Thursday, August 17, 2017

#सहजोक्त -३

लेखांक ३

देवीची आरती
आरत्यांचे सुद्धा वंदेमातरम ,जनगणमन सारखे असते पहा . एकट्याने म्हण म्हटले तर येत नाही , ही अोळ पुन्हा म्हण , सावकाश म्हण , लयीत बदल कर अशा सूचना केल्या कि पार सगळे विरून जायला होते.  कधी कधी या आरतीचे कडवे त्या आरतीत रिमिक्स होते तर कधी कधी तेच तेच पुन्हा पुन्हा म्हटले जाते . उच्चारण हा यर विवाद्य विषय . असो .
साधारणपणे  'दुर्गे दुर्घट भारी '  ही आरती 'सुखकर्ता दुखहर्ता'  या आरतीची जणु जोड-आरती समजून म्हटली जाते  . पण ही स्वतंत्र आरती असून नरहरी नावाच्या कवीने रचली आहे . संस्कृत काय किंवा मराठी काय प्राचीन  काळात  स्वत: बद्दल फारसं  सांगत नसत कविलोकं .
या लेखात देवीची ही आरती बघू .

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसरी =

या अोळीचा अर्थ असा की , "हे दुर्गे , तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट संसरवणे कठिणच आहे" .  इथे दोन शब्द विशेष  लक्षात घेण्यासारखे आहेत . त्यातील पहिला म्हणजे दुर्घट = दुर् +घट हा शब्द .
'घटना'  हा सामान्य परिचित शब्द याच घट पासून तयार झाला आहे.
घट , घाट , घटनावळ , घडविला , घडी , घटिका असे अनेक शब्द व्युत्पन्न होतात . दुर्घट म्हणजे घडण्यास कठिण , होण्यास  कठिण . दुर्  हा उपसर्ग थोडा नकारात्मकच असतो .
जसे - दुर्दैव , दुर्भाग्य , दुर्लभ , दुष्कर्म इत्यादी.
आता दुसरा शब्द संसरी , संसारी नाही.
संसर =सर् म्हणजे योग्य गतीने सरकत रहाणे .
 जो योग्य गतीने सरकत असतो संसार.
 तो पुढे पुढेच जातो , परत येत नाही . 'संसार' हे नाम आहे तर संसर हे क्रियापद आहे.
 " हे दुर्गे तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट पुढे सरकणे कठिणच आहे " असा एकूण अर्थ .

"अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी"=

हे अनाथांची नाथ असलेली आई . अंब ह्या संस्कृत शब्दाचा आई असा  अर्थ आहे.
या शब्दापासून  विविध भाषेत अम्मा , अम्मी  , अम्मा  , अंबा , आऊ , आई  असे शब्द दिसतात. नरहरी कवी म्हणतात ,  "आई अंबे , तू तुझी करूणा विस्तार , विस्तृत कर , वाढव. माझ्यावर कृपाकर .  जन्म-मरण यांचा फेरा हाच संसर. यापासून वारण कर  , वाचव .  इथे "वारी"  हा शब्द आहे .  निवारण करणे  , अनिवार असे शब्द आपण सामान्य भाषेत नेहमीच योजतो , त्यातील मूळ शब्द वृ (वर्)अडवणे या अर्थी आहे .  इथे आरतीत "वारी"  हे क्रियापद आहे .  तू अडव , तू निवारण कर हाच  अर्थ आहे.
आता पंढरपुरची वारी म्हणजे काय ?  तेथे हा शब्द क्रियापद म्हणून  नाही नक्की . तेथे परिक्रमा, यात्रा या अर्थाने आपण तो शब्द योजतो . " मूळात संसारापासून विरक्त , मुक्त करते ती यात्रा म्हणजे वारी "  असा अर्थ असेल ना ?
 तेथे वारी हे नाव आहे . असो.

"जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरवर दे तारक संजीवनी"=

त्या दुर्गेचा जयघोष  केला आहे.  महिषासुराची मथिनी म्हणजे जिने  मथन केले आहे म्हणजे अगदी घुसळून टाकले  , आजच्या भाषेत  "पार लोळवलेच".  सुरवर म्हणजे श्रेष्ठ देवता  ,  ईश्वर  म्हणजे शंकर या सर्वांना वर देणारी ,  
जी तारणारी , संजीवन देणारी आहे .  अशी ही अफाट कर्तृत्ववान महिला शक्ती.

"त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही"=

त्रिभुवनी-भुवनी या शब्दरचना केवळ अनुप्रासाकरिता नसावेत.  स्वर्ग-मृत्यू-पाताळ असे तीन भुवन आहेत  आणि आज वर्तमानात जे घडत आहे ते भुवन .  दुर्गा ही अनादी-अनंत अाहे . कवीला तिची अनुभूती आज या भुवनात ,वर्तमानात आली.  असे बघा,  "अनेक वर्ष आपण एखाद्या व्यक्तिमत्त्वाला पाहात असतो पण अवचित प्रसंगाने क्षणात वीज चमकावी तसे  आपल्याला व्यक्तिमत्त्वाची थोरवी कळते "  तसे काहीसे या वाक्यात आहे.   "तुझ्यासारखे दुसरे कोणी या त्रिभुवनात नाही",  अशी अनुभूती कवीला झाली आहे.

"चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडलो प्रवाही "=


चार आश्रम, चार युग असे जे काही  म्हणून चार असतील ते ते सर्व श्रमले,  तुझ्यापुढे अपुरे पडत आहेत ,  तोकडे पडत आहे , थकले बिचारे.
सहा वेदांग ,सहा शास्त्रं , सहा दर्शने आहेत.
 जे नेहमी एकमेकाचे खंडन-मंडन करीत असतात आणि त्यातून वाक्प्रवाहात पडतात .
 "वेद" म्हणजे ज्ञान परिपूर्ण-संपूर्ण झाले की बोलवत नाही मात्र विवाद आला की प्रवाहात पडणे आलेच, चिरंतन सत्य !

"ते तू भक्ता लागी पावसी लवलाही "=

ते म्हणजे तशी तू भक्तांसाठी लवकर ,क्षणाचाही विलंब न करता पाव, पावतेसच , हा विश्वास.

"प्रसन्न  वदने प्रसन्न होसी निजदासा "

निज , तुझा वैयक्तिक दास , निजदासावर तू प्रसन्न हो . हे  प्रसन्न वदना देवी ,  इथे "निजदासा" ही सप्तमी आहे.  'त ई आ' हे सप्तमीचे प्रत्यय . त्यातील "आ" हा प्रत्यय फार कमी ठिकाणी आढळतो .  तोच इथे आहे.
"क्लेशापासुनी सोडवी तोडी भवपाशा"
क्लेशांपासून सोडव आणि भवपाशांना तोड .
पाश तोडावेच लागतात. भव म्हणजेच संसार. भवपाशा इथे ही "आ" प्रत्यय आहे , पण सप्तमी नाही.

"अंबे तुज वाचोनि कोण पुरविल आशा "=

आईला लडिवाळ आळवणी कि ,'अग आई , प्लीज तुझ्याशिवाय  कोण ग करू शकेल ? तुझी नाही तर कोणाची खात्री देऊ सांग ना ?'

"नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा" =

नरहरी कवी ,स्वत:त थोडाही  न उरता तुझ्या पदरूपी कमळामध्ये तल्लीन (तत् +लीन) लीन म्हणजे एकरूप होणे . त्यात एकरूप, कशात ?
 तर त्या तत्वात !

ही आरती म्हणजे उत्कट भक्तीची कविता आहे.कवीच्या अलौकिक प्रतिभेने जनमानसावर गारूड घातले आहे . भक्ती महत्वाची , तितकीच शब्दभक्ती नि अर्थभक्ती  देखील !
देवीची अनेक नावे आहेत पण येथे "दुर्गा" म्हटले आहे .  दुर् + ग = दुर्ग . दुर्ग म्हणजे जाण्यास कठीण. म्हणून तर पर्वताला दुर्ग म्हणतात.
 सहज झपझप नाही जाता येत तेथे.
  तशी ही देवी "दुर्गा"आहे.  कोणीही कधीही पटवावी अशी ती 'आशुतोष' , 'सुलभा' नाही .
  म्हणून  तिला  ही आळवणी.
 
दुर्गा-क्षमा-शिवा-धात्री-स्वहा-स्वधा नमोSस्तुते ।

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment