Tuesday, January 30, 2018

#भाषाचिन्तन



.भाषा (भाष्, बोलणे )पासून "जी बोलल्या जाते ती भाषा" या अर्थाने हा शब्द आहे.
 अन् खरे तर "भाषा"शब्दाची हीच मूळ व्याख्या आहे ,
तसेच बोलणे ,संवाद साधणे हेच तिचे मूळ उद्दिष्ट आहे.

बोली,उपभाषा,प्रमाणभाषा,शुद्धभाषा,
मिश्रभाषा,
प्राचीनभाषा,आधुनिकभाषा,ज्ञानभाषा इत्यादि प्रकार; हा म्हणजे शब्दविलास होय.

अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा ,तसेच कामक्रोधहर्षादि मूळभावनांच्या पूर्ततेसाठीच भाषेचा उपयोग असतो.
अस्मिता-साहित्य-संस्कृती इत्यादि म्हणजे फ़ुटलेले घुमारे आहेत. ते चूकीचे आहेत ,असे अजिबात नाही .
पण "खाली पेट भजन न भाये गोपाला" हे त्रिकालाबाधित त्रिवार सत्य आहे.

भाषेचा उगम केव्हा झाला?
प्राचीनतम भाषा कोणती?
कोण्या भाषेतून कोणती भाषा जन्मली?
सर्वाधिक बोलली जाणारी भाषा?
मूलनिवासी भाषा कोणती??
श्रेष्ठ  भाषा कोणती??
आजची मृतभाषा कोणती?
जागतिकभाषा कोणती??
अशा प्रश्नमालिका सोडविण्याचा या लेखाचा उद्देश नाही आणि ह्या'"अनादि-अखंड-अनंत"प्रश्नमालिका सोडविण्या इतपत दांडगी माझी प्रज्ञा नाही नि भाषिकव्यासंग ही नाही!! असो.

एक सामान्य व्यक्ती म्हणून "भाषा " बाबत  माझे विचार व्यक्त करीत आहे.

 कोणतीही भाषा १००%नवी नाही नि १००%जुनी ही नाही.
 आई ज्याप्रमाणे अपत्याला जन्म देते त्या प्रमाणे कोणी एक भाषा कोण्या एकाभाषेला जन्म देत नाही.

  भाषा  ही भूगोल-समाज-कालसापेक्ष असते.

  प्रत्येक व्यक्ती तीच  भाषा वेगळी-वैशिष्ट्यपूर्ण बोलत असते.
भाषेचे मूळ, शब्द आहेत तर शब्दांचे मूळ ध्वनि म्हणजे नाद होय.
  " मुख" हेच नाद प्रगटीकरणाचे मूळ साधन आहे.
 जगात जितके लोक आहेत त्या सगळ्यांची मुखरचना भिन्न व वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्यामुळे उच्चारणशैली प्रत्येकाची भिन्न असते.

   साध्या 'अ'चे उदाहरण बघू. कोमल-मध्यम-तीव्र ,लघु-गुरु-प्लूत, सानुनासिक-अननुनासिक याप्रकारे अठरा भेद होतात. त्यात व्यक्तिवैशिष्ट्याने अगणित उच्चार तयार होतात.

   इथेच "भाषा-अंतर" व्हायला खरी सुरवात होते. म्हणून तर म्हणतात ,"नवा वाणी मुखे मुखे"!
  भाषिकभेदाची सुरवात इथेच होते.

  उदाहरणार्थ त्रयोदशी>तेरस>तेरा
  अक्षय्य>अख्खय>आखजी>आख्खा
  आषाढी>आखाडी
  यमुना> जमना
  बर मग ठिक आहे> बर्मगठिका
  देवयानी>देबजानी
  इंद्रवर>इंदिवर
  अमरेंद्र>अमरिंदर
  लुप्त हंसा> लुप्तांझा
  अोनामा >अोम् नम:
  अोनामासिधम> अोम् नमो सिद्धम्
  अशाप्रकारे उच्चारण भेद हे भाषा-विभाषेचे मूळ कारण असावे असे वाटते.

  मानवीवंशापासूनच भाषेचा जन्म झाला असावा. वर सांगितल्या प्रमाणे भाषांतर होता होता अनेक भाषा तयार झाल्या असाव्यत.त्यामुळे कोणत्या भाषेतून कोणता शब्द आला हे ठरवणे कष्टसाध्यच आहे. शिवाय शक्याशक्यते नुसार या भाषेतील शब्द
  त्या भाषेत जाऊन परत या भाषेत येऊ शकतोच ना.  तसेच या दोन्ही भाषेतून तिस-या भाषेत या सर्व शब्दांसह तिचा स्वतंत्र शब्द असू शकतोच ना.

उदाहरणार्थ  पक्षी (संस्कृत) > पख्खी(पाली) >पक्षी ,पाखरू (मराठी)

  [पालीपासून संस्कृत झाली की संस्कृतपासून पाली ,मराठी आधी का या भाषा ,या वादात पडाण्यासाठी ही उदाहरणे दिली नसून मला याच भाषा ज्ञात आहेत. इतर भाषांचा अभ्यास  नाही .म्हणून याच भाषांची उदाहरणे मी देते.]

  पूर्वी दळणवळण साधने तितकी उपलब्ध नव्हती. शिवाय तंत्रज्ञानही प्रगत नव्हते. त्यामुळे एकच भाषा वा मर्यादित बोली यांच्याद्वारे व्यवहार होत होते.देवाण-घेवाण क्वचितच होत असे.

आज सगळीच वर्दळ वाढलीय .त्यामुळे मानवांप्रमाणे भाषांचाही प्रवास-प्रगती वाढतेय यात शंका नाही.
 मग शब्द-शैली-ढब-तंत्र यांची देवाण-घेवाण होणे अपरिहार्य आहेच.

मानवीसमूहाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे "अहंपण"! मी-माझे-मम यातूनच ममत्व निर्माण होते. त्यातून भाषाही सुटत नाही.
पण कधी कधी मानवी प्रवृत्तीपेक्षाही शब्दांची विष्णुवृत्ती-(हा धार्मिक शब्द नाही ,शिरण्याची प्रवृत्ती)-अधिक तीव्र असते.
त्यामुळे कोणत्याही भाषेतील शब्द कुठल्या भाषेतील शब्दांशी साम्य बाळगतील हे सांगता येत नाही.
 उदाहरणार्थ निअर (जवळ या अर्थाने) इंग्रजी भाषेतील शब्द त्याच अर्थाने पण उच्चार वेगळा 'निअरे' राजस्थानीत आढळतो.
असे अनेक उदाहरणं कोसो दूरच्या भाषांमध्ये सापडतात.
कोणी कोणाचा शब्द घेतला यावर वाद करण्यापेक्षा भाषा शब्दसमृद्ध झाली हा परिणाम मोठा नाही कां?
मी माझ्या भाषेत परके शब्द घेणार नाहीच हा दुरभिमान आहे तसेच अधिकाधिक परकेच शब्द योजीन हा ही कणा नसल्याचा पुरावा आहे. इथे विवेक हवा. माझ्या मूळ भाषिक- अस्तित्वाला धोका न आणता ,भाषिकप्रवृत्तीला जपत जपतच मी शब्द स्वीकारीन  असा दृष्टिकोण असावा.
तसेच माझ्या भाषेतील याच अर्थाचे सर्व शब्द त्याच्या इतर अर्थच्छटांसह जपत नव्या शब्दाची भर घालण्यात कमी पणा वाटू नये.
गरज भासल्यास कोणत्याही भाषेतून शब्द आयात करावे . तसेच आपल्या भाषेतील शब्द सहज
दुस-या भाषेत पेरावे.
शेवटी भाषा ही बोलण्यासाठी (टचटच नाही) हे मूळ उद्दिष्ट कोणीच विसरू नये.
जगा -जगवा -जगू द्या.
तद्वत
बोला- बोलू द्या-बोलवा
(सर्वा मुखी मंगल बोलवावे मधिल बोलवा... )
हेच सूत्र महत्वाचे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, January 14, 2018

#कविता

#कविता.
असा कसा ग यशोदे तुझा हा कान्हा
किती सांगू  बाई याच्या कागाळ्या ग कुणा? ॥॥धृ॥

जमवून सा-या गोकुळीच्या बाळगोपाळा
शिकवी चोराया लोणी हांडीतील सकळा
गाई राखतांना करी खोड्यांच्या नानाकळा
यमुनेच्या काठी जमवी गोपाळांचा मेळा ॥
॥१॥

