खूप दिवसात डोक्यातील विचार कागदावर नेमके उतरत नव्हते. सारखं काय काय बॅकलॉग कामं पूर्ण करणं सुरू होतं . कॉलेज ते घर न् घर ते कॉलेज इतकं गुंतून गेलेली की लिहायचेही जमत नव्हते. अर्थात खंत नव्हती पण थोडं चुकचुकल्या सारखं वाटत होतं .
असंच एक दिवस कॉलेजला निघाली . नेहमीचा अतिवर्दळीचा रस्ता. कारमध्ये एफेम बँडचा रेडिअो सुरु. एक गाणं कानावर पडलं . अन् विचारचक्र गरगरू लागले. शेवटी त्यावर लिहूच ,असं ठरवलं.
हे अगदी खरय की भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीने तिच्या आरंभापासून ते आता पर्यंत सगळ्याच भारतीयांवर प्रभाव ठेवलाय.
हिंदी चित्रपट कथा असो वा गीत ; त्याचे मूल्यमापन कोणी कसे करावे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य . पण हे साहित्य नक्कीच दखलपात्र आहे यात शंका नाही.
समाजाने पटकथांना खाद्य पुरविले हे जितके खरे तितकेच हे ही खरे अाहे की सिनमाने जनमानसाला दिशा (काही बाबतीत दशा) दाखविली. समाज~सिनेमा हे अन्योन्य नाते आहे यात दुमत नाही.
तसं बघितले तर साहित्य हे समाजाचा आरसा असते. जे समाजात तेच साहित्यात प्रतिबिंबित होते. तीच बाब सिनेसाहित्यालाही लागू होते.
पूर्वीच्या काळातील सिनेसाहित्यातील प्रतिमाने आता पारच बदललेली आढळतात.
चूक-बरोबर,योग्य-अयोग्य ,नैतिक-अनैतिक अशा चाचण्या न लावता तटस्थ पहाणी केली तरी "जमाना बदल गया है!" हे अगदी कबूल करावेच लागेल.
त्या दिवशी कानावर पडलेलं गाण्याचे बोल असे होते ....
तू बन जा गली बनारस की
मैं शाम तलक भटकू तुझमें ॥धृ॥
तेरी बातें चटपट चाट सी हैं
तेरी आँखें गंगा घाट सी हैं
मैं घाट किनारे सो जाऊं..
फिर सुबह सुबह जागूं तुझमें
॥१॥
तीन कडव्यांचं हे गाणं !
प्रेयसीचे सानिध्य हवे ,तिचे मोहक सौंदर्य ,तिच्या रमणीय हालचाली यांचे वर्णन पूर्वापार सिनेगीतांचा उपजीव्य विषय आहे. त्यासाठी कविकल्पित ते वास्तविक अशी अनेक प्रतिमाने आजवर योजलेली ऐकली.
या दशकातील एका गाण्याचे बोल सहज आठवले "टेलिफोनधुन में हसनेवाली. . ." ! तेही गाणं पहिल्यांदा ऐकल्यावर मी कल्पना करून पाहिली की "एखादी रमणी टेलीफोनच्या रिंगसारखी हासली तर किती हास्यास्पद वाटेल ?"
तेच भाव वरील गाणं ऐकल्यावर मनात आले.
अशोक कुमार यांच्या तरूणपणीचे गाणे होते ," मै बन की चिडिया बन के बन बन बोलू रे. "!
प्रियकर-प्रेयसीला एकमेकांच्या सहवासात कोणत्याही निमित्त्याने रहावेसे वाटते ;हेच या गीतातून सुचवायचे होते. आजच्या काळात ते वरच्या गीतातून सुचवले आहे अन् आजच्या काळातील तरुणाई सारखेच शब्द गाण्यात आले की ,तू बन जा गली बनारस की
मैं शाम तलक भटकू तुझमें "
भावना त्याच ! पण प्रतिमानं बदललीत.
पूर्वी प्रेयसी म्हणजे अमृत ,माधुर्याची मूर्ती असं वर्णन असायचे तर नंतरच्या काळात ,"समुंदर में नहाँ के अौर भी नमकिन हो गयी हो ।" इतका चवीचा फरक पडला ! मग काय पुढची चव "चटपटा" होणे नैसर्गिकच की ! प्रेयसीचे बोलणे मधुर नव्हे तर "तेरी बातें चटपट चाट सी हैं " असं झालं !
प्रेमात पडल्यावर सतत एकमेकांच्या गुडबुकात रहाण्याची खटपट पूर्वीपासूनच होती . तेव्हा ," जो तुमको है पसंद वही बात करेंगे ,तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे "इतकं "त्वमेव शरणं मम " होतं . तर या गाण्यात "तेरा दिल बहलाऊं डांस करूँ मैं यूँही तुझे रोमांस करूँ " असं व्यक्त होतोय.
एकूण काय ? मानवी भावना आदिम काळापासून त्याच ,तशाच आहेत. फरक पडला तो व्यक्त होण्याच्या रितीचा ,शब्दांचा व त-हेचा ,इतकंच !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment