  मी मार्ग बदलवते नि पुन्हा ध्येयाकडे संथ-सातत्याने चालू लागते. . कोणी सोबत असो नसो .  कोणी मला हारवले याचा आनंद घेऊ दे वा मी संपल्याची खुशी मिळवू दे. . मी आधीपण तीच  होती ,आताही तीच आहे ,पुढेही तीच नि तशीच राहील. सरळ ,कार्यरत ,सकारात्मक. . .   बुद्धिबळाचा डाव मांडून विजयी होऊन एकटं उरण्यापेक्षा , एकट्यानेच ल्यूडोसारखं पाऊल पुढे पुढे टाकत आपल्यासह सगळ्या "आपल्यांना" घेत  समूहाने विजय साजरा करणं केव्हाही छानच ना !
नाही विजय मिळाला तरी समाधान नक्कीच मिळतं बघ. तीच तृप्ती चेहरा सांगतो ,तुमचं सहज वागणं समजतं जगाला . . कोणी कितिही लपवलं तरी तुमच्या सच्चेपणाचा धाक असतोच त्या तशा कर्तृत्ववान लोकांवर . .  . . कुणी निंदा कुणी वंदा आमुचा स्वहिताचा धंदा सोडू नये.  . .
..  . . .  मी स्वगत बोलत होती ,  ती ऐकत होती .  शेवटी म्हणाली ,"खरय ग तुझं .  . ज्ञानेश्वरांचे पसायदान ,शंकराचार्यांचे निर्वाणाष्टक म्हणूनच भावतात ,रुजतात मनात . .. . .  . . आपला सकारात्मकतेचा मूळ पिंड  सोडूच नये. हेच खरं . .

ही दिवाळी करोखर दिवा उजळून गेली अंतरीचा !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎

Monday, October 2, 2017

सहजोक्त


#सहजोक्त

संक्रमण>संसर्ग>लागण
हे रोगराईाठी वापरलेले शब्द वाटतात.
पण तसं नाही.चांगल्या -वाईट, प्रवृत्ती-कृती यांचाही संसर्ग>संक्रमण>लागण होत असते ना !
आपण निराश असलो तर जगही निराश भासते.
आपण खुश असलो तर जग खुश दिसते.
निराशावादाने नकारात्मकता पसरते.
संशयीवृत्तीने पछाडले की संशयकल्लोळ होतो.
अहंकाराने व्यापले की सर्वत्र अहंकारच दिसतो.
जसे विचार तसे आचार.
जसा आचार तसा प्रभाव व परिणाम.
सकारात्मक रहाल तर तेच हजारपट होऊन तुमच्या जवळ येणार.
EVERY ACTION HAS EQUAL AND OPPOSIT REACTION.
जैसी करनी वैसी भरनी
पेराल तेच उगवेल.
करावे तसे भरावे.
हे सगळं सगळं माहितच आहे .मग मनात निराशाभाव कां???
निराशात्मक/कलुषित भाव तसेच प्रतिसाद देतील.
चला .
आज आत्ता ताबडतोप आपण आतून आनंदी होऊ या.आपला आनंद कोण्या व्यक्ती/ वस्तु/ बाह्यालंबनावर आधारित नको.

सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
स्वतत्त्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो, मती सदुक्त मार्गी वळो॥
..
मोरोपंतांच्या केकावलीचा अर्थ घेतांना "सुसंगती"म्हणजे चांगली संगत हा च घेतात साधारणपणे.
पण इथे सुसंगती = coordination >विसंगत नसलेले ,अनुरूप ,तर्कसंगत असा अर्थ जास्त प्रभावी वाटतो. आपल्या अवतीभवती कोणत्याही मनोवृत्तीचे लोकं असू देत ;त्यांची कृती मला सुसंगत ठरू दे, हे महत्वाचे.
"सुजनवाक्य कानी पडो"म्हणजे समोरच्याच्या मनात काहीही असो ,वाक्य सुजनच असावे.रामदास स्वामी म्हणतात "सर्वा मुखी मंगल बोलवावे ".
म्हणजे त्यांची इच्छा असो वा नसो ,वृत्ती असो वा नसो आपली प्रतिसादात्मक कृती इतकी प्रभावी असावी की त्यांच्या तोंडून "मंगलच" निघावे, सुजनवाक्यच कानी पडावे ,वाईट ऐकू नयेच.
मानवी बुद्धीला जन्मापासून नकारात्मकतेचीच सवय असते ,तोच बुद्धीचा कलंक होय.तो झडलाच पाहिजे.
विषय म्हणजे भौतिक सुखात लिप्त होणे ,त्याच आठवणींत रेंगाळणे.तोच चाळा बुद्धीला लागतो ,तो अावडेनासा होऊ दे."स्वतत्त्व" हृदयाला कळू दे.दुस-यांचा मोठेपणा सहज कळतो पण "आपण" कोण ते कळत नाही.आपण आपल्यावर मनापासून प्रेमच करीत नाही,दुस-याने प्रेम करावे असे अपेक्षितो . ~दुसरोंकी जय से पहले खुद की जय करे~ हे लक्षात ठेऊन आचरावे.स्वत:ला स्वत: स्वीकारणे फार अवघड.एक तर न्यूनगंडात जगतो वा अहंगंडात.कोणताही गंड न बाळगता 'मी' समजून घेत 'मी'शी एकरूप व्हावे ना !विपश्यनाच ना ती!!!
याच्या पुढची पायरी म्हणजे दुरभिमान गळून जाऊदे.जे क्षणभंगूर आहे ,पद-प्रसिद्धी-पैसा-सत्ता यांच्या पलीकडे माणुसकी .तीच चिरंतन.मग अभिमान कशासाठी??तोच दुरभिमान गळून जावा.गळणे स्वाभाविक प्रवृत्ती आहे."अति झालं न् उतू गेलं" असं व्हावं दुरभिमानाचही."मी दूर केला माझा अभिमान "म्हटले की कर्तृत्व आले आपल्या कडे. नकोच उपाध्या ,गळू दे सारे,सडके फ़ळ गळावे तसे.
एकदाचे हे सगळे करून मन निर्मळ झाले की पुन्हा मळू नयेच कारण स्वच्छ कपड्यावर डाग लवकर पडतात.निर्मळ मन सदुक्त मार्गावर चालू दे.
सत्+उक्त  . सद् म्हणजे चांगले /सत्य इतके नाही तर अस्तित्वात असलेले. जे जे उत्तम उदात्त मंगल तेच सत्  तेच टिकाऊ बाकी टाकाऊ.
तर मन सदुक्त मार्गावर चालू देत.
तर आजपासून आपण जगात वावरतांना सकारात्मक/मंगल विचारांचे संक्रामक बनून वागू या. आज आपण अल्पसंख्य असू कदाचित् पण नक्की बहुसंख्य होऊ लवकरच."एकोSहं बहुस्याम्" हे चिरंतन सत्य आहे.
चला तर संक्रमण करूया सद्विचारांचे , लगण करू मांगल्याची ;सद्विचारांचा संसर्ग वाढवू या.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.