घागर फोडी मारून दगडं डोक्यावरची भारी
गोपीवस्रांची करून पळवापळवी हा बेजारी
छळण्याची ग सदाची  रीतच बाई याची न्यारी
तरीही मनामध्ये आमुच्या याचीच मूर्ती साजिरी
॥२॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे


Thursday, January 11, 2018

#कविता

#कविता
नेहमी सगळ्यांना सावली देणा-या झाडालाही कधी तरी सावलीत बसावं वाटत असेल ना ?
सतत सर्वांचे भार सहून पोसणा-या वसुंधरेला  कोणी तरी आधार असावा वाटत असेल ना?
ऊर्जा देत दिनरात तळपणा-या सूर्याच्या जवळ हळूच मायेची पखरण करीत कोणी असावं ना?
दुनियेचा खारटपणा पोटात घेत गोड ढगांतून वर्षणा-या सागराची तृष्णा भागवावी ना कोणी?
अनेकांचा आधारवड झालेल्या मनाला  कातरक्षणी साधार भावनिक जपावं ना कोणी ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे



Saturday, January 6, 2018

#सहजोक्त


कृष्ण देवच होता
पूर्णपुरुष होता
सोन्याच्या द्वारकेचा राजा होता
आठ पट्टराण्यांचा भर्तार होता
सुदामा-पेंद्याचा यार होता
सोळा हजार स्त्रियांचा पती होता
पांडवांचा परममित्र होता.
सांदिपनींचा शिष्य होता
गोकुळाचा प्राण होता
गोपींचा रमण होता
भक्तांचा तारणहार होता
कुशलनीतिज्ञ ,पराक्रमी-वीर होता
तत्त्ववेत्ता होता ,द्रौपदीचा सखा होता
राधेचा जीव होता ,मीरेचे आराध्य होता.
तसं त्रिलोकात देवांचा देव म्हणूनच ख्यात होता.
तरी मनाला एकच बाब कायम सलते इतकं सगळं छानच होतं ,
तर शेवटही छान कां झाला नाही ?
एका व्याधाच्या साध्या बाणाने मृत्यू यावा ?
आयुष्यभर ज्या असुरांच्या विरुद्ध लढा दिला त्यांच्याच कन्येचे सासरेपण नशिबी आले.
आपल्याच डोळ्यादेखत यादवी बघणेही आले.
निर्माण केलेली द्वारकाही डुबणे टाळता आले नाही.
कुलस्त्रियांचे परपुरुषांकडून अपहरण देखिल ना अर्जून टाळू शकला ना कृष्णाचे सत्त्व.
आयुष्य सारे अन्यायाविरुद्ध लढण्यात गेले मग शेवट दु:खान्त कां?
ही सल सतत कुरतडते मनाला  की कां असं व्हावं देवाचे ?
केवळ ईश्वरेच्छा ? की कर्माचा सिद्धान्त  ? की मानवी जीवनाची अगतिक अपरिहार्यता ? की 
दैवगती? की काय ? नेमकं काय ?  प्रत्येक कृष्णाने विचार करावाच याचा .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Friday, January 5, 2018

#सहजोक्त



रामकृष्ण मिशन  नागपूर यांच्या एका पुस्तकासाठी  इंग्रजी कवितेचा स्वैरानुवाद केला. ज्येष्ठ शिक्षिका
रामकृष्ण मिशन  नागपूर यांच्या एका पुस्तकासाठी  इंग्रजी कवितेचा स्वैरानुवाद केला. ज्येष्ठ शिक्षिका व रामकृष्ण मिशनच्या निस्सीम भक्त मंगला देसाई यांनी इंग्रजी कविता हाती ठेवली नि आताच अनुवाद कर असे सांगितले कविता केली ,त्यांच्याच मार्फत आश्रमास दिली, तेथे महाराजांना आवडली अन् त्यांनी ती पुस्तकात घेतली .  ती पुढे आहे.


## कविता
ध्येयपथाहून पुन: परतूनि कधीही तू येऊ नको
जेव्हा भोवती संकट-वलये येती  घेरोनि
मार्गक्रमणी कठिण ती उसवी श्वासासी
कर्ज ऋणाचे चढती आणिक पुण्य क्षय होई
हसू फुकाचे महाग होऊन जीवन क्षारण करी
थांब जरासा सावध क्षणसा, धैर्य जागवी मनी
परंतु कधीही ध्येयपथाहून परतु नको माघारी !

जीवनपथ हा अकल्पितसा
वळणे, खळगे आणिक धोके
हेच समजणे म्हणजे जगणे
अपयश त्यातील शिक्षक साजे.
आज जरी यश धूसर दिसते
नकोस त्यागू ध्येय्याक्रमणा
क्षण उद्याचा यशस्वीतेचा
वाट पाहती यशशिखरे ती
असेच सारे समजून उमजून
ध्येयपथाहून माघारी तू नकोस परतू !

विकारयुक्त ते मन सदोदित
भासवी ध्येया समीप साहजिक
ध्येयपथिक तू,भुलून मोहून
सोडसी ध्येया निचृत् लाभा
श्रेय तुझे मग लयअस जाईल
पश्चअत् बुद्धी प्रबोध देईल
स्थिर-निश्चल जर असती प्रगती
ध्येयआसनीची ती निश्चित स्थिती
म्हणुन कधीही कशामुळेही
ध्येयपथाहुन नकोस परतू तू माघारी ।

गमे कधी हे यश बघावे
प्रछन्न अपयशचि सदा रे
असून अंतरिु स्वान्त-सुखाने
शोध घेतसे बहिर्मनाने
कसे मिळावे ध्येय अशाने ?
संकल्पविकल्पी नकोस अडकू
अढळबुद्धीला स्थिर करी तू
दैन्य दारिद्र्य भोग भोगूनि
कास न  सोडी ध्येयाक्रमणी
काजळलेले जरि दैव या क्षणी
उजळेल निश्चित श्रद्धा ज्ञानी
म्हणून फिरू तू ,नकोस मागे
ध्येय साधका साधनयोगे !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, January 4, 2018

#सहजोक्त



नावाला अर्थ असावा या मताची मी आहे. त्यातल्या त्यात व्यक्तीच्या नावाला तर अर्थ असलाच पाहिजे असे माझे ठाम मत आहे. माझं मत बाळगण्याचा मला अधिकार आहे.
माझ्या घरी अाधीच्या पिढीपासून ते पुढच्या पिढीपर्यंत सगळ्यांची नावे अर्थपूर्ण व वैशिष्ट्य युक्त आहे. माझी आजी अतिशय बुद्धिमती व कल्पक होती. आम्हा सर्व नातवंडांचे नामकरण तिनेच केले इतकेच नाही तर त्यांच्या पत्नींची नावं काय ठेवावीत हेही तिने डायरीत लिहून ठेवले होते.आमच्या मुलांची नावे आमच्या आईच्या सल्ल्याने ठेवली. आमच्या कुटुंबातील काही नावांचा इथे उल्लेख करतेय.
माझे वडिल श्रीश म्हणून त्यांनी माझ्या आईचे नाव श्री . श्री म्हणजे लक्ष्मी .श्रीचा म्हणजे लक्ष्मीचा ईश म्हणजेच  श्रीश म्हणजे विष्णु.
आम्ही तिघे भावंडं .माझा मोठा भाऊ  प्रणव म्हणजे अोंकार म्हणजे ज्ञानाची सुरुवात ज्या अक्षराने होते ते, तर वहिनीचे नाव ठेवले ऋचा म्हणजे ऋग्वेदातील मंत्र .
मधली मी . माझं नाव प्रज्ञा . अर्थ बुद्धी.
लहान भावाचे नाव प्रबोध म्हणजे ज्ञानाची जाणीव होणे. त्याच्या पत्नीचे नाव प्राची ,अर्थ पूर्व दिशा ,जिथून सूर्योदय होतो.
प्रणव-प्रज्ञा-प्रबोध म्हणजे पहिले ज्ञानाक्षर-बुद्धी-ज्ञानाची जाणीव .आमच्या नावातच सुसंगती आहे असे नाही तर आमच्या भावनाही तशाच आहे.
माझा मुलगा अद्वैत (ईशान) . अद्वैत म्हणजे आत्म-परभाव लोप होऊन एकवटणे. ईशान म्हणजे सर्वांवर सत्ता चालवणारा.
प्रणवचे  दोन मुलगे ,पहिला स्वक्ष म्हणजे सु+अक्ष सुंदर डोळे असलेला (विष्णुसहस्रनामातील एक नाव) , तर दुसरा शर्व अर्थात वाईटाचा विनाशकरणारा शंकर.
प्रबोधची दोन अपत्य . मोठी स्रग्वी . स्रज् म्हणजे फुलांची माळ ,स्रग्विन् म्हणजे गळ्यात फुलांची (वैजयंती) माळ घातलेला विष्णु.हे ही विष्णुसहस्रनामातील एक नाव आहे.  तसा स्रग्वी हा पुल्लिंगी शब्द .पण मराठीचे वळणच तसं आहे .सविता ,निलिमा ,गरिमा  ही मूळ पुल्लिंगी शब्द आपल्याकडे स्त्रियांची नावं आहेत. असो. त्याचा दुसरा मुलगा सिद्धार्थ . हेही विष्णुचेच नाव.
माझ्या बाबांच्या नावाचा अर्थ विष्णू आहे आणि आमच्या पासून ते आमच्या मुलांची नावं देखिल विष्णु संबंधी आहे.
नामकरण एकदाच (मुलींचे क्वचित दोनदा) होते त्यामुळे ते सार्थच ठेवावे .
 बाकी नावं काय ठेवावे    हा  प्रत्येकाचा    लाडका उद्योग असू शकतो.
©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे.

Tuesday, January 2, 2018

#चित्रकविता


ना सुरेल भुपाळी
ना वासुदेवाची हाळी
तरी काष्ठीपाषणीजळी
देवा तुझी किरणं उजळी॥
निरेशेतही आशावाद
कुठून बरे आणतो ?
रोज मावळून परत
 कसां बरं उगवतो?
 ‎रोज करून ऊर्जादान
जगवतो पृथ्वीजीवन
कृतज्ञ तुजप्रति सकलजन
मनातून असो तुला नमन ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#चित्रकविता

#चित्रकविता
आताशा भीति वाटते स्वप्न बघायचीपण॥
उगाच छळतात नंतर बनून आठवण॥
जे जसं समोर येईल त्याला तोंड देणे ॥
नाही तर मागाहून मनात कुढत बसणे ॥
सारे हिशोब नाहीच  चुकते करता  येत  ॥
तेच मग ठरतात भळभळती जखम थेट ॥
म्हणूनच मी स्वप्न पाहणं सोडलय ॥
कारण सत्याहूनही जास्त त्यांनीच मला छळलय  ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Monday, January 1, 2018

#सहजोक्त


 रे रे रासभ, वस्रभारवहनात् कुग्रासमश्नासि किम् ?
 ‎राजाश्वावसथं प्रयाहि चणकाभ्यूषान् सुखं भक्षय ।
 ‎सर्वान् पुच्छवतो हया:इति वदन्त्यत्राधिकारे स्थिता:
 ‎राजा तेरुपदिष्टमेव मनुते सत्यं,तटस्था: परे ॥
 ‎ दोनतीन दिवसांपासून हा श्लोक डोक्यात घोळतो आहे. अर्थ असा की," हे धोब्याच्या गाढवा ,कपड्यांचे अोझे वाहून (देखील) वाईट अन्न कां बरे खातोस ? राजाच्या अश्वशाळेत जा आणि तेथे भाजलेले हरभरे खुशाल खा. ह्या ठिकाणी असलेले अधिकारी ,शेपटीधरी प्राण्यांना घोडा समजतात नि राजाही त्यांच्यावर विश्वास ठेवतो, इतर लोक तटस्थ असतात."
 ‎अन्योक्ती प्रकारातील अतिशय मार्मिक असा हा श्लोक. आजही सार्थ आहे. संस्कृतातील सुभाषिते आजही समर्थ कां ? कारण आजही त्यांची उपयुक्तता ताजी आहे.
 ‎तत्कालिन परिस्थितीवर भाष्य करणारा हा श्लोक आजही यथार्थ नव्हे कां?
 ‎क्षेत्र कोणतेही घ्या ,काळ कोणताही असू द्या परिस्थिती बदललेली नाही. हेच खरे.
 ©डॉ. प्रज्ञा  देशपांडे.
 ‎