Monday, January 3, 2022

 #सहजोक्त.

पंचतंत्रातील एक श्लोक असं  सांगतो  की  सत्ता , पैसा ,तारुण्य व सौंदर्य या चारही गोष्टी डोक्यात हवा जाण्यास मदत करणाऱ्या असतात . 

 सत्ता म्हटले की प्रत्येकवेळी राजकीय सत्ता डोळ्यासमोर  आणू  नये.  संस्था , कार्यालय वा  घरातील सत्तेमुळेही   डोक्यात हवा जाते.  हे व्यवहारात , समाजात सर्रास आढळते. सत्ताकेंद्रबिंदूसाठीच परस्परां मधील रस्सीखेच , शीतयुद्ध होते. श्रेयवाद  हा ही  प्रतिष्ठेचा असतो.  

 न् याच श्रेयवादातून कोणाला तरी बाजूला टाकणे , कोणाबद्दल ग्रह करून  घेणे , कोणाची लायकी ठरवून त्याला योग्य संधीच मिळू न देणे ,  त्याच्या न्याय्य अधिकारांपासून वंचित ठेवणे असे नाना प्रकार सामाजिक व्यवहारात घडतात.   

 'आपला तो सार्थ अभिमान , दुसऱ्याचा  मात्र माज '  ,  

' आपला तो सर्व सर्वसमावेशी स्वभाव , दुसऱ्याची मात्र हेकट वृत्ती ' 

   'आपण फारच परोपकारी  दुसरा  मात्र कंजूस भारी'   

   'आपला तो रास्त दृष्टिकोण , दुसऱ्याचा मात्र टोकाचा दुराग्रह '  

     एक ना अनेक वागण्याच्या तऱ्हा अनुभवता येतात जगात. 

 वृत्ती म्हणून  'मी , बरोबर ' हे ठिक पण  "मीच, बरोबर" हे अयोग्य आहे.  पण लक्षात कोण घेतो ? 

  जगताना जे ताण अनुभवाला येतात , त्यातले अनेक  अशाच वृत्तीमुळे  असू शकतात.

  

संहतिः श्रेयसी पुंसां विगुणेष्वपि बन्धुषु

तुषैरपि परिभ्रष्टा न प्ररोहन्ति तण्डुलाः ॥


 तांदूळ पेरला तर रुजत , उगवत नाही .  तुष्याचे आवरण असलेला धान उगवतो.   निकृष्ट म्हणून काढून टाकलेले तुसे नसल्यामुळेच तांदूळ उगवत नाही .  तांदुळाला दुसरं आवरण लावूनही पेरता येत नाही.  

 आज  आर्थिक बोझ वाटणारे  किंवा तुल्यप्रतिष्ठ नसलेले  अथवा व्यवहारिक फायद्याचे नसलेले , संबंध  ताणताना किंवा टाळताना हेच लक्षात घेतले तर ? 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment