Wednesday, November 14, 2018

#सहजोक्त.



सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताः चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः ते वन्दिनः ताः कथाः
सर्वं यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
कधी तरी हा श्लोक अध्यापनाला होता . तेव्हा हा तितकासा भावला नाही. पण काळाच्या अोघात याची सत्यता पटू लागली आहे.
"कालाय तस्मै नमः" ही तर सर्वसामान्यांच्या नेहमीच्या वापराची आहे.
शेवटची अोळ तर त्रिकालाबाधित सत्य आहे .पण ते सत्य समजावून सांगणारा दाखला ,जो वरच्या श्लोकात आला आहे ,तो सुद्धा अतिशय ताकदीचा आहे.
श्लोकाचा अर्थ असा , ती अतिशय रमणीय नगरी होती. तो सम्राट राजा देखील महान होता.राजाचे सामंतराजे (मांडलिक राजे)  देखील आहे. राजाच्या पाठीमागे ती विद्वत्परिषद् शोभून दिसतेय. (पलीकडे) त्या सुंदर राजस्त्रिया , बाजूला (तारुण्य न् सत्तेमुळे सार्थ अभिमान असलेला) राजपुत्रांचा समूह आहे. ते बन्दी म्हणजे राजाची स्तुती करणारे चारण-भाट आहेत नि त्यांच्या त्या राजाची स्तुती करणा-या कथा सुद्धा आहेत. 
हे सर्वच्या सर्व कालौघात स्मृतिपथातून गेले ; त्या काळाला नमस्कार असो.
नांदत्या साम्राज्याचा तो महान सम्राट ,त्याचे ते ऐश्वर्य  ,त्याची सत्ता ,त्याचे बळ ,त्याचा त्या काळावर असलेला प्रभाव इत्यादी सारे काळाच्या उदरात गडप झाले.
तारुण्य ,सौंदर्य ,पैसा ,सत्ता सारे सारे नश्वर असूनही याच गोष्टींचे भांडवल करून कितेक लोक ,
दुस-यांना अगदी खेळवत राहतात. याचे आश्चर्य वाटते !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment