Sunday, April 29, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
आज बुद्धपोर्णिमा. सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्रप्त झाली ती वैशाख पोर्णिमेला. म्हणून तिला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते.
बुद्धाची शिकवण ज्यात संग्रहीत केली आहे ते त्रिपिटक होय त्रिपिटक . त्रिपिटकाची भाषा रसाळ असून त्यात वास्तवाचा गंध आहे.मला त्रिपिटकाचे सुत्तपिटक  जास्त भावते. धम्मपद माझा आवडता ग्रंथ.
बुद्धाच्या जीवनात अनेक पाडाव आले. त्या त्यावेळी ते कसे वागले हे चिंतनीय व अनुकरणीय आहे. बुद्धाच्या अनेक जीवनकथा मला आवडतात. त्यातील एक येथे सांगते.

सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले तेव्हा त्यांनी पंचवर्गीय भिख्खूंना प्रथम बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तेच पहिले धम्मचक्कपवत्तन होय.  त्यांचा प्रभाव महान होता. मग जगाला उपकारक असा हा धर्म वाढविण्यासाठी भगवान फिरू लागले.
एके ठिकाणी दोन काश्यप भाऊ नदीच्या वरच्या व खालच्या भागात  आश्रम करून रहात होते. एकाचे ३०० शिष्य होते तर दुस-याचे २००. भगवान ३०० शिष्य असलेल्या भावाकडे गेले. त्याला भगवन्तांचा महिमा माहीत होता. पण त्याला ते उघड मान्य करायचे नव्हते.आपल्या शिष्यांना भगवन्तांच्या प्रभावात येऊ द्यायचे नव्हते. आलेल्या अतिथींचा सत्कार करणे तर कर्तव्यच होते. मग या काश्यपाने भगवंतांना  रात्री अशा ठिकाणी झोपायला  पाठवले जेथे महाभयंकर सर्पराज येत असे व झोपलेल्या व्यक्तीला मारून टाकत असे.
काश्यपाला वाटले की परस्परच गौतमाचा डाव संपेल . त्याचे विचार जाणून भगवान मनात हसतात. रात्री त्यांच्या प्रभावाने सर्पराज शरण येऊन नमन करून कायमचा ते स्थान सोडून गेला. तीन दिवस तेथे राहूनही भगवंतांना काहीही झाले नाही हे पाहून तो मनात चरकला . विचार करू लागला ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ". याचे मनातील भाव जाणून भगवान फक्त हसले.  मग भगवान ध्यान करण्यासाठी नदीवरून चालत जाऊन शिळेवर जात असत. हाही चमत्कार पाहून काश्यप मनात म्हणतो ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ".भगवान पुन्हा मूक हसतात.
अशा प्रकारे भगवान त्याला अजून चमत्कार दाखवतात पण तो मनातून भगवंतांना थोर मानतच नाही.
शेवटी भगवान मनात ठरवतात की "मूर्खाला त्याच्या मूर्खपणाची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे." मग  त्याच्या सर्व शिष्यांसमोर त्याची कान-उघाडणी करतात.  मग तो काश्यप त्याच्या ३०० शिष्यांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करतो.

ही कथा मला आवडते कारण आहिंसावादी भगवान बुद्धसुद्धा काश्यपाला स्पष्ट  सुनवतात .
कधी कधी समोरच्याला त्याची पायरी  वेळीच जाणवून द्यावी . पुढील अनर्थ त्यातून टळतात.
आजच्या दिखावू जगात ही शिकवणूक फारच उपयुक्त आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

No comments:

Post a Comment