Sunday, December 24, 2017

#सहजोक्त.



मनात विचार येतात. बरेचदा कार्यकारण भाव नसतानाही वेगवेगळ्या विषयावर अवचित सुचते. त्या सुचलेल्यातील काही शब्दबद्ध होतात. काही नष्ट होतात. मनात शब्द जुळणी होऊन ती नोटपॅडवर टंकणे हा ही मोठा सुयोगच असतो.
मनाजोगा विषय, मनासारख्या शब्दांतून सहज उतरले की सहजोक्त होते. भगवान् गौतम बुद्धाच्या 'उदानापासून' प्रेरणा घेत  सहजोक्तचा  उगम झाला.
सहजोक्तात काय ?  त्यात एक लय असते ,गवसलेला सूर असतो ,सर्वांना जुळवणारा  ताल असतो. मनापासून उतरलेले ते शब्दचित्र असते. त्यात कोणताही रंग असू देत ,संगतीत कमी नसते. प्रत्येक रंग त्याच्या त्याच्या प्रमाणात सुसंगतच असतो. सरमिसळ करतानाही अतिक्रमण न होता एकरंग होतात.
असं सहज सुचलेलं ,आयास-सायास नसलेलं हे सहजोक्त. यातून कोणाला ज्ञान द्यावे ,कोणाला माहिती सांगावी ,मनातील बोच व्यक्त करावी वा कुठलीशी उणीव व्यक्त करावी असा कुठलाच उद्देश नसतो. इतकेच काय ? कुणाला आनंद द्यावा हा ही उद्देश नसतो. निव्वळ सहज ,अगदी सहज ,फक्त सहजच लिहिले असते. जसे झाड ,फुलांनी बहरते ते त्याच्याच विकासाचा ,व्यक्तिमत्त्वाचा भाग असते ;तसेच हे सहजोक्त.
म्हणून ते जेव्हा सुचते ,पूर्ण शब्दांकित होते व टंकल्या जाते तेव्हाच ते सर्वांसमोर प्रकाशित होते.
प्रत्येक विचारात, कृतीत, अभिव्यक्तीत हेतू असवाच ,हा आग्रह कां? मनाचे काही कप्पे निरपेक्ष ,निखळ , निरागस ,निस्संदिग्ध असयलाच हवेत. अन् तेच सहजोक्त मधून चितारते इतकंच.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे

No comments:

Post a Comment