काल हनुमाननगरच्या बगीच्यात १० वर्षांहून अधिक काळ काम करणा-या घरेलु-कामगारांचा सत्कार झाला. दिवाळीपहाट अंतर्गत एक स्तुत्य उपक्रम घेतला. संयोजकांचे विशेष आभार.
काल माझ्या घरी काम करणा-या तीनही बायांचा तेथे सत्कार झाला.
लीलाबाई माझ्याकडे २૪ वर्षांपासून आहे. ती माझ्या माहेरी, मी सहावीत होती तेव्हापासून काम करायची . तिच्या बद्दल माझ्या "अभितः-परितः " पुस्तकात सविस्तर लिहिलेच आहे.
सुशीलाबाई ,माझ्याकडे २३ वर्षांपासून काम करीत आहेत. कालच्या कार्यक्रमात सर्व बायांमधून त्या एकट्याच सत्काराला उत्तर देण्यासाठी उभ्या झाल्या. इतक्या लोकांमध्ये न घाबरता बोलल्या. पण संयोजकांकडे वेळेची कमी असल्यामुळे दोनतीनच वाक्य त्या बोलू शकल्या. आज सकाळी नेहमी प्रमाणे कामासाठी आल्या न् माझ्या जवळ मनमोकळ्या व्यक्त झाल्या. माझ्या घरी मी एकटीच महिला. दरदिवाळीला त्या न चुकता मला अोवाळतात. आज इतके वर्ष झालीत पण त्यांनी शालीनता सोडली नाही. त्यांच्या वागण्यातून कोरडा व्यवहार नसून घरांतील माणसांना जपण्याची कसोशी दिसते.
ज्यांचा सत्कार करायचा अशा पात्रमहिलांचे नाव ,त्या ज्यांच्या घरी काम करतात त्या घरातील व्यक्तीने फॉर्म भरून द्यावे हे आठ दिवसांपूर्वी संयोजकांकडून कळले. त्याप्रमाणे शरद फॉर्म भरून आले. आपला फॉर्म भरला , हे कळल्यापासून सुशीलाबाईंच्या डोक्यात भावनांचे काहूर माजले.फॉर्म भरल्यापासून सकाळी सातला माझ्याकडे आल्यावर रोजच त्या प्रोफ़ेसर कॉलोनी न् त्यांचा ऋणानुबंध यावर बोलायच्या. आपण यांच्याकडे काम करतो, हे लोकं आपल्याला अतिशय आत्मियतेने ,आदराने वागवतात याविषयी त्या अतिशय कृतज्ञ आहेत. आज त्यांचा मी फोटो काढला. त्यांचे मनोगत व्हिडिअो केले .त्यांना अश्रु अनावर झाले ,भावनांना त्यांनी मोकळी वाट करून दिली.
जातांना म्हणाल्या ,"प्रज्ञा मला नाही वाटत मी आता जास्त जगीन ,तू मला माझ्या घुसमटीतून मोकळं केलस , अगं मला माझ्या नव-याने २८ वर्षांची असताना ,दोन लहानग्यांसह मुशाफिरखान्यात सोडून दिले होते .कधीतरी सांगीन तुला, आजवर कोणापाशीच बोलली नाही. तू लिहितेस ना ? मग सांगीन तुला माझी कहाणी , सिनेमाला शोभेल अशीच आहे. मी अडानीबाई. तुमच्या सारख्या चांगल्या लोकांच्या सहवासात माझं आयुष्य चांगलं गेलं हे सुदैव समजते ,नाहीतर काय संकटं आली असती ,सांगता येत नाही."
सुशीलाबाई-लीलाबाई-मायाबाई यांची ही एकेक कहाणी आहे. त्यांच्या जगण्यातून त्यांचे एक तत्वज्ञान तयार झालेय.
पुस्तके वाचून माणूस शहाणा होत असेलही पण या जिवंत ,व्यवहारज्ञानाने संपन्न महिलांच्या आचार-विचारांतून नक्कीच संवेदनशील मानव घडतो हे निश्चितच .
माझ्या घरी काम करणा-या या बाया म्हणजे माझ्या गृहस्वामिनी आहेत. होय , गृहस्वामिनीच. आज जे मी घडली आहे , ती यांच्या मदतीनेच . त्या येतात . काम करतात. नियमाने पैसे घेतात.सणवारी विशेष काम करितात व जास्ती पैसे घेतात. हा व्यवहार झाला तरी ,"रिडिंग बिट्विन द लाईन" सारख्या या घरातील सुखदुःखात , भावनांमध्ये सहभागी होतात. कधीतरी स्वतःचे अंतरीचे गुज व्यक्त करतात , स्वतःच्या आचरणातून जीवनाचा पाठ शिकवतात.
सोशलवर्क ,एन्जिअो गरजेचे आहेत ,तेथे श्रेयस्कर काम पण होत असतात ,पण दैनंदिन जिवनात आपल्या अवतीभवती असलेल्या कष्टकरी लोकांशी कौटुंबिक जिव्हाळा जपत ,"मी >ते > आम्ही" असा विश्वास जागवणं आत्मिक समाधान देणारं ठरतं ,नाही कां ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment