Wednesday, March 28, 2018

#शब्दचिंतन.


काल लेखनात एक शब्द योजला "जिजीविषा"! अनेक सजग वाचकांनी विचारले की हा शब्द कोणता ? चुकीने चूक लिहिला कां ? विजिगीषा हवा कां? काही जणांनी गुगलडिक्शनरीच पाठवली. . . या सर्व वाचकांचे मनापासून आभार. कारण त्यांच्यामुळेच मी शब्दचिंतन करतेय.

शब्दांमागे काय व्याकरण-प्रक्रिया असते. तिला  सामान्य व्यवहारात बघायची गरज नाही.
जसे बिजापासून वृक्ष. वृक्षापासून पान-फुल-फळ आदि लाभतात तसे मूळ लक्षात घेतले की वाढलेला पसारा आपसुक समजतो.
भाषेचंही तसंच आहे. शब्दनिर्मितीची प्रक्रिया जाणली की भाषिक समज वाढून भाषा सुलभ होते.

दैनंदिन व्यवहारात आपण जिज्ञासा ,पिपासा ,मीमांसा इत्यादी शब्द सहज उपयोगात आणतो.
हे शब्द वेगवेगळे आहेत पण एकाच प्रक्रियेतून तयार होतात.ही प्रक्रिया जाणणे रंजक आहे.
व्याकरणात इच्छार्थके म्हणजे इंग्रजीत त्याच्या deservetives आणि संस्कृतात "सन्नन्तक" म्हणतात. धातूपासून तयार होणारी ही रूपे हे तीन प्रकारची असतात. (१)इच्छार्थक क्रियापद ,(२)इच्छार्थक विशेषण,(३)इच्छार्थक नाम
यापैकी मराठी भाषेत विशेषण व नाम प्रचलित आहेत.
त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी "करणे"या धातूची मदत घेऊ  (१) करण्याची इच्छा असणे ,(२)करण्याची इच्छा असलेला ,(३) करण्याची इच्छा.
पुढे मराठीत सहज उपयोगात येणारी इच्छार्थक विशेषणे व नाम रूपे दिली आहेत.
जिज्ञासु (जाणण्याची इच्छा असलेला)    ~जिज्ञासा (जाणण्याची इच्छा) ,
जिगीषु  (  जिंकण्याची इच्छा असलेला)   ~जिगीषा (जिंकण्याची इच्छा ) ,
विजिगीषु  (   विजयी होण्याची इच्छा असलेला)   ~विजिगीषा (विजयी होण्याची इच्छा ) ,
मुमुक्षु  (मुक्तीची इच्छा असलेला)     ~ मुमुक्षा (  मुक्तीची इच्छा) ,
जिजीविषु (जगण्याची इच्छा असलेला )  ~जिजीविषा (जगण्याची इच्छा),
पिपासु  (पिण्याची  इच्छा असलेला)  ~ पिपासा (पिण्याची इच्छा ),
बुभुक्षु (भुकेची इच्छा असलेला ) ~बुभुक्षा ( भुकेची   इच्छा असलेला ,
 तितिर्षु  (तरण्याची   इच्छा असलेला)   ~ तितीर्षा (तरण्याची इच्छा) ,
विवक्षु ( बोलण्याची इच्छा) ~विवक्षा( बाेलण्याची इच्छा) ,
शुश्रूषु (ऐकण्याची इच्छा) ~   शुश्रूषा (ऐकण्याची इच्छा)

"मला जाणून घ्यायची इच्छा आहे ", इतकं मोठं वाक्य म्हणण्यापेक्षा ,"मला जिज्ञासा आहे". हे सुटसुटीत होतं. "जाणण्यास इच्छुक असलेला मी" ऐवजी ,"जिज्ञासु मी."म्हणणे सरळ पडते.
अशाप्रकारे इच्छार्थक रूपांमुळे भाषा अधिक सुटसुटीत होते.  इच्छार्थक रूपे भाषेत प्रचलित करायला हरकत नसावी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, March 27, 2018

#सहजोक्त.


पंचतंत्र .भाग २
मागच्या भागात पंचतंत्राची थोडक्यात अोळख करून दिली होती. या भागात  त्यात थोडी भर घालू या."पंचतंत्र" हा सामासिक शब्द आहे. पांच तंत्रांचा समुदाय .द्विगू समास आहे हा. पंचतंत्रमध्ये एकूण ६૪ कथा आहे. पंचतंत्रात नीतिशास्त्राची तत्त्वे कथारूपाने सांगितली आहेत. ग्रंथाच्या स्वरूपाबद्दल स्वतः रचयिता विष्णुशर्मा म्हणतात.
"यन्नवे भाजने लग्नः संस्कारो नान्यथा भवेत् ।
कथाच्छलेन बालानां ,नीतिस्तदिह कथ्यते ॥"
अर्थ असा की - नव्या भांड्यावर पडलेला पोचा कायम रहातो ,जात नाही. ह्याच दाखल्यानुसार बालकांना कथेच्या माध्यमातून  राजनीति-व्यवहारनीति-युद्धनीती सांगण्यात आली आहे.
 आजकालचा ज्ञानरचनावाद माहित नसतानाही प्राचीन -भारतात सरस कथांमधून मोठमोठे शास्त्र उलगडून सांगत असत.याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रंथ होय.
या ग्रंथातातील कथा पांच भागात म्हणजे तंत्रात विभागल्या आहेत.  या भागांची नावं आणि त्यातील कथांची संख्या  याची माहिती अशी...
१) मित्रभेदः = यात दोन मित्रंमध्ये कसे भांडण झाले ? त्याचा लाभ कोणी घेतला? अशी कथा आहे. या कथेशिवाय इतरही कथा आहेत.

२)मित्रसंप्राप्तिः = यात मित्र असण्याचे फायदे व मित्र कसा लाभला अशी कथा व याशिवाय इतर कथाही आहेत.

३)काकोलुकीयम् = काक म्हणजे कावळा तर उलुक म्हणजे घुबड,उल्लू.  कावळा व घुबड यां पात्रावर आधारलेल्या कथा आहे.

૪) लब्धप्रणाशः = हाता तोंडाशी आलेलं नष्ट होणे. याही भागात प्राण्यांच्या रूपकातून मनोवैविध्याच्या कथा सांगितल्या आहेत.

५) अपरीक्षित  कारकम् = न पारखता पाऊल टाकले तर वाईट परिणामांना सामोरे जावे लागते.अशा आशयाच्या कथा मानवी उदाहरणांतून दिल्या आहेत.

या ग्रंथाची रचना अतिशय रोचक पद्धतीने केली आहे. कथा व त्या कथेतून दुसरी कथा . कथेच्या आशयाला गभीरपणा (खोली देणारा) श्लोक वा अनेक श्लोक त्या त्या प्रसंगी त्या त्या पात्राच्या तोंडी दिले आहेत.
पुढील भागात पाचवे तंत्र म्हणजे अपरीक्षित कारक याचा विचार करू.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎

Monday, March 26, 2018

#सहजोक्त.


फुलं जरा वेडीच असतात.नाजूक तर इतकी असतात की सहज म्लान होतात ,सुकतात .
त्यांचं जीवनही किती क्षणिक असते.
पण जग जिंकण्याचा त्यांचा स्वभाव अचंबित करतो. आपल्या सुगंध-वर्णादी गुणांनी ते अक्षरशः डोक्यावर बसतात. कोमल देहात किती कणखरता जोपासतात ? बाहेरच्या विपरित वातावरणाला  न जुमानता बहरतातच स्वतःच्या अंतःप्रेरणेने. .
त्यांचा दुर्दम्य सकारात्मकता तर परिसीमा आहे जिजीविषेची ! क्षणभंगूरता असूनही अधिराज्य गाजवतात जिवंत मनांवर !!
किती देऊन जातात ना फुलं विश्वाला !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.



खल्वाट चंड किरणे अतितप्त झाला.
छायार्थ ताडतरुमूल समीप गेला. ।
तत्काल थोर पडले फ़ळ तो निमाला.
 ये जेथ दैवहत होईल तेथ घाला.॥
 ‎
 ‎खल्वाट =डोक्यावर केसं नसलेला (टकलु)
 ‎चंड= प्रखर
 ‎अतितप्त= फार तापला
 ‎ताडतरुमूल= ताडाच्या झाडाच्या बुंध्याशी
 ‎समीप= जवळ
 ‎निमाला= मेला ,मृत झाला.
 ‎दैवहत = दुर्दैव ,कमनशीब
 ‎घाला येणे = मोठं संकट येणे.
 ‎अर्थ = कोणी एक टकलामनुष्य( वाटसरु) प्रखर उन्हाने अतिशय तापला. सावली मिळावी म्हणून ताडाच्या बुंध्याशी गेला. त्याच वेळी ताडाचे मोठेफ़ळ त्याच्या डोक्यावर पडले न् तो मेला.
 ‎जेथे दैवच खराब होते तेथे हमखास संकट येणारच !
 ‎हा श्लोक "अर्थांतरन्यास अलंकाराचे" उदाहरण आहे.शेवटच्या अोळीच्या स्पष्टीकरणासाठी वरचे उदाहरण दिले आहे .

मराठी पंडितकाव्य परंपरा अतिशय प्रगल्भ व सर्वंकष होती. मोरोपंर ,रघुनाथपंडित ,वामन पंडित आदी अनेक दिग्गजांनी संस्कृतग्रंथांना नुसते अनुवादून मराठीत आणले नाही; तर त्यामूळ संकल्पनेला स्वप्रतिभेने अत्युच्च्य पातळीवर नेऊन अजरामर केले.
वर दिलेला हा श्लोक मराठी तर खाली संस्कृत श्लोक देतेय.

खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणैः सन्तापितो मस्तके । गच्छन्देशमनातपं विधिवशात्तालस्य मूलं गतः।
तत्राप्यस्य महाफलेन पतता भग्नं सशब्दं शिरः।
प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रैव यान्त्यापदः।।

याच श्लोकाचा पाठभेद असा

खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणैः संतापितो मस्तके
वाञ्छन्देशमनातपं विधिवशाद् तालस्य मूलं गतः।
तत्राप्येकफलेन मूर्ध्नि पतता भग्नं सशब्दं शिरः
प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रापि यान्त्यापदः॥

भाषा विकास >भाषा-अंतर >टीका (अर्थविस्तारासह भावानुवाद) . सहज सुंदर साधलाय,दोन्ही भाषेला साजेसा.

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Sunday, March 25, 2018

#चित्रकविता.

 जे झालं ते होऊन गेलं, झालं.
बरं झालं असं कसं म्हणू ?
हातातून घसरलेली वाळू
अन् निघून गेलेले क्षण
यांना माझं तरी कसं म्हणू ?
भरलेला हात नि मनावर कोरलेल्या स्मृती
त्यां माझ्या नाहीत हे कसं मानू ?
काय मनात असेल देवाच्या ते तोच जाणे
पण नकोच ते सल ,ती तगमग नि लिप्तता.
आंतरबाह्य मुक्त कर जोखडातून एकदा ॥
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#शब्दचिंतन.


काही शब्द कानावर पडून इतके परिचित होतात की ते कसे तयार झाले असावेत ? याबद्दल विचारही येत नाहीत.
सकाळी एक शब्द कानी आला. मग त्या प्रकारचे कोणते बरं शब्द ? असं आठवत गेली अन् जंत्रीच झाली.
किंवा ,किंकर्तव्य ,किंचित ,अथवा ,किंतु ,परंतु ,
अद्वा-तद्वा , इतस्ततः  , कदाचित ,क्वचित, सर्वत्र अन्यत्र, इतःपर ,वानवा ,आदि ,इत्यादि ............

अजून शोधले तर अजून सापडू शकतात. जर तुम्हाला सापडले तर जरूर कळवा.

अाता या शब्दांचा विचार करू.
वा,अथवा ,किंवा  =  हे शब्द विकल्प दाखविण्यासाठी  योजतात.
किम् वा = किंवा .
अथ वा = अथवा.
किम् याचा अर्थ "काय"असा होतो .
अथ म्हणजे "अशा प्रकारे" . अजून एक अर्थ    "सुरुवात" असाही आहे.
"वा " हे विकल्पदर्शक अव्यय आहे.
हाच शब्द लागून वानवा ,अद्वा-तद्वा हेही शब्द तयार झाले.
अद्= हा/ही/हे
तद् = तो/ती/ते
अद्वा =हे किंवा
तद्वा= ते किंवा
अद्वा-तद्वा बोलणे म्हणजे वाटेल तसं ,काहीबाही बोलणं
वा -न-वा म्हणजे "वा"चा अर्थ वर दिलाच आहे. "न"चा अर्थ "नाही" असा होतो.
वानवा असणे म्हणजे उपलब्धतेची कमतरता असणे.
तु= हे पण अव्यय आहे. "तर" हा त्याचा अर्थ.
परम् +तु =परंतु . "परम" असा शब्द असेल तर परिपूर्ण ,पुरेपुर असा अर्थ होतो. परमवैभव ,परमार्थ,परमोच्च आदि शब्दांत तोच आहे.
"परम्" चा अर्थ " सगळ आहे पण...." यात जो पण आहे ना ! तोच आहे.
किंतु = किम् (काय) +तु = किंतु. 
कदाचित = कदा+ चित् . कदा म्हणजे केव्हा. चित् हे इथे अव्यय आहे.
तसा चित् चा दुसरा अर्थ आत्मा ,चैतन्य ,बुद्धी असाही होतो. चिदानंद ,सच्चिदानंद ,चिद्विलास आदी शब्दात तोच अर्थ आहे.
मात्र तेथे अव्यय आहे नि त्याचा अर्थ अनिश्चितता दर्शक असा आहे. कदाचित् म्हणजे शब्दशः "केव्हातरी" असा अर्थ होतो.
क्वचित् = क्व म्हणजे "कुठे ,कुठून " असा अर्थ आहे . क्वचित् म्हणजे कुठून तरी ,कुठेतरी .
सर्वत्र = सर्व म्हणजे सगळे.  सर्वत्र म्हणजे सगळीकडे.
अन्यत्र= अन्य म्हणजे दुसरे. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे.
पुत्र,नेत्र,पवित्र ,गात्र (याप्रकारचे शब्द एका भागात चिंतले आहेत )यातील त्र व वरचा त्र समान नाही.
इतःपर = इतःपरम् .मराठीत "याउप्पर" असा अर्थ . इतः म्हणजे इथपासून .
आदि = सुरवात. आदि च्या विरुद्ध अन्त . साद्यान्त म्हणजे सुरवातीपासून शेवटापर्यंत. आदि म्हणजे आरंभ. आदिकारण म्हणजे मूळकारण. 
इत्यादी = इति + आदि =  इति म्हणजे "असे" किंवा शेवट . इत्यादि हा शब्द आपण यादीच्या शेवटी लिहितो. म्हणजे  यादीतील शेवटचा शब्द हा इति ठरतो न् त्यासारखे इतर यासाठी तोच आरंभ ठरतो.
हेच इत्यादी म्हणजे "याचप्रमाणे इतर".

 शब्द तयार होणं ही एक प्रक्रिया आहे तर त्याचा प्रचलित भाषेत रूढ अर्थ ही पण एक प्रक्रिया आहे. बरेचदा मूळ शब्दांचे अर्थ ,जोडशब्दांचे मूळ अर्थ व भाषेतील रूढार्थ यांच्यात तार्किक संगती दिसून येत नाही. कदाचित् कालौघात मधल्या कड्या गहाळ झाल्या असाव्यात.  त्या कड्यांचा शोध घेणे किंवा आहे ते स्वीकारणे हेच हाती उरतं . असो.
 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Friday, March 16, 2018

#शब्दचिंतन

#शब्दचिंतन.

" तारतम्य" हा शब्द कानी आला नि विचारचक्र सुरु झाले. बोलताना सहज उपयोगात आणतात हा शब्द. तारतम्य म्हणजे पोच ,विवेक ,वागण्यातील समज ,प्रगल्भता  अशा अनेक अर्थच्छटा त्यातून अपेक्षिल्या जातात.
मुळात हा तद्धित प्रकारातील भाववाचक शब्द आहे. 'तर-तम' या दोन प्रत्यय़ांपासून तो तयार झालाय.  तुलना करताना जो प्रत्यय योजतातात तो "तर" प्रत्यय.
उदाहरणार्थ उत्तर ,अधिकतर ,उच्चतर,लघुतर ,महत्तर ,प्रियतर हे मुळातील तत्सम शब्द तर पुढे मराठीकरणात तयार झालेले बद्तर ,बेहत्तर इत्यादी.
सर्वोच्चता दाखवणारा "तम" हा प्रत्यय आहे. उदाहरणार्थ उत्तम,सर्वोत्तम ,महत्तम ,लघुत्तम , प्रियतम,दीर्घतम इत्यादी .
याच दोन प्रत्ययांचे समानार्थी दोन प्रत्यय आहेत ;
तर =इयस्   नि तम=इष्ठ
दोन्हीची उदाहरणार्थ श्रेष्ठ ,ज्येष्ठ ,कनिष्ठ ,गरिष्ठ ,
श्रेयस् ,प्रेयस् कनियस्
मराठीकरण झालेले स्वादिष्ट ,चविष्ट ,गप्पिष्ट ,कोपिष्ट  इथे मुळातील प्रत्ययातही मराठीकरण केलेय.
तर हे दोन प्रत्यय "तर-तम" इंग्रजीतील " ER-EST" ( comparative & superlative degree)  आहेत.
"याहून अधिक चांगले नि सर्वात चांगले" हे कळून वागण्याची पात्रता म्हणजे तारतम्य .कोणत्याही परिस्थितींत स्वार्थापुरता नाही तर सर्वबाजूने अधिक चांगले काय? सर्वोत्तम काय?  हे कळण्याची लायकी विकसित करणे म्हणजेच तारतम्य !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपुर.

Tuesday, March 13, 2018

#सहजोक्त



# अभंग...
अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी क्लासेस घ्यायची ,नोकरी नव्हती.एका विद्यार्थीनीने त्यांच्या घरी जी उपासना चालायची त्यातील एक अभंग मला कॅसेटद्वारे ऐकवला.त्या अभंगाने मला इतके खोलवर भारवून टाकले की आजही ते सूर ,तो अर्थ मला आतून शांत करतो. गणेशपुरी आश्रमाच्या स्वामी चिद्विलासानंदा यांच्या इंग्रजीवळणाच्या उच्चारातून गायलेला तो अभंग. मी तसाच पाठ केला .फार प्रयत्न न करता तो सहज आत्मसात झाला. संत तुकारामांचा फक्त आठ अोळींचा तो अभंग. जेव्हाही मनावर मळभ येतात ,तेव्हा सहज मनातून आळवल्या जातो.
माझी आजी मला तो नेहमी गायला सांगायची.तिच्या मते त्या गायनात अतिशय आर्तता आहे.आजीची माया दुसरे  काय?
तो अभंग असा...
देव माझा मी देवाचा
हीच माझी सत्य वाचा ॥
देह देवाचे देऊळ
आत बाहेर निर्मळ ॥१॥
देव पाहाया मी गेलो
तेथे देवच होऊन गेलो ॥२॥
तुका म्हणे धन्य झालो
माझे विठ्ठल भेटलो ॥३॥
शब्द साधे. अर्थ सोपा .चाल बाहेरून आत नेणारी. आशय आचरायला फ़ारच कठीण.
पण जेव्हाही "देव माझा "  नि "मी देवाचा" हे मनातून  समजते तेव्हा खुप मोकळं ,आनंदी वाटते.
बरेचदा शब्दार्थ कळतात. पण जितके जितके त्या शब्दांचे सखोल चिंतन करावे तितके नवे नवे काही अनुभूतीला येते की जे व्यक्त करायला शब्द तोकडे पडतात. व्यक्तिमर्यादा.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, March 12, 2018

#सहजोक्त..



खूप दिवसात डोक्यातील विचार कागदावर नेमके उतरत नव्हते. सारखं काय काय बॅकलॉग कामं पूर्ण करणं सुरू होतं . कॉलेज ते घर न् घर ते कॉलेज इतकं गुंतून गेलेली की लिहायचेही जमत नव्हते. अर्थात खंत नव्हती पण थोडं चुकचुकल्या सारखं वाटत होतं .
असंच एक दिवस कॉलेजला निघाली . नेहमीचा अतिवर्दळीचा रस्ता. कारमध्ये एफेम बँडचा रेडिअो सुरु. एक गाणं कानावर पडलं . अन् विचारचक्र गरगरू लागले. शेवटी त्यावर लिहूच ,असं ठरवलं.

हे अगदी खरय की भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीने तिच्या आरंभापासून ते आता पर्यंत सगळ्याच भारतीयांवर प्रभाव ठेवलाय.
हिंदी चित्रपट कथा असो वा गीत ; त्याचे मूल्यमापन कोणी कसे करावे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य . पण हे साहित्य नक्कीच दखलपात्र आहे यात शंका नाही.
समाजाने पटकथांना खाद्य पुरविले हे जितके खरे तितकेच हे ही खरे अाहे की सिनमाने जनमानसाला दिशा (काही बाबतीत दशा) दाखविली. समाज~सिनेमा हे अन्योन्य नाते आहे यात दुमत नाही.
तसं बघितले तर साहित्य हे समाजाचा आरसा असते. जे समाजात तेच साहित्यात प्रतिबिंबित होते.  तीच बाब सिनेसाहित्यालाही लागू होते.
पूर्वीच्या काळातील सिनेसाहित्यातील प्रतिमाने आता पारच बदललेली आढळतात.
चूक-बरोबर,योग्य-अयोग्य ,नैतिक-अनैतिक अशा चाचण्या न लावता तटस्थ पहाणी केली तरी "जमाना बदल गया है!" हे अगदी कबूल करावेच लागेल.
त्या दिवशी कानावर पडलेलं गाण्याचे बोल असे  होते  ....

