Sunday, February 9, 2020

#सहजोक्त.



पशु-पक्षी परिसरातले.
अगदी लहान असताना ,बाळाला  आई  ,'एक घास काऊचा ,एक घास चिऊचा' असे करीत अन्न भरवते. मनीमॅऊ ,भूभू ,काऊ ,चिऊ ,हंबा ,बे बें बकरी असे अवती भोवतीचे पशुपक्षी बाळाला कळू लागतात. त्यातच जर कोणाकडे पशुपालन वा शेतीवाडी असेल तर मुलाचा परिसर अभ्यास अनौपचारिक निरीक्षणातून सहज होतो.

जसे जसे मूल मोठे होत जाते ,बोलू चालू लागते तसे घरातील वडिलधारी मंडळी त्याला कहाण्या-कथा सांगतात. त्यातूनही बाळाचा परिचय प्राणीविश्वाशी होतो.  गौतम बुद्धांची हंस कोणाचा ही कथा , बायबलातील  नोव्हाची नौका-कथा ,बौद्ध वाङ्मयातील दानशूर शिबी राजा व कबुतराची कथा , रामायण कथांमधील हनुमान ,वानरसेना ,जांबवान ,आस्वलसेना ,जटायु यांच्या कथा ,    महाभारतातील स्वर्गारोहण प्रसंगातील धर्मराज व कुत्रा यांची कथा ,भागवतातील बाळकृष्ण ,त्याचे मोरपिस ,त्याची बासरी ,त्याच्या गायी व गोपाळांच्या कथा ,नलराजा व सोनेरी हंसाची कथा , स्वामी चक्रधर व त्यांचे पशुप्रेम , पंडित मंडनमिश्रा व शास्त्रार्थ चर्चा करणारा पोपट यांची कथा ,विष्णुपुराणातील दशावतार कथा , महाराणा प्रताप व चेतक घोड्याची कथा , तानाजी मालुसरे  व यशवंती घोरपड ,  पंचतंत्र ,हितोपदेश ,जातक कथा आदी कथांमुळे प्राणीजगताशी परिचय होत होत मुलांचे भावविश्व विस्तारते.
पुढे मूल मोठे झाल्यावर टिव्हीतील अॅनिमेटेड  कार्टून ,नॅशनल जिअॉग्राफिकल चॅनेल ,अॅनिमल प्लॅनेट आदींच्या द्वारे ते सद्य युगातील प्राणीविश्वाशी पुरेसा परिचित होतो.

आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे सूक्ष्म ते अतिस्थूल असे जितके विविध प्राणी या विश्वात आहेत त्यांचा अभ्यास करणा-य़ा प्राणीशास्त्राच्या ९८ च्या वर शाखा न् त्याहून अधिक उपशाखा  आज अस्तित्वात आहेत न् त्या वाढण्याची दाट शक्यता आहे. 
जीवसृष्टी ही वैविध्याने नटलेली आहे. पशु-पक्षी-कीटक यांची दुनिया अगणित विशाल व नाना
त-हेची व  समृद्ध आहे. सृष्टिचक्र हे या  जैवविविधतेमुळेच सुरु असते. जीवसाखळी निसर्गनियमानेच निर्माण झाली आहे. "जीवो जीवस्य जीवनम्।" हे चिरंतन सत्य आहे.
प्राणीशास्त्राच्या अभ्यासातून मानवी जीवन अधिक प्रगल्भ होत असते. मानवाला सहायीभूत , हानीकारक , पूरक , पोषक , अलिप्त असे अनेक प्राणी-पशु-पक्षी-किटक या सृष्टीत आहेत.  आणि त्या सर्वांच्या अस्तित्वाचे महत्व आहे. या निसर्गाची रमणीयता जैवविविधतेमुळेच आहे.

विज्ञान हे असे शास्त्र आहे की ज्यामध्ये दररोज नवनव्या सिद्धांतांची भर पडते .विज्ञानात कोणताही सिद्धांत अंतीम वा ब्रह्मवाक्य नसतात. त्यामुळे सजीवसृष्टीच्या विकासाचे अनेक सिद्धांत आज प्रचलित आहेत ,ते सगळेच सत्य , असत्य वा अर्धसत्य नाहीत तर अफाट ,अनंत अशा सृष्टीला जाणून घेण्यासाठी टाकलेले एक एक पाऊल समजावे. 
जीवसृष्टी केव्हा निर्माण झाली ? कोणी केली ? सृष्टीत किती जीववैविध्य आहे ? प्राण्यांची संख्या किती ? किटकांची संख्या किती ? हा प्राणी असाच कां ? अशी प्रश्नमालिका कोणाच्याही डोक्यात निर्माण होऊ शकते. यांची उत्तरे (विज्ञानेतर) वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून वा दृष्टिकोणातून वेगवेगळी येऊ शकतात. ती सर्वच खोटी वा काल्पनिक असतील असेही नाही न् विज्ञानाच्या कसोटीवर सत्यच उतरतील असेही नाही.

ईसाई धर्मानुसार (उत्प.१ः ११,२०-२५) सृष्टी निर्मितीच्या तिस-या व सहाव्या दिवसांमध्ये परमेश्वराने आपल्या पवित्र शक्तीने वैविध्यपूर्ण ,जटिल ,सुबक व अपरिमित अशी झाडे-पशु-पक्षी तयार केले त्यामुळे आम्हाला ही सुंदर जीवसृष्टी मिळाली."
कुराणानुसार (२२-१८) "सूर्य-चंद्र-तारे ,पर्वत ,  झाडे व चर-जीव अल्लाने बनविले आहे.

जगातील प्राचीनतम ग्रंथ म्हटल्या गेलेल्या वेदांमध्ये  "नासदीय सूक्तातून" व  "मनुमत्स्य कथा" यातून  जीवसृष्टीचा उद्गम सांगितला आहे.

मराठी संतांनी आपल्या अभंगांतून  प्राणीसृष्टींची प्रतिमाने योजिली आहेत.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,
"पैल तो गे काऊ कोकताहे , शकुन गे माये सांगताहे ॥"
संत एकनाथांनी तहानलेल्या गाढवाला गंगाजळ पाजले अशी कथा आहे.
संत कान्होपात्रा म्हणते ," हरिणीचे पाडस ,व्याघ्रे धरियेले , मजलागी जाहले तैसे देवा"।
"पोर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाही "। असे तुकोबा महाराज म्हणतात.
संत जनाबाई पशुंमधील मातृभाव व्यक्त करताना म्हणतात ,
"पक्षी जाय दिगंतरा ,बाळकासी आणी चारा ।
घार हिंडते आकाशी ,तिचे लक्ष पिल्लापाशी ।
वानरी हिंडे झाडावरी ,पिला बांधूनी उदरी ॥

अनेक समाजात अनेक पशु-पक्षांबद्दल परंपरागत समज-गैरसमजही  आढळून येतात. धर्म भावनाही पशुपक्षांच्या संवर्धनादीवर प्रभाव टाकते.
गाय हिंदूंसाठी पवित्र तर डुक्कर इस्लामला निषिद्ध  यावरूनच जनभावनेचा क्षोभ होऊन इंग्रजां विरुद्ध १८५७ चे पहिले बंड पुकारले गेले होते.
कधी कधी अज्ञान व गैरसमजातून पशुविषयक कुप्रथा समाजात रूढ होतात. त्या विज्ञानाच्या मदतीने डोळसपणे दूर कराव्यात. मांजर आडवी जाणे ,कुत्रे रडणे ,घरावर घुबड बसणे , कासव पाळणे ,शरीरावर पिसवा लागणे आदी अंधश्रद्धा आज विज्ञान युगात कोणीच पाळत नाहीत.

कधी कधी धार्मिक समजूतीतून पशुपक्षांचे संरक्षणच होत नाही तर त्यांना समाजमान्यता मिळते.
गणपतीचे वाहन उंदीर ,लक्ष्मीचे वाहन घुबड , कार्तिकेयाचे मोर ,पार्वतीचे सिंह ,शिवाचे नंदी ,विष्णुचे गरुड ,सरस्वतीचे हंस , दत्तगुरुंचे सोबत गाय व चार कुत्रे असत. या देवतांमुळे हे पशुपक्षी पूजनीय व रक्षणीय ठरतात. जैन धर्मातही चोवीस तीर्थंकरांचे चोवीस आराध्य पशु आहेत.
भारत देशाचा राष्ट्रिय  पशु वाघ अाहे तर राष्ट्रिय पक्षी मोर आहे.

आज संपूर्ण जगात २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा केल्या जातो . कितीतरी अासने पशुपक्षीझाडे यांच्या सहजस्थितीवरून बेतलेली आहेत इतकेच नाही तर त्यांची नावेही तीच आहेत. उदाहरणार्थ , कुक्कुटासन
मयूरासन (मोर)
भूजंगासन (साप)
शलभासन (नाकतोडा)
मत्स्यासन (मासा)
शशकासन(ससा)
उष्ट्रासन (उंट)
बकासन (बगळा)
अश्विनी मुद्रा(घोडा)
गोमुखासन (गायीचे तोंड)
इत्यादी इत्यादी.

