#सहजोक्त.
पंचतंत्रातील एक श्लोक असं सांगतो की सत्ता , पैसा ,तारुण्य व सौंदर्य या चारही गोष्टी डोक्यात हवा जाण्यास मदत करणाऱ्या असतात .
सत्ता म्हटले की प्रत्येकवेळी राजकीय सत्ता डोळ्यासमोर आणू नये. संस्था , कार्यालय वा घरातील सत्तेमुळेही डोक्यात हवा जाते. हे व्यवहारात , समाजात सर्रास आढळते. सत्ताकेंद्रबिंदूसाठीच परस्परां मधील रस्सीखेच , शीतयुद्ध होते. श्रेयवाद हा ही प्रतिष्ठेचा असतो.
न् याच श्रेयवादातून कोणाला तरी बाजूला टाकणे , कोणाबद्दल ग्रह करून घेणे , कोणाची लायकी ठरवून त्याला योग्य संधीच मिळू न देणे , त्याच्या न्याय्य अधिकारांपासून वंचित ठेवणे असे नाना प्रकार सामाजिक व्यवहारात घडतात.
'आपला तो सार्थ अभिमान , दुसऱ्याचा मात्र माज ' ,
' आपला तो सर्व सर्वसमावेशी स्वभाव , दुसऱ्याची मात्र हेकट वृत्ती '
'आपण फारच परोपकारी दुसरा मात्र कंजूस भारी'
'आपला तो रास्त दृष्टिकोण , दुसऱ्याचा मात्र टोकाचा दुराग्रह '
एक ना अनेक वागण्याच्या तऱ्हा अनुभवता येतात जगात.
वृत्ती म्हणून 'मी , बरोबर ' हे ठिक पण "मीच, बरोबर" हे अयोग्य आहे. पण लक्षात कोण घेतो ?
जगताना जे ताण अनुभवाला येतात , त्यातले अनेक अशाच वृत्तीमुळे असू शकतात.
संहतिः श्रेयसी पुंसां विगुणेष्वपि बन्धुषु
तुषैरपि परिभ्रष्टा न प्ररोहन्ति तण्डुलाः ॥
तांदूळ पेरला तर रुजत , उगवत नाही . तुष्याचे आवरण असलेला धान उगवतो. निकृष्ट म्हणून काढून टाकलेले तुसे नसल्यामुळेच तांदूळ उगवत नाही . तांदुळाला दुसरं आवरण लावूनही पेरता येत नाही.
आज आर्थिक बोझ वाटणारे किंवा तुल्यप्रतिष्ठ नसलेले अथवा व्यवहारिक फायद्याचे नसलेले , संबंध ताणताना किंवा टाळताना हेच लक्षात घेतले तर ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment