Sunday, March 25, 2018

#शब्दचिंतन.


काही शब्द कानावर पडून इतके परिचित होतात की ते कसे तयार झाले असावेत ? याबद्दल विचारही येत नाहीत.
सकाळी एक शब्द कानी आला. मग त्या प्रकारचे कोणते बरं शब्द ? असं आठवत गेली अन् जंत्रीच झाली.
किंवा ,किंकर्तव्य ,किंचित ,अथवा ,किंतु ,परंतु ,
अद्वा-तद्वा , इतस्ततः  , कदाचित ,क्वचित, सर्वत्र अन्यत्र, इतःपर ,वानवा ,आदि ,इत्यादि ............

अजून शोधले तर अजून सापडू शकतात. जर तुम्हाला सापडले तर जरूर कळवा.

अाता या शब्दांचा विचार करू.
वा,अथवा ,किंवा  =  हे शब्द विकल्प दाखविण्यासाठी  योजतात.
किम् वा = किंवा .
अथ वा = अथवा.
किम् याचा अर्थ "काय"असा होतो .
अथ म्हणजे "अशा प्रकारे" . अजून एक अर्थ    "सुरुवात" असाही आहे.
"वा " हे विकल्पदर्शक अव्यय आहे.
हाच शब्द लागून वानवा ,अद्वा-तद्वा हेही शब्द तयार झाले.
अद्= हा/ही/हे
तद् = तो/ती/ते
अद्वा =हे किंवा
तद्वा= ते किंवा
अद्वा-तद्वा बोलणे म्हणजे वाटेल तसं ,काहीबाही बोलणं
वा -न-वा म्हणजे "वा"चा अर्थ वर दिलाच आहे. "न"चा अर्थ "नाही" असा होतो.
वानवा असणे म्हणजे उपलब्धतेची कमतरता असणे.
तु= हे पण अव्यय आहे. "तर" हा त्याचा अर्थ.
परम् +तु =परंतु . "परम" असा शब्द असेल तर परिपूर्ण ,पुरेपुर असा अर्थ होतो. परमवैभव ,परमार्थ,परमोच्च आदि शब्दांत तोच आहे.
"परम्" चा अर्थ " सगळ आहे पण...." यात जो पण आहे ना ! तोच आहे.
किंतु = किम् (काय) +तु = किंतु. 
कदाचित = कदा+ चित् . कदा म्हणजे केव्हा. चित् हे इथे अव्यय आहे.
तसा चित् चा दुसरा अर्थ आत्मा ,चैतन्य ,बुद्धी असाही होतो. चिदानंद ,सच्चिदानंद ,चिद्विलास आदी शब्दात तोच अर्थ आहे.
मात्र तेथे अव्यय आहे नि त्याचा अर्थ अनिश्चितता दर्शक असा आहे. कदाचित् म्हणजे शब्दशः "केव्हातरी" असा अर्थ होतो.
क्वचित् = क्व म्हणजे "कुठे ,कुठून " असा अर्थ आहे . क्वचित् म्हणजे कुठून तरी ,कुठेतरी .
सर्वत्र = सर्व म्हणजे सगळे.  सर्वत्र म्हणजे सगळीकडे.
अन्यत्र= अन्य म्हणजे दुसरे. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे.
पुत्र,नेत्र,पवित्र ,गात्र (याप्रकारचे शब्द एका भागात चिंतले आहेत )यातील त्र व वरचा त्र समान नाही.
इतःपर = इतःपरम् .मराठीत "याउप्पर" असा अर्थ . इतः म्हणजे इथपासून .
आदि = सुरवात. आदि च्या विरुद्ध अन्त . साद्यान्त म्हणजे सुरवातीपासून शेवटापर्यंत. आदि म्हणजे आरंभ. आदिकारण म्हणजे मूळकारण. 
इत्यादी = इति + आदि =  इति म्हणजे "असे" किंवा शेवट . इत्यादि हा शब्द आपण यादीच्या शेवटी लिहितो. म्हणजे  यादीतील शेवटचा शब्द हा इति ठरतो न् त्यासारखे इतर यासाठी तोच आरंभ ठरतो.
हेच इत्यादी म्हणजे "याचप्रमाणे इतर".

 शब्द तयार होणं ही एक प्रक्रिया आहे तर त्याचा प्रचलित भाषेत रूढ अर्थ ही पण एक प्रक्रिया आहे. बरेचदा मूळ शब्दांचे अर्थ ,जोडशब्दांचे मूळ अर्थ व भाषेतील रूढार्थ यांच्यात तार्किक संगती दिसून येत नाही. कदाचित् कालौघात मधल्या कड्या गहाळ झाल्या असाव्यात.  त्या कड्यांचा शोध घेणे किंवा आहे ते स्वीकारणे हेच हाती उरतं . असो.
 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

No comments:

Post a Comment