Saturday, December 30, 2017

सहजोक्त

#सहजोक्त .
श्रद्धा-अंधश्रद्धा
वेदांमध्ये *श्रद्धासूक्त* आहेत.
*श्रद्धया कृतम् इति श्राद्धम्* असे मानतात. शिष्याला उपदेश करतात पहिले *श्रद्धस्व* असे सांगतात. भग्वद्गीतेतही *श्रद्धावान् लभते ज्ञानम्* असे म्हटले आहे. *धम्मपदातही* श्रद्धेचे महत्व मानले आहे. श्रद्धा महत्वाचीच आहे. त्याचे आलंबन योग्य वा अयोग्य असू शकते. ते सापेक्षही असू शकते .पण श्रद्धेशिवाय ज्ञान अशक्यच.
*अंधश्रद्धा* हा शब्द मराठीत *लोकनायक बापुजी अणे* यांनी आणला म्हटले तर वावगे ठरू नये. *तिलकयशोर्णव*या त्यांच्या संस्कृत महाकाव्यात "अंधश्रद्धजना: एते नित्यं* *धूर्तै: वंचिता:*" असा उल्लेख आलाय.

श्रद्धा- अंधश्रद्धा ह्या भावनाच आहेत. बरेचदा एखाद्याची श्रद्धा दुस-यासाठी अंधश्रद्धा ठरू शकते. अनेकदा *आपला तो सोन्या दुस-याचा तो कार्टा* अशी अवस्था *श्रद्धा-अंधश्रद्ध* या बद्दल असते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, December 25, 2017

#सहजोक्त



अहंकार आपला असेल तर स्वाभिमान, जवळच्याचा असेल तर गर्व ,नावडत्याचा असेल तर माज ! अहं म्हणजे मी. मीपणा म्हणजेच अहंकार !
तसं बघितलं तर जन्माला आल्यापासून माणूस स्वतःच्या अस्तित्वाला जपत असतो.
 पहिले शरीरभान मग मनोभान मग पुढे वैश्विक भान . . !
 मी>माझं : आम्ही>आमचं मग आपण>आपलं असा उदार प्रवास सुरु होतो.
अहंभाव लहानपणीच असतो असं नाही. उलट लहानपणीचा अहंभाव निरागस, लवचिक असतो.
जसे जसे मोठे व्हावे (वय-अनुभव,पद,पैसा,सत्ता  इत्यादी कोणत्याही दृष्टीने ) अहंकाराची पुटंच्या पुटे चढत जातात. "मला कशाचाच अभिमान नाही" असाही अहंकर असतो.
मोठ्यांच्या अहंकारामुळे प्रत्येक वेळी घर ,समाज भरडल्या जातो. पुराणकाळापासून ते इतिहासापर्यंत येवढेच कशाला वर्तमानकाळातही याची अनेक उदाहरणे सगळ्यांना माहितच असतात. ही उदाहरणेही नेमकी  दुस-यांचीच असतात. "अापण"मात्र "तसे" अहंकारी अजिबातच नसतो!! हे म्हणजे अगदी फिरत्या चाकावरच्या स्थिर मुंगळ्यासारखं असतं !!
तसं बघितलं तर हे जग आणि आपण स्वत:  "मी"पणानेच जोडले आहोत ना ? "आप मर गये डूब गयी दुनिया " हे खरे नाही कां?
"मी" समजणे नि "मीपणा" मिरवणे यात फरक आहे. मीपणा सर्वसमावेशक व्यापक करीत समष्टीपर्यंत वाढविला तर . . .  . .  .. ..   .
तर जगात प्रश्नच उरणार नाहीत. मग जग तरी उरेल कां? हा "अहं"प्रश्न !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, December 24, 2017

#सहजोक्त.



मनात विचार येतात. बरेचदा कार्यकारण भाव नसतानाही वेगवेगळ्या विषयावर अवचित सुचते. त्या सुचलेल्यातील काही शब्दबद्ध होतात. काही नष्ट होतात. मनात शब्द जुळणी होऊन ती नोटपॅडवर टंकणे हा ही मोठा सुयोगच असतो.
मनाजोगा विषय, मनासारख्या शब्दांतून सहज उतरले की सहजोक्त होते. भगवान् गौतम बुद्धाच्या 'उदानापासून' प्रेरणा घेत  सहजोक्तचा  उगम झाला.
सहजोक्तात काय ?  त्यात एक लय असते ,गवसलेला सूर असतो ,सर्वांना जुळवणारा  ताल असतो. मनापासून उतरलेले ते शब्दचित्र असते. त्यात कोणताही रंग असू देत ,संगतीत कमी नसते. प्रत्येक रंग त्याच्या त्याच्या प्रमाणात सुसंगतच असतो. सरमिसळ करतानाही अतिक्रमण न होता एकरंग होतात.
असं सहज सुचलेलं ,आयास-सायास नसलेलं हे सहजोक्त. यातून कोणाला ज्ञान द्यावे ,कोणाला माहिती सांगावी ,मनातील बोच व्यक्त करावी वा कुठलीशी उणीव व्यक्त करावी असा कुठलाच उद्देश नसतो. इतकेच काय ? कुणाला आनंद द्यावा हा ही उद्देश नसतो. निव्वळ सहज ,अगदी सहज ,फक्त सहजच लिहिले असते. जसे झाड ,फुलांनी बहरते ते त्याच्याच विकासाचा ,व्यक्तिमत्त्वाचा भाग असते ;तसेच हे सहजोक्त.
म्हणून ते जेव्हा सुचते ,पूर्ण शब्दांकित होते व टंकल्या जाते तेव्हाच ते सर्वांसमोर प्रकाशित होते.
प्रत्येक विचारात, कृतीत, अभिव्यक्तीत हेतू असवाच ,हा आग्रह कां? मनाचे काही कप्पे निरपेक्ष ,निखळ , निरागस ,निस्संदिग्ध असयलाच हवेत. अन् तेच सहजोक्त मधून चितारते इतकंच.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#चित्रकविता


Saturday, December 23, 2017

#कविता



#कविता
देवकी सारखा त्याग नाही जमणार मला ।
यशोदेचा वात्सल्यपान्हा कसा पाझरणार पुन्हा॥

राधेची रमणीयता कुठून बरे आणू ?
मीरेची भक्ती तरी कशी आंगी बाणू ?।

तू घडवलेस देवा ,तशीच मी आहे ।
तुझ्याशिवाय दुजा मला  ठाव नाही रे ॥

चराचरात तुझेच रूप सदा मी पाहते ।
तुझ्यातच सारं जग मला माझे मिळते ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, December 22, 2017

#शब्दचिंतन .



२२/१२/२०१७
आज जागतिक गणित दिवस . तसं कुठलेच गणित मला जमले नाही. शब्दावर अन् शब्दांमागे असलेल्या भावनांवरच माझं जास्त प्रेम. मग आज "गणित" या शब्दाचाच सांगोपांग विचार करवा असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच .
 दैनिक व्यवहारात आपण खालील शब्द सहज  वापरतो.
 जसे
 ‎गण = हा  शब्द ,समूह या अर्थाने प्रचलित आहे. ,
 ‎याच शब्दला जोडून  गणमान्य ,गणप्रमुख ,गणनायक असे
 ‎गणन = मोजण्याची प्रक्रिया  या अर्थाने  गणना = मोजदाद ,गनती(हिंदी शब्द)
 ‎गणित = मोजलेले या अर्थी मूळ शब्द . पण प्रचलित आहे तो गणित नावाची ज्ञानशाखा म्हणून .,
 ‎नगण्य = न मोजण्या योग्य, गण्य म्हणजे मोजण्या लायक . बरेचदा जनभाषेत नकारार्थी रूप जास्त प्रचलित होते.
 ‎गणनीय= मोजण्या लायक  ,
 ‎गणक = गणना म्हणजे मोजदाद करणारा .
 ‎संगणक = योग्य मोजदाद करणारा.
 ‎प्रगणक = वेगाने मोजणारा .
 ‎वरील सर्व शब्द  गण् =मोजणे या अर्थी असलेला हा मूळ धातूपासून तयार होतात.
 ‎या शिवाय "गणती नसणे " ," न गिनणे" , "खिजगणतीत नसणे " असे वाक्प्रचार पण ऐकण्यात असतात.
 ‎शब्द  निर्मितीचेही गणित समजणे गरजेचे आहे.
 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
 ‎
 ‎

Monday, December 18, 2017

#शब्दचिंतन


कधी कधी चूक काय नि बरोबर काय ,कळेनासे होते. बरेचदा भाषा-व्याकरणाचे नियम वेगळे असतात नि व्यवहारात वेगळाच शब्द असतो. मग गोंधळ होतो.
 "शास्त्रात् रूढिः बलीयसी" म्हणूनच म्हटले जाते.
काही प्रचलित शब्द   बघा . .
प्राथमिक ,निरलस दुरवस्था , अनसूया ,पारंपरिक .
अजून शोधले तर अजून सापडतील.
वर लिहिलेले हे शब्द व्याकरण दृष्ट्या निर्दोष आहेत. पण समाजात यांचे उच्चारण व लेखन बहुतांश वेळा अयोग्य केल्या जाते.पुढे निर्दोष शब्द दिला आहे व त्याच्या समोर प्रचलित दोष काय ते सांगितले आहे.
जसे
प्राथमिक = प्रार्थमिक ,इथे अकारण एक जास्त रफार उच्चारला जातो.
निरलस = निरालस , निर् +अलस =निरलस हे जरी खरं असलं तरी म्हणताना 'निरालस' म्हणतात.
अनसूया =अन्+असूया . पण बरेच जण अनुसया असेच म्हणतात. याला तद्भव म्हणावे की विकृत ??
पारंपरिक = 'इक ' प्रत्ययान्त शब्द भाषेत अनेक आहेत . हा प्रत्यय लागताना मूळ शब्दात काही बदल होतात पण ते समानच असतात. जसं इथेच पाहू.
परंपरा + इक= पअरंपरिक.
स्वभाव + इक= स्वाभाविक
प्रथम + इक = प्राथमिक
मध्यम +इक = माध्यमिक
परिवार +इक = पारिवारिक
वरील उदाहरणात मूळ शब्दातील सुरवातीच्या अकाराचा आ-कार झाला.
भूगोल +इत = भौगोलिक
भूमिती +इक = भौमितिक
भूति +इक = भौतिक
वरील उदाहरणात उकाराचा ओ-कार झाला.
इतिहास +इक = ऐतिहासिक
नीती + इक = नैतिक
इह +इक = ऐहिक
वरील उदाहरणात इकाराचा ऐ-कार झाला.
मूळ शब्द काय ? त्याचे परिवर्तन कसे ? हे जाणून घेतले तर दोषपूर्ण उच्चारण व लेखन टाळाता येऊ शकेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, December 16, 2017

#शब्दचितन

#शब्दचिंतन -वर्णविचार १

वर्णविचार . .म्हटलं की व्याकरणातील एक भाग वाटतो. किंवा भाषाविज्ञानातील प्रकरण. एकूणच  अभ्यासक्रमाशी संबंधित अध्येय घटक असंच मत होतं .ते स्वाभाविक आहे.
बोली ,भाषा कोणतीही असो  ; तिचे मूळ उच्चारातच असते. उच्चाराचे वेगवेगळे ध्वनी असतात. त्या ध्वनींना दर्शवणारे चिह्न असतात. त्या चिह्नांनाच लिपी म्हणतात. प्रत्येक भाषा लिपीतूनच लिहिल्या जाते. लिपीचं मूळ एकक म्हणजे अक्षर .  क्षर म्हणजे नाश ,लोप . अक्षर नष्ट होत नाहीत ,लुप्त होत नाहीत. उच्चारानंतर ध्वनी नष्ट होतात पण लिपीतील चिन्ह तेच तसेच राहतात.
प्रत्येक भाषेची लिपी वेगवेगळी असते.
ललितविस्तर नामक बौद्ध ग्रंथात ६૪ लिपींचा उल्लेख आहे. तर जैन साहित्यात १०० हून अधिक लिपींचा उल्लेख आहे.आज जगात लाखोंच्यावर बोली-भाषा आहेत. पण लिपींची संख्या शेकड्यांच्या अात आहे. भाषाविज्ञानात भाषेचे जसे परिवार आहेत तसे लिपीचेही आहेत.मूळ लिपी तीन प्रकारच्या आहेत.
१)चित्र लिपी = चिनी ,जपानी इत्यादी
२)ब्राह्मी लिपी =भारतीय लिपी व दक्षिण-आशियायी लिपी
३) फोनेशियन = युरोप  ,मध्य आशिया व उत्तर आफ्रिकेतील लिपी.
कोणतीही भाषा कोणत्याही लिपीतून लिहिल्या जाऊ शकते. उदाहरणार्थ मराठीची लिपी देवनागरी आहे पण ती इंग्रजी (रोमन) लिपीतून लिहिता येते. याला 'लिप्यन्तर' असे म्हणतात.
ब्राह्मी लिपीतून देवनागरी लिपी उत्क्रांत झाली. आज संस्कृत,पालि ,मराठी ,हिंदी ,नेपाळी ,कोंकणी ,सिंधी ,कश्मिरी ,डोगरी ,तमांग,बोडो, अंगिका,संथाली ,मैथिली ,मगही ,भोजपुरी,
गढवाली या भाषांसह काही प्रमाणात पंजाबी ,गुजराथी, विष्णुपुरिया ,मणिपुरी ,रोमानी ,उर्दू याही भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात.
स्पष्टोच्चारिता हे देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे .
पाणिनींच्या अष्टाध्यायीत उच्चारणाचे बारकावे अतिशय काटेकोरपणे नोंदवले आहेत. प्रत्येक  स्पष्ट उच्चारणाचे स्वतंत्र चिन्ह  हे देवनागरीचे अजून एक वैशिष्ट्य होय.
आज जगामधे सर्वात जास्त लिहिल्या जाणारी लिपी ही देवनागरी आहे.
भाषा वाक्यांपासून तयार होते. वाक्य शब्दांचे तयार होते. शब्द अक्षरांपासून नि अक्षरे म्हणजेच विशिष्ट उच्चारांचे चिह्न .यांनाच वर्ण असेही म्हणतात .या वर्णांचे भेद असतात.
पुढल्या भागात वर्णां विषयी विचार करू.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे



Monday, December 11, 2017

#शब्दचिंतन

#शब्दचिंतन.
दैनंदिन बोलीत आपण गीता ,सीता ,बाला ,बालिका,आत्मजा ,शिवा ,वृद्धा ,युक्ती ,मुक्ती ,बुद्धी ,पार्वती ,सुंदरी
,स्वामिनी, माधवी असे अनेक नामं ,शब्द वापरतो. हे शब्द स्त्रीलिंगी आहेत.
स्त्रीप्रत्यय ,म्हणून व्याकरणात स्वतंत्र प्रकरण आहे. हे प्रत्यय लागले की स्त्रीलिंगी शब्द तयार होतात. साधारणपणे तीन प्रकारचे स्त्रीप्रत्यय भाषेत अधिकाधिक योजतात.
बहुतेक स्त्रीलिंगी शब्द आकारान्त , इकारान्त व ईकारान्त असतात. पुल्लिंगी पदापासून स्त्रीप्रत्यय लागून हे शब्द तयार होतात.
आकारान्त स्त्रीलिंगी शब्द होण्यासाठी "टाप्" हा स्त्रीप्रत्यय योजतात.
उदाहरणार्थ
गीत + टाप् = गीता
सीत  + टाप् = सीता
ज्येष्ठ  + टाप् = ज्येष्ठा
बाल +  टाप् = बाला
शिव + टाप् = शिवा
रसिक + टाप् = रसिका
सुरेख + टाप् = सुरेखा
आपल्या भाषेत साधारणत:  आकारन्त स्त्रीलिंगी जेवढी नावे आहेत ,ती याच प्रक्रियेनी तयार झालीत.
इकारान्त स्त्रीलिंगी शब्द तयार करण्यासाठी "क्तिन् " प्रत्यय जोडतात. हे प्रत्यय मूळ धातूला लागतात.
उदाहरणार्थ. (मूळ धातूंच्या आधी उपसर्ग वा शब्द  लावले की अजून वेगळे शब्द तयार होतात )
बुध् +  क्तिन् = बुद्धि ,सुबुद्धि ,दुर्बुद्धि
शक् + क्तिन् = शक्ति ,चित्शक्ति
भज् + क्तिन् = भक्ति ,श्रीमद्भक्ति ,पराभक्ति
युज् + क्तिन्  = युक्ति ,संयुक्ति
गम् + क्तिन् = गति, अधोगति ,प्रगति ,संगति
मन् + क्तिन् = मति ,सन्मति ,सुमति
मुच् + क्तिन् = मुक्ति,
कृ  +  क्तिन् = कृति, संस्कृति ,प्रकृति ,विकृति
अशा प्रकारे अनेक शब्द आपल्या व्यवहारात येतात. मराठीत हे सर्व शब्द दीर्घान्त होतात. संस्कृत  व हिंदीत वर लिहिल्या प्रमाणेच असतात.
आता शेवटचा स्त्रीप्रत्यय म्हणजे "ङीप् " प्रत्यय. या प्रत्ययामुळे ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द तयार होतो.
उदाहरणार्थ
सुंदर + ङीप् = सुंदरी
स्वामिन् + ङीप्  = स्वामिनी
नद + ङीप्  = नदी
पर्वत + ङीप् = पार्वती
भैरव + ङीप्  = भैरवी
लेखन + ङीप् = लेखनी
मार्जन + ङीप् = मार्जनी
अशा प्रकारे या स्त्रीप्रत्ययांनी भाषेतील स्त्रीलिंगी शब्द तयार होतात.

आता काही शब्द बघू.
सविता = सवितृ ,सूर्य या अर्थाच्या मुळ पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एकवचन आहे.
गरिमा = गरिमन् या मूळ पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एकवचन .
महिमा ,निलिमा ,रक्तिमा हे ही शब्द गरिमा प्रमाणेच .
याच प्रमाणे मानी ,यशस्वी ,तेजस्वी हे ही शब्द पुल्लिंगी आहेत.

मराठीत असे काही शब्द आहेत ,जे खरेतर पुल्लिंगी आहेत पण आपण ते स्त्रीलिंगी समजतो. .. . चालायचेच . . "शास्त्रात् रूढि: बलियसी ।"
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.






Sunday, December 10, 2017

#शब्दचिंतन.



#शब्दचिंतन
डॉ. प्रज्ञा देशपांडे

पैसा ,धन ,वित्त ,अर्थ ,रुपया ,कमाई ,आय-व्यय,श्री ,मूल्य ,संपत्ती ,ऐश्वर्य.....
पैसेवाले ,धनवंत ,वित्तकोष ,
रुपयेवाले ,आयकर ,धनी,
श्रीमान् ,श्रीमंत ,ऐश्वर्यवान् / ऐश्वर्यवती

साधारणत: पहिल्या ओळीतले -व्यवहारात उपयोगात येणारे ,जीवन सुखी होण्याचे साधन मानतात तर
 दुस-या ओळीत -उपरोल्लिखित साधनयुक्त व्यक्तिविशेषण आहेत.
मन,वन,जन,तन,गण अशाच प्रकारचा धन शब्द वाटतो.
तन म्हणजे वाढणारं .
गण म्हणजे मोजलेलं ,
मन म्हणजे  मनन करणारं.
मन हे क्रियात्मक नि संवेदनात्मक इंद्रिय आहे.
जन म्हणजे जन्माला आलेले ....
तसाच धन असेल कदाचित् .. . . संस्कृतात पाच हजाराहून जास्त मूळ धातू आहेत . प्रत्येक शब्द हा त्या मूळधातूंपासून वेगवेगळ्या प्रक्रियांतून तयार होत असतो. काळाच्या ओघात भाषा-अंतर होत गेले. मूळ धातूंचा अर्थ वा प्रक्रिया कळेनासी झाली.
 ( वेळ नाही ,ही अनध्यायाची मोठी सबब.) असो .
धन महत्वाचे , प्रक्रिया काही कां असेना!
वित्त म्हणजे प्राप्त केलेलं . इथे इच्छा व प्रयत्न दोन्ही अपेक्षित आहेत.
अर्थ म्हणजे इच्छित ,वांछित .
अर्थ् या मूळ धातूपेक्षा प्रार्थ् हा उपसर्गयुक्त धातू अधिक प्रचलित आहे.
 प्रार्थना म्हणजे प्रकर्षाने केलेली अर्थना ( इच्छा) .
ज्यात इच्छाच नाही त्यात "अर्थ" कसा??
रुपया हा शब्द अर्थविस्तार प्रकारात मोडतो.
रुप्यकचा रुपया झाला.
पूर्वी चांदीचा रुपया होता. पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी. मानवतेच्या अवमूल्यनासह रुपयाचेही झाले.
आज नाणं जरी चांदीचे नाही तरी रुपयाच म्हटले जाते. हेच अर्थविस्तार .
आय म्हणजे मिळकत.
वि+आय=व्यय म्हणजे गेलेली कमाई.
श्री म्हणजे लक्ष्मी.
संपत्ती -आपत्ती-विपत्ती हे विविध उपसर्गपूर्वक पत्ती कृदन्त होय. योग्य रितीने (भाळी) पडली तर संपत्ती .
उलटी पडली तर आपत्ती नि विरुद्ध झाली तर विपत्ती.
कमावणे पासून कमाई.
 कम्-काम म्हणजे भौतिक सुखाची इच्छा . इच्छा तेथे मार्ग. कमाई त्याचसाठी करतात अनेक जण.
ऐश्वर्य शब्दाचा ऐशशी सबंध नाही. ईश् = नियंत्रण ठेवणे,ईश्वर जो नियंत्रण ठेवतो तो. ईश्वराचे सारे ते ऐश्वर्य. असा तो मूळ अर्थ.
मग "तळे राखेल तो पाणी चाखेल" या न्यायाने ईश्वर म्हणजे सर्वशक्तिमान. अन् त्याचे हे ऐश्वर्य.
मूल्य म्हणजे मुळचे ,मूळयुक्त. मुळात असेल तरच  येणार नाही तर आडात नाही तर पोह-यात कुठून..
मूल्यच नाही ते सारं अमूल्य.
वाला/वाली ,वान्/ वती ,मान्/ मती हे सगळे प्रत्यय "ज्याच्या जवळ आहे ,असा जो तो/ ती".
या अर्थाने येतो.
कोष म्हणजे ज्यात गुंततो तो ,वित्त गुंतलेते वित्तकोष ( बँक)
एकंदरित वित्त नाही म्हणजे आपत्तीच.
 अर्थ नाही म्हणजे अनर्थ ठरलेला.
शब्द कोणताही वापरा  ,
माणुसकीचे अवमूल्यन होऊ नये इतके बघा.
असो......इतका अर्थ शब्दचिंतनाने केला.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त


 आमचं गावं तसं छोटच पण  महत्त्वपूर्ण स्वातंत्र्यपूर्वकाळात  गावात तीन मालगुजारी घराणे सुखानी नांदणारे. प्रत्येकाची सत्तास्थाने श्रद्धास्थाने ,मिळकत स्त्रोत वेगळे तरी घरंदाजपणा ,शालीनता व दानत सारखीच जवळपास.
  माझी आजी जमीनदाराची मुलगी व  मालगुजाराची बायको. उन्हाळ्यात गावी गेलो की आजी रोज छान छान गोष्टी सांगायची. एकदा आजीने "दाखवणे व असणे" या आशयाचा किस्सा सांगितला. 
  ‎तेव्हा इंग्रजांचे राज्य होते . मालगुजार लोकांकडे अनेक दिवाणजी कारभार सांभाळायला असत. वायदे-कज्जे आदि साठी नेहमी तहसीलदाराकडे जावे लागे. स्वत: मालगुजार क्वचितच जात असे . ही कामं दिवाणजींचीच होती. मालगुजार गणपतराव देशमुख हे त्याकाळी आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.  देशमुखांचे दिवाणजी नेहमी तहसीलदाराकडे जात असत. उची वस्त्रं अंगावर दागदागिणे घालणारे ,रुबाबात राहणी असा त्या  दिवाणजींचा वेष असे. तहसीलदार दिवाणजींना आदराने वागवत असत. एकदा  मालगुजार श्री. गणपतरावांना स्वत:ला तहसीलदाराकडे जाण्याचा प्रसंग आला.
  ‎गणपतराव कचेरीत गेले. जी मंडळी त्यांना अोळखत होती ,ती आदराने उभी राहिली. तहसीलदार उभा झाला नाही. थोडा मागाहून दिवाण आला. तहसीलदार मानाने उभा राहिला. गणपतराव तेथे वाट पहात उभेच होते. दिवाणाला लक्षात आले तो चपापला. त्याने सारवासारव करत गणपतरावांची अोळख करून दिली. खादीचे गुडघ्यापर्यंतचे धोतर ,वर बाराबंडी , गळ्यात असली तर एखादी साखळी एखादी अंगठी असा साधा वेष कायमच घालणारे हेच ते गणपतराव ,अतिश्रीमंत व प्रख्यात मालगुजार  आहेत असं कळल्यावर तहसीलदारही वरमला. शेवटी तहसीलदाराला रहावलं नाही . त्याने गणपतरावांना तसा प्रश्न विचारला. त्यावेळी ते सहज उत्तरले "दिवाणजीची इस्टेट ते अंगावर सांभाळतात. मी काय काय सांभाळू ?"
    ‎बावीस गावांची मालगुजारी असलेले गणपतराव नि त्यांचा नोकर यांचे राहणीमान --विचार व वर्तन  अनुक्रमे घरंदाज प्रगल्भता आणि उथळ खळखळाट दाखविणारे होते.
    ‎ आजकाल 'एक हात लाकूड व सात हात झिलपी' असाच जमाना आहे .   विचार न करता ,पात्रता न बघता स्वत:वर दिवे अोवाळून घेण्याची रीतच काही जणांनी सुरु केलीय.  मूळात आपण किती ? याचा विचार न करता इंप्रेशन मारण्याची एकही संधी  सोडत नाहीत.
   दाखवेगिरीच्या या जमान्यात ‎ हा किस्सा अवचित आठवला. अंगभूत मोठेपणा साधेपणानेच खुलतो हे कळायला पात्रता लागते ये-या गबाळ्याचे ते काम नोहे.
   ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
    ‎
    ‎
    ‎

Friday, December 8, 2017

#शब्दचिंतन.



काल कोणीतरी  *स्वार्थी* शब्द कसा होतो ते विचारले. स्व+अर्थ+इन् = स्वार्थिन् या मूळ शब्दाचे पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे ते . स्वार्थ ज्याच्यात आहे तो स्वार्थिन् .
याच प्रकारचे कितीतरी शब्द आपण रोजच्या भाषेत बोलतो.
शब्द तयार होण्याची प्रक्रिया आनंददायी असते. एकदा ती कळली की शब्द लीलया साधतात.  मानी ,बली ,धनी ,विजयी ,वादी ,मूलगामी ,
दूरगामी, विद्यार्थी ,लाभी ,कृपाकांक्षी ,दर्शनाभिलाषी ,साक्षी ,त्यागी ,तारी,घनपाठी,दशग्रंथी,भाषी, भारी,याजी,दानी इत्यादी सगळे शब्द वर सांगितलेल्या प्रक्रियेने तयार झाले आहेत.

मानी =मानिन् ,
बली=बलिन्
धनी=धनिन्
विजयी =विजयिन्
वादी=वादिन्
मूलगामी = मूलगामिन् ,
दूरगामी=दूरगामिन् ,
यार्थी=विद्यार्थिन्  ,
लाभी =लाभिन् ,
कृपाकांक्षी=कृपाकांक्षिन्  ,
दर्शनाभिलाषी=दर्शनाभिलाषिन्  ,
साक्षी=साक्षिन् ,
त्यागी =त्यागिन्  ,
तारी=तारिन् ,
घनपाठी=घनपाठिन् ,
दशग्रंथी=दशग्रंथिन् ,
भाषी=भाषिन् ,
भारी=भारिन् ,
याजी=याजिन् ,
दानी=दानिन्
संचारी=संचारिन्
वैभवशाली= वैभवशालिन्
हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. यांची स्त्रिलिंगी रूपे असतात.
मानी =मानिनी,
बली=बलिनी ,
धनी=धनिनी ,
विजयी =विजयिनी,
वादी =वादिनी,
मूलगामी =मूलगामिनी,
दूरगामी=दूरगामिनी, विद्यार्थी =विद्यार्थिनी,
लाभी =लाभिनी,
कृपाकांक्षी =कृपाकांक्षिणी,
दर्शनाभिलाषी =अभिलाषिणी,
साक्षी =साक्षिणी,
त्यागी =त्यागिनी,
तारी=तारिणी,
शाली=शालिनी
माली=मालिनी,
धारी=धारिणी ,
वारी= वारिणी,
मारी =मारिणी
शब्द व्याकरणाच्या अंगाने न शिकता असे शिकले तर सहज ,सोपे व रमविणारे ठरतात.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.