Sunday, April 29, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
आज बुद्धपोर्णिमा. सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्रप्त झाली ती वैशाख पोर्णिमेला. म्हणून तिला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते.
बुद्धाची शिकवण ज्यात संग्रहीत केली आहे ते त्रिपिटक होय त्रिपिटक . त्रिपिटकाची भाषा रसाळ असून त्यात वास्तवाचा गंध आहे.मला त्रिपिटकाचे सुत्तपिटक  जास्त भावते. धम्मपद माझा आवडता ग्रंथ.
बुद्धाच्या जीवनात अनेक पाडाव आले. त्या त्यावेळी ते कसे वागले हे चिंतनीय व अनुकरणीय आहे. बुद्धाच्या अनेक जीवनकथा मला आवडतात. त्यातील एक येथे सांगते.

सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले तेव्हा त्यांनी पंचवर्गीय भिख्खूंना प्रथम बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तेच पहिले धम्मचक्कपवत्तन होय.  त्यांचा प्रभाव महान होता. मग जगाला उपकारक असा हा धर्म वाढविण्यासाठी भगवान फिरू लागले.
एके ठिकाणी दोन काश्यप भाऊ नदीच्या वरच्या व खालच्या भागात  आश्रम करून रहात होते. एकाचे ३०० शिष्य होते तर दुस-याचे २००. भगवान ३०० शिष्य असलेल्या भावाकडे गेले. त्याला भगवन्तांचा महिमा माहीत होता. पण त्याला ते उघड मान्य करायचे नव्हते.आपल्या शिष्यांना भगवन्तांच्या प्रभावात येऊ द्यायचे नव्हते. आलेल्या अतिथींचा सत्कार करणे तर कर्तव्यच होते. मग या काश्यपाने भगवंतांना  रात्री अशा ठिकाणी झोपायला  पाठवले जेथे महाभयंकर सर्पराज येत असे व झोपलेल्या व्यक्तीला मारून टाकत असे.
काश्यपाला वाटले की परस्परच गौतमाचा डाव संपेल . त्याचे विचार जाणून भगवान मनात हसतात. रात्री त्यांच्या प्रभावाने सर्पराज शरण येऊन नमन करून कायमचा ते स्थान सोडून गेला. तीन दिवस तेथे राहूनही भगवंतांना काहीही झाले नाही हे पाहून तो मनात चरकला . विचार करू लागला ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ". याचे मनातील भाव जाणून भगवान फक्त हसले.  मग भगवान ध्यान करण्यासाठी नदीवरून चालत जाऊन शिळेवर जात असत. हाही चमत्कार पाहून काश्यप मनात म्हणतो ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ".भगवान पुन्हा मूक हसतात.
अशा प्रकारे भगवान त्याला अजून चमत्कार दाखवतात पण तो मनातून भगवंतांना थोर मानतच नाही.
शेवटी भगवान मनात ठरवतात की "मूर्खाला त्याच्या मूर्खपणाची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे." मग  त्याच्या सर्व शिष्यांसमोर त्याची कान-उघाडणी करतात.  मग तो काश्यप त्याच्या ३०० शिष्यांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करतो.

ही कथा मला आवडते कारण आहिंसावादी भगवान बुद्धसुद्धा काश्यपाला स्पष्ट  सुनवतात .
कधी कधी समोरच्याला त्याची पायरी  वेळीच जाणवून द्यावी . पुढील अनर्थ त्यातून टळतात.
आजच्या दिखावू जगात ही शिकवणूक फारच उपयुक्त आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#सहजोक्त.

#सहजोक्त.
झाडाख्यान..३.

आजी (पितामही) लहानपणी एक गोष्ट सांगायची.
फार फार पूर्वी एक राजा होता. तो सगळ्या प्रजेसाठी अतिशय आदराचे व जिव्हाळ्याचे स्थान होता. त्याचा एक शाही हज्जाम म्हणजे राज-नाभिक म्हणजे राजाचा न्हावी होता.  दर आठ दिवसांनी तो न्हावी राजाकडे येई आणि अगदी एकांतात त्या राजाचे केशकर्तन-दाढी-मिशी आदी कार्य करीत असे.
पुढे तो न्हावी मरण पावला. वंशपरंपरे नुसार त्याचा मुलगा ,घनु वडिलांचे काम सांभाळायला आला. राजाने त्याला एकांतात बोलावले. राजाने जसा फेटा काढला तस्सा घनु भीतीने अोरडला कारण राजाला दोन शिंग होते.इतके दिवस हे गुपित राजा व घनुचे बाबा यांच्यातच होते. आता ते घनुला
कळले  होते. राजाने त्याला धमकी दिली की ,'जर गुपित उघड झाले तर  मृत्यूची शिक्षा देईल'.
घनु आधीच बोलघेवडा . सगळ्या गोष्टी भडभड सा-यांना सांगणारा. आता त्याला हे गुपित पोटात ठेवणे भाग पडले. पण या दबावामुळे तो झुरू लागला. हळुहळू तो सुकू लागला. त्याचे आप्तगण काळजीत पडले. पण घनू कोणाच काही सांगे ना . शेवटी उन्हाळेपावसाळे पाहिलेला एक ज्येष्ठ आप्त म्हणाला "गड्या  ,तुझ्या मनात काहीतरी सल आहे,जो तू उघड करू शकत नाहीस. त्याचमुळे तुझी प्रकृती खालावली. असे कर ,एखाद्या जंगलात जा नि तुझी खंत एखाद्या झाडाला सांग.मग तू मोकळा होशील." घनुला ते पटले. तो गेला . एका झाडाला सांगितले. परतला. ताण उतरलेला घनु पूर्वीसारखा पुन्हा हसरा व बोलका झाला. सगळे आप्तेष्ट आनंदले.
इकडे ते झाड झुरु लागले. हळुहळू ते वाळून गेले. एकदा त्या जंगलातून बजय्ये (वाद्य निर्मिती करणारे) कलाकार जात होते. त्यांना जंगलात सरळसोट पण पार वाळलेेले झाड दिसले. त्यांनी ते नीट कापले. त्यातून त्यांनी ढोलकी-पेटी-सारंगी बनवली. मग त्यांनी वाजवून पाहिली .पेटी वर काहीही  वाजवलं की सुरावट यायची ,राजा को दो सिंग फुटे।" सारंगी वाजवली की आवाज यायचा ,"किन्ने बताया ,किन्ने बताया"। ढोलकीवर थाप पडली की बोल उमटायचे,"घनुनाईने बताया, घनुनाईने बताया."। सगळे कलाकार आश्चर्यचकित झाले.त्यांना कळेच ना ,हे असे कां झाले? आजवर इतकेदा वाद्य बनवून विकले पण असे कधीच अनुभवले नव्हते त्यांनी. ही अजब वाजणारी वाद्य घेऊन ती गावोगाव ,शहरशहर फिरू लागले. लोकांना ती विचित्र वाद्य वाजवून दाखवू लागले. फिरत फिरत त्या राजाच्या राजधानीत आले. वाद्यांतून येणारा स्पष्ट आवाज एकून राजाचे बिंग फुटले. आता ही गोष्ट सा-यांच्या तोंडी झाली. शेवटी राजाने घनुला बोलावले. घनुने हकिकत सांगितली.
आता राजा काहीही करू शकत नव्हता कारण यात घनुचा दोषच नव्हता. .
झाडाला जीव असतो हे तर सिद्धच झालय विज्ञानाने . झाडाला भावना असतात कां?
झाडांना सुख-दुःख ,आपुलकी ,एकाकीपणा असतो कां?
मौखिकवाङ्मयात झाडांच्या मानवी भावनांविषयी कथा आहेत पण प्रमाणसाहित्यात असेच मानतात कां? झाडांना भावना असतात ही कल्पना आहे कां वास्तव ?
"तृण-कोटरात चिमण्यांची शाळा घेऊन निजला अौदुंबर" अशी उदाहरणे काव्यात चेतनगुणोक्ती अलंकाराची मानतात. म्हणजे मानवी भावना झाडांमध्ये नसतात कां?
सकाळी फिरताना एकमेकाला सावरून धरल्या सारखे झाड नजरेला पडले अन् विचार अाले तेच वर मांडले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.

 #सहजोक्त.
झाडाख्यान.....२
काल शिरीष वृक्ष पाहिला. अन् अनेक आठवणींची मालिका सुरु झाली.
आमच्या कॉलोनीतील घरासमोरच्या मोकळ्या पटांगणात अनेक वृक्ष होते आमच्या लहानपणी. आता मोजके शिल्लक आहेत.काही वर्षांपूर्वी  कॉलोनीत प्रवेश करताच नजेत भरत असे, ते शांत वातावरण ,ती पटांगणातली वृक्षराजी अन् भान हरपून पटांगणात खेळणारे बालगोपाल.
काळाच्या अोघात भरपुर बदल झाले कॉलोनीत पण पटांगणाच्या दोन टोकाला दोन डेरेदार ,घनदाट शिरीष वृक्ष म्हणजे कॉलनीची शानच; आजही तसेच आहेत .
दोन टोकांना असूनही सख्ख्या-मित्राच्या गळ्यात गळा घालून फिरणा-या आनंदी बालका सारखे हे दोन वृक्ष एकमेकांत गुरफटून गेल्यासारखेे . दोघांच्याही फांद्या एमकेकात गुंतल्या आहेत . दोघांचेही आकार ,वाढ साधारणपणे समानच आहे.
लहानपणी झाडाच्या खाली सावलीत तर खेळत असूच आम्ही. पण झाडावर चढून शिवाशिवी खेळाचो. म्हणजे एकदोन साडेमाडे तीन म्हणायच्या आधी  बाकी सगळ्यांनी झाडावर चढायचे न्    एकदोन साडेमाडे तीन म्हटले की राज्य देणा-याने झाडावर चढून पकडायचे. एका झाडावरून चढायचे आणि दुस-या झाडावरून उतरायचे. आजही ही झाडं पाहून ते सगळं आठवतं . अन् आता आश्चर्य वाटतं की आमचे पालक रागवत नव्हते ,अोरडत नव्हते की पडाल ,लागेल वगैरे. मग वाटतं आमची मुलं याच कॉलनीत मोठी झाली पण या पिढीने तसे एंजॉय केले नाही.कारणं काहीही असो.
साधारणपणे दुसरीत असतानाचा किस्सा. एकदा माझा  मावसभाऊ राजेशदादा  त्याच्या मित्रांना सांगत होता की माझी छोटी भावंडहीं या झाडावर चढतात. मग त्यांच्या समोर प्रात्यक्षिक दाखवायला म्हणून मला चढायला सांगितलं  .मी चढून झाडाच्या टोकावर गेली .अन मग  या झाडाच्या फांदीवरून त्या झाडाच्या फांदीवर चढत होते .अचानक् मध्येच मी विचित्र फसली. मला पुढेही जाता येईना न् मागेही. इतक्या टोकावर मी लटकून होती. मला रडायला येत नव्हते. पण खाली जमलेले बघे अोडायला लागले न् मला भीतीने रडू यायला लागले. तितक्यात खालून राजेशदादा अोरडला ,'घाबरू नको मी येतोय.'. आमचा राजेशडदादा म्हणजे आमच्यासाठी त्या बालवयातील निर्भीड लिडर ,कॉलनीतला दादा माणुस!! मग राजेशदादा सरसर वर चढला न् मला नीट सावरलं आणि हळूहळू झाडावरून उतरायला मदत केली. तेवढ्यावेळात मावशी व बाजूचे काही मोठीमंडळी जमली. मावशीने जवळ घेतले. राजेशदादाला रागावली की ,'मुली नाजूक असतात . तिला काही झालं असतं तर ?,तुम्हाला तुमची बहिण नकोशी झालीय कां?' वगैरे.
आजही तो प्रसंग बारकाव्यांसह आठवतो. "डिझास्टरमॅनेजमेंट" पुस्तकात न शिकताही लहानपणी वागण्यातून उमजत होते.
इतका प्रसंग होऊनही लहानपणी ते झाड कशाचे हे ठाऊक नव्हते. बरेच वर्षांनी हे झाड शिरीषचे ते कळले. साधारण एप्रिलमध्ये या झाडाला फुले येतात. य़ाची फुलं पण वैशिष्ट्यपूर्णच. आमच्या परिसरात गुलाबी फुलांचे  शिरीषवृक्षं आहेत. लहानपणी आम्ही फूलं गोळा करायचो. त्यांना एकत्र बाधायचो. आणि दाढीचा ब्रश म्हणायचो.   लक्ष नसलेल्या मित्रमंडळींच्या कानात वा नाकात     या फुलांनी स्पर्श करून गुदगुल्या करायचो.
 फुलं संपली की झाडाला शेंगा धरतात. शेंगा वाळल्या की त्या दूरदूर पसरतात. असे हे झाड.
 हीच झाडं मेडिकल परिसरात प्रचंड संख्येने आहेत. भर उन्हाळ्यात घनदाट सावली हे तर त्यांचं वैशिट्य आहेच . शिवाय आयुर्वेदात या वृक्षाला 'महाविषघ्न" म्हटले आहे. या झाडाच्या परिसरात संसर्ग पसरवणारे विषाणु वाढत नाहीत असे एकदा आयुर्वेदाचार्य असलेली शुभदावहिनी म्हणाली होती.
 आमची कॉलोनी मेडिकलकॉलेज परिसराच्या जवळ ! आमच्या परिसरासह मेडिकलपरिसरात  शिरीषवृक्षांचे प्राबल्य. आणि मेडिकल म्हणजे रोगराईचे उपचारकेंद्र !
 "योजकस्तत्र दुर्लभः" ही उक्ती या झाडांकडे पाहून खरी वाटते. ज्या कोणी ही झाड लावली असतील व ज्यांनी या झाडांना जगू दिलं असेल त्या सर्वां प्रति मनापासून कृतज्ञता.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, April 28, 2018

#सहजोक्त.


#सहजोक्त.
झाडाख्यान ...१
काय बघितल्यावर कोणते विचार मनात यावेत याचा काही नेम नसतो. गोष्ट कुठून सुरु होते न् कुठे जाऊन ठेपते हे सांगताच येत नाही. आजच पहा ना ! जवळ जवळ पंधरा दिवसांनंतर सक्काळी फिरायला गेली. नेहमीच्या बास्केटबॉल ग्राऊंडवर प्रातःस्मरण करीत फिरत होते. सहज नजर गेली झाडाकडे. खरे तर रोजच्या परिचयाचा पायाखालचा तो परिसर ! पण आज लक्ष वेधलं ते शिरीषवृक्षाने . खूप आठवणी आहेत या वृक्षाच्या ! पुढची सहजोक्त या विषयावर सहज लिहिता येणार हे नक्की.
माझ्या घरा समोरही मोठमोठी झाडं आहेतच . पण हे पटांगण त्यापेक्षा विशाल असल्यामुळे यावर जास्त झाडं आहेत. मग सगळी झाड मोजली. दहा झाडं शिरीष ,नऊ सिसवाची झाडं ,चार कडुलिंबाची झाडं ,दोन गुलमोहोराची झाडं , नावे माहित नसलेली चारपाच झाडं ,एक रुईचे झाड,अन् हो ,एक वडाचं झाड ,ज्याला त्या परिसरातून जाणारे येणारे नमस्कार करतात  ; ..असे अनेक झाडं आहेत तेथे .
शिवाय एक बोराचं झाड होतं जे कोणीतरी छाटलेलं दिसतय सध्या . चांगली चवदार बोरं यायची त्याला.छाटलेलं ,केविलवाणं झाड पाहून रोज मन खंतवायचं . "काय माणसं असतात ना ! फळं खातात ,सावली उपभोगतात ,पाणीही देत नाहीत  किंवा काळजीही घेत नाहीत ,तसं हे झाड यांच्या अायुष्यात अडचणीही आणत नाही ; तरी त्या बिच्च्या-या झाडाला छाटून टाकलं !" असा विचार यायचा मनात. आज जरा जवळ जाऊन त्या झाडाला निरखून पाहिलं तर एक कोवळे कोंब त्याच्या छाटक्या बुध्यावर रसरसून वाढताना दिसले. ते पाहून उगाच मीच जिंकल्याचा आनंद झाला. "कितीही विपरीत परिस्थिती राहो ,अापलीच मंडळी मुळावर उठली तरी जिद्दीने पुन्हा तगवायचेच स्वतःला !" हीच शिकवण देतात कां झाडं? न कळे !

लहानपणी उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये खेड्यात रहायचो आम्ही भावंड. बाबांची शेती होती ना ! तेथे दुपारभर खेड्यातील सवंगड्यांसह मनसोक्त उंडारत खेळायचो आम्ही.
"अत्ती लाव ,पत्ती लाव"असा एक खेळ होता.

¥(हे नाव शुद्ध मराठी आहे कां आमचे नागपुरी हिंदीयुक्त मराठी , हे अजून कळलं नाही. लाव म्हणजे लावणे की लाव म्हणजे घेऊन ये ? यावर कंफ्यूजन आहे कारण खेळताना दोन्हींची गरज आहे पण स्टाईलमध्ये रुबाब झाडायचा तर मध्येच हिंदी झळकलेच पाहिजे असा संस्कार हिंदी सिनेमांनी केला आहे ना....'बचेंगे तो अौर भी लडेंगे..'किंवा 'मेरी झाशी नही दूंगी'! सारखं ......इति विषयांतर .) ¥
 ज्याच्यावर राज्य आलं त्याला "अत्ती लाव पत्ती लाव ..अमुक झाड" असं सांगायचं . मग त्याने ते झाड जेथे असेल तेथे जाऊन पानं तोडून आणायची मग त्या पानांनी
दुस-यांना आऊट करायचे. मग जो बाद झाला त्याला नवे झाड सांगायचे अन् असा हा खेळ सगळे  थकत   पर्यंत चालायचा पण संपायचा नाही.
 या खेळामुळे चपळता ,लवचिकता , सांघिकभावना तर वाढलीच शिवाय झाडांची नावे (अर्थात मराठीत) कळली. शिवाय गावाच्या भूगोलाची माहिती व्हायची हा फायदा.
 आज ही झाडं पाहून लहानपणचे झाडांचे नाव व रंगरूप लक्षात ठेवण्याचे संस्कार आठवले एकदम.
 बाकी झाडांविषयी पुढल्या भागात. ......
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Monday, April 23, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
उन्हाळा आला की काही खास पदार्थांची हमखास आठवण येते. छत्तीसगढी बाँसीभात ,ज्वारीपिठाची आंबिल ,गव्हाची फेणी (शेवयी सारखा खाद्यपदार्थ),खमंग सातु (खारा व चटपटा ,उन्हाळकाकडी सह खायचा ) तांदुळाचे उकडीचे पापड,त्याची उकड ,ज्वारीचे अोले धापडे ,दुपारी कच्चा चिवडा ,मुरमु-याचा चिवडा ,गुलकंद शेक ,आंब्याच्या पोळ्या ,खारवड्या ,लह्यवड्या ,बोरवड्या ,बोरकुट भिरकवलेले उकडलेले बोरं ,अशा विविध  घरगुती  खाद्य प्रकारांची रेलचेल.
असाच एक उन्हाळी पदार्थ म्हणजे कांद्याचे लोणचे.
माझी आजी दर उन्हाळ्यात तात्पुरते टिकणारे भोकराचे लोणचे व कांद्याचे लोणचे करायची. आम्ही मग दुपारच्या जेवणात भाजी ऐवजी कांद्याचेच लोणचे खायचो.माझं लग्न झाल्यावरही नातजावायाला आवडते म्हणून तीच करून पाठवायची. मला तशी स्वयंपाकाची आवड कमीच . पण मग पाहून पाहून शिकले. कांद्याच्या लोणच्यात आजी घरी तयार करून मसाला भरायची . मी मात्र रेडिमेड लोणचे मसालाच वापरते. बाजारातून पिलूकांदे (अगदी छोटे कांदे,जे उन्हाळ्यातच मिळतात आमच्याकडे) आणायचे. त्याचा शेंड्याचा भाग कापायचा ,देठाचा भाग राहू द्यायचा. मग त्याला कमळाकार कापायचे. कांद्याचे फुल तयार होते. त्यात लोणचे मसाला भरायचा. कैरीचा किस वा बारिक फोडी त्यात  घालायच्या . मग फोडणीचे थाड तेल वरून अोतायचे. अर्ध्या तासात लोणचे मुरते. फ्रीजमध्ये दिनतीन दिवस टिकते . (अर्थात खाणा-यांच्या तावडीतून सुटले तर!)
तसा हा सोपा व नागपुरी उन्हाळ्यासाठी वरदान प्रकार ,करून पाहायला हरकत नाही.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, April 20, 2018

#सहजोक्त.



परवा दहावीपाठ्यपुस्तकाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण झाले. तज्ज्ञमार्गदर्शक म्हणून कार्यरत होती. या पाठ्यपुस्तकात वेगवेगळ्या विभागात वणिज् , सार्थवाह व श्रेष्ठी असे तीन शब्द आले आहेत. व्याकरण विभागात वणिज् हा जकारान्त शब्द आहे. 'अमूल्य कमलम्' या पाठात सार्थवाह हा शब्द 
आला आहे. तर नाट्यस्तबकम् वा नाट्ययुगलम्   या पाठात श्रेष्ठी हा शब्द आला आहे. हे तीनही शब्द एकाच पाठ्यपुस्तकात येणं हा ही माझ्या दृष्टीने योगायोगच आहे.
सन् २००० मध्ये   ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपदासह "M.A पाली पदवी मला प्राप्त झाली. जीवनात ज्या काही छान गोष्टी लाभल्या त्यात ही MA पालीची  दोन वर्षे महत्त्वाची ठरतात. मला आयुष्यात ज्या दिग्गज गुरुवरांनी घडवले त्यातील एक गुरुजन मला याच वर्षात लाभले. पालिप्राकृत विभागाचे विभागाध्यक्ष डॉ. भागचंद जैन ,माझे गुरु. जैनसर म्हणजे "नमन्ति फलिनो वृक्षः " अशी उक्ती सार्थ करणारे. सर चार विषयात पीएच्डी आणि तीन विषयात डीलिट ह्या सर्वोच्च पदव्या प्राप्त झालेले आहेत. हिंदी ,संस्कृत ,पालि व प्राकृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व निर्विवाद आहे. या भाषांतील तत्त्वज्ञान हा त्यांचा व्यासंगाचा विषय आहे.
पालिसाहित्यात भगवान् बुद्धाचे चरित्र व पालित्रिपिटक यांचा अभ्यास करावा लागला MA ला असताना. पालिसाहित्यात सार्थवाह ,श्रेष्ठी हे शब्द बरेचदा आले  आहेत. मी या शब्दांना समानार्थक समजायचे. तसे ते समान जातकुळीचे आहेतही. पण डॉ. जैन सरांनी एकदा या तीनही शब्दांचा अर्थ सांगितला. वणिज् म्हणजे व्यापारी ,किराणाभुसार किंवा वाणसामानाचा दुकानदार,आजच्या काळात डिपार्टमेंट स्टोरचालक. सार्थवाह म्हणजे सरांच्या शब्दात ,,"कारवॉ ले कर इस शहर से दुसरे शहर जाने वाला" आजच्या काळात होलसेलडिस्ट्रिब्युटर ,तर श्रेष्ठी म्हणजे राजदरबारात ज्याला सन्मानस्थान आहे तो ,आजच्या भाषेत राज्यसभा सदस्य.  मला त्यांच्या या शब्दच्छटांचा अर्थ पटला. सार्थवाह या शब्दात वहन करणारा असा अर्थ अनुस्यूत असू शकतो. श्रेष्ठी या संस्कृत शब्दाचा पालीत सेठ्ठी असा होतो . तोच हिंदीत सेठ झाला तर मराठीत शेठ वा शेटजी झाला.
दहावीच्या या शब्दांमुळे गतमस्मृतीला उजाळा मिळाला.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, April 10, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता

आजही तो तसाच वळवाचा  कोसळतोय    ।

त्यांच्या मिलनाची खुण म्हणून  मृद्गंध पसरतोय।

वळवाचा तो तसाच परत जाईल माघारी ।

 रुजणं न्  सृजनक्रिया जरी नाहीच होणार खरी ।

पुन्हा नक्कीच तो बरसेल वर्षाऋतुत संततधारा ।

धरित्रीला सजवून तो जरूर करेल वसुंधरा ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, April 1, 2018

#सहजोक्त.



"उकिरड्याचेही भाग्य पालटते मग आपण तर माणुस आहोत" ,माझ्या सासुबाई असं नेहमी म्हणायच्या.
सकाळी पटांगणात फिरताना उगवलेल्या सूर्याला नमस्कार करीत होते. मोठ्या इमारतीमागून सूर्याची स्वारी वर येत होती.ती इमारत पाहून   मनातचक्र सुरु झाले   न् सासुबाईचे ते  वाक्य आठवले.

जन्मापासून ते आजवर मी जेथे रहाते तो रहिवासी भाग असून उच्चमध्यमवर्गीय लोकांची ती वस्ती आहे. माझ्या बालपणी हा भाग अगदी साधा  संथ पण एकमेकांविषयी स्नेहाळ जिव्हाळा बाळगणारा होता. सर्वांच्या घरी साधारणपणे समान परिस्थिती होती.
घरात बेडरूम नावाची गोष्टच नव्हती.पुढचे आंगण पहिली खोली ,माजघर ,देवघर,स्वयंपाकघर ,व्हरांडा ,बाहेर संडास-बाथरूम,मागचं आंगण अशी सगळीकडे समान रचना होती. सगळ्यांकडे  रेडिअो ,सायकल असायची.बैठकीत चार खुर्च्या ,पलंग ,टेबल क्वचित कोणाकडे सोफ़ा. सगळेच जण महिन्याच्या सुरुवातीला भरल्या खिशाचे तर शेवटी रिकाम्या खिशाचे असत. घरोघरी साधारणपणे घरी बनवलेले पदार्थ होते. लिव्हिंगसँडर्डच्या भंपक कल्पना नव्हत्या.आमच्या कॉलोनीत आंतरराष्ट्रिय स्तरावर नावाजलेल्या विद्वानांसह स्थानिक पातळीवर प्रभावी व्यक्तिमत्त्वे व कोणतीही अोळख नसलेले सामान्य लोकंही गुण्यागोविंदाने रहात होते. त्यांचे त्यांचे क्षेत्र कॉलनीतील सहजीवनात दडपण वा विसंवादी ठरत नव्हते. सगळ्यांचे कुटंबजन चारचौघांत कोणताही गंड न बाळगता न् न जाणवून देता मिसळत असत.
मी व माझे दोन भाऊ. कॉलनीत आमच्या वयाची बच्चेकंपनी भरपूर.कॉलनीत भरपूर वृक्षराजींसह मोठं पटांगण , त्यामुळे शाळा सुटल्यावर खेळायला संपन्न वातावरण होते. घरचेही दिवेलागणी पर्यंत रागावत नसत.
अशा अनेक कारणांनी प्रोफ़ेसर्स कॉलोनी नावाचा आमचा भाग आम्हाला खुपच आवडायचा. कॉलनीत जवळजवळ प्रत्येक घरी तीन वा चार क्वचित त्यांच्यावर मुले होतीच होती. पण दोनतीन घरं त्याला अपवाद होती. त्यातील एक घर थोर गणितज्ज्ञ मंगळगिरी यांचेही होते .मंगळगिरी आजोबा व आजी  दोघेही  सगळ्यांशी मिसळून वागत . हळदीकुंकू -दसरा,सोनं वाटप यासारख्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. आडव्या रांगेतील सेन यांचे घर त्यामानाने अतिशय अलिप्त होते.

कॉलनीत त्यावेळी घरोघरी संक्रांत-चैत्रगौर यांचे हळदीकुंकु साजरे केले जाई. त्याप्रसंगी आई कागदावर कॉलनीतील सगळ्या काकू-आजींची नावे लिहून देत असे . मग मी ,मीरा ,अपर्णा घरोघरी तो कागद व पेन्सिल घेऊन फिरत असू. प्रत्येक घरातून सही आलीच पाहिजे असा आईचा आग्रह!
कागद हाती पडल्याबरोबर मी अोरडायची ,"सेनकडे जाणार नाही !!" कारण त्यांच्याकडे दोन आजीच होत्या न् त्यांचं बंगाली वळणाचं मराठी किंवा हिंदी मला कळायचं नाही.मग आई मीराला सांगायची अन् तिच्यासोबत मग अस्मादिक तेथे जायला तयार व्हायचे.
सेनच्या घराशी तसा कोणाचाच घरोबा नव्हता. दोन वयस्क बंगाली  स्त्रियांशिवाय तेथे कोणीच नव्हतं. त्या दोघी एकमेकांच्या नणंद-भावजया होत्या. नणंद म्हणजे प्राध्यापक सेन मॅडम ,त्यांचाच तो बंगला . त्यांची भावजय त्यांच्या सोबत रहात असे. त्या दोघीजणी शिष्ट नव्हत्या पण तरी सुद्धा कोणात मिसळत नसत. येता-जाता तोंडावर तोंड पडले की त्या मोठ्यांशी बोलत. आमच्या सारख्या मुलांशी त्या बोलत नसत किंवा आम्हीच त्यांच्या वा-याला उभे राहत नसू.सेनचे घर नि घरातील मंडळी या विषयी एक गुढ वलय वाटायचे आम्हाला.
आमच्या लहानपणी घरोघरी काय किंवा रस्त्यावर काय विद्युत प्रगती झालेली नव्हती. घरात एखादी ट्यूबलाईट व बाकी पिवळे बल्ब असत. तेच रस्त्यावरही अगदी टोकांवर पिवळे पथदीप असत ,ज्यावर प्रचंड किडे कायमच असत.  कॉलनीत घरोघरी भरपूर झाडं ,कॉलनीतील मोकळ्या जागांवरही झाडे असत . त्यामुळे दिवेलागणी नंतर रातकिड्यांचे आवाज ,लुकलुकणारे काजवे,डराव-डराव करणारे बेडकं ,रंग बदलणारे सरडे ,खेकडे ,गोगलगाई ,पैसा नावाच्या लाल अळ्या ,विविध रंगी फुलपाखरे ,मैना ,चिमण्या ,कावळे ,पोपट आदी पक्षी;  त्यां-त्या सिझनमध्ये सहज दिसायचे.

सायंकाळानंतर कॉलोनीतील आडव्या रांगेत आम्ही जातच नसू. त्यातल्या त्यात बोबडेंचे घर ही हद्द होती. सेनच्या घराकडे तर बघत पण नसू.
आजी,आई ,मावशी ह्या सेनबायांची चौकशी करीत असत.पुढे पुढे ते एकाट घर पार सुनं सुनं झालं . कारण त्या दोनपैकी एक आजी वारल्या. काही दिवसांनंतर त्या दुस-या आजी कुलुप लावून त्यांच्या मूळगावी परत गेल्या. आता ते घर खरोखर निर्जन झाले.
अाधीसुद्धा त्या घराचे आंगण अोकेबोके होते आता तर अधिकच फावले. त्या घराच्या आंगणात एकही फळाचे झाड नव्हते ना नीटसे फुलाचेही. फक्त कटलेल्या पतंगी वा उसळलेला चेंडू घेण्यासाठी तेथे मुले क्वचित जात असत. वा पावसाळ्यात तुंबलेल्या गडरलाईन मोकळी करायला आलेल्या मजुरांना वाट दाखवायला एखादा उत्सही बंड्या तेथे जाई.
बाकी कितीतरी वर्ष ती वास्तु पडिकच होती.
 म्हणजे बांधल्यापासून ते सेनकुटुंब जाई पर्यंत तसं ती वास्तु नांदती नव्हतीच . इतर घरांत जसे गोकुळ होते तसं तेथे नव्हतच काही.
 ‎ पण नंतरही बरेच वर्ष काहीही हालचाल नव्हती. काही वर्षांनी  बाहेरच्या एका व्यापा-याने ती वास्तु विकत घेतली असे कळले. ती वास्तु तशीच निर्जन राहिली. मग काही वर्षांनी त्या माणसाकडून
 ‎दुस-याने ती खरेदी केली असे कानी आले.
 ‎ पण वास्तूत काही बदल झाला नाही. मधे काही महिने तिथे एक संगणकवर्ग सुरु झाला होता. पण नंतर तिच्या भाळी असलेले निर्जनपण ती वास्तु पुन्हा मिरवू लागली. आश्चर्य म्हणजे पडित वास्तुत काही अनैतिक उद्येग चालतात तसे इथे काहीच होत नव्हतं. चोर,भिकारी सुद्धा तेथे फिरकत नव्हते. तसं त्या वास्तुबद्दल काही आगळवेगळंही कानी येत नव्हतं . पण तरी ती निर्जनच होती.
 ‎आता नव्या मालकाने तेथिल मूळ वास्तु तोडून जमिनदोस्त केली. मग साग्रसंगीत भूमिपूजन केले. त्यानंतर जवळजवळ दोन वर्षे बांधकाम सुरु होते. छान चार मजली मोठी अद्ययावत सुखसोईंनी युक्त इमारत त्या जागी आज उभी आहे .
पण आश्चर्य हेच की आज पाचसहा वर्षे होऊनही तेथे कोणी नांदायला आलेले नाहीच. चौकीदार व त्याचं कुटुंब त्या वास्तुची देखभाल करतो.
ती मोठी इमारत पाहून सारं बालपण व तेव्हाचे ते प्रसंग आठवले.
नशिब ,दैव ,भाग्य,लक हे जसं मानवाला लागू असते तसं एखाद्या स्थावर मालमत्तेला लागू पडते कां ? सहज तरंग उमटले मनावर
सेनचे घर व त्यावरची श्रीमंत इमारत पाहून!!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे .