Friday, January 28, 2022

#सहजोक्त.

 

 संवाद.

 लेकरू  = झोपू दे ना आई अजून फक्त पाच मिनिटे ।

आई = पाऊण तासापासून सरली नाही पाच मिनिटे॥ १॥

ले = बघ जरा खिडकीत अजून अंधार दाटलेला।

आ = चाहूल ऐक किलबिलाटाची , उठले पक्षी मुला ॥ २॥

ले = अशी ग काय करते , बघ ना तो सूर्य पेंगुळलाय ।

आ = उगवून सुद्धा या धुक्यांनी बघ त्याला  दडवलाय  ॥ ३॥

ले = त्याची आई बघ किती छान रेंगाळूदेते त्याला ।

आ = नियमिततेचे दुसरे नाव म्हणतात दिनकर त्याला ॥ ૪॥

ले =  वेलींवरच्या कळ्याही अजून उमललेल्या नाही ।

आ=  त्यांच्या मागे कुठे असते कामाधामाची घाई ?॥  ५॥

ले=  शाळासुद्धा नाही अगं , अॉनलाईन क्लास सारा ।

आ = लवकर तयार होऊन , फुलांनी  देवपूजा कर जरा ॥ ६॥

ले = मित्रांसंगे खेळायलाही नाही म्हणते मला । 

आ=  मदत कर ना घरातील कामामध्ये मला॥ ७॥

ले = तीच कामे , तेच रुटिन, आता  कंटाळलो बुवा ।

आ= सूर्यानेही असेच म्हटले काय होईल बाबा ? ८॥

ले=  नियमित रहाणं कां गं इतकं जरुरी असावे ?

आ=  निसर्गाचे घटक आपण , निसर्गनियमित रहावे ॥ ९॥

आ =  निसर्गासम नित्यनूतन जगावे सर्जक होऊन ।

ले =  करतो नक्की चांगली सुरुवात आजपासून ॥ १०॥

आ=  शहाणं माझं बाळ ते सद्गुणी तेजस्वी सूर्य ।

आ=  सातत्य नियमितता हेच चिरंतन यशाचे गुह्य ॥ ११ ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 

 

 















#सहजोक्त.

.

शब्दकळा.

 शब्द निर्मिती  हा  भाषेचा स्वतंत्र आयाम  आहे.  बऱ्याचशा भारतीय भाषा भाषाशास्त्रीय दृष्ट्या  संस्कृतोद्भव आहेत  , यात शंका नाही.  संस्कृतातून जशेच्या तसे (अर्थासह) घेतलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द होय. तर बदल होऊन तयार झालेले शब्द तद्भव म्हटल्या जातात. 

 शब्दांच्या मूळात शिरण्याची  व शब्दनिर्मिती प्रक्रिया जाणून घेण्याची संस्कृतभाषेची प्रवृत्ती आहे. हीच प्रवृत्ती विविध ग्रंथांतून प्रकट होत विकसित झालेली आहे.  व्याकरणशास्त्र , निरुक्त ,  छंदशास्त्र , न्यायशास्त्र, वाक्यपदीयम्  वगैरे मूळ व मौलिक ग्रंथ त्याचेच प्रमाण आहेत. 

ज्या प्रमाणे नवा जीव हा त्याच्या मातृ-पितृकुळातील सात पिढ्यांपैकी कोणाचे तरी गुणसूत्र घेतो. त्याप्रमाणे आजच्या भारतीय भाषासुद्धा संस्कृतसह त्या त्या काळातील प्राकृतादी भाषांच्या सरमिसळीतून तयार  झालेल्या असू शकतात.  भाषेचा उद्गम व विकास मोठा रंजक असतो.

सद्यकालीन मराठीभाषा  ही स्वतंत्र भाषा आहे. प्राचीन वाङ्मयीन साहित्यापासून  आजच्या दैनंदिन मराठीभाषेपर्यंतचा  प्रवास अभ्यासणे नक्कीच भाषाशास्त्रीय दृष्ट्या  रोचक ठरते .

मराठीभाषेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे  तिचे  शब्द.  काही मराठी शब्दांचे मूळ शोधताना संस्कृतच्या व्याकरण , निरुक्त  वगैरेंचा उपयोग होतो. संस्कृतशब्दांशी पूर्णपणे साधर्म्य बाळगणारे काही मराठी शब्द कधी कधी  वेगळ्याच अर्थाचे वा रचनेचे दिसतात. शब्द निर्मिती करण्याची मराठी प्रवृत्ती अनेकदा बुचकळ्यात पाडते. 

उदाहरणार्थ काही शब्द बघा. 

 घोर , अघोरी  , अहिल्या , अनुसया , परोक्ष , अपरोक्ष ,  प्रगट    वगैरे  वगैरे. 

 आता या शब्दांविषयी जाणून घेऊ .

 घोर => मराठीत हा शब्द अनेकदा , अनेक संदर्भात वापरतात. जसे घनघोर वर्षाव , घोर अन्याय. घोर अंधार . घोर लागून राहणे. बिनघोर झोपणे .  वगैरे  वगैरे. घोर  या शब्दाचा अर्थ  भयानक , भयंकर  . संस्कृतनुसार घाताला किंवा मराला कारण असलेला म्हणजे  घोर. 

 अघोरी =>   घोरच्या विरुद्ध म्हणजे अघोर.  संस्कृतनुसार  अघोरी शब्दाचा अर्थ  सौम्य , भीतिदायक नसलेला , असा होतो. पण  अधोरीबाबा , अघोरीकृत्य , अघोरी उपाय , अघोर तंत्र वगैरेने या शब्दाला  मराठीत मात्र भयंकर केलं आहे. आणि अशा प्रकारे विशिष्ट संदर्भात घोर व अघोर  मराठीत समानार्थक ठरले.

 अहिल्या , अनुसया , प्रगट  =  

  हल म्हणजे नांगर . अहल्या  म्हणजे  नांगरणी न झालेली जमीन . 

  असूया म्हणजे 'जेलसी',  नजर , जळणं द्वेष वगैरे. अन् +असूया म्हणजे अनसूया म्हणजेच जिला द्वेष नाही ती. 

   मूळात  कट् हा धातू  गतिवाचक आहे . प्रकट म्हणजे स्पष्ट .

   संस्कृतच्या मूळ सार्थ शब्दांना मराठी  अशी वळवून बदलते ना  की मूळ शब्द सांगितला तरी  तो  बरोबर वाटेनासा होतो , नाही कां ? 

   परोक्ष , अपरोक्ष =   संस्कृतमध्ये (अक्ष्णोः परम् = परोक्षम् । अप्रत्यक्षम् ।  असाक्षात् ।) दृष्टीच्या पलीकडचे म्हणजे परोक्ष होय.  तर  अपरोक्ष म्हणजे नजरे समोर घडलेले.  पण हे शब्द वापरण्यातही  मराठीची बातच न्यारी !

म्हणजे मराठीतील शब्द चूक आहेत , असं म्हणायचे कां ? तर नाही. भाषेचा गुणधर्म प्रवाही असणे असा असतो.

संस्कृतच्या शास्त्रशुद्धरूपांना मराठीने आपलंसं करीत मरठमोळं केलं.  नातवंडं/पणतवंडं आपल्या आजी/पणजीचे काही काही गुण घेतात , सर्वच गुण घेत नाहीत. तसेच  काहीसे आधुनिक  भारतीय भाषांचे आहे. संस्कृतशी साधर्म्य बाळगत आपलं विशिष्ट हळूच खुलवतात या भाषा.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


   

Monday, January 17, 2022

#सहजोक्त.

 #माफीवीर ? होय माफीवीरच !

 शब्द कसे तयार होतात ? हे न समजल्याने अनेक शब्द अनर्थक ठरतात. उदाहरणार्थ हाच बघा ना ; माफीवीर  शब्द ! 

 मूळ अरबी भाषक असलेला मुआफ़  हा शब्द , हिंदीत - "छोड़ा गया, मुक्त किया गया, क्षमा किया गया ,मुक्त, आज़ाद" , या अर्थाने आहे.  मुआफ चे माफ होऊन मराठीकरण झाले.   म्हणजे हा शब्द "परकीय" प्रकारातील आहे.    


वीर  हा शब्द मात्र संस्कृत आहे . मराठीत तो तत्सम  प्रकारातील शब्द  ठरतो. वीर या शब्दाची  व्युत्पत्ती अशी

(वीरयतीति ।  वीर विक्रान्तौ + पचाद्यच् ।  

यद्वा   विशेषेण ईरयति दूरीकरोति शत्रून् ।  

वि + ईर + इगुपधात् कः । 

 यद्वा  अजति क्षिपति शत्रून् । 

 अज + स्फायितञ्चीत्या दिनारक् ।  अजेर्व्वीः । )  शौर्य्यविशिष्टः ।  तत्पर्य्यायः ।  शूरः २ विक्रान्तः ३ ।  इत्यमरः ।  २ ।  ८ । ७७

अर्थात  जो शत्रूंना विशेषत्वाने दूर करतो   , तो  वीर.  

संस्कृतकुलातील भाषांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सामासिक शब्द तयार करण्याची वृत्ती. दोन वा अनेक अर्थपूर्ण शब्द  एकत्र येऊन सामासिक शब्द  निर्माण होतो.

 या सामसिक शब्दांना विशेष अर्थ असतो. उदा. "चंद्रमुखी" हा सामासिक शब्द चंद्र  व मुख या दोन अर्थपूर्ण शब्दांपासून निर्माण झाला.

 पण त्याचा अर्थ चंद्रासम मुख असलेली ती सुंदरी , असा होतो. 

सामासिक शब्द व समासाचा विग्रह  करायला भाषेच्या मूळप्रवृत्तीची जाण असायला हवी.   

नाही तर    "अर्धवट ज्ञान......." अशी अवस्था होते.

 माफी शब्द माफ याच शब्दापासून आहे.

  माफी  म्हणजे क्षमा.

 वीर शब्दाचा अर्थ - विक्रांत , शूर , शत्रूंना संपवणारा - असा होतो.  

  या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून, उथळपणे कुठल्याशा विद्वेषातून , 'माफीवीर',  हा सामासिकशब्द घाईने तयार केल्या गेला. 

 न् "माफी मागणारा वीर" असा त्याचा अर्थही तितक्याच  निर्बुद्धपणे सर्वत्र पसरल्या गेला.   

 जराशी तर्कशक्ती वापरली तरी लक्षात  येईल की  वीर असणारा व्यक्ती माफी कां मागेल ?   माफी मागेल तर तो  वीर  कसा असेल ?  

 माफी म्हणजे क्षमा . "क्षमा वीरस्य भूषणम् ।"   

 कवी रहीम म्हणतात ,

 "क्षमा बड़न को चाहिए, छोटन को उत्पात।  रहीम हरी का घट्यो, जो भृगु मारी लात।।" 

 क्षमा करणे , हा महापुरुषांचा गुणधर्म आहे.  माफीवीर या सामासिक शब्दाचा अर्थपूर्ण विग्रह , "सर्वांना माफी देणारा (क्षमा करणारा) वीर ", असाच  होतो.  

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य म्हणजे प्रतिभा व खडतर वास्तव यांच्या सर्जनातून जन्मलेले शब्दबद्ध अनुभव आहेत. 

 पुढील कविता वाचा.


कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने 

लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने 

जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे 

बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll ९ ll

हे मातृभूमि तुजला मन वाहियेले  

वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले 

तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला 

लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll १६ ll

त्वत्-स्थंडिले ढकलिले प्रिय मित्र-संघा 

केलें स्वये दहन यौवन देह-भोगा 

त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा 

तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा ll १७ ll

त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता 

दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता 

त्वत्-स्थंडिली अतुल-धैर्यनिष्ठ बंधू 

केला हवि परम कारुण पुण्यसिंधू ll १८ ll

त्वत्-स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला 

त्वत्-स्थंडिला वरी अता मम देह ठेला  

हे काय बंधू असतो जरी सात आम्ही 

त्वत्-स्थंडिलीच असते दिधले बळी मी ll १९ ll

संतान ह्या भारतभूमिस तीस कोटि 

जे मातृभक्ति सज्जन धन्य होती 

हे आपुले कुल ही तय मध्ये ईश्वरांश  

निर्वंश होउनी ठरेल अखंड वंश ll  २० ll

कीं ते ठरों ही अथवा न ठरो परंतु 

हें मातृभू अम्ही असो परिपूर्ण हेतु 

दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ   

हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll २१ ll


  सूर्याच्या प्रखरतेला दिवाभीत जाणू शकत नाही व सहनही करू शकत नाही .  

ती  दिवाभीताची लायकी  असते. 

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे  स्वातंत्र्यसूर्य होय ; ज्याच्या मनातून, भावनांमधून  , कृतीतून  केवळ  देशभक्ती  प्रसवते .  

 केवळ सावरकरच   ह्या असल्या निकृष्ट दर्जाच्या (सडक्या)  विचार-कृतींना माफ करू शकतात.  कारण  कुजके असले तरी  ते विचार व  त्या कृती  भारतीयांच्या  आहेत .  

आणि भारतमाता ही सावरकरांची श्रेयस व प्रेयस सर्वस्व आहे!  तर  माफीवीर म्हणजे बाष्कळ , दर्जाहीन कृती-विचारांना माफ करणारा  शूरवीर . 

  

   आजकाल कोर्टाचा बडगा आला की माफी मागायची   न् परत  चुकीचे वागायचे , अशी फॅशनच आली आहे. आदमखोर, नशाखोर, रिश्वतखोर, हरामखोर  , दंगलखोर , दरोडेखोर  वगैरे सारखा माफीखोर हा शब्द

 या नव-जमातीला  शोभून दिसतो.

   दुखावलेल्या सावरकरवादींनी  अशांना माफीवीर म्हणून  शब्दाचा दुरुपयोग करू नये .     

   

   तर माफीवीर  व माफीखोर यात सामासिक विग्रहाचा तसेच  वैचारिक सिद्धांताचा फरक असून या शब्दांची  गल्लत करू नये. 

   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

   नागपूर 



 

Tuesday, January 11, 2022

 सहजोक्त.


फळे मधुर खावया , असती नित्य मेवे तसे ।

हिरे-जडित-सुंदरी कनक-पंजरीही वसे ॥

अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे।

स्वतंत्र-वन-वृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे ॥

कृष्णशास्त्री चिपळूणकरांची पृथ्वी वृत्तातील  ही अन्योक्ती.  जुने लोकं , जुने तत्त्व न् जुने विचार ! 

आता काळ बदलला . समाजमान्यता बदलल्या. 

आता या शुकान्योक्तीला  बदलावेच लागेल ना ?  "कष्टाची भाकरी" फक्त कथेतच छान..   चिपळूणकर शास्त्रींची क्षमा मागून  नव-अन्योक्ती रचते आहे.


फळे मधुर खावया , असती नित्य मेवे तसे ।

हिरे-जडित-सुंदरी कनक-पंजरीही वसे ॥

अहर्निश सुखासनी शुक मजेत ऐदी फिरे ।

स्वतंत्र-वन-वृत्तीला कधीहि तो पुन्हा ना स्मरे ॥


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, January 10, 2022

सहजोक्त.

 पञ्चकन्या !

 अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा ।

पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।।

हा श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे. 

या श्लोकाचे अनेक  पाठभेद प्रचलित आहे. "पञ्चकन्याः स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।" असाही श्लोकार्ध प्रसिद्ध आहे. या श्लोकात पाच स्त्रियांची नामे आहेत म्हणून पाचकन्या असा शब्द श्लोकात  असावा असा समज होतो.  पण संस्कृतमध्ये "कन्या" कोणाला म्हणावे यावर विचार केला आहे.   जी दशवर्षिया कुवारी  असते ती कन्या.  

(कन् दीप्तौ + अघ्न्यादित्वात् यक् इत्युणादौ ४ । १११ । कन्यायाः कनीन् चेति निर्द्देशात्  पाणिनिमतानुसारेण न ङीष् अतष्टाप् ।) कुमारी । इत्यमरः ॥ २ । ६ । ८ । सा तु दशमवर्षीया । इति स्मृतिः ॥ (यथा महाभारते     वनपर्ब्बणि । “यस्मात् कामयते सर्व्वान् कमेर्धातोश्च भाविनि ! । तस्मात् कन्येह सुश्रोणि ! स्वतन्त्रा बरवर्णिनि !” ॥) 

वरील श्लोकात उल्लेखलेल्या सर्व महिला विवाहिता असून त्या कन्या नक्कीच नाहीत. 

श्लोकात "पंचकं" असा शब्द जास्त अर्थवाही आहे. पंचक म्हणजे पाचांचा समुद‍ाय. श्लोकात ज्या पाचांचा उल्लेख आहेत , त्यात विविध कुलातील महिला आहेत. 

जसे 

अहल्या =  ही  मेनका-भद्राश्व राजा यांची कन्या व ऋषिपत्नी होती.   द्रौपदी= याज्ञसेनी  ही  द्रुपदराजाला यज्ञातून लाभलेली तेजस्वी कन्या होती. सीता = ही जनकराजाने सांभाळलेली  भूमिकन्या होती. 

तारा =  ही वानरकुलातील होती.   मंदोदरी= ही ऋषी काश्यप यांचा पुत्र मयासुर व अप्सरा हेमा यांची  कन्या होती.   

या श्लोकात  जो "ना" शब्द दिसत आहे  तो   नृ (मानव) या मूळ शब्दाचे प्रथमेचे एकवचन आहे.  "पञ्चकं ना स्मरेत् नित्यम्"  या  वाक्याचा अर्थ असा की ,

" या पाचांच्या समूहाला मानवाने नेहमी स्मरावे".  

 मनात एखादी विकृती येणे वा   समाजमान्य वागणुकीनुसार चुकीचे वर्तन घडणे  ,  एखाद्या  व्यक्तीकडून    घडू शकते.  ही  मानवी प्रकृती आहे.   मानवी मन , बुद्धी  व वर्तन कधी कधी समीक्षेबाहेर असू  शकते.  अशा वेळी त्या व्यक्तीला (१)  परत  चुकीच्या मार्गावर न ढकलता , 

 किंवा (२) चुकीचे समर्थन करायला भाग न पाडता, 

  किंवा (३)  चुकीचे गौरवीकरण न करता ,

   किंवा (૪)  चुकीमुळे आयुष्यातून न उठवता  , 

    सामान्य व्यक्ती म्हणून जगण्यास बळ देणे ;  ही खरी  संस्कृती .

 वरील सर्व स्त्रियांचे उदाहरणं आपल्याला हाच दाखला देतात. वरील महिला  मोहाने , अज्ञानाने , अगतिकतेने , सूडभावनेने वा  समाजबंधनाने पतित झाल्या.  तरीही  त्यांच्या स्पष्ट , दंभहीन व  निखळ वागणुकीमुळे समाजाला  त्या वंदनीय  झाल्या.

  हा श्लोक  केवळ मानवी भावभावनांचे व्यवस्थापन कसे करावे ? यासाठी आहे कां ?  नाही.  हा श्लोक दुसराही महत्त्वाचा संदेश देतो. 

  

  माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

हा श्लोक जमिनीचे संवर्धन व व्यवस्थापन नि  उत्पादकता  कशी  वाढवावी ?  या विषयीचाही आहे.

  अहल्या = म्हणजे ज्या जमिनीवर कधीच "हल" (नांगर) चालवला नाही. म्हणजे जंगलातील , न कसलेली जमीन.

  द्रौपदी = दुबार पेरणी करण्याजोगी सुपिक जमीन.

  सीता = पांढरी माती असलेली भूमी.

  पांढरी माती काही जुन्या लोकांच्या मतानुसार ही पूर्णपणे नैसर्गिक माती आहे. यात कुठल्याही घटकाच मिश्रण नाही. किंवा कुठलेही घटक एकत्र करून ही माती बनवली गेलेली नाही. ही माती बहुधा राजस्थान, हरीयाणा, पंजाब या भागात आढळते. पूर्वी वाडे, गढी बांधण्यासाठी वापरली जायची .

  तारा = म्हणजे पानथळ जमीन  जिच्यात आकाशातील तारामंडळ प्रतिबिंबित होते.

  भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम या पाणथळ जमीनी करतात. पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती या प्रदूषित पाणी आणि इतर हानीकारक घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्धा करतात. अलिकडच्या काळात असेही आढळून आले आहे की पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या काही वनस्पतींच्या मुळांपासून थेट वीजनिर्मितीही करता येते. भातखाचरे आणि मत्स्यबीज उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशातच समाविष्ट होत असल्याने त्यातून जगभरातील लोकांना त्यांचे दररोजचे अन्न खायला मिळते.

  मंदोदरी =  नांगर न चालवताही ,  न कसताही  भरपूर उत्पादन देणारी  मऊ , भुसभुशीत  व  सुपिक  जमीन .  

आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात.                  जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही. या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करून सहज व्यवहारात त्याचा उपयोग करून घेण्याची हातोटी हीच आपल्या भारतीय संस्कृतीची महती आहे.

वरील श्लोक म्हणूनच प्रत्येकाने मनन व चिंतन करून  आचरणात आणावा , हेच संस्कृतिरक्षण होय.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Tuesday, January 4, 2022

 #सहजोक्त.

महात्मा कोणाला म्हणावे ? कां म्हणावे ? कोणाला म्हणू नये ? यावर मत मांडण्यासाठी हा लेख लिहीत नाही.


आत्मा म्हणजे जन्मलेला जीव . महात्मा म्हणजे अंगभूत थोरवी व  कर्तृत्वाने  मोठेपणा लाभलेला जीव. "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" हे सहण्याची तयारी असली की महात्मेपणा येतो.  


संस्कृत सुभाषिते मानवी व्यक्तिमत्वांना घडविणारी मनोविकासकं  असतात.  काही सुभाषिते तर 'वर्तनशास्त्राचे' सूत्र उलगडणारी समुपदेशकं असतात. 'महात्मा' शब्दाला ग्लॅमर मिळण्यापूर्वी देखील काही सुभाषिते रचलेली आढळतात. पुढील श्लोकात "महात्मा"  शब्दाची व्याख्याच सांगितली आहे जणू. 


विपदि धैर्यमधाभ्युदये क्षमा

 सदसि वाक्पटुता युधि विक्रमः। 

यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ प्रकृतिसिद्धमियं हि महात्मनाम् ॥


Patience in adversity, magnanimity in ascendancy, eloquence in assembly, bravery in battle,

 aspiration for eminence

  and engrossment in the Scriptures are the self-evident attributes of great men.


विपत्ति में धैर्य, अभ्युदय में सहिष्णुता, सभा में वाक् चातुरी, युद्ध में वीरता,

यश में उत्कण्ठा, वेद-शास्त्रों विषयक अनुराग, 

ये गुण महानुभावों के स्वभाव में ही पाये जाते हैं।


विपदि धैर्यम् म्हणजे संकटात धैर्य ,

अभ्युदये क्षमा म्हणजे  परमोत्कष काळात क्षमाशीलता ,

सदसि वाक्पटुता  म्हणजे सभेत वाक्पटुत्व ,

युधि विक्रमः म्हणजे युद्धात पराक्रम , 

यशसि च अभिरुचिः  म्हणजे यशाच्या शिखरावर असताना सदभिरुची (म्हणजे उत्तम छंदांची जपणुक),

व्यसनं श्रुतौ म्हणजे ज्याला वेदांचा व्यासंग आहे ,   ही सर्व लक्षणं  उपजत  महात्म्यांची आहेत . 


तर एकूण काय ? वरील पैकी काही लक्षणं स्वतःमध्ये आढऴली तर  बिंधास्त  स्वतःला 'महात्मा' समजा !  

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, January 3, 2022

 #सहजोक्त.

पंचतंत्रातील एक श्लोक असं  सांगतो  की  सत्ता , पैसा ,तारुण्य व सौंदर्य या चारही गोष्टी डोक्यात हवा जाण्यास मदत करणाऱ्या असतात . 

 सत्ता म्हटले की प्रत्येकवेळी राजकीय सत्ता डोळ्यासमोर  आणू  नये.  संस्था , कार्यालय वा  घरातील सत्तेमुळेही   डोक्यात हवा जाते.  हे व्यवहारात , समाजात सर्रास आढळते. सत्ताकेंद्रबिंदूसाठीच परस्परां मधील रस्सीखेच , शीतयुद्ध होते. श्रेयवाद  हा ही  प्रतिष्ठेचा असतो.  

 न् याच श्रेयवादातून कोणाला तरी बाजूला टाकणे , कोणाबद्दल ग्रह करून  घेणे , कोणाची लायकी ठरवून त्याला योग्य संधीच मिळू न देणे ,  त्याच्या न्याय्य अधिकारांपासून वंचित ठेवणे असे नाना प्रकार सामाजिक व्यवहारात घडतात.   

 'आपला तो सार्थ अभिमान , दुसऱ्याचा  मात्र माज '  ,  

' आपला तो सर्व सर्वसमावेशी स्वभाव , दुसऱ्याची मात्र हेकट वृत्ती ' 

   'आपण फारच परोपकारी  दुसरा  मात्र कंजूस भारी'   

   'आपला तो रास्त दृष्टिकोण , दुसऱ्याचा मात्र टोकाचा दुराग्रह '  

     एक ना अनेक वागण्याच्या तऱ्हा अनुभवता येतात जगात. 

 वृत्ती म्हणून  'मी , बरोबर ' हे ठिक पण  "मीच, बरोबर" हे अयोग्य आहे.  पण लक्षात कोण घेतो ? 

  जगताना जे ताण अनुभवाला येतात , त्यातले अनेक  अशाच वृत्तीमुळे  असू शकतात.

  

संहतिः श्रेयसी पुंसां विगुणेष्वपि बन्धुषु

तुषैरपि परिभ्रष्टा न प्ररोहन्ति तण्डुलाः ॥


 तांदूळ पेरला तर रुजत , उगवत नाही .  तुष्याचे आवरण असलेला धान उगवतो.   निकृष्ट म्हणून काढून टाकलेले तुसे नसल्यामुळेच तांदूळ उगवत नाही .  तांदुळाला दुसरं आवरण लावूनही पेरता येत नाही.  

 आज  आर्थिक बोझ वाटणारे  किंवा तुल्यप्रतिष्ठ नसलेले  अथवा व्यवहारिक फायद्याचे नसलेले , संबंध  ताणताना किंवा टाळताना हेच लक्षात घेतले तर ? 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.