Saturday, August 26, 2017

कविता


#पाहूनि गवतफुलास .

निसर्गात अनेक रंगीबेरंगी  फुले आहेत.
आकार-प्रकारांनी ते किती श्रेष्ठ आहेत.
सुगंधाची पण दुनिया किती न्यारी आहे
आकार्षित करण्याची लकब प्यारी आहे ॥

कोणी शोभे ललनेच्या भाळी
आरास  करून मंदिरास मढवी
 कुणी शोभिवंत गृहास सजवी
 कुणी मानवी लोचनांस निववी  ॥

गवताचे हे फुल सानुले
तुलनेने तर गरीब बिचारे
उपवनास अनुपयोगी ते
जातिवंत ही नसे गोजिरे॥

तरी शिवाच्या मस्तकी राजे
वनकन्येच्या कायी विराजे
गिरिशिखरांची शोभा साजे
गवतकुलाचा महिमा गाजे ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.









स्मरणचित्रे.










Saturday, August 19, 2017

#सहजोक्त - लेखांक ५

लेखांक ५
आरत्या म्हणून झाल्या कि शेवटी दोन कडव्यांची संस्कृत कर्पुरारती म्हणण्याचा प्रघात कुठे कुठे आढळतो.

कर्पुरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंन्द्रहारं
सदा वसतं ह्रदयारविंदे भवं भवानीसहितं नमामि ॥

शेवटचे चरण "भवनी सहितं भवं  नमामि ।
म्हणजे भवानी (पार्वती) सह भवाला म्हणजे शंकराला मी नमस्कार करतो.आता वरच्या तीन अोळीत फक्त शंकराचे वर्णन अाहे. शेवटी मात्र हायकमांड सह आराध्याला नमस्कार केला आहे.
वरच्या तीन चरणांमध्ये शंकराची सर्व विशेषणे द्वितीया विभक्तीत योजली आहे कारण "नमामि" (मी नमस्कार करतो) या क्रियापदाला
कर्म द्वितीया विभक्तीत अपेक्षित आहे.  म्हणजे शंकराची सर्व विशेषणे द्वितीया विभक्तीत आहेत.
कर्पुरगौरम् =कापरा सारखा गोरा.
करुणावतारम् = करूणेचा अवतार.
संसारसारम् = संसाराचे, विश्वाचे सार /मर्म
भुजग इंद्र हारम् = भुजंग राजाचा हार धारण केलेला.
सदा वसन्तम् = नेहमी राहणारा /वसणारा
हृदयारविंदे = भक्तांच्य‍ा हृदयकमळात.
अशा शंकराला कवी पार्वतीसह नमस्कार करतो आहे.
आता दुसरे कडवे. . .

मंदारमालांकृतालकायै ,कपलमालांकितशेखराय
दिव्यांबरायै च दिगंबराय , नम: शिवायै च नमः शिवाय ॥

मंदर माला अलंकृत अलकयै = मंदारफुलांच्या माळांनी जिने केस (अलका) अलंकृत केले आहेत ,सजवले आहेत.  त्या पार्वतीला .

कपालमाला अंकित शेखराय = कपाल ( नरमुंड) माऴांनी युक्त शेखराला ,शंकराला .

दिव्य अंबरायै = दिव्य म्हणजे उची /भारी / महागडे  वस्त्र (अंबर) घातलेल्य पार्वतीला.

दिक् अंबराय = दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे त्या शंकराला.

नम: शिवायै = शिवा म्हणजे शिवानी म्हणजे शिवशंकरची पत्नी ,तिला. नमस्कार असो.

नम: शिवाय =  शिवाला म्हणजे शंकराला नमस्कार असो.

नम: हे अव्यय असून त्याचा अर्थ "नमस्कार असो" हा होतो. या अव्ययाला चतुर्थी विभक्तीची  अपेक्षा असते.

या श्लोकात पार्वती व शंकर अशा दोहोंना ही त्यांच्या विशेषणांसह नमस्कार केला आहे.
पैकी पार्वतीची विशेषणे स्त्रीलिंगी चतुर्थी विभक्तीत तर शंकराची विशेषणे पुल्लिंगी  चतुर्थी विभक्तीत आहेत.

शिव-पार्वती या दंपतीच्या स्वभावात ,रहाणीमानात आमूलाग्र भेद आहे. तो इथे ठऴकपणे दाखविलाही आहे. तरीही सर्व देवांमध्ये ही "जोडी नंबर एकच" आहे. कारण त्यांचा बाह्य भेद त्यांच्य‍ा अंतरंगातील अद्वैताला छेद देत नाही. अंतरंग समन्वय फारच महत्वाचा . "जो अंदर फिट ,वो बाहर भी हिट"!.

पाच लेखांमधून मराठमोळ्या संस्कृतीला जपणा-या आरती नामक अक्षरवाङ्मयाचा वेध घेण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. या वाङ्मयाकडे भाषाभ्यासकांनी अधिक लक्ष द्यावे तसेच भाषेच्या विद्यार्थ्यांनी याही वाङ्नयाकडे अभ्यासविषय म्हणून पहावे ही विनंती.
सामान्य वाचकांनी अर्थ समजून आरतींचे उच्चार केले तरी हा वाग्यज्ञ सफल झाला हेच मी समजेन.
देवार्पणमस्तु ।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.



Friday, August 18, 2017

#सहजोक्त .लेखांक४

#आरती. .  लेखांक ४
#लवथवती विक्राळा. .
शंकर एक आराध्य दैवत. विनाशकारक देव सृष्टीचा लय कर्ता पण शब्दसृष्टीचा कर्ता. त्याची ही आरती. हाच एकमेव देव ज्याची पत्नी ही अगदी
 प्रिय- प्राणेश्वरी-सहचरी-सहधर्मचारिणी आहे. म्हणून हा देव सर्वात जास्त आवडतो.  म्हणूनच याची पूजा कन्यकांनी करावी कि जेणे करून पती  शंकराप्रमाणे पत्नीची कदर करणारा , समानपणे वागणारा मिळेल.  असो.

लवथवती विक्रळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा ॥

तांडवनृत्य करणा-या , तिसरा डोळा उघडलेल्या रौद्ररूप शिवाचे हे वर्णन . तसे कर्मकांडानुसार उग्रदैवताची आराधना करू नये म्हणतात पण इथे तर पहिल्याच अोळीत देवतेचे उग्रभाव प्रगटले आहेत.  तांडवनृत्य करताना ज्याच्या गळ्यातील विकराळ , महाभयंकर नरमुंडमाळ हिंदकळत आहे . ज्याचा गळा विषामुळे निळा-काळा झालाय. ज्याच्या तिन्ही डोळ्यातून ज्वाळा निघत आहेत. शंकराच्या तीन डोळ्यांपैकी एक चंद्र ,एक सूर्य तर एक अग्नी आहे.
या अोळीत उग्र दैवताचे वर्णन तर घडले आता लगेच त्याला उतार.

लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥

शंकराच्या मस्तकावर लावण्यसुंदर अशी बाला आहे.
मराठीत 'ल' चा  'ळ' होतो. जसे. .  . .
कुल=कुळ
कला=कळा
निला=निळा
जल=जळ इत्यादी .
बाळा म्हणजे बाला.  म्हणजेच सौभाग्यकांक्षिणी स्त्री.  सोप्या शब्दात नवरा काय ,कशासाठी हवा हे समजू शकणारी सज्ञान तरूणी.  शंकराच्या डोक्यावर लावण्यवती गंगा आहे जिच्यापासून झुळझुळ, निर्मळ जळ वाहते .

सुंदरच रचना!
या दोन्ही अोळीत लवथवती , झुळझुळ  हे नादमय शब्द चपखल योजले आहेत . क्रोधात लवथवणारच .प्रेमात झुळझुळणारच . विसंगतीपूर्ण अर्थयुक्त शब्द ,वाक्य जवळ जवळ,  हा ही एक अलंकारच म्हणावा !
वर रौद्ररूपातील रौद्ररसयुक्त वर्णन तर
 दुसर्‍या अोळीत निर्मळ , प्रेमळ असे शांत, श्रुंगाररसयुक्त वर्णन!
  त्रिनेत्र ज्वाळा अोकत आहेत तर पाणी झुळझुळ वाहते आहे.


जयदेव जयदेव जय श्रीशंकरा
आरती  अोवाळू तुज कर्पूरगौरा ।

शंकराचा जयजयकार केला आहे.शंकर कापरासारखा गोरा आहे. फेअर अँड लव्हली न लावताही फेअर !!

कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा॥
विभुतीचे उधळण शितीकंठ निळा
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥

कर्पुराप्रमाणे गौरवर्णीय असलेला हा शंकर भोळा आहे.त्याचे डोळे विशाल, मोठे-मोठे आहेत. त्याची अर्धांगिनी (शब्दश:  पण आणि लक्षार्थाने पण) ;  पार्वती  मंदारपुष्पमालांनी सजून त्याच्या अर्धासनावर बसलेली आहे .
त्याच्या अंगावर  चिताभस्म विभूतीचे उधळण  आहे.
ज्याचा मूळातील पांढरा गळा आता विषप्राशनामुळे  निळा झाला आहे.  असा हा शंकर उमावेल्हाळ   आहे.
'वेल्हाळ' एक मस्तच मराठी शब्द . गोष्टीवेल्हळ, वेल्हाळगौर असे शब्द वापरतो आपण .
 वेल्हाळ म्हणजे दिवाना ,वेडा .  उमेचा म्हणजे स्वत:च्या पत्नीचा दिवाना . खरोखर सलाम आपल्या पुराणकथांना  ! गंगा कितीही डोक्यावर बसू देत ,हा मात्र उमेचाच दिवाना !
 "मान गये उस्ताद"!  म्हणूनच महादेव आहात.

देवी-दैत्यी सागरमंथन पै केले।
त्यामाजी अवचित हालाहल जे उठले।
ते त्वा असुरपणे प्राशन केले
नीलकंठ नम प्रसिद्ध झाले।।

या अोळीत जरा जुन्या मराठीच्या पाऊलखुणा आहेत. पै हे पादपूरणार्थ अव्यय आहे.
याला मुळचा अर्थ नाही.
देवी-दैत्यी या शब्दांत तृतीयेचा 'ई' प्रत्यय आहे.
त्वा हा ही तद्भव शब्द आहे. (सध्याच्या प्रचलित नागपुर ग्रामीण बोलीत "तुवा असं काहून मनलं ?" म्हणतात ना ? त्यातील हा त्वा  आहे .)
देवांनी आणि दानवांनी सागरमंथन केले , त्यातून अनपेक्षित , अचानक, एकाएकी , अवचित हालाहल नावाचे जहाल विष बाहेर पडले . इतर रत्ने घेण्यास सगळे समोर पण हे मात्र कोणीच स्वीकारले नाही. त्यावेळी असूरपणे म्हणजे अतिशय पराक्रमाने, उत्साहाने तू ते प्राशन केले .
असूर या शब्दाचा राक्षस हा अर्थ मागाहून  रूढ झाला. आधी त्याचा अर्थ पराक्रमी असा होता. तसेही राक्षस अफ़ाट पराक्रमी होते.
सामान्य देव मृत्यू पावले असते वा त्यांचे सर्वांग निळे झाले असते पण तुम्ही महादेव ! तुमचा गळा निळा झाला.  म्हणून तुमचे नाव निळकंठ पडले.

व्याघ्रांबर फणिवर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळ टिळक रामदासा अंतरी ॥

शंकर गजाजीन घालतात वा व्याघ्रांबर  घालतात. येथे शंकराचे वर्णन करताना त्यांनी व्याघ्रांबर घातले आहे असे म्हणतात.  फणिवर म्हणजे श्रेष्ठ नाग धारण केलेला शंकर ,सुंदर असून मदन अरी आहे , म्हणजे मदनाचा शत्रु आहे. शंकराची पिंड म्हणजे पति-पत्नीच्या एकत्वाचे प्रतीक अन् तो मदनारी!! कसे शक्य आहे हे ? उमेचा वेल्हाळ ! तरी मदनरी?

 इथेच गंमत आहे.जीवनात सर्वच रंग हवेत, योग्य तेथे योग्य मात्रेत .  रंगांची सरमिसळ नको किंवा एका रंगातून दुसर्‍या रंगात शिरताना जुन्या रंगाची उजळणी नको.  हा तसाच आहे.  म्हणून तो मदनारी आहे.
 पंचानन म्हणजे सिंहासारखा पराक्रमी.
 मनमोहन म्हणजे मन मोहविणारा.
 मुनिजनांना सुखकारक ठरणारा ,
 असा हा शंकर रघुकुळाला भूषवाह असलेल्या रामदासाच्या अंतरंगात शतकोटीचे बीज वाचेतून प्रकटू दे .

 आता पर्यंत प्रचलित तीन आरतींचे रसग्रहण मला भावले तसे यथामती केले. "तेच बरोबर" असा माझा दावा नाही. यापेक्षा अधिक चिंतन करून कोणी मांडू शकतीलच अशी आशा नव्हे खात्री आहे.
 "देवार्पणमस्तु।"
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

Thursday, August 17, 2017

#सहजोक्त -३

लेखांक ३

देवीची आरती
आरत्यांचे सुद्धा वंदेमातरम ,जनगणमन सारखे असते पहा . एकट्याने म्हण म्हटले तर येत नाही , ही अोळ पुन्हा म्हण , सावकाश म्हण , लयीत बदल कर अशा सूचना केल्या कि पार सगळे विरून जायला होते.  कधी कधी या आरतीचे कडवे त्या आरतीत रिमिक्स होते तर कधी कधी तेच तेच पुन्हा पुन्हा म्हटले जाते . उच्चारण हा यर विवाद्य विषय . असो .
साधारणपणे  'दुर्गे दुर्घट भारी '  ही आरती 'सुखकर्ता दुखहर्ता'  या आरतीची जणु जोड-आरती समजून म्हटली जाते  . पण ही स्वतंत्र आरती असून नरहरी नावाच्या कवीने रचली आहे . संस्कृत काय किंवा मराठी काय प्राचीन  काळात  स्वत: बद्दल फारसं  सांगत नसत कविलोकं .
या लेखात देवीची ही आरती बघू .

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसरी =

या अोळीचा अर्थ असा की , "हे दुर्गे , तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट संसरवणे कठिणच आहे" .  इथे दोन शब्द विशेष  लक्षात घेण्यासारखे आहेत . त्यातील पहिला म्हणजे दुर्घट = दुर् +घट हा शब्द .
'घटना'  हा सामान्य परिचित शब्द याच घट पासून तयार झाला आहे.
घट , घाट , घटनावळ , घडविला , घडी , घटिका असे अनेक शब्द व्युत्पन्न होतात . दुर्घट म्हणजे घडण्यास कठिण , होण्यास  कठिण . दुर्  हा उपसर्ग थोडा नकारात्मकच असतो .
जसे - दुर्दैव , दुर्भाग्य , दुर्लभ , दुष्कर्म इत्यादी.
आता दुसरा शब्द संसरी , संसारी नाही.
संसर =सर् म्हणजे योग्य गतीने सरकत रहाणे .
 जो योग्य गतीने सरकत असतो संसार.
 तो पुढे पुढेच जातो , परत येत नाही . 'संसार' हे नाम आहे तर संसर हे क्रियापद आहे.
 " हे दुर्गे तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट पुढे सरकणे कठिणच आहे " असा एकूण अर्थ .

"अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी"=

हे अनाथांची नाथ असलेली आई . अंब ह्या संस्कृत शब्दाचा आई असा  अर्थ आहे.
या शब्दापासून  विविध भाषेत अम्मा , अम्मी  , अम्मा  , अंबा , आऊ , आई  असे शब्द दिसतात. नरहरी कवी म्हणतात ,  "आई अंबे , तू तुझी करूणा विस्तार , विस्तृत कर , वाढव. माझ्यावर कृपाकर .  जन्म-मरण यांचा फेरा हाच संसर. यापासून वारण कर  , वाचव .  इथे "वारी"  हा शब्द आहे .  निवारण करणे  , अनिवार असे शब्द आपण सामान्य भाषेत नेहमीच योजतो , त्यातील मूळ शब्द वृ (वर्)अडवणे या अर्थी आहे .  इथे आरतीत "वारी"  हे क्रियापद आहे .  तू अडव , तू निवारण कर हाच  अर्थ आहे.
आता पंढरपुरची वारी म्हणजे काय ?  तेथे हा शब्द क्रियापद म्हणून  नाही नक्की . तेथे परिक्रमा, यात्रा या अर्थाने आपण तो शब्द योजतो . " मूळात संसारापासून विरक्त , मुक्त करते ती यात्रा म्हणजे वारी "  असा अर्थ असेल ना ?
 तेथे वारी हे नाव आहे . असो.

"जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरवर दे तारक संजीवनी"=

त्या दुर्गेचा जयघोष  केला आहे.  महिषासुराची मथिनी म्हणजे जिने  मथन केले आहे म्हणजे अगदी घुसळून टाकले  , आजच्या भाषेत  "पार लोळवलेच".  सुरवर म्हणजे श्रेष्ठ देवता  ,  ईश्वर  म्हणजे शंकर या सर्वांना वर देणारी ,  
जी तारणारी , संजीवन देणारी आहे .  अशी ही अफाट कर्तृत्ववान महिला शक्ती.

"त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही"=

त्रिभुवनी-भुवनी या शब्दरचना केवळ अनुप्रासाकरिता नसावेत.  स्वर्ग-मृत्यू-पाताळ असे तीन भुवन आहेत  आणि आज वर्तमानात जे घडत आहे ते भुवन .  दुर्गा ही अनादी-अनंत अाहे . कवीला तिची अनुभूती आज या भुवनात ,वर्तमानात आली.  असे बघा,  "अनेक वर्ष आपण एखाद्या व्यक्तिमत्त्वाला पाहात असतो पण अवचित प्रसंगाने क्षणात वीज चमकावी तसे  आपल्याला व्यक्तिमत्त्वाची थोरवी कळते "  तसे काहीसे या वाक्यात आहे.   "तुझ्यासारखे दुसरे कोणी या त्रिभुवनात नाही",  अशी अनुभूती कवीला झाली आहे.

"चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडलो प्रवाही "=


चार आश्रम, चार युग असे जे काही  म्हणून चार असतील ते ते सर्व श्रमले,  तुझ्यापुढे अपुरे पडत आहेत ,  तोकडे पडत आहे , थकले बिचारे.
सहा वेदांग ,सहा शास्त्रं , सहा दर्शने आहेत.
 जे नेहमी एकमेकाचे खंडन-मंडन करीत असतात आणि त्यातून वाक्प्रवाहात पडतात .
 "वेद" म्हणजे ज्ञान परिपूर्ण-संपूर्ण झाले की बोलवत नाही मात्र विवाद आला की प्रवाहात पडणे आलेच, चिरंतन सत्य !

"ते तू भक्ता लागी पावसी लवलाही "=

ते म्हणजे तशी तू भक्तांसाठी लवकर ,क्षणाचाही विलंब न करता पाव, पावतेसच , हा विश्वास.

"प्रसन्न  वदने प्रसन्न होसी निजदासा "

निज , तुझा वैयक्तिक दास , निजदासावर तू प्रसन्न हो . हे  प्रसन्न वदना देवी ,  इथे "निजदासा" ही सप्तमी आहे.  'त ई आ' हे सप्तमीचे प्रत्यय . त्यातील "आ" हा प्रत्यय फार कमी ठिकाणी आढळतो .  तोच इथे आहे.
"क्लेशापासुनी सोडवी तोडी भवपाशा"
क्लेशांपासून सोडव आणि भवपाशांना तोड .
पाश तोडावेच लागतात. भव म्हणजेच संसार. भवपाशा इथे ही "आ" प्रत्यय आहे , पण सप्तमी नाही.

"अंबे तुज वाचोनि कोण पुरविल आशा "=

आईला लडिवाळ आळवणी कि ,'अग आई , प्लीज तुझ्याशिवाय  कोण ग करू शकेल ? तुझी नाही तर कोणाची खात्री देऊ सांग ना ?'

"नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा" =

नरहरी कवी ,स्वत:त थोडाही  न उरता तुझ्या पदरूपी कमळामध्ये तल्लीन (तत् +लीन) लीन म्हणजे एकरूप होणे . त्यात एकरूप, कशात ?
 तर त्या तत्वात !

ही आरती म्हणजे उत्कट भक्तीची कविता आहे.कवीच्या अलौकिक प्रतिभेने जनमानसावर गारूड घातले आहे . भक्ती महत्वाची , तितकीच शब्दभक्ती नि अर्थभक्ती  देखील !
देवीची अनेक नावे आहेत पण येथे "दुर्गा" म्हटले आहे .  दुर् + ग = दुर्ग . दुर्ग म्हणजे जाण्यास कठीण. म्हणून तर पर्वताला दुर्ग म्हणतात.
 सहज झपझप नाही जाता येत तेथे.
  तशी ही देवी "दुर्गा"आहे.  कोणीही कधीही पटवावी अशी ती 'आशुतोष' , 'सुलभा' नाही .
  म्हणून  तिला  ही आळवणी.
 
दुर्गा-क्षमा-शिवा-धात्री-स्वहा-स्वधा नमोSस्तुते ।

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, August 16, 2017

#सहजोक्त - लेखांक २

लेखांक 2

आरती
धार्मिक वाङ्मय म्हटले ,की त्याला एक वेगळे वलय चिटकवण्याची घाई , भक्त आणि निंदक दोघेही करतात . येथेच या वाङ्मयावर प्रचंड अन्याय होतो . साधे "आरती" प्रकार बघू या .
कर्मकांडानुसार षोडशोपचार विधीने पूजा केल्या जाते त्या सोळाही उपचारांमध्ये "आरती" हे नावच नाही. संस्कृतमध्ये याला आरातिक्य असे नाव आहे पण त्याचाही उल्लेख सोळा उपचारविधीत नाही .
 तरीही रूढीप्रिय समाजात "आरती" फारच प्रचलित आहे .  देवाची , गुरुची , संतांची आरती , इतकेच नाही तर वृक्षाची , नदीची ,पोथीची पण आरती आढळते . खरे तर आरती म्हणजे  पूर्णपणे
रत /रममाण होऊन केलेली शब्दस्तुती .
मूळात आरती ही पण एक कविताच असते ना !
 ती ती देवता हा त्या कवितेचा वर्ण्यविषय  असतो इतकेच . आपले मराठी वाङ्मय विशेषरित्या
 धार्मिक-वाङ्मय अतिशय सखोल , गंभीर  आणि चिंतनप्रवण आहे , यात शंकाच नाही .
ज्ञानेश्वरीत  कोणे एके ठिकाणी पार्वती शंकराला प्रश्न विचारते की, गीतेचा महिमा काय ?  त्यावर शंकर उत्तरतात , 'देवी ,जशी तू रोजच नित्यनुतन वाटते , कितीदा बघावे तरी दरवेळी नाविन्य जाणवते तसेच गीतेचे स्वरूप आहे ".
हाच दृष्टांत 'धार्मिक वाङ्मयाला  तंतोतंत  लागू होतो. जितके वेळा तुम्ही ते वाचाल, मनन कराल , चिंतन कराल ; तुम्हाला त्यातील खोल-खोल, वेगवेगळे अर्थ उलगडत जातील . जे जे तुम्ही अनुभवाल ते सारे इतरांना सांगावेच असे नाही .
"आपल्याला आलेली अनुभूती दुस-यात संक्रमित करायला 'बळकट गुरु' असावा लागतो"  असो.
भाषा अभ्यासकांनी टोकाचे अतिरेक सोडून निव्वळ भाषा म्हणून आरतीकडे पहावे . कवीचे काव्य , गीतकाराचे  गीत, तसे आरतीकाराची आरती .
इतके सोपे "ए फॉर अॅपल" सारखे असावे .
जसा जसा अभ्यासाचा स्तर, पोत  वाढेल तसे तसे
 "ए फॉर एनिथिंग" शिकवावे लागणार नाही ,
तर आपोआप समजेल !
आता पहिली आरती गणपतीची .

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
 नुरवी , पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

 सर्वांगी  सुंदर उटी शेंदुराची
 कंठी झळके माळ मुक्ताफ़ऴांची॥१॥

 जय देव जयदेव जय मंगलमूर्ती
 दर्शनमात्रे ,मन कामना पुरती ॥धृ॥

 रत्न खचित फरा तुज गौरीकुमरा
 चंदनाची उटी कुमकुम केशरा
 हिरेजडित मुकुट शोभतो बरा
 रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥२॥

 लंबोदर पितांबर फणिवर बंधना
 सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
 दास रामाचा वाट पाहे सदना
 संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३॥


 अाता एकेक करून अर्थ बघू .
 "सुखकर्ता दुखहर्ता  "

  सुख करणारा , दु:ख हरणारा ; इथे अर्थ द्विरुक्ती आहे कां ? सुख मिळणे म्हणजे दु:ख नष्ट होणेच ना ? पण तसे नाही . एसीत बसलोय , थंडीचे सुख घेतोय पण वाढत्या बिलामुळे दु:ख पण वाढते आहे ना ! म्हणून सुख करणारा गणेश आणि दु:ख दूर करणारा दु:खहारक गणेश असे दोन्ही रूपे हवेच .
कर्तृ>कर्ता ;
हर्तृ>हर्ता ;
भोक्तृ>भोक्ता ;
वक्तृ >वक्ता
या पद्धतीने हे रूप सिद्ध होते .

 "वार्ता विघ्नाची नुरवी " =

 विघ्नाची , वि+घ्न म्हणजे विशेष रितीने नाश करणारे जे काही असेल ते ; त्या सर्वांची वार्ता म्हणजे प्रत्यक्ष संकटे , अडचणी , विघ्न येण्यापूर्वी जी सूचना वा संकेत मिळतात त्यांची वार्ता नुरविणारा .
नुरविणे  हा सुंदर सुंदर मराठी शब्द .
न उरविणे , खरे तर अ+उ बरोबर अो , होतो.
जसे गणेश+उत्सव =गणेशोत्सव,
प्रश्न+उत्तर=प्रश्नोत्तर .
पण नुरवणे शब्दात या संधिनियमाला अपवाद आढळतो . न+उरविणे=नुरविणे,पररूप संधी म्हणता येईल.

 पुरवी प्रेम कृपा जयाची =

 ज्याची कृपा प्रेम पुरविते . मुळात आपले अस्तित्व एक 'चैतन्यमय आनंद" असतो . तोच प्रत्येकाचा 'स्वभाव' असतो .  द्वेष , राग , मोह , मत्सर , अहंकार इत्यादी स्वत:वर लादलेल्या विकृती आहेत म्हणून गणेशाची कृपा झाली , खरे गणेशतत्त्व कळले की फक्त आणि फक्त 'प्रेमभाव' शिल्लक राहतो .
गणेश मूर्तीचे वर्णन करतांना रामदास स्वामी
 जिवंत मूर्ती डोळ्यासमोर उभी करतात .
सर्वांगाला शेंदुराची उटी लावली अाहे .
 गळ्यात मोत्यांची माळ घातली आहे.
ती माळ चमकते आहे झळकते आहे म्हणजे
दुस-यांच्या डोळ्यात तिचे तेजस्वी अस्तित्व जाणवतेय.
आता प्रत्यक्ष गणपती,  जो पार्वतीचा मुलगा ,
केशर-कुमकुम युक्त चंदन उटी लावतो .
आपण नाही का सन्स्क्रिन ,डिओ लावतो ?
 त्यावेळेचे ते इकोफ्रेंडली श्रुंगारसाधने.
हिरेजडित मुकुट, रत्नखचित फ़रा अशा अॅसेसरीज् , अॉर्नामेंट हे असणारच ना !
 यातही पहा ; रामदासस्वामी  गणपतीला शंकराचा पुत्र म्हणत नाही . कारण शंकर म्हणजे दिगंबर , चिताभस्म लावणारा चंद्रमौली पण पार्वती ही हिमालयाकन्या , दिव्यांबरा , छान राजस रहाणी असलेली ; तिचा हा वारस , मग तोही छानच रहाणार.

 लंबोदर पितांबर-फ़णिवरबंधना =

 गणेश कसा आहे तर लंब उदर ,पीत अंबर  घातलेला आणि 'फ़णिवर' म्हणजे बेल्ट घातलेला आजकाल पँटच्या पॅटर्न नुसार बेल्टची व्हेरायटी असते मग विचार करा ना ! पिवळ्या रेशमी धोतरावर श्रेष्ठ  नागाचे बंधन ! So cool ,No !

 सरळ सोंड -वक्रतुंडत्री नयना =

 गणेशाची सोंड सरळ पण सोंडीच्या भारामुळे तोंड थोडं वाकडे होणारच ना ! बाबांचा शंकराचा वारसा त्रिनेत्र रूपाने  मिळवला आहे.

 रामदासाचा वाट पाहे सदना
 संकटी पावावे ,निर्वाणी रक्षावे
 सुरवर वंदना  =

 रामाचा दास या गणेशाची सदनात , घरात म्हणजे
या शरीररूपी मंदिरात आर्ततेने वाट पाहतो आहे. गणेशा, संकटसमयी मला पाव रे .  वाण म्हणजे वासना , इच्छा .  सगळ्या संपल्यात  , निर्वाण झाले आहे ,आता रक्षण करा .
सुर वर म्हणजे ज्येष्ठ-श्रेष्ठ  देवांकडून वंदल्या जाणारा गणेश .

 दर्शन मात्रे मनकामना पुरती =

 हा ही सुंदर वाक्य प्रकार . तसे शब्दसिद्धी नुसार मनोकामना  व्हायला पाहिजे पण मन हे क्रियात्मक इंद्रिय आहे . त्यात कामना म्हणजे इच्छा असणारच. त्याची "पूर्ती" म्हणजे पूर्तता म्हटले नाही कारण मनाच्या इच्छा अनंत असतात , त्या पूर्ण होतच नसतात .
पण मंगलमूर्तीच्या दर्शनाने त्यांची "पुरती" होते . भर पासून भरती तसेच पुर पासून पुरती.
 म्हणजे इच्छेत गणेश/ मंगलमूर्तीच रहाते मग बाकी पूर्तीची गरज नाहीच !
 गणपतीची आरती अजून सखोल चिंतता येईल .
पण माझ्या तोकड्या ज्ञानाने मला सध्या इतकेच सुचले आहे . एकमात्र आवर्जून जाणवते कि , आपले अक्षर पासून वाङ्मयापर्यंत सगळे सगळेच कलासक्त , सौंदर्यासक्तच आहे.
     भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा :   . . . .  . . ।
     म्हणतात ते उगाच नाही .
"देवा , माझ्या नजरेला चांगलेच दिसू दे " याचा अर्थ "जगात चांगलेच असू दे अाणि चांगल्यातील चांगले बघण्याकडे माझी वृत्ती असू दे बाह्यंग-अंतरंग सुंदर असू दे ".
     हाच बोध प्रत्येक वाङ्मयातून असावा असे वाटते.
     एकूणच या गणपतीच्या आरतीतून रामदासस्वामींची तप:साधना आहेच.
या शिवाय इतक्या लीलया प्रासादिक रचना , अलंकारांचा वापर  साधणार नाही .
वानगीदाखल सुखकर्ता-दुखहर्ता-वार्ता  या रचनेत
'र्ता' या वर्णाची पुनरुक्ती करून वर्णानुप्रास साधलाय . तर विघ्नाची-जयाची येथे यमक आहे .
'फणिवरबंधन' येथे रूपक अलंकार आहे.
किती किती शोधावे ? एकेका शब्दातून  भाषिकसौंदर्य सौष्ठव भरभरून दिसते आहे .
     मुळात गणेश हा गोरा देव . त्याचे बाबा शंकर कर्पूरगौर आणि आई तर गौरीच !
 गोरा गणेश कुमकुम-केशर-चंदनाची उटी लावतो ,
पिवळे झळझळीत रेशमी धोतर घालतो.
गळ्यात चमकदार मोती ,नव्हे नव्हे  मुक्ताफ़ळ म्हणजे टपोरे मोती यांची माळ घालतो.
डोक्यावर हिरेजडित मुकुट , पायात रुणुझुणु नाद करणारे घांगरिया  असलेले नुपूर म्हणजे पैंजण.
     सौंदर्यासह पंचेंद्रियांनी ज्ञान ग्रहण करावे याचा वास्तुपाठच या आरतीतून मिळतो .
डोळ्यांना मंगलमूर्ती ,जी मूळात सुंदर आहे आणि वर जिने बाह्यरूप सुद्धा उटी-माळ-पैंजणादींच्या सहायाने सुंदर केले आहे .
     आपल्या कानांना यातील नाद ऐकू यावेत. माळ झळकतेय, तिचा नाद , नुपूरांची रुणझूुण ,
जिवंत फणिवर म्हणजे फणा उगारलेला श्रेष्ठ  नाग , त्याची सळसळ , पितांबराची सुळसुळ  असे अनेक नाद-लय कानांनी ऐकावे .
चंदन , केशर इत्यादींनी आपले घ्राणेंद्रिय म्हणजे नाक तृप्त व्हावे .
मनात गणेश पुरून उरला कि बाकी मंगलमय होणारच.
असे सर्व जिवंत सौंदर्य आपल्या वाणीतून उच्चारावे. हीच खरी पंचज्ञानेंद्रियांनी केलेली वाक् सेवा आहे .

     ©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
     प्रोफ़ेसर्स कॉलोनी
     हनुमान नगर
     नागपूर.

Tuesday, August 15, 2017

# सहजोक्त.

#सहजोक्त

धार्मिक साहित्य.

भाषा म्हणजे संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन.
"पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" असे म्हणतात.
म्हणजे प्रत्येक जीव हा त्याच्या त्याच्या नुसार वेगळा असतो. मग भाषा जिने संवाद साधायचा ती सुद्धा प्रत्येकासाठी  वेगळी होते ना !

 वाङ्मय (वाक्+मय) म्हणजे वाणीचे साम्राज्य .
जे जे म्हणून शब्द ,संकेत,चिन्ह,ध्वनी व्यक्त केल्या जातात ते सर्व वाङ्मयच होय . यालाच साहित्य असेही म्हणतात . साहित्य हे मौखिक  वा लिखित असते . ललित चे लालित्य तसे सहित चे साहित्य .
कशाच्या सहित तर संस्कार-संस्क्रृति-परंपरा-रूढी इत्यादिं सह असलेले ते साहित्य मानवी बुद्धी जशी विविधांगी असते तशीच त्याची अभिव्यक्तीही विविधांगी असते . समाजाचा अारसा म्हणजे साहित्य . साहित्यात नऊ रस असतात . मानवी जीवनातही
हे नऊ रस असतातच . रस उत्तम प्रकारे आस्वादणारे ते रसिक. हे नऊ रसही माझ्या जीवनात असावे असे कोणीही इच्छित नाही. तरी वाङ्मयात मात्र नऊ रस असायलाच पाहिजे . या सर्व रसांमध्ये सामान्यांना साधारणत: आवडीचा रस म्हणजे श्रुंगार . श्रुंगार रसाचा मूळ भाव रती हा आहे , हाच रतिभाव
 भक्ती-वात्सल्य या ही रसात आढळतो . जेव्हा देवता ,गुरुजन , देश इत्यादी ज्येष्ठ ,उदात्त,अमूर्त संकल्पनांवर रतिभाव जडतो तेव्हा तेथे भक्तिरस निर्माण होतो . या  भक्तिरसाचे प्रकटीकरण धार्मिक वाङ्मयातून लीलया होत असते. "भाव तसा देव" असे म्हणतात ते खोटे नाही . देवते विषयी भाव-भक्ती मनात ठेऊन निर्माण केलेले मोठ्ठे समृद्ध असे वाङ्मय दालन मराठी भाषेला . श्रीमंत करीत आहे , यात शंकाच नाही.
या वाङ्मयाकडे केवल भक्तिरस युक्त , श्रद्धायुक्त साहित्य अशा संकुचित दृष्टिकोणातून न बघता मानवी भावभावनांचे समृद्ध -निरागस-लाघवयुक्त लालित्यपूर्ण रूप म्हणून पहावे .
विपुल शब्दसंग्रह ,अलंकार ,भाषाशैली ,भावरस इत्यादींचा अगाध खजिना या साहित्यात आहे . मुळात हे साहित्य प्रासादिक शैलीत असल्यमुळे मनाला निर्मळ करते . असे म्हणतात ,
न कळता पाय अग्नीवर पडे
न करी दाह असे कधी न घडे
अजीत नाम वदो भलत्या भीसे
सकल पाप भस्म करितसे ॥

एकूणच धार्मिक वाङ्मय केवळ धार्मिक परिप्रेक्ष्यातून न बघता ,बोलीभाषांची समृद्ध अभिव्यक्ती मराठीची
अलौकिक श्रीमंती या ही दृष्टीने  त्याकडे पहावे .
या सर्व साहित्यात एक लय-ठेका-सहजता-लावण्य-लालित्य असते. हळूहळू व्यक्तीची भाषिक समज यातून वृद्धींगत होते यात दुमत नाही.

धार्मिक साहित्य आपण म्हणतो त्यात अनेक
प्रकार -उपप्रकार  आहेत. जसे कथा , कहाण्या, अभंग , अोवी , दोहे , आरती , शेजारती ,भूपाळी ,
पाळणा,भारूड ,पत्र, धार्मिक लावणी , गौळण , विरहिणी , स्तोत्र , मंत्र ,आळवणी,
श्लोक , पद , कवन ,पोथी ,गोधळ , विडा, नैवेद्याची आळवणी , विविध भक्तिगीते , भावगीते इत्यादी इत्यादी अनेक प्रकार त्यात येऊ शकतात . हे वाङ्मयाचे प्रकार व त्यांची नावे यांच्या नामकरणात एक मोठी संकल्पना ,सार्थभाव असतो . हे सर्व प्रकार  रचण्याचे अतिशय काटेकोर भेद वा नियम असतात असे नाही पण कळत नकळत ते प्रकारभेद आता विशिष्ट नियमांनी बांधले गेले अाहेत.

शब्द हे गणेशाचे रूप अाहे, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात . शब्द ही शक्ती आहे , ती व्यर्थ घालवू नये ; असेच आपले धार्मिक वाङ्मय आपल्याला सुचवते . म्हणूनच म्हटले आहे ,"एकेक अोवी अनुभवावी "।
आजकाल तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यामुळे धार्मिक वाङ्मयाला मोठ्ठी "मार्केट व्हॅल्यू" पण लाभली आहे ,
हे ही विसरून चालणार नाहीय . आज बाजारात ना धार्मिक वाङ्मयाचे हजारो टंकित , मुद्रित , ध्वनिमुद्रित , दृक्श्राव्य मुद्रित असे अनेक प्रकार दिसून येतात. सोशलमिडिया हे सुद्धा मोठे व्यासपीठ आहे . साधी गणपतीची आरती म्हटली  तर उत्तमोत्तम
गायक-गायिका , वेदशास्त्रसंपन्न गुरुजन इत्यादींच्या अावाजात आज उपलब्ध  आहे .
या लेखमालेत मला आवडलेला  वाङ्मयप्रकार घेऊन त्याच्यातील मला भावलेले भाषिक भावभावनांची वैशिष्ट्ये वा स्पंद माझ्या आकलनानुसार टिपण्याचा प्रयत्न करणार आहे.ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे ना !
          राजहंसाचे चालणे ,भूतळी जालिया शहाणे
          आणिक काय कोणे चालावेची ना ?
  भाषेचा अनमोल वारसा माझ्या परीने उलगडून दाखवीत भाषेच्या या ज्ञानकुंडात ही लेखमाला   रूपी वागाहूती अर्पण करते आहे.
डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, August 12, 2017

#सहजोक्त.

#सहजोक्त  
आज तंत्रज्ञानक्रांतीमुळे जग जवळ आलय .
 हो खरय.कितीतरी अपरिचित या तंत्रस्नेहामुळे चिरपरिचित झालेत.
पूर्वी लेख/निबंध/कविता/इत्यादी लिहिले की नियतकालिकातात द्या, ते छापतील की परत पाठवतील वाट बघा.असा सगळा "धीर धरी" कार्यक्रम. आलं काही छापून की कोण आनंद !
आता सट्ट लिहा पट्ट पोस्टा.... सोशलच झालाय मिडिया.लई सोस त्याला जग जोडायचा,अभिव्यक्ती जपण्याचा...
आता सगळ्या जगालाच वेगाचे वेड लागलेय. गाड्या/वाहने/नेटस्पीड/वागणे /बोलणे/मैत्री करणे/तोडणे .........सगळं वेगात / आवेगात .
ज्याला त्याला शिखर/कळस गाठायची घाई.जो तो टोक/शिखर/कळस गाठायचीच वाट बघतो.
यशच हवे ,अपयश नकोच . अपयश पचवायची ताकद या वेगवान घोडदौडीत संपलीय.
जग जवळ आलं ते ही आभासी.ना त्यात प्राण-रस-रूप-गंध ,पंचज्ञानेंद्रिय निववणारे सामर्थ्य  ना समाधान.
"बोलाचीच (लिहायची)कढी न् बोलाचाच (लिहायचा) भात"!
लहान-मोठा ,स्त्री-पुरुष ,गरीब-श्रीमंत ,जवळ-दूर सारे भेद अभेद झाले,समता-समानता आली. छानच.
 वास्तवात प्रतंयेकाच्या मनात "स्वतंत्र विश्व" तयार झालय.व्यक्तिस्वातंत्र्याची व्याप्ती इतकी मोठी झाली की जगद्व्याळ.
चालायचेच .
पूर्वी वेळ होता ,पैसा नव्हता.हायफायसुख नव्हते. आज सार आहे पण वेळ नाहीय. आभास जास्त भावतो वास्तवाला भेदायची शक्तीच नाही.
कालाय तस्मै नम:!!
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.