मराठी ही अनेक आयामांनी समृद्ध भाषा आहे.
मराठी लोकांची भाषा म्हणजे मराठी भाषा. निव्वळ महाराष्ट्रात राहणारे ,येवढ्याच संकुचित परिघातील ही भाषा नाही. मराठी माणसं ज्या ही क्षेत्रात ,प्रांतात जातात तेथे ते स्वतःच्या प्रतिभेने त्या क्षेत्राला वेगळीच उंची प्रदान करतात. हा मराठीचा गुण फार फार पहिले पासूनचा आहे.
इतिहासावर नजर टाकली तरी मराठी लोकांनी आपल्या प्रभावाने कितीतरी बाबी उजळवून टाकल्या हे सहज लक्षात येते. संपूर्ण भारत
एकीकडे अन् महाराष्ट्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान एकीकडे ,असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही.
प्राचीन काळी संस्कृत ही अभिजात लोकांची भाषा होती. विद्वत्ता ,सभ्यपणा दाखविण्यासाठी तिचा उपयोग तत्कालिन मान्यवर करीत असत.संपूर्ण भारतात संस्कृतभाषेचा उपयोग सर्वमान्य होता. विविध विषयांवर अनेकानेक ग्रंथ संस्कृतात रचले गेले. त्याकाळी संस्कृतभाषा मानवी भावभावनांचे प्रकटीकरण सक्षमपणे करीत होती. त्याकाळी भारतीय जनमानसावर संस्कृतचा जबरदस्त पगडा होताच ,तो पुढेही अनेक वर्ष कायम होता.
नंतरच्या काळात भारतात भाषिक विकासाच्या प्रक्रियेत अनेक भागात अनेक बोली विकसित होत होत नव्या भाषा निर्माण झाल्या. तरीही त्या त्या भाषांवर संस्कृत प्रभाव होताच हे मान्य करावे लागतेच. या नव्या भाषा एक प्रकारे संस्कृतची त्या त्या प्रांतातील ,त्या त्या काळातील रूपे होती ,असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पुढे कालौघात मानवी व्यवहार व भावभावना व्यक्त करण्यासाठी या नव्या भाषांचाच वापर होऊ लागला. जी बोलल्या जाते तीच भाषा ठरते. या न्यायाने त्या काळात अाधुनिक भाषांची भरभराट झाली. संस्कृत ही मर्यादित उपयोगाची ठरली.
मानवी जीवन जसं जसे भौतिक सुखसोयींनी समृद्ध होत गेले तसं तसे या आधुनिक भाषाही अधिकाधिक बहरत गेल्या. मानवी जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्शणारे शब्द व शब्दकळा या भाषांत सहज तयार होऊ लागले. मूळ संस्कृत पासून शब्द घेऊन ,त्यात आपल्या भाषिक वैशिष्ट्यांची जोड देत नव्या भाषांनी स्वतःचे विपुल शब्दभंडार रचले . इतकेच नाही तर मधल्या काळात आलेली परचक्रांची भाषिक आक्रमणेही "दोन घे चार दे" या पद्धतीने पचवलीच नाही तर त्यांच्या भाषेला आपल्या भाषिक प्रवृत्तीने स्वीकारून स्वतःच्या भाषेला अजूनच वेगवान केले.
वर केलेले वर्णन भारतात आज बोलल्या
जाणा-या व प्रमुख म्हणविणा-या सर्वच भाषांना कमी अधिक प्रमाणात लागू पडते.
पण मराठी भाषेची गोष्टच न्यारी आहे.
अनेक आयाम असे आहेत की ज्याला मराठमोळ्या वेगळेपणाने अतिशय समृद्ध केले आहे.
अभंग ,
कीर्तन-प्रवचन ,संतकाव्य ,पंतकाव्य ,तंतकाव्य ,
नाट्यसंगीत ,संगीतनाटक ,
लोककला आदी सर्वांवर मराठी बुद्धिमत्तेचा प्रभाव ठळक दिसून येतो.
भगवद्गीतेहून सरस ज्ञानेश्वरी आहे यात जसे दुमत नाही तसेच एकनाथी भागवत ,आध्यात्मरामायण आदी ग्रंथ मूळ ग्रंथांचे निव्वळ भाषांतर नसून स्वतंत्र प्रतिभेचा सुंदर अविष्कार आहे.
मराठी संतवाङ्मय हे देखिल "पचवलेले ज्ञान" समर्थपणे देशी भावनांसह सोप्या शब्दात मांडल्या गेल्याचे उत्तम उदाहरण आहे.
संस्कृतने उपनिषद काळात ज्या प्रमाणे जनसामान्यांच्या भावना समर्थपणे मुखर केल्या होत्या तशा , ती सद्यकालिन समाजाच्या भावभावनांचे सर्व पदर उलगडून दाखवायला आज पूर्णपणे सक्षम नाही ; हे मान्य करायलाच हवे.
मानवी भावभावनांचे प्रगटीकरण सहज मराठी शब्दांतून साधते ,तितके शब्द ,अर्थच्छटा न् भाषेची श्रीमंती अन्यभाषेत नाहीच ,मराठी मातृभाषकाला तर नाहीच नाही.
खंत याचीच वाटते की सर्वार्थाने श्रीमंत अशी मराठी इंग्रजीच्या प्रभावी संकरातून स्वतःचे वैभव ढासळवत आहे.
आज गरज आहे ती रांगत्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी मराठी ,तिच्या सर्व बोलीभाषांसह , प्रतिष्ठित करण्याची.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment