Monday, October 23, 2017

#सहजोक्त



परवा खूप दिवसांनी लहानपणीची मैत्रिण दिवसभर रहायला आली . इतके वर्षांचे साठवलेले ,मनाच्या कोप-यातले अनेक विषय अलगद  निघत होते ,गप्पा रंगत होत्या . ती पत्रकार मी  शिक्षक .  त्यामुळे फंडू आदर्शवादापासून व्यवहारिक वास्तवापर्यंत सर्व स्तरावरील सर्व विषयांच्या सगळ्या पातळ्यांवर गप्पा हाणत होतो. अनायासे अद्वैत नि शरद बाहेर गेले होते. म्हणजे "होल वावर वॉज अवर्स "!   कोण कसे रिऍक्ट होतात.यावर गाडी आली. कोणी उगाच स्पर्धा करतात , अकारण  वैर करतात. कोणी अकारण मन दूषित करतात . कोणी टोळकं बनवून वाळीत टाकतात असे एक ना अनेक  विषयांवर मस्त मनमुराद चर्चा झाली.
 बोलतांना ती म्हणाली ,," अग ,आपण आपलं सरळ ल्यूडो खेळल्यासारखं  आयुष्यात आलेलं दान समजून ,स्वीकारून पुढे जात असतो. पण काही लोक ठरवून बुद्धिबळाचा पट मांडून प्यादे जमवतात , वजीर स्वत: होतात , कोणाला घोडा,कोणाला उंट ,कोणाला काय काय करून वापरतात नि आपल्याला टॅकल करून  संपवण्याचा डाव आखतात. आपण गाफिल कधी सापडतोच यांच्या कटात मग आपले अतोनात नुकसान होते ."
तिचे बोलणे ऐकून मी विचारात पडली. खरच कितीदा आपण असे अवचित फसलो ? याचा हिशेब करू लागली. लख्ख  दिसू लागले एकेक प्रसंग. खरोखर सगळ्यांना आपुलकीने ,समानतेने ,न्यायाने वागवतांना ,सांभाळून घेण्याच्या नादात आपण  स्वत:लाच कितीदा डावलले ? याची मोजदाद कठीण होऊन बसली. मी चिंतनात व्यग्र झाली. तशी ती परत  म्हणाली ,"काय मिळतं त्यांना असे वागून ?" "अ ? हो ना!,खरेय!" असं काहीतरी बोलली नि पुन्हा विचारविवर्तात गढून गेली.. . . . . . .      .
इतकी बुद्धिमत्ता, येवढं कर्तृत्व केवळ दुस-याची रेष कमी करायला वा त्याला अपमानित करायला किंवा स्वत:च्या जपणूकीसाठी दुस-याचा बळी द्यायला वापरतांना यांचे मन कसे धजावते ? इतकं कसं सरावतं निर्ढावलेपण कि संवेदनाच संपून जातात. कोणतं यश मिळतं असं दुस-याला असहाय, लाचार करून  स्वत:चा मोठेपणा मिरवण्यात?  खरच हीच कर्तृत्वाची परिसीमा आहे कि मानसिक विकृती ? ... .. . .  . .
पुन्हा तिने तंद्री भंग केली . "काय विचार करतेय?" तिने विचारले. मी म्हटलं ,"अगं प्रयत्न करूनही आपल्याला ते बुद्धिबळ जमेल कां? निरपेक्ष सर्जनशील मन असे कारस्थानं करेल तर सर्जनशीलता संपणार नाही कां? आपण आपलं आपल्या स्वभावानुसार  वागावं ग साधं सरळ ,सकारात्मक  . . त्यांचे संस्कार ,त्यांचे वर्तन ,त्यांचे डावपेच त्यांना लखलाभ .. .  त्यांनी कितीही मात दिली ,तात्कालिक फायदा लुटला . . सोड आपण त्यांचा विचारच करू नये. . आपण आपली मुंगीची गती नि प्रयत्नवाद कधीच सोडू नये. .  . . हे केवळ तत्त्वज्ञान नाही हं सांगत.  . .  अनेक प्रसंग आले नि गेले .  . मी याच पद्धतीने वागते. कधी मला पण  निराशा येते , सारं व्यर्थ आहे वाटतं मग .  मी मार्ग बदलवते नि पुन्हा ध्येयाकडे संथ-सातत्याने चालू लागते. . कोणी सोबत असो नसो .  कोणी मला हारवले याचा आनंद घेऊ दे वा मी संपल्याची खुशी मिळवू दे. . मी आधीपण तीच  होती ,आताही तीच आहे ,पुढेही तीच नि तशीच राहील. सरळ ,कार्यरत ,सकारात्मक. . .   बुद्धिबळाचा डाव मांडून विजयी होऊन एकटं उरण्यापेक्षा , एकट्यानेच ल्यूडोसारखं पाऊल पुढे पुढे टाकत आपल्यासह सगळ्या "आपल्यांना" घेत  समूहाने विजय साजरा करणं केव्हाही छानच ना !
नाही विजय मिळाला तरी समाधान नक्कीच मिळतं बघ. तीच तृप्ती चेहरा सांगतो ,तुमचं सहज वागणं समजतं जगाला . . कोणी कितिही लपवलं तरी तुमच्या सच्चेपणाचा धाक असतोच त्या तशा कर्तृत्ववान लोकांवर . .  . . कुणी निंदा कुणी वंदा आमुचा स्वहिताचा धंदा सोडू नये.  . .
..  . . .  मी स्वगत बोलत होती ,  ती ऐकत होती .  शेवटी म्हणाली ,"खरय ग तुझं .  . ज्ञानेश्वरांचे पसायदान ,शंकराचार्यांचे निर्वाणाष्टक म्हणूनच भावतात ,रुजतात मनात . .. . .  . . आपला सकारात्मकतेचा मूळ पिंड  सोडूच नये. हेच खरं . .

ही दिवाळी करोखर दिवा उजळून गेली अंतरीचा !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎

No comments:

Post a Comment