Tuesday, September 22, 2020

#सहजोक्त.

 माझी रेणुका माऊली....


'माझी रेणुका माऊली' ऊषा मंगेशकरांनी गायलेलं हे गाणं नवरात्रामध्ये बरेच ठिकाणी ऐकायला येते . अतिशय सुरेख चाल आणि  मंगेशकरी स्पर्श यामुळे हे गाणं लोकप्रिय तर होणारच ना !  गुगलवर शोध घेतला तर गीतकार म्हणून विष्णुदास हे नाव दाखवतात ! बिचारे विष्णुदास महाराज ! त्यांना काय कल्पना ? की भक्तशिरोमणी  , प्रसिद्धिपराङ्मुख असे ते पुढे  'गीतकार' म्हणून पडद्याच्या मागे राहतील न् आवाज देणारे त्यांची प्रसिद्धी करतील !  कालाय तस्मै नमः । 


माझी रेणुका माऊली।

कल्पवृक्षाची साउली ॥१॥

जैसी वत्सालागी गाय ।

तैसी अनाथाची माय ॥२॥

हाके सरसी घाई घाई ।

वेगे धावतची  पायी ॥३॥

आली तापल्या उन्हात ।

नाही आळस मनात ॥૪॥

खाली बैस घे आराम ।

मुखावरती आला घाम ॥५॥

विष्णुदास आदराने ।

वारा घाली पदराने ॥६॥ 


हे गाणं भक्तिगीत म्हणून  सर्वत्र गाजते . 

शाक्तपंथात देवीला स्त्री-ऊर्जा म्हणून पूजतात . इथे मात्र देवीच्या मातृरूपाची पदोपदी अाळवणी दिसते.  


  ' मानव' जर निसर्गाची उत्तम निर्मिती असेल तर स्त्री ही नक्कीच  सर्वोत्तम निर्मिती होय , यात शंका नाही. पण याच स्त्रीचे मातृत्वरूप हे जगातील सर्वोच्च व श्रेष्ठ अशी अवस्था असते. मातृत्व ही वृत्ती आतून येणारी न् सर्व विश्वाला   वात्सल्यधाग्यात बांधणारी असते. 

  " स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची आई असते"  या उक्तीला देवीही अपवाद नाही.  बाळाचे रक्षण करण्याच्या वेळी स्त्री अतिशय कठोर व सामर्थ्यशाली होते .  बाळासाठी संपूर्ण जगाशी ती वैर घेऊ शकते न् कोणत्याही परिस्थितीत बाळाला राखण्याचा आटोकाट प्रयत्न करते. 

  

 कल्पवृक्ष म्हणजे कल्पना करू ते सर्व सत्यात आणणारा वृक्ष . प्रत्येकच आई आपल्या बाळासाठी कल्पवृक्षच असते. तिच्या क्षमतांच्याही जास्त मुलांना मिळावे यासाठी झटत असते.  

गाय जशी धावत वासरापाशी येते , वासराला मिळावे म्हणून पान्हा चोरते , तशी रेणुकासुद्धा  सर्व अनाथांसाठी धावून येते. 

बाळाचा टाहो ऐकला की हातचे काम सोडून आई धावते , तशीच रेणुकाही येते. भक्ताने आर्ततेने आळवले की ती उन्हातान्हात  धावत येते. विदर्भातले उन्ह तेव्हाही प्रसिद्ध असावे.  

बाळासाठी आई सतत जागरुक असते . बाळाच्या संगोपनात  आळस , कामचुकारपणा याला थाराच नसतो.  तशी रेणुकाही  धावत आली. 


आईचे कर्तव्य रेणुका पुरेपूर पार पाडतेच . 'क्वचिदपि कुमाता न भवति।' हे त्रिवार सत्य आहे.  


आईने तर आईपण जागे ठेवले , आता बाळाची वेळ आली. "माझ्यासाठी आई इतके ताप न् कष्ट सहन करते" , याची जाणीव असलेला सुपुत्र इथे विष्णुदासांच्या पदांतून दिसतो.


"आई , तू उन्हात घाईने आलीस , तुझ्या मुखावर घाम आला , तू जरा बस , आराम कर "  इतके म्हणून विष्णुदास थांबत नाहीत , तर उपरण्याच्या पदराने वारा घालत आहेत.  आईच्या वात्सल्याला स्वतःच्या जाणीवेतून प्रतिसाद देत आहेत. आई आणि मुलाचे मनोबंध जगात अद्वितीय असतात.  ते या अभंगातून  उलगडलेले  दिसतात. 


बरेचसे धार्मिक वा संत वाङ्मय  प्रमाणभाषा-बोलीभाषा , प्रस्थापित साहित्य-विद्रोही साहित्य इत्यादी इत्यादी   कोणत्याही  वादात न फसता ,  या रचना सर्वतोमुखी होतातच आणि रचनांचा आशयही सर्वांना कळतो.  हेच या साहित्याचे मांगल्य आहे. 

  मला नेहमी विस्मय  होतो की कोण्या एका कोप-यात रचलेले हे  संत वाङ्मय असो वा धार्मिक वाङ्मय , संपूर्ण मराठी विश्वात वाणवल्या जाते. 

इतक्या सोप्या , आशयघन तरीही उच्च साहित्यिक मूल्य असलेल्या रचना या अभ्यासानी घडतात की तपाने ? हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

3 comments: