#माफीवीर ? होय माफीवीरच !
शब्द कसे तयार होतात ? हे न समजल्याने अनेक शब्द अनर्थक ठरतात. उदाहरणार्थ हाच बघा ना ; माफीवीर शब्द !
मूळ अरबी भाषक असलेला मुआफ़ हा शब्द , हिंदीत - "छोड़ा गया, मुक्त किया गया, क्षमा किया गया ,मुक्त, आज़ाद" , या अर्थाने आहे. मुआफ चे माफ होऊन मराठीकरण झाले. म्हणजे हा शब्द "परकीय" प्रकारातील आहे.
वीर हा शब्द मात्र संस्कृत आहे . मराठीत तो तत्सम प्रकारातील शब्द ठरतो. वीर या शब्दाची व्युत्पत्ती अशी
(वीरयतीति । वीर विक्रान्तौ + पचाद्यच् ।
यद्वा विशेषेण ईरयति दूरीकरोति शत्रून् ।
वि + ईर + इगुपधात् कः ।
यद्वा अजति क्षिपति शत्रून् ।
अज + स्फायितञ्चीत्या दिनारक् । अजेर्व्वीः । ) शौर्य्यविशिष्टः । तत्पर्य्यायः । शूरः २ विक्रान्तः ३ । इत्यमरः । २ । ८ । ७७
अर्थात जो शत्रूंना विशेषत्वाने दूर करतो , तो वीर.
संस्कृतकुलातील भाषांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सामासिक शब्द तयार करण्याची वृत्ती. दोन वा अनेक अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द निर्माण होतो.
या सामसिक शब्दांना विशेष अर्थ असतो. उदा. "चंद्रमुखी" हा सामासिक शब्द चंद्र व मुख या दोन अर्थपूर्ण शब्दांपासून निर्माण झाला.
पण त्याचा अर्थ चंद्रासम मुख असलेली ती सुंदरी , असा होतो.
सामासिक शब्द व समासाचा विग्रह करायला भाषेच्या मूळप्रवृत्तीची जाण असायला हवी.
नाही तर "अर्धवट ज्ञान......." अशी अवस्था होते.
माफी शब्द माफ याच शब्दापासून आहे.
माफी म्हणजे क्षमा.
वीर शब्दाचा अर्थ - विक्रांत , शूर , शत्रूंना संपवणारा - असा होतो.
या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून, उथळपणे कुठल्याशा विद्वेषातून , 'माफीवीर', हा सामासिकशब्द घाईने तयार केल्या गेला.
न् "माफी मागणारा वीर" असा त्याचा अर्थही तितक्याच निर्बुद्धपणे सर्वत्र पसरल्या गेला.
जराशी तर्कशक्ती वापरली तरी लक्षात येईल की वीर असणारा व्यक्ती माफी कां मागेल ? माफी मागेल तर तो वीर कसा असेल ?
माफी म्हणजे क्षमा . "क्षमा वीरस्य भूषणम् ।"
कवी रहीम म्हणतात ,
"क्षमा बड़न को चाहिए, छोटन को उत्पात। रहीम हरी का घट्यो, जो भृगु मारी लात।।"
क्षमा करणे , हा महापुरुषांचा गुणधर्म आहे. माफीवीर या सामासिक शब्दाचा अर्थपूर्ण विग्रह , "सर्वांना माफी देणारा (क्षमा करणारा) वीर ", असाच होतो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य म्हणजे प्रतिभा व खडतर वास्तव यांच्या सर्जनातून जन्मलेले शब्दबद्ध अनुभव आहेत.
पुढील कविता वाचा.
कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने
जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll ९ ll
हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले
तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला
लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll १६ ll
त्वत्-स्थंडिले ढकलिले प्रिय मित्र-संघा
केलें स्वये दहन यौवन देह-भोगा
त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा ll १७ ll
त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता
दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता
त्वत्-स्थंडिली अतुल-धैर्यनिष्ठ बंधू
केला हवि परम कारुण पुण्यसिंधू ll १८ ll
त्वत्-स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला
त्वत्-स्थंडिला वरी अता मम देह ठेला
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्-स्थंडिलीच असते दिधले बळी मी ll १९ ll
संतान ह्या भारतभूमिस तीस कोटि
जे मातृभक्ति सज्जन धन्य होती
हे आपुले कुल ही तय मध्ये ईश्वरांश
निर्वंश होउनी ठरेल अखंड वंश ll २० ll
कीं ते ठरों ही अथवा न ठरो परंतु
हें मातृभू अम्ही असो परिपूर्ण हेतु
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll २१ ll
सूर्याच्या प्रखरतेला दिवाभीत जाणू शकत नाही व सहनही करू शकत नाही .
ती दिवाभीताची लायकी असते.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यसूर्य होय ; ज्याच्या मनातून, भावनांमधून , कृतीतून केवळ देशभक्ती प्रसवते .
केवळ सावरकरच ह्या असल्या निकृष्ट दर्जाच्या (सडक्या) विचार-कृतींना माफ करू शकतात. कारण कुजके असले तरी ते विचार व त्या कृती भारतीयांच्या आहेत .
आणि भारतमाता ही सावरकरांची श्रेयस व प्रेयस सर्वस्व आहे! तर माफीवीर म्हणजे बाष्कळ , दर्जाहीन कृती-विचारांना माफ करणारा शूरवीर .
आजकाल कोर्टाचा बडगा आला की माफी मागायची न् परत चुकीचे वागायचे , अशी फॅशनच आली आहे. आदमखोर, नशाखोर, रिश्वतखोर, हरामखोर , दंगलखोर , दरोडेखोर वगैरे सारखा माफीखोर हा शब्द
या नव-जमातीला शोभून दिसतो.
दुखावलेल्या सावरकरवादींनी अशांना माफीवीर म्हणून शब्दाचा दुरुपयोग करू नये .
तर माफीवीर व माफीखोर यात सामासिक विग्रहाचा तसेच वैचारिक सिद्धांताचा फरक असून या शब्दांची गल्लत करू नये.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर
No comments:
Post a Comment