Tuesday, February 25, 2020

#सहजोक्त.

कधी तरी आड वेळी ,होई जिवाची काहिली ।
आठवाच्या झुळूकीनी ,तनु दाह-दाह होई ॥१॥
तुझी आठवण जशी , चांदणं ग उन्हातली ।
चंद्र कौमुदी विरही ,सूर्य वैशाख वणवी ॥२॥
धूमकेतु आठवाचा ,धरेवर आदळला ।
किती सावरा सावरा ,अस्वस्थ ही वसुंधरा ॥३॥
सय आली ग दाटून , हृदयाच्या खोलातून ।
धारा वाही डोळ्यातून ,अंतरंगाला छेडून ॥૪॥
होता तुझे ग स्मरण ,शुन्यावते माझे मन ।
अंतरंगाला छेडून ,धारा वाही डोळ्यातून ॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, February 23, 2020

सहजोक्त.


#कविता.
स्नेह संपल्यावरी दिव्यातील ,
ज्योती अलगद मालवती ।
जगता जगता तसे काहीसे
गवसुनही नुरती मोती ॥१॥

फूल सुगंधी सुखावणारे
हळुच गळुनी खाली पडे ।
अल्लड क्षण जे हळवेसे ते
पुन्हा मागुती कधी न फिरे ॥२॥

रिक्त अोंजळी अोलावा धरी
गळले जल त्यातील जरी ।
दुरावलेले वळणावरती
मन सदा स्मरणी रमती ॥३॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, February 22, 2020

सहजोक्त.



#माझ्यावर मी खुश आहे .......
सगळं मनासारखं होईना कां जरी
लयीत सारं असो वा नसो काही तरी
वेळ मिळो अथवा न मिळो त्यापरी
माझ्यावर मी मात्र खुश आहे भारी॥
आजवर अनेक पाहिले उन्हसावलीचे खेळ
समतोल साधत जमवलाय जगण्याचा मेळ
मनासारखं सगळंच नाही घडलं सारं
तरीही माझ्यावरच मी खुश आहे बरं ॥
तक्रार अनेक गोष्टींसाठी करता येईल
अनेक बाबींसाठी  मनात झुरता येईल
खूप काम अजून करायचं आहे बाकी
आज तरी माझ्यावर खुशच आहे मी ॥
घडलं-बिघडलं ,तुटलं-फुटलं,मोजून काय होणार
झाल गेलं गंगेला मिळालं ,रडून काय साधणार
एकाच गाडीची चक्रे, प्रयत्न आणि दैव
माझ्यावरच खुश रहाणार आहे मी सदैव ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, February 20, 2020

#चिंतनात्मक लेख.

#प्रणाली
 गुलाबाची कळी उमलताना बघितली कां ? चाफ़्याच्या फुलाला किती पाकळ्या असतात ,त्या नेहमी बदलत असतात कां ?  मुंग्यांची अोळ कण नेताना पाहिली ?  पक्षांचे थवे आकाश झाकोळून मावळतीला जाताना पाहिले ? वेगवेगळ्या वेळ-प्रसंगी कुत्रे कसे वेगवेगळे आवाज काढतात ? पाऊस पडल्यावर विविध ठिकाणी कुत्र्याच्या छत्र्या उगवतात ,ते नेमक्या कुठे व कां ? दूरवर  नेऊन सोडलेलं मांजरेचे पिलू न चुकता घरी कसे परतते ?  पहिला पाऊस पडल्यावर येणारा मातीचा सुगंध अनुभवलाय ? सूर्य बाराही महिने पूर्व दिशेला नि एकाच ठिकाणून उगवतो कां ? दिवसा चंद्र दिसतो कां ? इंद्रधनुष्य नेहमीच दिसत कां नाही ? ऊन्ह-वारा-थंडी-पाऊस कमी येवो अथवा जास्त , झाड त्याचे बहरणे सोडते कां? 



 आपल्याला रोजच्या झोप-जेवण-व्यायामादींच्या  निश्चित वेळा ठरल्या असतील तर त्या त्या वेळी ते काम झाले नाही तर अस्वस्थ होतो कारण शरीरात असलेले जैविक घड्याळ ! 

 विविध भौगोलिक वातावरणात उगविणा-या वनस्पती वा जगणारे प्राणी , हळूहळू परिवर्तीत केलेल्या वातावरणात सहज तग धरतात. इतकेच नाही तर त्यांची पुढील पिढी नव्या वातावरणार जोमाने वाढते.

 शिक्षकांसमोर सतत एकमेकांचे स्पर्धक वा  कट्टर विरोधक विद्यार्थी ,आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांशी छान जुळवून घेतात.

 समजा आपल्याला दिल्लीला जायचे आहे , आपण काय करणार ? पहिले तर आपलं गाव ते दिल्ली याचे अंतर शोधणार मग पर्यटन साधनांची माहिती घेणार ,मग तेथे कुठे, कसे किती दिवसांचे काम आहे त्यानुसार तेथील निवासाची व्यवस्था , तिथे जेवण-फिरणे आदींची व्यवस्था बघणार. दिल्लीतील परिचितांशी संपर्क करणार मग  आपल्या सोयीनुसार बस , रेल्वे , विमान आदींचे तिकिट काढायचा विचार पक्का करणार , होय ना ?


वर उल्लेखलेले अनेक प्रश्न वा दाखले व त्याची उत्तरे  मिळविण्यासाठी काही प्रक्रिया , विधी , व्यवस्था वा तयारी करून निरीक्षणे नोंदवावी लागतात , तिला साधरणपणे प्रणाली असे म्हणू शकतो. 
 जीवसृष्टी , निसर्गचक्र , जलचक्र , ऋतुचक्र , जीवसाखळी , अन्नसाखळी इत्यादी सर्व बाबी एका सुसूत्र प्रणालीने होत असतात.

मी > माझं अंतरंग > बाह्य विश्व > मानव निर्मित  कृत्रिम व्यवस्था ; असा  छोटा धांडोळा घेतला तर  प्रणाली म्हणजे नेमकं काय , ते लक्षात येईल.

 मानवी शरीर रचना व शरीर क्रिया या दोन मुख्य शाखांचा अभ्यास केला तर लक्षात येते की अस्थीसंस्था , स्नायुसंस्था , मज्जा संस्था , रक्त संस्था, चेता संस्था , हृदय कार्य , मेंदू कार्य , यकृत कार्य , मुत्रपिंडकार्य  इत्यादी एकेकाची नीट पारखणी  केली तर मानवी-जीवनात प्रणाली किती महत्वाची आहे , हे लक्षात येते. कोणती संस्था वा इंद्रिय , श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो उलट मानवी शरीरातील इतक्या गुंतागुंतीच्या अनेक संस्था वेगवेगल्या असूनही एकमेकांशी सुसंगत असतात.   निव्वळ मानवी शरीरच नाही तर कोणत्याही सजीवाची शरीररचना व कार्य यांचा अभ्यास केला तर प्रणाली म्हणजे काय हे नीट कळेल.
  परिपूर्ण विकसित मेंदू व हृदय असलेला मानव व मानवेतर सजीव यांच्यातही परस्पर  साहचर्य , समन्वय , सहसंबंध असतोच असतो.   "जीवो जीवस्य जीवनम्।",  "जियो अौर  जिने दो " असे सारे सजीव एकमेकांशी संबंध्द असतात.
  दोन व्यक्ती वा समुदाय यांच्यातही वेगवेगळी आंतरक्रिया घडत असते." दोन अधिक दोन म्हणजे चार " , हे गणितीय सत्य , मानवी वर्तनशास्त्रात फेल होते. परस्पर आंतरक्रिया कोणत्या प्रणालीवर आधारलेली आहे त्यावर उत्तर अबलंबून आहे .

बुद्धिमान व वर्तनवादी मानवाने स्वतःचे जीवन सुखी , आरामदायी व समाधानी करण्यासाठी विविध संस्थांच्या रूपानी अनेक प्रणाली विकसित केल्या आहेत. कुटुंब संस्था , विवाहसंस्था , समाजिक संस्था , शिक्षण संस्था , नागरी संस्था , न्यायसंस्था , वितरण संस्था , संरक्षण संस्था , सहकारी संस्था ,  धर्मादाय संस्था ,धर्मसंस्था ,  पर्यावरण संस्था , परिसंस्था , पशुपालन संस्था , वित्त संस्था इत्यादी इत्यादी अनेक संस्था व त्यांची कार्यप्रणाली यांच्या द्वारे मानवी-समाज-जीवन सुखकर होते. व्यक्ती-समाज वा देश यांचे यशापयश   प्रणालींची नीट मांडणी व अन्वयन यावर अवलंबून  असते.

कुठलेही काम करण्यापूर्वी त्या संबंधीचे सर्व पैलू समजून घेत काम करण्याचे तंत्र आत्मसात  करून व्यवस्थित राबवण्याच्या प्रक्रियेवर यशापयश ठरते. म्हणजे प्रणाली समजून घेत नीट काम करणे गरजेचे आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, February 11, 2020

#सहजोक्त.

#शब्दचिंतन
©डॉ.प्रज्ञा देशपांडे
२०१६
काल नवा शब्द कळला...."अपैशुन्य"! 
पिशुन म्हणजे  रानटी,हिस्र हा संस्कृतमध्ये अर्थ माहित होता.

पण माऊलींच्या शब्दकळा नि अर्थगर्भता अद्वितीयच. मराठीतील  भरजरी महावस्त्र म्हणजे "ज्ञानेश्वरी".

माऊली म्हणताता.......

तैसे आपुले निगुणे।पुढीलांचे उणे।
फेडूनिया पाहणे ।तयाकडे॥
वाचूनि न विंधिजे वर्म।नातुडविजे अकर्मी।
।न बोलविजे नामी।सदोष तिही॥
वरी कोणे एके उपाये।पडिले ते उभे होये।
तोचि किजे परीघाये नेदावे वर्म॥
(ज्ञानेश्वरी १६.१૪९.५)

सरलार्थ....
त्याच प्रमाणे आपल्या चांगुलपणाने दुस-यांचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्या कडे पाहावे.
ए-हवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये.पापकर्मामध्ये कोणास गुंतवू नये.आणि ज्या नामामध्ये याच्या दोषांचा उल्लेख होतो अशा नामांनी यास हाक मारू नये.

खरोखर "माऊली" माऊलीच आहेत.
 संस्कृतनुसार "अपैशुन्य"चा अर्थ दुष्टपणा/जनावरपणा नसणे किंवा संस्कारित असणे इतकाच होईल.

पण माऊलीच्या अमृतस्पर्शाने मराठी संपन्न झाली.

अपैशुन्यचा अर्थ (माऊलींच्या नुसार) =दुस-याच्या दोषांवर टीका न करता त्याला सन्मार्गी लावण्यासाठी आपल्या गुणांचा उपयोग करणे.

खरोखर तेथेच  इतकी सहज शब्दश्रीमंती योजली जाते जेथे वात्सल्यपूर्ण निर्मळ मन असणारच.
दुस-याचे दोष दाखवू नये उलट त्याला कमीपणा न आणता आपल्या चांगुलपणाने ते दूर करून त्याला मोठे करावे.....केवळ थोरच...
.छानच ....मननीय...चिंतनीय...वर्तनीय........

माऊली अजोड आहेत. पसायदान तेच मागू शकतात.
🙏🙏🙏
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Sunday, February 9, 2020

#सहजोक्त.



पशु-पक्षी परिसरातले.
अगदी लहान असताना ,बाळाला  आई  ,'एक घास काऊचा ,एक घास चिऊचा' असे करीत अन्न भरवते. मनीमॅऊ ,भूभू ,काऊ ,चिऊ ,हंबा ,बे बें बकरी असे अवती भोवतीचे पशुपक्षी बाळाला कळू लागतात. त्यातच जर कोणाकडे पशुपालन वा शेतीवाडी असेल तर मुलाचा परिसर अभ्यास अनौपचारिक निरीक्षणातून सहज होतो.

जसे जसे मूल मोठे होत जाते ,बोलू चालू लागते तसे घरातील वडिलधारी मंडळी त्याला कहाण्या-कथा सांगतात. त्यातूनही बाळाचा परिचय प्राणीविश्वाशी होतो.  गौतम बुद्धांची हंस कोणाचा ही कथा , बायबलातील  नोव्हाची नौका-कथा ,बौद्ध वाङ्मयातील दानशूर शिबी राजा व कबुतराची कथा , रामायण कथांमधील हनुमान ,वानरसेना ,जांबवान ,आस्वलसेना ,जटायु यांच्या कथा ,    महाभारतातील स्वर्गारोहण प्रसंगातील धर्मराज व कुत्रा यांची कथा ,भागवतातील बाळकृष्ण ,त्याचे मोरपिस ,त्याची बासरी ,त्याच्या गायी व गोपाळांच्या कथा ,नलराजा व सोनेरी हंसाची कथा , स्वामी चक्रधर व त्यांचे पशुप्रेम , पंडित मंडनमिश्रा व शास्त्रार्थ चर्चा करणारा पोपट यांची कथा ,विष्णुपुराणातील दशावतार कथा , महाराणा प्रताप व चेतक घोड्याची कथा , तानाजी मालुसरे  व यशवंती घोरपड ,  पंचतंत्र ,हितोपदेश ,जातक कथा आदी कथांमुळे प्राणीजगताशी परिचय होत होत मुलांचे भावविश्व विस्तारते.
पुढे मूल मोठे झाल्यावर टिव्हीतील अॅनिमेटेड  कार्टून ,नॅशनल जिअॉग्राफिकल चॅनेल ,अॅनिमल प्लॅनेट आदींच्या द्वारे ते सद्य युगातील प्राणीविश्वाशी पुरेसा परिचित होतो.

आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे सूक्ष्म ते अतिस्थूल असे जितके विविध प्राणी या विश्वात आहेत त्यांचा अभ्यास करणा-य़ा प्राणीशास्त्राच्या ९८ च्या वर शाखा न् त्याहून अधिक उपशाखा  आज अस्तित्वात आहेत न् त्या वाढण्याची दाट शक्यता आहे. 
जीवसृष्टी ही वैविध्याने नटलेली आहे. पशु-पक्षी-कीटक यांची दुनिया अगणित विशाल व नाना
त-हेची व  समृद्ध आहे. सृष्टिचक्र हे या  जैवविविधतेमुळेच सुरु असते. जीवसाखळी निसर्गनियमानेच निर्माण झाली आहे. "जीवो जीवस्य जीवनम्।" हे चिरंतन सत्य आहे.
प्राणीशास्त्राच्या अभ्यासातून मानवी जीवन अधिक प्रगल्भ होत असते. मानवाला सहायीभूत , हानीकारक , पूरक , पोषक , अलिप्त असे अनेक प्राणी-पशु-पक्षी-किटक या सृष्टीत आहेत.  आणि त्या सर्वांच्या अस्तित्वाचे महत्व आहे. या निसर्गाची रमणीयता जैवविविधतेमुळेच आहे.

विज्ञान हे असे शास्त्र आहे की ज्यामध्ये दररोज नवनव्या सिद्धांतांची भर पडते .विज्ञानात कोणताही सिद्धांत अंतीम वा ब्रह्मवाक्य नसतात. त्यामुळे सजीवसृष्टीच्या विकासाचे अनेक सिद्धांत आज प्रचलित आहेत ,ते सगळेच सत्य , असत्य वा अर्धसत्य नाहीत तर अफाट ,अनंत अशा सृष्टीला जाणून घेण्यासाठी टाकलेले एक एक पाऊल समजावे. 
जीवसृष्टी केव्हा निर्माण झाली ? कोणी केली ? सृष्टीत किती जीववैविध्य आहे ? प्राण्यांची संख्या किती ? किटकांची संख्या किती ? हा प्राणी असाच कां ? अशी प्रश्नमालिका कोणाच्याही डोक्यात निर्माण होऊ शकते. यांची उत्तरे (विज्ञानेतर) वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून वा दृष्टिकोणातून वेगवेगळी येऊ शकतात. ती सर्वच खोटी वा काल्पनिक असतील असेही नाही न् विज्ञानाच्या कसोटीवर सत्यच उतरतील असेही नाही.

ईसाई धर्मानुसार (उत्प.१ः ११,२०-२५) सृष्टी निर्मितीच्या तिस-या व सहाव्या दिवसांमध्ये परमेश्वराने आपल्या पवित्र शक्तीने वैविध्यपूर्ण ,जटिल ,सुबक व अपरिमित अशी झाडे-पशु-पक्षी तयार केले त्यामुळे आम्हाला ही सुंदर जीवसृष्टी मिळाली."
कुराणानुसार (२२-१८) "सूर्य-चंद्र-तारे ,पर्वत ,  झाडे व चर-जीव अल्लाने बनविले आहे.

जगातील प्राचीनतम ग्रंथ म्हटल्या गेलेल्या वेदांमध्ये  "नासदीय सूक्तातून" व  "मनुमत्स्य कथा" यातून  जीवसृष्टीचा उद्गम सांगितला आहे.

मराठी संतांनी आपल्या अभंगांतून  प्राणीसृष्टींची प्रतिमाने योजिली आहेत.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,
"पैल तो गे काऊ कोकताहे , शकुन गे माये सांगताहे ॥"
संत एकनाथांनी तहानलेल्या गाढवाला गंगाजळ पाजले अशी कथा आहे.
संत कान्होपात्रा म्हणते ," हरिणीचे पाडस ,व्याघ्रे धरियेले , मजलागी जाहले तैसे देवा"।
"पोर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाही "। असे तुकोबा महाराज म्हणतात.
संत जनाबाई पशुंमधील मातृभाव व्यक्त करताना म्हणतात ,
"पक्षी जाय दिगंतरा ,बाळकासी आणी चारा ।
घार हिंडते आकाशी ,तिचे लक्ष पिल्लापाशी ।
वानरी हिंडे झाडावरी ,पिला बांधूनी उदरी ॥

अनेक समाजात अनेक पशु-पक्षांबद्दल परंपरागत समज-गैरसमजही  आढळून येतात. धर्म भावनाही पशुपक्षांच्या संवर्धनादीवर प्रभाव टाकते.
गाय हिंदूंसाठी पवित्र तर डुक्कर इस्लामला निषिद्ध  यावरूनच जनभावनेचा क्षोभ होऊन इंग्रजां विरुद्ध १८५७ चे पहिले बंड पुकारले गेले होते.
कधी कधी अज्ञान व गैरसमजातून पशुविषयक कुप्रथा समाजात रूढ होतात. त्या विज्ञानाच्या मदतीने डोळसपणे दूर कराव्यात. मांजर आडवी जाणे ,कुत्रे रडणे ,घरावर घुबड बसणे , कासव पाळणे ,शरीरावर पिसवा लागणे आदी अंधश्रद्धा आज विज्ञान युगात कोणीच पाळत नाहीत.

कधी कधी धार्मिक समजूतीतून पशुपक्षांचे संरक्षणच होत नाही तर त्यांना समाजमान्यता मिळते.
गणपतीचे वाहन उंदीर ,लक्ष्मीचे वाहन घुबड , कार्तिकेयाचे मोर ,पार्वतीचे सिंह ,शिवाचे नंदी ,विष्णुचे गरुड ,सरस्वतीचे हंस , दत्तगुरुंचे सोबत गाय व चार कुत्रे असत. या देवतांमुळे हे पशुपक्षी पूजनीय व रक्षणीय ठरतात. जैन धर्मातही चोवीस तीर्थंकरांचे चोवीस आराध्य पशु आहेत.
भारत देशाचा राष्ट्रिय  पशु वाघ अाहे तर राष्ट्रिय पक्षी मोर आहे.

आज संपूर्ण जगात २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा केल्या जातो . कितीतरी अासने पशुपक्षीझाडे यांच्या सहजस्थितीवरून बेतलेली आहेत इतकेच नाही तर त्यांची नावेही तीच आहेत. उदाहरणार्थ , कुक्कुटासन
मयूरासन (मोर)
भूजंगासन (साप)
शलभासन (नाकतोडा)
मत्स्यासन (मासा)
शशकासन(ससा)
उष्ट्रासन (उंट)
बकासन (बगळा)
अश्विनी मुद्रा(घोडा)
गोमुखासन (गायीचे तोंड)
इत्यादी इत्यादी.

भारतीय संगीतातील सात सूर  प्राणी-पक्षांच्या मूळध्वनिलहरींवरून बेतलेले आहेत .संगीत दर्पण नामक भारतीय संगीतावरील संस्कृत ग्रंथाच्या १७१व्या श्लोकात सांगितल्या प्रमाणे सात स्वर ,त्यांचे नाव व त्या स्वराचा मूळ पशु वा पक्षी  पुढे दिला आहे. 
सा= षडज् => मोर
रे= ऋषभ=> चातक आणि  पावशा (हिंदीत  पपिहा ) (इंग्रजीत common Hawk cuckoo)
ग= गंधार => बकरा आणि राजहंस
म=मध्यम=> क्रौंच आणि सारस
प=पंचम=> कोकिळ
ध= धैवत=> बेडुक आणि घोडा
नि= निषाद => हत्ती 

प्राचीन भारतीय शिल्पकला सुद्धा तिच्या आविष्कारातून अनेक पशुपक्षी यांची प्रतिकात्मक योजना करते. मंदिरांमध्ये ,लेण्यांमध्ये आपल्याला विविध पशु ,पक्षी आदींचे शिल्प वा चित्र दिसून येतात.
 
 
अशा प्रकारे प्रत्यक्ष जीवनात जवळचे असलेले पशुपक्षी विश्व मानवाला अनेक प्रकारे उपकारक आहे. पशुंमुळे अन्न (दूध ,दुग्धजन्य पदार्थ,अंडे , मांस ,तेल)
वस्त्र (लोकर ,रेशीम,चामडे)   मिळते. शिवाय काही प्राणी आणि मानव यांची संरचना मिळती-जुळती असल्यामुळे अौषधी निर्मिती व संशोधनात अशा प्राण्यांचा उपयोग होत असे.
अतिपूर्वी पासून घोडा , ऊंट , बैल , रेडा , गाढव , हत्ती ,  शहामृग इत्यादी पशुंचा वाहन व यातायात व्यवस्थेसाठी उपयोग केल्या जातो.
शिवाय आर्थिक स्रोताचे आधार पशु असतात.
कितीही यंत्र-तंत्रज्ञान विकसित झाले तरीही शेतीचा प्रमुख आधार पशु-पक्षी आहेतच .
पशु हे मानवाचे सर्वात जवळचे मित्र असतात. हे मुके प्राणी मानवी भावना समजावून घेत ,मानवाची साथ देतात ,मनोरंजनही करतात . गाय,बैल,म्हैस ,घोड़ा ,उंट कुत्रा ,मांजर ,पोपट  (आता पाळणे निषिद्ध आहे) इत्यादी अनेक स्वामिनिष्ठ पशुंच्या कथा आपण ऐकतो. अनेक पाळीव प्राणी त्या त्या  घरातील सभासदच होऊन जातात इतका परस्पर जिव्हाळा निर्माण करतात.
पशु-पक्षी यांचा मानवाशी निरंतर संबंध येतो त्यामुळे मानवीरोग त्यांच्यात न् त्यांचे रोग मानवी शरीरात प्रवेश करतात .याचाही अभ्यास करणारे वैद्यक शास्त्र आहे. आधुनिक पशुरोगवैद्यक शाखे प्रमाणे भारतीय आयुर्वेदात पशुरोगचिकित्सा होत असे . "पालकाप्य"नावाचा हत्तींची सखोल माहिती देणारा प्राचीन संस्कृत ग्रंथ आजही मार्गदर्शक ठरतो.
कौटिलीय अर्थशास्त्रात हेरगिरी करण्यासाठी पशु-पक्षांचा वापर केल्याचा उल्लेख आहे. आजही पोलिसखाते ,हेरखाते तसा वापर करतात.
बादशाही अंमलाच्या काळात कबुतरांकडून संदेशवहनाचे काम करवून घेत असत.
पशु-पक्षी आदी प्राणीमात्रांनी मानवी जीवनाला चहूकडून व्यापले आहे ,मानवी जीवन रंजक न् समृद्ध केले आहे. या प्राणीमात्रांच्या नित्य सवयीचा परिणाम म्हणून भाषेत अनेक म्हणी व वाक्प्रचार निर्माण झाले आहेत. त्या शोधून ,संकलन करून त्या कां निर्माण झाल्या हे लिहिणे नक्कीच ज्ञानवर्धक उपक्रम ठरेल. 
वानगी दाखल काही इथे देत आहे.
१• ) "आयत्या बिळावर नागोबा"
नाग ,साप हे सरिसृप गटातील प्राणी स्वतःहून बीळ बनवत नाहीत. बरेचदा मुंग्यांनी तयार केलेल्या मातीच्या वारूळात ते अतिक्रमण करतात. जेव्हा मुळात काम न करता त्याचा फायदा जो उचलतो त्याला आयत्या बिळात नागोबा म्हणतात.
२• )  बैल गेला न् सोपा केला
चिमणीचे घरटे ,घोड्याचा तबेला ,गायीचा गोठा न् बैलाचा सोपा .  बैलच राहिला नाही न् मागाहून त्याच्या राहण्याची सोय केली. एखाद्या  गोष्टीचे अौचित्य संपल्यावर तिच्यासाठी सोयी करणे.
३• ) हत्तीचे दात खायचे वेगळे न् दाखवायचे वेगळे.
हस्तिदंत हे बाहेर दिसणारे पण अन्नभक्षणासाठी कुचकामी ठरणारे असतात. जेव्हा एखादी गोष्ट दाखवायची वेगळी न् वागताना नेमकी उलटी वाईट असते ,अशा वेळी ही म्हण योजतात.
૪• ) गोगलगाय न् पोटात पाय
शिंपलं पाठीवर घेऊन हळूहळू चालणारा छोटासा शुल्लक प्राणी म्हणजे गोगलगाय. समोर जिवाला धोका दिसला की तो आपले शरीर त्या टणक शिंपल्यात लपवून बचाव करतो. जेव्हा बाहेरून मवाळ, बिचारा वाटणा-या  एखाद्या व्यक्तीच्या मनात  नेमकं काय बरंवाईट चालले आहे ,हे समजत नाही तेव्हा वरील म्हण योजतात.
५• ) सरड्यासारखे रंग बदलणे.
सरडा ह्या प्राण्याला स्वक्षणासाठी रंग बदलण्याचा गुण निसर्गाने दिला आहे. शत्रूला दिसू नये म्हणून  ज्या आधाराने तो राहतो त्याच रंगात तो स्वतःला बदलतो. स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तेव्हा हवे तसे बदलणा-या प्रवृत्तीला वरील वाक्प्रचार योजतात.
६• ) नक्राश्रू ढाळणे.
उभयचर गटातील मगर हा विशालकाय प्राणी. याच्या डोळ्यांवर कायम अर्धोन्मिलित पापणी असते. शिकार गिळताना मगरीच्या डोळ्यातून पाणी येते.  हा वाक्प्रचार मराठी ,हिंदी आदी भाषांमध्ये  शतकांपासून प्रचलित  आहे . २००७ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील प्राणिशास्त्रज्ञ केंट व्ल्हेट (Kent Vlet) याने सिद्ध केले की काही मगरी भक्ष्य गिळताना अश्रु ढाळतात.
जेव्हा त्रास देणाराच सहानुभूती दाखवतो तेव्हा हा
वाक्प्रचार योजतात.

पृथ्वीवरील समृद्ध प्राणिविश्व पर्यावरणाला अतिशय उपकारक ,पूरक आहे. पर्यावरण रक्षणासाठी भारतात वन्यजीव संरक्षण कायदा तयार करण्यात आला. लोकजागृती ,लोकसहभाग याद्वारे तो राबविण्यात येतो. वन्यजीव संरक्षण-संवर्धनासाठी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रयत्न केले जात आहेत.यातूनच आज संपूर्ण भारतात पाचशे हून जास्त अभयारण्ये तयार झालेली आहेत. त्यातील पन्नासहून अधिक "वाघ रक्षण परियोने"करीता आहेत.सध्या भारतात १०५ हून जास्त राष्ट्रिय उद्याने आहेत. वाघ ,सिंह ,हत्ती ,फुलपाखरे ,पक्षी ,एकशिंगी गेंडा ,रेनडियर ,दुर्मिळ हरीण आदी प्राणिविशेषांसाठी स्वतंत्र राष्ट्रिय उद्याने भारतात आहेत. अभयारण्य , उद्यान यात  मूलभूत फरक काय ? कोणत्या राज्यात कोणती व किती आभयारण्ये वा राष्ट्रियउद्याने आहेत ? राष्ट्रियउद्याने वा अभयारण्ये यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो ? जैवविविधता ,समृद्ध अधिवास यांना आभयारण्ये वा राष्ट्रियउद्याने कसे उपकारक ठरतात ? विशिष्ट प्राणी आणि त्या संबंधी माहिती ! इत्यादी अनेक रंजक उपक्रम वा प्रकल्प यातून होऊ शकतात.
तर असे हे प्राणिविश्व मानवाला आंतरबाह्य वेढून आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.










सहजोक्त.

#अौचित्य हरविलेले गाणे...
फ़ुल तुम्हे भेजा है खत में
फूल नही मेरा दिल है
प्रियतम मेरे मुझको लिखना क्या ये तुम्हारे काबिल है .........
त्या काळातील अतिशय गाजलेले श्रुंगाररसप्रधान गीत.
प्रेमात असलेल्या प्रियकराने त्याच्या प्रियतमेला (म्हणजे प्रिया , प्रियतरा असेल की काय त्याला ?? त्यांनाही काही पाठवत असेल कां हा ? ,नसल्या शंका !!)  पत्रातून फूल पाठवणे ,  फूल म्हणजे जणू त्याचे हृदयच , ती चिठ्ठी तिला मिळाल्यावर तिने ती वाचून  मग  प्रेमचिंतन करीत झोपावे , स्वप्न पहावीत न् वरून ती सविस्तर चिठ्ठीत लिहून पाठवावी ......बापरे  किती लंबी प्रोसिजर , किती हा टाईमपास !!!
बर झालं तो फारच स्लोमोशनचा काळ होता. नाट्यसंगीत ऐकायला , जलसा ऐकायला लोकं जात , रात्रभर म्हणे एकेका गाण्याला वन्स मोअर  मिळे , एकेक गाणं  प्रसंगी पन्नास-साठ वेळा म्हटल्या जाई ... म्हणणारे महानच न् ऐकणारे त्याहून भारी !!
इतका वेळ , इतकी फुरसत त्या काळी प्रत्येकाला होती ??  घरी डझनाने पोरं , तरी बाहेर इतके फुरसती रसिक वागणे ,  व्यावसायिक कर्तव्याला कसे न् कितीवेळ देत असावेत , हा प्रश्नच .
आज ही अशी लव्हस्टोरी वास्तवात होऊच शकणार नाही , व्टेंन्टी-व्टेंन्टी , सिक्स वर्ड स्टोरी वगैरे  "अति लघु" (जुन्या काळी फक्त शंकाच होत्या 😂!)  प्रकार सर्वत्र अस्तित्वात आलेय.  "टाईम इस मनी" , हे अंगी भिनवलय सगळ्यांच्या.  त्यामुळे ,

Solomon Grundy,
Born on a Monday,
Christened on Tuesday,
Married on Wednesday,
Took ill on Thursday,
Grew worse on Friday,
Died on Saturday,
Buried on Sunday,
That was the end,
Of Solomon Grundy.
या कवितेत जसं आठवड्याभरात सर्व जीवनपट उलगडून दाखवलाय , तसा फास्ट फॉर्वर्ड जमाना आहे.  ही कविता आजकाल वास्तववादी असू शकेल.
इथे सारच फास्ट होते , मग ते प्रेम असो का प्रेमभंग !  प्रेम झाल्याचे सुख नाही न् भंग झाल्याचे दुःख नाही .
 "दोन अोंडक्यांची होते सागरात भेट , एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ"  , हे तत्त्वज्ञान या जगातील नवतरूण प्रत्यक्ष आचरणात आणतात !! याला प्रचंड तयारी लागते !!
  कुठेही न गुंतता , केवळ साक्षीभावाने ,  फलरहित कर्म करीत रहाणे  पूर्वी मुमुक्षुंना साधत असे , आजकाल प्रेमवीरांनाही छानच साधतं , यात जाति-वय-लिंग-स्तर आदी भेद नाहीच !!
  अशा अतिविकसित जमान्यात वरचे गाणे अौचित्यहीन ठरले तर नवल काय ?
  तुमच्या स्मरणात , जुन्याकाळातील आज अौचित्यहीन ठरलेले गाणे असेल तर नक्की कळवा .
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.