#सहजोक्त
संक्रमण>संसर्ग>लागण
हे रोगराईाठी वापरलेले शब्द वाटतात.
पण तसं नाही.चांगल्या -वाईट, प्रवृत्ती-कृती यांचाही संसर्ग>संक्रमण>लागण होत असते ना !
आपण निराश असलो तर जगही निराश भासते.
आपण खुश असलो तर जग खुश दिसते.
निराशावादाने नकारात्मकता पसरते.
संशयीवृत्तीने पछाडले की संशयकल्लोळ होतो.
अहंकाराने व्यापले की सर्वत्र अहंकारच दिसतो.
जसे विचार तसे आचार.
जसा आचार तसा प्रभाव व परिणाम.
सकारात्मक रहाल तर तेच हजारपट होऊन तुमच्या जवळ येणार.
EVERY ACTION HAS EQUAL AND OPPOSIT REACTION.
जैसी करनी वैसी भरनी
पेराल तेच उगवेल.
करावे तसे भरावे.
हे सगळं सगळं माहितच आहे .मग मनात निराशाभाव कां???
निराशात्मक/कलुषित भाव तसेच प्रतिसाद देतील.
चला .
आज आत्ता ताबडतोप आपण आतून आनंदी होऊ या.आपला आनंद कोण्या व्यक्ती/ वस्तु/ बाह्यालंबनावर आधारित नको.
सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
स्वतत्त्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो, मती सदुक्त मार्गी वळो॥
..
मोरोपंतांच्या केकावलीचा अर्थ घेतांना "सुसंगती"म्हणजे चांगली संगत हा च घेतात साधारणपणे.
पण इथे सुसंगती = coordination >विसंगत नसलेले ,अनुरूप ,तर्कसंगत असा अर्थ जास्त प्रभावी वाटतो. आपल्या अवतीभवती कोणत्याही मनोवृत्तीचे लोकं असू देत ;त्यांची कृती मला सुसंगत ठरू दे, हे महत्वाचे.
"सुजनवाक्य कानी पडो"म्हणजे समोरच्याच्या मनात काहीही असो ,वाक्य सुजनच असावे.रामदास स्वामी म्हणतात "सर्वा मुखी मंगल बोलवावे ".
म्हणजे त्यांची इच्छा असो वा नसो ,वृत्ती असो वा नसो आपली प्रतिसादात्मक कृती इतकी प्रभावी असावी की त्यांच्या तोंडून "मंगलच" निघावे, सुजनवाक्यच कानी पडावे ,वाईट ऐकू नयेच.
मानवी बुद्धीला जन्मापासून नकारात्मकतेचीच सवय असते ,तोच बुद्धीचा कलंक होय.तो झडलाच पाहिजे.
विषय म्हणजे भौतिक सुखात लिप्त होणे ,त्याच आठवणींत रेंगाळणे.तोच चाळा बुद्धीला लागतो ,तो अावडेनासा होऊ दे."स्वतत्त्व" हृदयाला कळू दे.दुस-यांचा मोठेपणा सहज कळतो पण "आपण" कोण ते कळत नाही.आपण आपल्यावर मनापासून प्रेमच करीत नाही,दुस-याने प्रेम करावे असे अपेक्षितो . ~दुसरोंकी जय से पहले खुद की जय करे~ हे लक्षात ठेऊन आचरावे.स्वत:ला स्वत: स्वीकारणे फार अवघड.एक तर न्यूनगंडात जगतो वा अहंगंडात.कोणताही गंड न बाळगता 'मी' समजून घेत 'मी'शी एकरूप व्हावे ना !विपश्यनाच ना ती!!!
याच्या पुढची पायरी म्हणजे दुरभिमान गळून जाऊदे.जे क्षणभंगूर आहे ,पद-प्रसिद्धी-पैसा-सत्ता यांच्या पलीकडे माणुसकी .तीच चिरंतन.मग अभिमान कशासाठी??तोच दुरभिमान गळून जावा.गळणे स्वाभाविक प्रवृत्ती आहे."अति झालं न् उतू गेलं" असं व्हावं दुरभिमानाचही."मी दूर केला माझा अभिमान "म्हटले की कर्तृत्व आले आपल्या कडे. नकोच उपाध्या ,गळू दे सारे,सडके फ़ळ गळावे तसे.
एकदाचे हे सगळे करून मन निर्मळ झाले की पुन्हा मळू नयेच कारण स्वच्छ कपड्यावर डाग लवकर पडतात.निर्मळ मन सदुक्त मार्गावर चालू दे.
सत्+उक्त . सद् म्हणजे चांगले /सत्य इतके नाही तर अस्तित्वात असलेले. जे जे उत्तम उदात्त मंगल तेच सत् तेच टिकाऊ बाकी टाकाऊ.
तर मन सदुक्त मार्गावर चालू देत.
तर आजपासून आपण जगात वावरतांना सकारात्मक/मंगल विचारांचे संक्रामक बनून वागू या. आज आपण अल्पसंख्य असू कदाचित् पण नक्की बहुसंख्य होऊ लवकरच."एकोSहं बहुस्याम्" हे चिरंतन सत्य आहे.
चला तर संक्रमण करूया सद्विचारांचे , लगण करू मांगल्याची ;सद्विचारांचा संसर्ग वाढवू या.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment