Tuesday, November 20, 2018

#सहजोक्त.


काही अक्षरवाङ्मय अजरामर असते.त्यातही कविता वर  त्या जर संगीतबद्ध गायलेल्या असतील तर .....? सोने पे सुहागा.
 दिनतीन दिवसांपूर्वी कधी नव्हे इतकी फुरसत न् रिकामा वेळ  अवचित गवसला. अंगणात पाळण्यावर झोके घेत होती. लहानपणी पाळण्यावर जोर जोरात झुलतांना त्या लयीने गाणं आपोआप फुटायचे. तसंच आताही सुरु झाले.  जरा वेळाने सूर्य मावळतीला जाऊ लागला.
 झोपाळ्यावर झुलतांना तसेही मन हिंदोळे घेतच असते. त्यात पूर्णपणे रिकापण. मग काय ? मन सुसाट पण लयीत सुरु झाले . झाडांच्या मध्ये त्या सूर्याचा रक्तिमा  पसरला होता. तसा उगवतीचा सूर्य अन् मावळतीचा सूर्य दिसायला  सारखाच  . "उगवतीचा सूर्य" हा एक शब्दप्रयोग प्रसिद्ध आहे.
 तो मावळतीचा  सूर्य बघून गाणं आठवलं . नुसतं आठवलंच नाही तर लहानपणी खेडेगावी आमचे  बाबा आम्हाला पाळण्यावर झोके घेत गाणे गायचे. बाबांची काही गाणी आवडती होती . बाबांची अजून एक सवय होती की ते गाण्याचा अर्थ उदाहरणा सह समजाऊन सांगायचे . तेव्हा बाबांनी सांगितलेलं  सगळं समजायचेच असे नाही पण छान वाटायचे.
 त्या दिवशी तो सूर्य पाहून ते गाणे आठवले.
 ते गाणे म्हणजे  भा.रा. तांबे यांची कविता आहे.  ती संपूर्ण कविता अशी..

मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा !॥धृ॥

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा ॥१॥

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा !॥२॥

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा !॥३॥

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा !॥૪॥

यातील पहिले तीन कडवे लता मंगेशकरांच्या आवाजात नेहमी ऐकल्या गेले आहे. शाळेत कविता सुद्धा तीनच कडव्यांची शिकविल्या गेली. शेवटचे कडवे मात्र अपरिचित आहे.
वर वर निराशावादी वाटणा-या   या गाण्यात एक वेगळेच आकर्षण आहे ,अोढ आहे . खोल खोल अंतर्मुख करण्याची ताकद आहे.
या गाण्यातला सूर्य खूप जवळचा , नेहमीचा वाटत राहतो. या सूर्याचे कर्तृत्व ,चांगुलपणा जवळून अनुभवलेला वाटतो. उगवत्याला सलाम ठोकणा-या समाजात मावळत्या सूर्याचे वंदन मनाला भिडणारे पण जरासा दिलासाही देणारे वाटते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
 

Monday, November 19, 2018

#सहजोक्त.


"तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी" असं प्रत्येकाच्याच जीवनात अनुभवायला  येतं. सगळं असतं तर वेळ नसतो ,वेळ असतो तेव्हा बळ नसतं , न् सर्व जुळून आलं तरी प्रत्यक्षात उतरतच नसते. काय कारण असावे ?? दैवात नसते कां मुळात मनातच नसते , ते सारं प्राप्त करणं ??
जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्यासाठी , अस्तित्वासाठी वा कशाच्या तरी साठी प्रत्येकाचीच धडपड ,लढाई सुरुच असते.
जगाच्या दृष्टीने चारचौघांसारखे वा असामान्य असलेली व्यक्तिमत्वे अनेक बाबतील अतिशय दीनवाणे असतात. निसर्गातही बघा . एकीकडे डोंगर असेल तर दुसरीकडे गर्ता ही असणारच . इकडे वाळवंट तर तिकडे हिरवळ. सुंदर ,नाजुक मोराचे पाय बेढब ,अतिशय ठणक पाठीच्या कासवाचे काळीज अतिनाजुक. 
मानवी मन , मानवी मेंदू अन् मानवी सर्जनता ,हे सारं एका विशाल सागरासारखं आहे.
 असामान्य गुण अंगी बाळगणा-यांच्याही  व्यक्तिमत्वात विसंगती ,उणीव वा काळोख असतोच असतो .  त्या न्यूनाला कमीपणा म्हणून लपवावे वा मोकळेपणाने स्वीकारावे ? यावर त्या व्यक्तीचे खरे भोग ठरलेले असतात .
असं हे चमत्कारिक मानवी व्यक्तिमत्व , कितीही अोळखल्या सारखा भासू दे ,प्रत्येक वेळी काही तरी अनोखं ,नवंच रूप घेउन  समोर येते.
जगासमोर स्वतःला असामान्यता देणारा एखादा गुण प्रतिष्ठित झाल्यावर ती व्यक्ती सुद्धा त्याच पैलूच्या प्रेमात पडते न् बाकीचे न्यून लपवीते वा ते न्यून कसे अपरिहार्य आहे ,याचा मानसिक ढाल बनवून स्वतःचा बचाव करते. पण हे करणे गरजेचे आहे कां ?? बेढब पायामुळेच मोर वेगाने पळतो , त्याचे नाजूक सौंदर्य , जीव वाचवायला  कामी येत नाही. ,हे खरे ना ?
जगातले जेवढे म्हणून महान ,थोर व्यक्तिमत्वांच्या चारित्र्य चित्रणातून ही गोष्ट ठळकपणे  दिसून येते की त्यांचे वैगुण्य त्यांनी सहजतेने न स्वीकारल्यामुळे  बरेच महान् जणं शेवटी बिचारे ठरले.  उलट ज्यांनी स्वतःतील अलौकिक प्रतिभेचा ,स्वतःतील वैगुण्यासह सहज स्वीकार केला ; ते खरेखुरे चमकदार तारे ठरले. उदाहरणच द्यायचे तर
ज्ञानेश्वर माऊली ,यांचे आहे. समाजाने वाळीत टाकलेल्या मायबापाचे ते पोर होते. समाजाने  केलेल्या अवहेलना-वंचनेने आई-वडिलांना जीव द्यावा लागला . पोरके झाल्यावरही समाज बहिष्कार न् उपेक्षा कायमच होती. तत्कालिन समाजमान्य बुद्धिमंतांपेक्षा किती तरी बुद्धी असूनही ,समाजात प्रतिष्ठित ठरावे वा आईबाबांच्या मृत्यूचा बदला घ्यावा अशी कोणतीही इच्छा न बाळगता आंतरिक समाधान मिळवत जगत गेले ,पलायनवाद वा लोटांगणवाद न करता नित्यकर्म आचरत राहिले. शेवटी समाजाला त्यांचे मोठेपण स्वीकारावे  लागले कारण मुळातून स्वतः माऊलींनी स्वतःचा परिपूर्ण स्वीकार केलेला होता.
"पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना " , हे सत्य स्वीकारले तर "यथा मतिः तथा गतिः " हे सुद्धा स्वीकारावेच लागेल. प्रत्येकाने स्वतःचे स्वतःला पूर्णपणे स्वीकारले तर जगाने  डोक्यावर घेतले काय किंवा पायदळी तुडवले काय , त्याला फरक पडणार ??
जवळच्या समजल्या जाणा-या व्यक्तींच्याही प्रतिक्रिया ,प्रतिसाद वा प्रतिस्पंदांनी स्वतःतील "मी" वर परिणाम व्हायलाच नको. "तुम्ही करा वटवट ,माझा मी बळकट" हे कायमचे मनात ठेऊन चरैवेति चरैवेति करावे. असे वागले तर बाहेरची द्वंद्वे तर सोडा आतून पोखरणारी चिंता सुद्धा संपेल न् खरोखरचे महान् व्यक्तिमत्व आपले आपल्याला सहज गवसेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, November 15, 2018

#सहजोक्त.


मराठी ही अनेक आयामांनी समृद्ध भाषा आहे.
मराठी लोकांची भाषा म्हणजे मराठी भाषा. निव्वळ महाराष्ट्रात राहणारे ,येवढ्याच संकुचित परिघातील ही भाषा नाही. मराठी माणसं ज्या ही क्षेत्रात ,प्रांतात   जातात तेथे ते स्वतःच्या प्रतिभेने त्या क्षेत्राला वेगळीच उंची प्रदान करतात. हा मराठीचा गुण फार फार पहिले पासूनचा आहे. 
इतिहासावर नजर टाकली तरी मराठी लोकांनी  आपल्या प्रभावाने कितीतरी बाबी उजळवून टाकल्या हे सहज लक्षात येते. संपूर्ण भारत
एकीकडे अन् महाराष्ट्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान एकीकडे ,असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही.

प्राचीन काळी संस्कृत ही अभिजात लोकांची भाषा होती. विद्वत्ता ,सभ्यपणा दाखविण्यासाठी तिचा उपयोग तत्कालिन मान्यवर करीत असत.संपूर्ण भारतात संस्कृतभाषेचा उपयोग सर्वमान्य होता.  विविध विषयांवर अनेकानेक ग्रंथ संस्कृतात रचले गेले. त्याकाळी संस्कृतभाषा मानवी भावभावनांचे प्रकटीकरण सक्षमपणे करीत होती. त्याकाळी भारतीय जनमानसावर संस्कृतचा जबरदस्त पगडा होताच ,तो पुढेही अनेक वर्ष कायम होता.
नंतरच्या काळात भारतात भाषिक विकासाच्या प्रक्रियेत अनेक भागात अनेक बोली विकसित होत होत नव्या  भाषा निर्माण झाल्या. तरीही त्या त्या भाषांवर संस्कृत प्रभाव होताच हे मान्य करावे लागतेच.  या नव्या भाषा एक प्रकारे संस्कृतची त्या त्या प्रांतातील ,त्या त्या काळातील रूपे होती ,असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पुढे कालौघात मानवी व्यवहार व भावभावना व्यक्त करण्यासाठी या नव्या भाषांचाच वापर होऊ लागला. जी बोलल्या जाते तीच भाषा ठरते. या न्यायाने त्या काळात अाधुनिक भाषांची भरभराट झाली. संस्कृत ही मर्यादित उपयोगाची ठरली.
मानवी जीवन जसं जसे भौतिक सुखसोयींनी समृद्ध होत गेले तसं तसे या आधुनिक भाषाही अधिकाधिक बहरत गेल्या. मानवी जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्शणारे शब्द व शब्दकळा या भाषांत सहज तयार होऊ लागले. मूळ संस्कृत पासून शब्द घेऊन ,त्यात आपल्या भाषिक वैशिष्ट्यांची जोड देत नव्या भाषांनी स्वतःचे विपुल शब्दभंडार रचले . इतकेच नाही तर मधल्या काळात आलेली परचक्रांची भाषिक आक्रमणेही "दोन घे चार दे" या पद्धतीने पचवलीच नाही तर त्यांच्या भाषेला आपल्या भाषिक प्रवृत्तीने स्वीकारून स्वतःच्या भाषेला अजूनच वेगवान केले.
वर केलेले वर्णन भारतात आज बोलल्या
जाणा-या व प्रमुख म्हणविणा-या सर्वच भाषांना कमी अधिक प्रमाणात लागू पडते.
पण मराठी भाषेची गोष्टच न्यारी आहे.
अनेक आयाम असे आहेत की ज्याला मराठमोळ्या वेगळेपणाने अतिशय समृद्ध केले आहे.
अभंग ,
कीर्तन-प्रवचन ,संतकाव्य ,पंतकाव्य ,तंतकाव्य ,
नाट्यसंगीत ,संगीतनाटक ,
लोककला आदी सर्वांवर मराठी बुद्धिमत्तेचा प्रभाव ठळक दिसून येतो.
भगवद्गीतेहून सरस ज्ञानेश्वरी आहे यात जसे दुमत नाही तसेच एकनाथी भागवत ,आध्यात्मरामायण आदी ग्रंथ मूळ ग्रंथांचे निव्वळ भाषांतर नसून स्वतंत्र प्रतिभेचा सुंदर अविष्कार आहे.
मराठी संतवाङ्मय हे देखिल "पचवलेले ज्ञान" समर्थपणे देशी भावनांसह सोप्या शब्दात मांडल्या गेल्याचे उत्तम उदाहरण आहे.
 संस्कृतने उपनिषद काळात ज्या प्रमाणे जनसामान्यांच्या भावना समर्थपणे मुखर केल्या होत्या तशा , ती सद्यकालिन  समाजाच्या भावभावनांचे सर्व पदर उलगडून दाखवायला आज पूर्णपणे सक्षम नाही ;  हे मान्य करायलाच हवे.
 मानवी भावभावनांचे प्रगटीकरण सहज मराठी शब्दांतून साधते ,तितके शब्द ,अर्थच्छटा न् भाषेची श्रीमंती अन्यभाषेत नाहीच ,मराठी मातृभाषकाला तर नाहीच नाही.
खंत याचीच वाटते की सर्वार्थाने श्रीमंत अशी मराठी इंग्रजीच्या प्रभावी संकरातून स्वतःचे वैभव ढासळवत आहे.
आज गरज आहे ती रांगत्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी मराठी ,तिच्या सर्व बोलीभाषांसह , प्रतिष्ठित करण्याची.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, November 14, 2018

#सहजोक्त.



सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताः चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः ते वन्दिनः ताः कथाः
सर्वं यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
कधी तरी हा श्लोक अध्यापनाला होता . तेव्हा हा तितकासा भावला नाही. पण काळाच्या अोघात याची सत्यता पटू लागली आहे.
"कालाय तस्मै नमः" ही तर सर्वसामान्यांच्या नेहमीच्या वापराची आहे.
शेवटची अोळ तर त्रिकालाबाधित सत्य आहे .पण ते सत्य समजावून सांगणारा दाखला ,जो वरच्या श्लोकात आला आहे ,तो सुद्धा अतिशय ताकदीचा आहे.
श्लोकाचा अर्थ असा , ती अतिशय रमणीय नगरी होती. तो सम्राट राजा देखील महान होता.राजाचे सामंतराजे (मांडलिक राजे)  देखील आहे. राजाच्या पाठीमागे ती विद्वत्परिषद् शोभून दिसतेय. (पलीकडे) त्या सुंदर राजस्त्रिया , बाजूला (तारुण्य न् सत्तेमुळे सार्थ अभिमान असलेला) राजपुत्रांचा समूह आहे. ते बन्दी म्हणजे राजाची स्तुती करणारे चारण-भाट आहेत नि त्यांच्या त्या राजाची स्तुती करणा-या कथा सुद्धा आहेत. 
हे सर्वच्या सर्व कालौघात स्मृतिपथातून गेले ; त्या काळाला नमस्कार असो.
नांदत्या साम्राज्याचा तो महान सम्राट ,त्याचे ते ऐश्वर्य  ,त्याची सत्ता ,त्याचे बळ ,त्याचा त्या काळावर असलेला प्रभाव इत्यादी सारे काळाच्या उदरात गडप झाले.
तारुण्य ,सौंदर्य ,पैसा ,सत्ता सारे सारे नश्वर असूनही याच गोष्टींचे भांडवल करून कितेक लोक ,
दुस-यांना अगदी खेळवत राहतात. याचे आश्चर्य वाटते !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, November 13, 2018

#सहजोक्त.


दिवाळीच्या सुट्ट्या न् घरी तपासायला पेपरचे गठ्ठे ,  दिवाळीची कामं . रेडिअो लाऊन कामं करायला आवडतं . रेडिअोवर अचानक  उडत्या चालीवरचं गाणं लागलं : "छोड दो आँचल , जमाना क्या कहेगा.."   गाणं ऐकलं न् युट्यूबवर पुन्हा  पाहून ऐकलं. जुन्या काळातील काही युगलगीत कायम मनाला रमवतात ,त्यातील हे एक गाणं.
पेईंगगेस्ट पिच्चरमधलं किशोरकुमार न् आशाभोसलेंच्या नटखट आवाजातल , निरागस श्रुंगारीक गाणं . देवआनंद न् नुतनने मोहक प्रणयी अदांनी चिरस्मरणीय केलेय. अचानक ,गार न् सुगंधी झुळूक यावी न् ताजे करून जावी ,असे झाले.
पेपर तपासणे , घरातली नेहमीची कामें अगदी लयीत होत होती न् बॅगराऊंड मध्ये सहजोक्त सुचत होते.
"हिंदी सिनेमा न् हिंदी गाणं " तसं म्हटलं तर ज्ञानभांडारच आहे. समाजमिती समजून घ्यायचे साधन आहे.  हे गाणे देखील त्याकाळातील समाजाचे चित्रण दाखवतेच ना ! गाण्यातील शब्दसंवाद न् चित्रित अभिनय  बघून लक्षातच येते ते.
काळ बदलतो ,बदल होतोच होतो मग व्यक्ती असो की समाजमान्यता !
गाण्याच्या रसापासून ते चित्रण नि शब्दापर्यंत विचारचक्र पुढे गेलें न् "आँचल"  इथे अडकले.
"आँचल" म्हणजे पदर . पण फक्त पदर हा शाब्दिक अर्थ न रहाता संस्कार मर्यादा ,शालीनता ,सुशीलता ,घरंदाजपणा,वात्सल्य  इत्यादींचा समुच्चय एका पदरातून सुचवला जातो. नववार लुगडं असो की साडी की अातच्या सलवारवरच्या दुपट्ट्याचा ,पदर असणारच मग त्यावर "जरतारी नाचरा मोर" असो किंवा नसो !
मेंढीच्या शेपटी सारखा असो वा जमीन झाडणारा, आईचा स्नेहाळ वात्सल्य पाजळणारा पदर असो वा प्रिय पत्नीचा मार्दव जपणारा पदर असो ; पदराला असे भावनेचे कितीक पदर असले तरी पदर म्हणजे पदरच  असतो.
आँचल ,पदर या शब्दावरून किती तरी गाणी आठवली.
• काटों से खीच के ये आँचल.
• सारा प्यार तुम्हारा मैने बांध लिया है आँचल में
• बादल में क्या जी ...आँचल में क्या जी...अजबसी धडकन..
• हुजू्र इस तरहा ना लहराके चलिये ,खुले आम आँचल ना लहराते चलिये.
• चाँद छुपा है आँचल में ..
अजून बरेच काही गाणे न् त्यावरची दृश्य भरभर डोळ्या समोरून गेले.
खरोखर एक शब्द ,एक संस्कार न् एक जमाना दर्शवणारा असतो.
• ती आई , चुलीवर स्वयंपाक करतेय न् तिचा लहानगा तिला पाठीमागून बिलगतो ,तितक्या  धांदलीतही ती डोईवरचा पदर सावरत  पदराने त्याचा चेहरा पुसते.
• पदराचा अोचा करून मुलांसाठी ,घरासाठी रानमेवा ,खाजं(म्हणजे खाऊ) आणणारी सुगृहिणी आई.
• नंतरच्या काळात शिवणयंत्रावर आई शिवतेय न् पदर लोंबतोय स्टूलावरून ,रांगतं बाळ ते धरून अोढतंय.
• पदराने मुलाची दृष्ट काढणारी प्रेमळ आई.
पुढे अोट्याशी उभी राहून आई स्वयंपाक करतेय न् नवतरूण तिचा मुलगा तिच्या पदराने , अोला चेहरा पुसतोय.न् तीही कृतक कोपाने टॉवेल घे ना रे..म्हणून अोरडतेय.
ही झाली आईची  माया.
आता पत्नी वा प्रेयसी च्या पदराची कथा.
• हिरोला पाहून उगाच स्वतःच्या  पदराशी चाळा करीत पायांच्या बोटांनी जमीन उखरणारी.
• हिरोच्या अचानक धसमुसळेपणाने हृदयाचा ठोका चुकतोय न् पदर लयीत खालीवर होतोय.
• दोन्ही खांद्यांवर  पदर घेऊन अदबीने अहोंचा मान सांभाळणारी घरंदाज कुलवधू.
• पदर खोचून शेजारणीशी भांडणं करणारी गृहिणी
नळावर पाण्यासाठी शेजारणीचा पदर,झिंझ्या अोढून  लढणारी मर्दानी.
• अचानक आलेल्या पावसात भिजू नये म्हणून जोडीदारा सह पदराने दोघांना झाकणारी ..
इत्यादी इत्यादी...
असे  व्यक्त अव्यक्त प्रसंगांचे पदर उलगडण्याचा प्रयत्न केला इथे.
आता जमाना बदलला आहे. सबलीकरणाने महिला सक्षम झाल्या आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या या झंझावातात जुनी वहिवाट मोडून नवे पायंडे स्थापित होऊ पहात आहेत.
या सगळ्या सव्यापसव्यात "पदराचे" महत्त्व तितकेसे उरले नाही, हे वास्तव आहे ,पदरची माहिती नाही. लुगड्यावरून साडी , साडीवरून सलवार ,सलवार वरून पाश्चात्य पेहराव 
यावर कधी विकास प्रक्रिया  पोहचली ते कळलेच नाही. आता ब-याचश्या महिला ,मुली बिना अोढणीचे वेष परिधान करतात. अशा परिस्थितीत आचल , पदर न् पदराचे चाळे ,त्यावर आधारित नर्म श्रुंगारिक वा अोल्या वात्सल्याचे गाणे बाद ठरतात ना !
कालाय तस्मै नमः।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.







Wednesday, November 7, 2018

#सहजोक्त.


काल हनुमाननगरच्या बगीच्यात १० वर्षांहून अधिक काळ काम करणा-या घरेलु-कामगारांचा सत्कार झाला. दिवाळीपहाट अंतर्गत एक स्तुत्य उपक्रम घेतला. संयोजकांचे विशेष आभार.
काल माझ्या घरी काम करणा-या तीनही बायांचा तेथे सत्कार झाला.
 लीलाबाई माझ्याकडे २૪ वर्षांपासून आहे. ती माझ्या माहेरी,  मी सहावीत होती तेव्हापासून काम करायची . तिच्या बद्दल माझ्या "अभितः-परितः " पुस्तकात सविस्तर लिहिलेच आहे.
 सुशीलाबाई ,माझ्याकडे २३ वर्षांपासून काम करीत आहेत. कालच्या कार्यक्रमात सर्व बायांमधून त्या एकट्याच सत्काराला उत्तर देण्यासाठी उभ्या झाल्या. इतक्या लोकांमध्ये न घाबरता बोलल्या. पण संयोजकांकडे वेळेची कमी असल्यामुळे दोनतीनच वाक्य त्या बोलू शकल्या. आज सकाळी नेहमी प्रमाणे कामासाठी आल्या न् माझ्या जवळ मनमोकळ्या व्यक्त झाल्या.  माझ्या घरी मी एकटीच महिला. दरदिवाळीला त्या न चुकता मला अोवाळतात. आज इतके वर्ष झालीत पण त्यांनी शालीनता सोडली नाही. त्यांच्या वागण्यातून कोरडा व्यवहार नसून घरांतील माणसांना जपण्याची कसोशी दिसते. 
 ज्यांचा सत्कार करायचा अशा पात्रमहिलांचे नाव ,त्या ज्यांच्या घरी काम करतात त्या घरातील व्यक्तीने फॉर्म भरून द्यावे हे आठ दिवसांपूर्वी संयोजकांकडून कळले. त्याप्रमाणे शरद फॉर्म भरून आले. आपला फॉर्म भरला , हे कळल्यापासून सुशीलाबाईंच्या डोक्यात भावनांचे काहूर माजले.फॉर्म भरल्यापासून  सकाळी सातला माझ्याकडे आल्यावर रोजच त्या प्रोफ़ेसर कॉलोनी न् त्यांचा ऋणानुबंध यावर बोलायच्या. आपण यांच्याकडे काम करतो, हे लोकं आपल्याला अतिशय आत्मियतेने ,आदराने वागवतात याविषयी त्या अतिशय कृतज्ञ आहेत. आज त्यांचा मी फोटो काढला. त्यांचे मनोगत व्हिडिअो केले .त्यांना अश्रु अनावर झाले ,भावनांना त्यांनी मोकळी वाट करून दिली.
 जातांना म्हणाल्या ,"प्रज्ञा मला नाही वाटत मी आता जास्त जगीन ,तू मला माझ्या घुसमटीतून मोकळं केलस  , अगं मला माझ्या नव-याने २८ वर्षांची असताना ,दोन लहानग्यांसह मुशाफिरखान्यात सोडून दिले होते .कधीतरी सांगीन तुला, आजवर कोणापाशीच बोलली नाही. तू लिहितेस ना ? मग सांगीन तुला  माझी कहाणी ,  सिनेमाला शोभेल अशीच आहे. मी अडानीबाई. तुमच्या सारख्या चांगल्या लोकांच्या सहवासात माझं आयुष्य चांगलं  गेलं हे सुदैव समजते ,नाहीतर काय संकटं आली असती ,सांगता येत नाही."
 सुशीलाबाई-लीलाबाई-मायाबाई यांची ही एकेक कहाणी आहे.  त्यांच्या जगण्यातून त्यांचे एक तत्वज्ञान तयार झालेय.
 पुस्तके वाचून माणूस शहाणा होत असेलही पण या जिवंत ,व्यवहारज्ञानाने संपन्न महिलांच्या आचार-विचारांतून नक्कीच संवेदनशील मानव घडतो हे निश्चितच .
माझ्या घरी काम करणा-या  या बाया म्हणजे माझ्या गृहस्वामिनी आहेत. होय , गृहस्वामिनीच.  आज जे मी घडली आहे , ती यांच्या मदतीनेच . त्या येतात . काम करतात. नियमाने पैसे घेतात.सणवारी विशेष काम करितात व जास्ती पैसे घेतात. हा व्यवहार झाला तरी ,"रिडिंग बिट्विन द लाईन" सारख्या या घरातील सुखदुःखात  , भावनांमध्ये  सहभागी होतात. कधीतरी स्वतःचे अंतरीचे गुज व्यक्त करतात , स्वतःच्या आचरणातून जीवनाचा पाठ शिकवतात.
 सोशलवर्क ,एन्जिअो गरजेचे आहेत ,तेथे श्रेयस्कर काम पण होत असतात ,पण दैनंदिन जिवनात आपल्या अवतीभवती असलेल्या कष्टकरी लोकांशी कौटुंबिक जिव्हाळा जपत ,"मी >ते > आम्ही" असा विश्वास जागवणं आत्मिक समाधान देणारं ठरतं ,नाही कां ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.