तू बन जा गली बनारस की
मैं शाम तलक भटकू तुझमें ॥धृ॥
तेरी बातें चटपट चाट सी हैं
तेरी आँखें गंगा घाट सी हैं
मैं घाट किनारे सो जाऊं..
फिर सुबह सुबह जागूं तुझमें
॥१॥
तीन कडव्यांचं हे गाणं !
प्रेयसीचे सानिध्य हवे ,तिचे मोहक सौंदर्य ,तिच्या रमणीय हालचाली यांचे वर्णन पूर्वापार सिनेगीतांचा उपजीव्य विषय आहे. त्यासाठी कविकल्पित ते वास्तविक अशी अनेक प्रतिमाने आजवर योजलेली ऐकली.
या दशकातील एका गाण्याचे बोल सहज आठवले "टेलिफोनधुन में हसनेवाली. . ." ! तेही गाणं पहिल्यांदा ऐकल्यावर मी कल्पना करून पाहिली की "एखादी रमणी टेलीफोनच्या रिंगसारखी हासली तर किती हास्यास्पद वाटेल ?"
तेच भाव वरील गाणं ऐकल्यावर मनात आले.
अशोक कुमार यांच्या तरूणपणीचे गाणे होते ," मै बन की चिडिया बन के बन बन बोलू रे. "!
प्रियकर-प्रेयसीला एकमेकांच्या सहवासात कोणत्याही निमित्त्याने रहावेसे वाटते ;हेच या गीतातून सुचवायचे होते. आजच्या काळात ते वरच्या गीतातून सुचवले आहे अन् आजच्या काळातील तरुणाई सारखेच शब्द गाण्यात आले की ,तू बन जा गली बनारस की
मैं शाम तलक भटकू तुझमें "
भावना त्याच ! पण प्रतिमानं बदललीत.
पूर्वी प्रेयसी म्हणजे अमृत ,माधुर्याची मूर्ती असं वर्णन असायचे तर नंतरच्या काळात ,"समुंदर में नहाँ के अौर भी नमकिन हो गयी हो ।" इतका चवीचा फरक पडला ! मग काय पुढची चव "चटपटा" होणे नैसर्गिकच की !  प्रेयसीचे बोलणे मधुर नव्हे तर "तेरी बातें चटपट चाट सी हैं " असं झालं !
प्रेमात पडल्यावर सतत एकमेकांच्या गुडबुकात रहाण्याची खटपट पूर्वीपासूनच होती . तेव्हा ," जो तुमको है पसंद वही बात करेंगे ,तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे "इतकं  "त्वमेव शरणं मम " होतं . तर या गाण्यात "तेरा दिल बहलाऊं डांस करूँ मैं यूँही तुझे रोमांस करूँ " असं व्यक्त होतोय.
एकूण काय ? मानवी भावना आदिम काळापासून  त्याच ,तशाच आहेत. फरक पडला तो व्यक्त होण्याच्या रितीचा ,शब्दांचा व त-हेचा ,इतकंच !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, March 8, 2018

#सहजोक्त




अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः।

 अंगुष्ठोदकमात्रेण  शफरी *फर्फरायते*।।

राजा विक्रमादित्य एकदा *सर्वस्वदक्षिणयज्ञ* करू इच्छितो.सर्व तयारी करवतो.सगळ्यांना निमंत्रण देतो.समुद्राला निमंत्रण देण्यास एका दूताला पाठवतो. तोही जातो ,रितीने निमंत्रण देतो. समुद्र त्याला चार रत्न देतो व म्हणतो ,"माझ्यावतीने राजाला दे ".
 दूत परततो.तोवर यज्ञ समाप्त होऊन सगळी संपत्ती दान केलेली असते राजाने.दूत राजाला ते चार रत्न देतो नि प्रत्येकाचे वैशिष्ट्य सांगतो
,(१) जे म्हणाल ते सुग्रास जेवण देते
.(२) चतुरंग सेना देते.
(३)पैसा देते .
(૪) दागदागिने देते.
दूताला राजा म्हणतो,
" तू नव्हतास ,यज्ञदक्षिणाकाळ संपला .या रत्नांपैकी जे घ्यायचे ते तू घे ".
दूत म्हणतो ,
"घरी जाऊन घरच्यांना विचारून सांगतो."
राजा होकार देतो.दूत घरी जातो . पत्नी-मुलगा-सून सगळ्यांना हकिकत सांगतो. प्रत्येकजण वेगवेगळे रत्न इच्छितो. एकवाक्यता उरत नाही. दूत दुसरे दिवशी राजाला इत्थंभूत सांगतो.
राजा त्याला चारही  रत्न देऊन टाकतो.

महानता कशात असते ?
खरे अौदार्य कोणाते?
निस्पृहता कोणती?
सहज श्रेष्ठत्व कोणाते असते ?

सर्वस्व देऊनही *देण्याची* क्षमता असलेला राजा विक्रमादित्य .आपल्याला आलेली चारही रत्ने सहज ,मनात किल्मिष न आणता देऊन टाकतो.
कारण

"क्रियासिद्धि: सत्वे भवति महतां नोपकरणे"!

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.