भारतीय संगीतातील सात सूर  प्राणी-पक्षांच्या मूळध्वनिलहरींवरून बेतलेले आहेत .संगीत दर्पण नामक भारतीय संगीतावरील संस्कृत ग्रंथाच्या १७१व्या श्लोकात सांगितल्या प्रमाणे सात स्वर ,त्यांचे नाव व त्या स्वराचा मूळ पशु वा पक्षी  पुढे दिला आहे. 
सा= षडज् => मोर
रे= ऋषभ=> चातक आणि  पावशा (हिंदीत  पपिहा ) (इंग्रजीत common Hawk cuckoo)
ग= गंधार => बकरा आणि राजहंस
म=मध्यम=> क्रौंच आणि सारस
प=पंचम=> कोकिळ
ध= धैवत=> बेडुक आणि घोडा
नि= निषाद => हत्ती 

प्राचीन भारतीय शिल्पकला सुद्धा तिच्या आविष्कारातून अनेक पशुपक्षी यांची प्रतिकात्मक योजना करते. मंदिरांमध्ये ,लेण्यांमध्ये आपल्याला विविध पशु ,पक्षी आदींचे शिल्प वा चित्र दिसून येतात.
 
 
अशा प्रकारे प्रत्यक्ष जीवनात जवळचे असलेले पशुपक्षी विश्व मानवाला अनेक प्रकारे उपकारक आहे. पशुंमुळे अन्न (दूध ,दुग्धजन्य पदार्थ,अंडे , मांस ,तेल)
वस्त्र (लोकर ,रेशीम,चामडे)   मिळते. शिवाय काही प्राणी आणि मानव यांची संरचना मिळती-जुळती असल्यामुळे अौषधी निर्मिती व संशोधनात अशा प्राण्यांचा उपयोग होत असे.
अतिपूर्वी पासून घोडा , ऊंट , बैल , रेडा , गाढव , हत्ती ,  शहामृग इत्यादी पशुंचा वाहन व यातायात व्यवस्थेसाठी उपयोग केल्या जातो.
शिवाय आर्थिक स्रोताचे आधार पशु असतात.
कितीही यंत्र-तंत्रज्ञान विकसित झाले तरीही शेतीचा प्रमुख आधार पशु-पक्षी आहेतच .
पशु हे मानवाचे सर्वात जवळचे मित्र असतात. हे मुके प्राणी मानवी भावना समजावून घेत ,मानवाची साथ देतात ,मनोरंजनही करतात . गाय,बैल,म्हैस ,घोड़ा ,उंट कुत्रा ,मांजर ,पोपट  (आता पाळणे निषिद्ध आहे) इत्यादी अनेक स्वामिनिष्ठ पशुंच्या कथा आपण ऐकतो. अनेक पाळीव प्राणी त्या त्या  घरातील सभासदच होऊन जातात इतका परस्पर जिव्हाळा निर्माण करतात.
पशु-पक्षी यांचा मानवाशी निरंतर संबंध येतो त्यामुळे मानवीरोग त्यांच्यात न् त्यांचे रोग मानवी शरीरात प्रवेश करतात .याचाही अभ्यास करणारे वैद्यक शास्त्र आहे. आधुनिक पशुरोगवैद्यक शाखे प्रमाणे भारतीय आयुर्वेदात पशुरोगचिकित्सा होत असे . "पालकाप्य"नावाचा हत्तींची सखोल माहिती देणारा प्राचीन संस्कृत ग्रंथ आजही मार्गदर्शक ठरतो.
कौटिलीय अर्थशास्त्रात हेरगिरी करण्यासाठी पशु-पक्षांचा वापर केल्याचा उल्लेख आहे. आजही पोलिसखाते ,हेरखाते तसा वापर करतात.
बादशाही अंमलाच्या काळात कबुतरांकडून संदेशवहनाचे काम करवून घेत असत.
पशु-पक्षी आदी प्राणीमात्रांनी मानवी जीवनाला चहूकडून व्यापले आहे ,मानवी जीवन रंजक न् समृद्ध केले आहे. या प्राणीमात्रांच्या नित्य सवयीचा परिणाम म्हणून भाषेत अनेक म्हणी व वाक्प्रचार निर्माण झाले आहेत. त्या शोधून ,संकलन करून त्या कां निर्माण झाल्या हे लिहिणे नक्कीच ज्ञानवर्धक उपक्रम ठरेल. 
वानगी दाखल काही इथे देत आहे.
१• ) "आयत्या बिळावर नागोबा"
नाग ,साप हे सरिसृप गटातील प्राणी स्वतःहून बीळ बनवत नाहीत. बरेचदा मुंग्यांनी तयार केलेल्या मातीच्या वारूळात ते अतिक्रमण करतात. जेव्हा मुळात काम न करता त्याचा फायदा जो उचलतो त्याला आयत्या बिळात नागोबा म्हणतात.
२• )  बैल गेला न् सोपा केला
चिमणीचे घरटे ,घोड्याचा तबेला ,गायीचा गोठा न् बैलाचा सोपा .  बैलच राहिला नाही न् मागाहून त्याच्या राहण्याची सोय केली. एखाद्या  गोष्टीचे अौचित्य संपल्यावर तिच्यासाठी सोयी करणे.
३• ) हत्तीचे दात खायचे वेगळे न् दाखवायचे वेगळे.
हस्तिदंत हे बाहेर दिसणारे पण अन्नभक्षणासाठी कुचकामी ठरणारे असतात. जेव्हा एखादी गोष्ट दाखवायची वेगळी न् वागताना नेमकी उलटी वाईट असते ,अशा वेळी ही म्हण योजतात.
૪• ) गोगलगाय न् पोटात पाय
शिंपलं पाठीवर घेऊन हळूहळू चालणारा छोटासा शुल्लक प्राणी म्हणजे गोगलगाय. समोर जिवाला धोका दिसला की तो आपले शरीर त्या टणक शिंपल्यात लपवून बचाव करतो. जेव्हा बाहेरून मवाळ, बिचारा वाटणा-या  एखाद्या व्यक्तीच्या मनात  नेमकं काय बरंवाईट चालले आहे ,हे समजत नाही तेव्हा वरील म्हण योजतात.
५• ) सरड्यासारखे रंग बदलणे.
सरडा ह्या प्राण्याला स्वक्षणासाठी रंग बदलण्याचा गुण निसर्गाने दिला आहे. शत्रूला दिसू नये म्हणून  ज्या आधाराने तो राहतो त्याच रंगात तो स्वतःला बदलतो. स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तेव्हा हवे तसे बदलणा-या प्रवृत्तीला वरील वाक्प्रचार योजतात.
६• ) नक्राश्रू ढाळणे.
उभयचर गटातील मगर हा विशालकाय प्राणी. याच्या डोळ्यांवर कायम अर्धोन्मिलित पापणी असते. शिकार गिळताना मगरीच्या डोळ्यातून पाणी येते.  हा वाक्प्रचार मराठी ,हिंदी आदी भाषांमध्ये  शतकांपासून प्रचलित  आहे . २००७ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील प्राणिशास्त्रज्ञ केंट व्ल्हेट (Kent Vlet) याने सिद्ध केले की काही मगरी भक्ष्य गिळताना अश्रु ढाळतात.
जेव्हा त्रास देणाराच सहानुभूती दाखवतो तेव्हा हा
वाक्प्रचार योजतात.

पृथ्वीवरील समृद्ध प्राणिविश्व पर्यावरणाला अतिशय उपकारक ,पूरक आहे. पर्यावरण रक्षणासाठी भारतात वन्यजीव संरक्षण कायदा तयार करण्यात आला. लोकजागृती ,लोकसहभाग याद्वारे तो राबविण्यात येतो. वन्यजीव संरक्षण-संवर्धनासाठी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रयत्न केले जात आहेत.यातूनच आज संपूर्ण भारतात पाचशे हून जास्त अभयारण्ये तयार झालेली आहेत. त्यातील पन्नासहून अधिक "वाघ रक्षण परियोने"करीता आहेत.सध्या भारतात १०५ हून जास्त राष्ट्रिय उद्याने आहेत. वाघ ,सिंह ,हत्ती ,फुलपाखरे ,पक्षी ,एकशिंगी गेंडा ,रेनडियर ,दुर्मिळ हरीण आदी प्राणिविशेषांसाठी स्वतंत्र राष्ट्रिय उद्याने भारतात आहेत. अभयारण्य , उद्यान यात  मूलभूत फरक काय ? कोणत्या राज्यात कोणती व किती आभयारण्ये वा राष्ट्रियउद्याने आहेत ? राष्ट्रियउद्याने वा अभयारण्ये यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो ? जैवविविधता ,समृद्ध अधिवास यांना आभयारण्ये वा राष्ट्रियउद्याने कसे उपकारक ठरतात ? विशिष्ट प्राणी आणि त्या संबंधी माहिती ! इत्यादी अनेक रंजक उपक्रम वा प्रकल्प यातून होऊ शकतात.
तर असे हे प्राणिविश्व मानवाला आंतरबाह्य वेढून आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.










No comments:

Post a Comment