आज रथसप्तमी.
आठवण आली लहानपणाची.
कॉलनीत घरोघरी आज लगबग असायची.
सूर्य-रथ अशी रांगोळी तुळशीजवळ काढायची. चुलीवर बोळक्यात खिचडी शिजवायची.
आज हळदी-कुंक कार्यक्रमाचा शेवटचा दिवस.
आता एकदम चैत्रातील हळदीकुंकवाची वाट बघणे.आज माघ महिना लागला.
पण पौषात मकरसंक्रमणापासून घरोघरी सूर्यपूजन होत असे.
दर रविवारी आजी तुळशीजवळ रांगोळीने सूर्यनारायण काढायची.
त्यावर तिळ-गुळ,बोर,ऋतूद्भव फळे ठेवायची. सुगड्यात कोरडी खिचडी ठेवायची.
दुपारी सगळी कामधामं आटपून आजी तुळशीपाशी बसायची . तिच्या मैत्रिणी पण जमायच्या ,तिजारे आजी,बैतुले आजी वगैरे. मग मी माझ्या मैत्रिणी तिथे येऊन बसत असू.
मग आजी "पुषादितवाराची कहाणी" सांगायची.
. सुरवात अशी असे "एका राणोबाई तुमची कहाणी...." पाचसहा कहाण्या आजी सांगायची. प्रत्येक रविवारी त्याच त्याच कहाण्या.
त्या कहाण्या वैज्ञानिक- तार्किक-वास्तविक वगैरे नव्हत्या.बोध- मर्म वगैरे पण नव्हतं त्यात काही. म्हातारी - गावखेडं-झाडं हेच वर्ण्य विषय.सूर्याच्या कृपेने काय मिळाले त्यांना ...ते रसाळ पद्धतीने वर्णन व आजीची सांगण्याची हातोटी. मज्जा यायची ऐकायला. दरवर्षी हाच उपक्रम -तिच्या भाषेत व्रत अखंड सुरु असे.
आज विचार करते, काय मिळाले त्यातून ? नकळत भाषिकसंस्कार झाले ,कल्पनाविश्व समृद्ध करण्याचे कारण झाले ,कहाणी सांगण्याचे बीज रोवले गेले,,नियमिततेने केलेला उपक्रम म्हणजे व्रत हे कळले,भाषेची गोडी लागली..........अजून बरच काही जे शब्दांच्या पलीकडले आहे.
आज वाटते ,आम्ही नशिबवानच . ट्युशन-क्लास-करियर,असे काहीच आमच्या पालकांच्या डोक्यात नव्हते. "फुंकर मारून फ़ुल उमलवण्याची घाई कोणालाच नव्हती" .आमच्या गतीने-कुवतीने आम्ही जात होतो ........खरच सुखीच होतो...
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
३.२.२०१७
छान माहिती मिळाली। धन्यवाद मॅडम।
ReplyDeleteफुंकर मारून फ़ुल उमलवण्याची घाई कोणालाच नव्हती।
ReplyDeleteक्या डायलाॅग मारा है मॅडम।एकदम अचुक।
अगदी साहित्यिक भाषेत सत्य मांडलयं तुम्ही।
आईच्या तुमच्या पिढीने हे सर्व चालु का ठेवले नाहीं???
मला ती खिचड़ी खायची इच्छा होतेय।
अप्रतीम लेख
ReplyDelete