Thursday, October 26, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त

कधी कधी काही सुचतं ,स्फुरतं नि शब्दबद्ध होतं , मग ते काव्य असो वा लेख. सहज ,सुप्त मनाच्या  तळाशी असले नसले काही भाव व्यक्त होतात. ते सारे अनुभूत वा अपेक्षित नसतात उलट बरेचदा  कल्पनारम्य असतात वा सहानुभूतीतून उमटलेले ईषत्स्फूट  असतात.
एकदा सहजोक्त मध्ये  काही लिहिले. नेहमी सारखे दोनशे-अडीचशे नियमित वाचकांना पाठवले. त्यातील एका सर्जक-कवी-लेखकाचा उत्स्फूर्त प्रतिसादाचा फोन  आला.  माझ्या कवितेतील अभिव्यक्तीवर  ते बराच वेळ बोलत होते. जे ही बोलत होते ते ऐकतांना मलापण माझ्या न कळत तो विचार,  विचारप्रवृत्त करीत होता.

भारतीय  संस्कृती पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पुरुषांना बरेचदा अमर्याद स्वातंत्र्य सहज मिळते. पुरुषांना अनेक गोष्टी अनायास करायला मिळतात. भ्रमरवृत्ती ही पुरुषाच्या रसिकतेशी जोडली जाते. पूर्वी बहुपत्नीत्व हे मर्दपणाशी जोडले जायचे . आजही पुरुषाचे बाहेरख्यालीपण वा लफ़डेबाजपणा अपवादात्मक विकृती म्हणून पाहिली जाते , गुन्हा नव्हे. सौ चूहियाँ खाऊन समाजात स्वच्छ प्रतिमेने जगणारे अनेक बिल्ले आजूबाजूला सहज दिसतात. 'इज्जत ही स्त्रिलाच असते पुरुषांना नाही', असा सर्व समाजाचा सामान्यग्रह आहे. त्यामुळे महिलांना बंधने तर पुरुषांना मोकाटपणा अोघाने येतोच . पुरुषाचे  गंभीर गुन्हेही "भूल" ठरते. तर स्त्रीची अनवधानाने झालेली भूल मोठ्ठा गुन्हा ठरते.  याच सर्व पार्श्वभूमीमुळे स्त्री ही अबला ठरते.  बरेचदा बिच्चारी ठरते . नाते कोणतेही  असो -पत्नी, सवत ,रखेल ,आजकालचं गोंडस नाव गर्लफ्रेंड वा मैत्रीण - बरेचदा ती शोषित ठरते. समाजाची सहानुभूती तिला मिळतेच .
या अशाच विचारातून "रुक्मिणीभावातून" मी कविता लिहिली होती.
पण त्या वाचकांच्या फोनने मला वेगळा विचार करायला भाग पाडले.
रुक्मिणी-सत्यभामा यांना राधा-मीरा यांच्यामुळे अवहेलना सहन करावी लागली असेल. त्यांच्या सहनशीलतेवर व सत्शीलतेवर  अनेक साहित्य रचले गेले. कृष्णाचे राधेशी वा मीरेचे कृष्णाशी असलेले नाते कृष्ण पत्नींना बिचारेपणाच देणारं आहे. जगात साहित्यातून त्याांना तशी सहानुभूती मिळतेही.
पण त्याच वेळी राधेच्या पतीच्या मनाचा विचार कां कोणी करीत नाही? परस्त्रियांना लुटणारा नरकासूर जाणूनच  राक्षस होता. पण राधेच्या पतीचे नशीब किती खराब की त्याला देवापासून वाचवायचे होते स्वत:च्या पत्नीला ! काय मानसिक यातना होत असतील त्याला की आवडती पत्नी परपुरुषाच्या प्रेमात आकंठ बुडालीय ,तो पुरुष सामान्य नसून पुरुषोत्तम म्हणविणारा आहे! तीच बाब मीरेची . अनय राजा होता. समाजात त्याचे श्रेष्ठ स्थान होते. अनेक स्त्रियांना तो हवहवासाही असेल पण त्याची पत्नी कृष्णार्पण झालेली!
परस्त्रीशी संबंध ठेवणं जसे गृहस्त्रीशी प्रतारणा आहे व जे चूक आहे तसेच परपुरुषाची अभिलाषा ही स्वपुरुषाशी प्रतारणाच आहे नि तीपण  चूकच अाहे. होय ना? देव असो वा मानव ; पुरुषप्रधान असो वा स्त्रीप्रधान ! समाजात काय चालले आहे ते ज्याची त्याची मर्जी वा स्वातंत्र्य !  पण साहित्यचित्रण करतांना तरी किमान व्यक्तीच्या भावनांचा समतोलपणे विचार करावा ना? फसवले गेल्याचे ,वंचना झाल्याचे ,लुबाडल्या गेल्याचे दुःख  स्त्रीला जास्त नि पुरुषाला कमी असे कसे होईल ? 
किमान संवेदनशील ,सर्जक लेखन करतांना येवढे भान ठेवावे ना !
त्या वाचकाच्या मनापासून मांडलेल्या विचारांनी मी अंतर्मुख झाली. नेहमी व्यक्त होणा-या भावनांच्या पेक्षा अगदी वेगळा  दृष्टिकोण माझ्या समोर उघड झाला होता.

आता तरी मला भेदभावरहीत व्यक्तिवादी-समतोल विचार करता येईल काय ?  परंपरा-रुढींनी बनविलेले एक पक्के मत इतक्या लवकर तसे बदलेल कां?  समतोल मत संवेदनशीलपणे शब्दातून सहजोक्त मांडता येतील काय?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment