Tuesday, November 20, 2018

#सहजोक्त.


काही अक्षरवाङ्मय अजरामर असते.त्यातही कविता वर  त्या जर संगीतबद्ध गायलेल्या असतील तर .....? सोने पे सुहागा.
 दिनतीन दिवसांपूर्वी कधी नव्हे इतकी फुरसत न् रिकामा वेळ  अवचित गवसला. अंगणात पाळण्यावर झोके घेत होती. लहानपणी पाळण्यावर जोर जोरात झुलतांना त्या लयीने गाणं आपोआप फुटायचे. तसंच आताही सुरु झाले.  जरा वेळाने सूर्य मावळतीला जाऊ लागला.
 झोपाळ्यावर झुलतांना तसेही मन हिंदोळे घेतच असते. त्यात पूर्णपणे रिकापण. मग काय ? मन सुसाट पण लयीत सुरु झाले . झाडांच्या मध्ये त्या सूर्याचा रक्तिमा  पसरला होता. तसा उगवतीचा सूर्य अन् मावळतीचा सूर्य दिसायला  सारखाच  . "उगवतीचा सूर्य" हा एक शब्दप्रयोग प्रसिद्ध आहे.
 तो मावळतीचा  सूर्य बघून गाणं आठवलं . नुसतं आठवलंच नाही तर लहानपणी खेडेगावी आमचे  बाबा आम्हाला पाळण्यावर झोके घेत गाणे गायचे. बाबांची काही गाणी आवडती होती . बाबांची अजून एक सवय होती की ते गाण्याचा अर्थ उदाहरणा सह समजाऊन सांगायचे . तेव्हा बाबांनी सांगितलेलं  सगळं समजायचेच असे नाही पण छान वाटायचे.
 त्या दिवशी तो सूर्य पाहून ते गाणे आठवले.
 ते गाणे म्हणजे  भा.रा. तांबे यांची कविता आहे.  ती संपूर्ण कविता अशी..

मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा !॥धृ॥

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा ॥१॥

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा !॥२॥

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा !॥३॥

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा !॥૪॥

यातील पहिले तीन कडवे लता मंगेशकरांच्या आवाजात नेहमी ऐकल्या गेले आहे. शाळेत कविता सुद्धा तीनच कडव्यांची शिकविल्या गेली. शेवटचे कडवे मात्र अपरिचित आहे.
वर वर निराशावादी वाटणा-या   या गाण्यात एक वेगळेच आकर्षण आहे ,अोढ आहे . खोल खोल अंतर्मुख करण्याची ताकद आहे.
या गाण्यातला सूर्य खूप जवळचा , नेहमीचा वाटत राहतो. या सूर्याचे कर्तृत्व ,चांगुलपणा जवळून अनुभवलेला वाटतो. उगवत्याला सलाम ठोकणा-या समाजात मावळत्या सूर्याचे वंदन मनाला भिडणारे पण जरासा दिलासाही देणारे वाटते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
 

No comments:

Post a Comment