Thursday, August 30, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन  - भाग ૪

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
 भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ||७||
 शंकराचे वर्णन करतांना शंकराचार्य म्हणतात की , चिताभस्मलेपन करणारा ,विषभक्षण करणारा, दिगंबर  ,जटाधारी ,गळ्यात भुजगेंद्रहार धारण करणारा ,पशुपतिनाथ ,कपालधारी भूतनाथ असा शंकर जगदीश्वर ही पदवी धारण करतो ते केवळ तुझे पाणिग्रहण केले म्हणूनच  बरे ,हे भवनी !

 न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः |अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||
चंद्रानने (चंद्रा सारखे सुंदर मुख असलेली ) ना मला मोक्षाची इच्छा आहे , ना भौतिक सुखांची ; ना मला विज्ञानाची (मोक्ष प्राप्तीचे विशेष ज्ञान)  ना सुखाची इच्छा आहे.म्हणूनच हे आई , मी  विशेष मागणी मागतो की (इथे संयाचना हा फार सुंदर शब्द योजला आहे, याचना म्हणजे मागणी न् संयाचना म्हणजे योग्य प्रकारची विशेष मागणी ) मृडानी ,रुद्राणी ,शिवा ,शिवानी ,भवानी असे तुझे नाम  जपण्यातच माझा जन्म जाऊ दे.

नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः |
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||
हे श्यामे (देवीला गौरीही म्हणतात न् श्यामाही )
रुक्षचिंतनपर वाणीने ,विविध विधींच्या उपचारांनी तुझी आराधना केली नाही.तरी तुझीच कृपा आहे की माझ्यासारख्या अनाथावर तू कृपाछत्र धरतेस.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, August 29, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन -भाग ३
 आईने मातृभावाने पुत्राचे अपराध पोटात घ्यावे त्याला क्षमा करावी हे मागणे या स्तोत्रातून श्रीमद्शंकराचार्य व्यक्त करीत आहेत. एखादं चुकार मुलं मोठी चूक करतं न् मग आईचा अनुनय करीत तिच्याशी लाडीगोडी करतो तसे हे श्लोक आहेत.

जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
 न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया |
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||
  शंकराचार्य म्हणतात , हे जगदंबे ,जगज्जननी ना मी तुझी सेवा केली ना तुला माझं बरेच धन अर्पिले तरीही तू माझ्यावर निरुपम (म्हणजे ज्याची तोडच नाही ,अतुलनीय ) प्रेम करते. कारण मुलगा भलेही वाईट निपजेल पण आई कधीच वाईट नसते. .

परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि |
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||
बाबा कोपले तर बचावाचे एकच माध्यम म्हणजे आई. बाबांकडून काही मोठं मिळवून घ्यायचे असेल तर आई मध्ये हवीच . हेच याही श्लोकात दिसते.
जीवन जगतांना विविध भोगात लिप्त झालो, सारे देव विस्मरणात गेले माझ्या. यातच  वयाची पंच्यांशीही उलटून गेली ,(आयुष्याचे फार कमी दिवस राहिले.) गणेशजननी ,आता जर तुझे सहाय (आधार) मिळाला नाही तर निराधार असा मी (या विशाल जगात) कोणाला  बरे शरण जाऊ ? सांग ना ! (तुझ्याशिवाय आता मला कोणीच वाचवू शकत नाही. )

श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः |
तवापर्णे कर्णे विशति मनु वर्णे फलमिदं
 जनः को जानीते जननि जननीयं जपविधौ ||६||
 कुत्र्याचे मांस भक्षण करणारा (ज्ञानोपासक नसलेला) सुद्धा (तुझ्या कृपेने) मधाळ गोड वाणीने बहुभाषक होतो.दरिद्रीसुद्धा (तुझ्या कृपेने) निर्भय होऊन कोट्याधिशासारखा वावरू लागतो. हे अपर्णे, हे सारे ,तुझे नाव कानावर पडल्याचेच  (कानातून मनात भिनल्यामुळे ) फलित आहे. हे जननी तुझ्या जपामुळे  काय काय सुपरिणाम होतात ,हे कोण बरे जाणू शकेल ? (अशक्यप्राय गोष्टी तुझ्या जपाने सहजशक्य कशा होतात हे कोण जाणू शकेल ?)
 जप करणे म्हणजे केवळ वाणीने तो शब्द उच्चारणे नव्हे तर सदा सर्वकाळ तेच रूप व शब्द ध्यानी मनी स्वप्नी रुजवणे हे होय. इतक्या तीव्रतेने अखंड ईशस्मरण केले की जीवनाचे कल्याण होणारच ना ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, August 22, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन -भाग २
 देवीला मातृरूपाने पूजणे हे स्वाभाविक आहे. जगात आई एवढा लाड दुसरे कोणीच करीत नाही. आई एवढी सत्ता कोणावरच गाजवता येत नाही. म्हणूनच आदिशंकराचार्यांनी देव्यपराधक्षमापन स्तोत्र रचले.या स्तोत्राचे  पहिले तीन श्लोक असे

 न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः |
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
हे आई ,मी मंत्र (विशिष्ट  शब्दोच्चार ) ,यंत्र (विशिष्ट आकार),स्तुती (शब्दस्तुती), आवाहन(भावनिक साद) ,ध्यान(देविरूपाचे सतत स्मरण) ,स्तुतिकथा ,मुद्रा (हातांचे वा अंगांचे विशिष्ट आकार),विलपन(कारुण्य प्रदर्शक मंत्र) इत्यादि पूजाविधी मी जाणत नाही.  पण आई मी हे (नक्कीच) जाणतो की तुझे अनुसरण करणे ,क्लेश दूर करणारे आहे.
दक्षिणतंत्र पद्धतीत अनेक मुद्रा-भाव आहेत. ते काहीही  न जाणता मी इतकेच जाणतो की तुझेच अनुसरण करणे हेच खरे सुखाचे आधान आहे.

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||
पूजापद्धती विषयक अज्ञानामुळे ,धनलोभाने ,आळसामुळे वा नियतीच्या शक्याशक्यतेमुळे हे आई तुझ्या चरणांपासून मी
ढळलो  तरी ; जगाचा उद्धार करणारी ,कल्याण करणारी हे आई माझा अपराध पोटात घाल.
पुत्र वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
जीवन जगण्याच्या रगाड्यात नेमकं वर्मच हरवून बसतो आपण . जन्मताच जसे निरागस असतो ते मन हळू हळू जनरहाटीत प्रदूषित होते. परतीच्या प्रवासात हे लक्षात येते.लेकरू चुकतेच पण आईने सांभाळावे ना त्याला सर्व परिस्थितीत !

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः |
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||
आई ग ,पृथ्वीवर  तुझे अनेक पुत्र आहेत पण त्यामध्ये माझ्यासारखा एखादाच विरळातील विरळ आहे. (विषयासक्त झालेल्या )माझा हा (तुझ्यापासून दूर जाण्याचा ) त्याग योग्य नाहीच . हे शिवे(शिवाची पत्नी ) ,मुलगा वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
निसर्गचक्रानुसार आई होणं हे स्वाभाविक आहे पण "आईपण" एकदा समजलं की कोणतीच आई  कुमाता होऊच शकत नाही.
मुलगा कितीही मोठा झाला तरी  आईसाठी तो लहानच असतो.आईला अनेक मुलं असली तरी तिचा प्रत्येकाशी स्वतंत्र व विशेष अनुबंध असतोच .प्रत्येक मूल वेगळं असतं.
"कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति" ही काही श्लोकात समान अोळ आहे. ती एक प्रकारची टॅगलाईनच आहे या स्तोत्राची.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Saturday, August 18, 2018

#सहजोक्त.


आज दोन लेख वाचले. एक मराठी व दुसरा हिंदी.
दोन्ही लेखांचा मूळ हेतू मातृभाषेतून शिक्षणाची महती हाच आहे.
दोन्ही लेख छान व विषयाला पूर्ण न्याय देणारे होते.
शिक्षणात मातृभाषेचे स्थान अनन्यसाधारण आहे यात शंकाच नाही.
या दोन्ही लेखाची सुरुवात एकाच संस्कृत श्लोकाने झाली हा योगायोग. नेमकं दोन्ही लेखात तो श्लोक निर्दोष दिलेला नाही. संस्कृत ही मायबोली नाही त्यामुळे  असो. त्यावर मी रचना केली.
मातृभाषा महती ।
मातृभाषां परित्यज्य भाषामन्यामुपासते ।
ते चक्रासन्दमासाद्य
स्वपादहीनपङ्गवः ॥
©डॉ.प्रज्ञा देशपांडे
भारत हा बहुभाषिक देश आहे. बहुभाषिकत्व हे भारताचे बलस्थान आहे.भारतीय शिक्षणात भाषा हा महत्वाचा घटक आहे. भाषावार प्रान्त रचनेमुळे प्रादेशिक ,भाषिक अस्मिता वाढणे नैसर्गिक आहे. आजकाल कुठेतरी ही अस्मिता व राष्ट्रियता  यांच्यात उगाच दावा उभा केल्या जातोय की काय असे वाटते. या प्रकारांमुळे भारताचे बलस्थानच कमकुवत होते आहे असे वाटते.
सर्व भारतीय ,राष्ट्रियत्व जपणा-या सुजाण नागरिकांनी भाषा शिक्षणाकडे डोळसपणे बघणे ही काळाची गरज आहे.
 परिसरबोली ,मातृभाषा ,राजभाषा,राष्ट्रभाषा ,
 जागतिकभाषा  यांच्या गलबल्यात शिक्षण अडकवण्यापेक्षा  भाषिकसामंजस्य ,भाषाशिक्षण या विषयाला गांभीर्याने घ्यायला हवे.
 भाषा ही संस्कृतीचे वहन करते न् भारतीयांची विशिष्ट संस्कृती आहे असे जर अभ्यासकांना वाटत असेल तर भारतीय भाषांचे वैविध्य व परस्पर पूरकता ,अंतर्गत साम्य नव्या पिढीला सोदाहरण समजावून देणे हे त्यांचे महत्वाचे कर्तव्य आहे.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, August 17, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन.भाग १
"आई" या नावातच सारे विश्व सामावले आहे. सर्जन , समर्पण ,संवेदना ,सहनशीलता ,क्षमाशीलता ,वात्सल्य यांचे मूर्तरूप म्हणजे आई . म्हणूनच भारतीय संस्कृतीत आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. इतकेच नाही तर जे जे उत्तम ,उदात्त ,मंगल त्या सगळ्यांना मातृभाव दिल्या जातो , हे  पृथ्वी ,नदी ,गाय ,भाषा , जन्मस्थान इत्यादींवरून सहज लक्षात येते.
देव ,ईश्वर ,ईश ,परमेश ,जगन्नियंता ,पिता ,
सर्वशक्तिमान   वा इतर कोणत्याही स्वरूपात  त्या मंगलोर्जेची जग उपसना करते त्याचेच स्त्रीरूप सुद्धा जगात वंदनीय आहे. या स्त्रीरूपाला देवी म्हणतात. देवीची सुद्धा मातृरूपाने पूजा करण्याचा प्रघात आहे.
एकदा त्या अमोघ शक्तीला "आई" म्हटले की ,
आई-लेकराचे नाते निर्माण होतेच . मानवी नात्यात जसे भावभावनांची तरलातितरल स्तरं असतात तसेच नाते देवी व तिच्या भक्तात तयार होते.
राग-लोभ,चीड,रुसवा ,प्रसन्नता आदी सारे भाव मग या नात्यात अोघाने येतातच.
स्तोत्रवाङ्मय हा भारतीय साहित्याचा अद्वितीय खजिना आहे. स्तोत्र म्हणजे स्तुती करण्याचे शब्दरूपी साधन . हा एक काव्यप्रकारच आहे. यात शुद्ध भक्ती ,भाव-रस असतोच शिवाय प्रासादिकताही असते.
श्रीमद् शंकराचार्यांची स्तोत्रे विशेष उल्लेखनीय आहेत.
या लेखमालेचा विषय "देव्यपराधक्षमापनस्तोत्र" हा आहे.
स्तोत्राच्या नावातच त्याचा वर्ण्यविषय स्पष्ट लक्षात येतो. देवी म्हणजे मातृरूपाने पूजिली जाणारी सर्वोच्च शक्ती ,अपराध म्हणजे कळत-नकळतपणे  केलेले मान्यतांच्या विरुद्ध वर्तन ,क्षमापनस्तोत्र म्हणजे क्षमा मागण्यासाठी केलेले स्तुतिकाव्य.
या स्तोत्रात एकूण बारा श्लोक आहेत. ते पुढील प्रमाणे.
(©डॉ.प्रज्ञा देशपांडे)
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः |
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः |
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
 न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया |
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि |
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
 निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः |
तवापर्णे कर्णे विशति मनु वर्णे फलमिदं
 जनः को जानीते जननि जननीयं जपविधौ ||६||
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
 भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ||७||
न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः |अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः |
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि |
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ||१०||
जगदम्ब विचित्रमत्र किं
परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि |
अपराधपरम्परापरं
न हि माता समुपेक्षते सुतम् ||११||
मत्समः पातकी नास्ति
 पापघ्नी त्वत्समा न हि |
एवं ज्ञात्वा महादेवि
यथायोग्यं तथा कुरु ||१२||

पुढील भागांपासून  या श्लोकांचे यथामती ,यथाक्रम रसग्रहण करील.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Sunday, August 5, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
आज एक शब्द पहिल्यांदाच  वाचण्यात आला.छान वाटला. दोन तीनही शब्दकोशात आढळला नाही. अॉनलाईन शब्दकोशात आढळला पण वेगळ्या अर्थाने.आज छान वाटलं ,रविवारचा सदुपयोग झाला.
"यस्य पर्णमयी जुहूर्भवति न स पापं श्लोकं शृणोति "।  (तैतिरीय संहिता३/५/७/२) अर्थ असा की , "जुहू(चमचा) जर पर्णमय (पळसाचा) बनवला ,तर त्यामधून एक विशिष्ट अपूर्व निर्माण होते.
वेगळ्या संदर्भाने काही वाचत होती न् शब्द दिसला. शब्द तसेही आवडतात.
जुहू हा शब्द मुंबईचे एक उपनगर म्हणून परिचित आहेच . पण आजवर हा शब्द संस्कृत मध्येही आहे ,हे माहित नव्हते.
वरील वाक्यात जुहू शब्द चमचा या अर्थाने आला आहे. तर अॉनलाईन शब्दकोशात जीभ,ज्योत , ब्रह्मदेवाची पत्नी ,पळी असे अनेक अर्थ दिले आहेत.
जुहू म्हणजे चमचा , पळी (ज्याला संस्कृतात दर्वी म्हणतात ) असा अर्थ कळला आणि छान वाटले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.