Friday, February 23, 2018

#सहजोक्त.


"मन मोठं असलं की सारं सामावतं" असा डायलॉग होता एका सिरियलमध्ये. हे विश्वचि माझे घरं , ही अनुभूती यायला विश्वात फिरायला हवे ना? घरालाच विश्व मानले वा आपल्याच भावविश्वात गुरफ़टले तर कसं होईल ?
काल पुरी येथे आली. भारतातून ३० जणं संस्कृतसंगोष्ठीसाठी येथे आलेय. येथे व्यवस्था बघण्याचे दायित्व "सरस्वती विद्यामंदिर" यांच्याकडे आहे. या शाळेचे सर्व विषयाचे अध्यापक व्यवस्थेत गुंतले आहेत. ते संस्कृत भाषक नाहीत. त्यातील बरेच जण उडिया भाषा बोलतात.
काही गोष्टी येथे विशेषत्वाने जाणवल्या. येथे स्त्रीशिक्षिकेला "गुरुमा" म्हणतात तर पुरुषशिक्षकाला "गुरुजी". रस्त्यावरून जाताना जरी शिक्षक दिसले तर जवळ येऊन पादस्पर्श करून "प्रणाम" म्हणतात. इथे सामान्य माणसं प्रेमळ व साधे आहेत.
उडिया भाषेत मराठीसारखेच बरेच शब्द आहे.जसे
"ळ'  हा वर्ण या भाषेत आहे. मराठीपेक्षा जास्त तो योजतात. जसे काळिंदी ,काळांश ,काळ ,लीळा जळ इत्यादी . आज मराठीत आपण जल ,लीला ,काल,कालांश ,कालिंदी  योजतो. उडियाभाषेत
आपल्यासारखेच मावशी ,काका इत्यादी म्हणत‍ात. आपण जसं मुलांना लाडाने पिलू म्हणतो तसं इथे  "पिला". (महर्षी कणादाने अणुसाठी "पिलु" शब्द योजला होता. ) मराठीसाम्राज्य बंगाल पर्यंत पसरले होते . त्याचा तर हा परिणाम नाही ना?
उडिया भाषा पालीभाषेशी सुद्धा साम्य बाळगून आहे. पूर्ण ला ते पालीसारखं पुण्ण म्हणतात. इथेही फक्त "स" उच्चारतात'श,ष' . इतकेच नाही तर श्री च्या ऐवजी "स्री" उच्चारतात.
तशी बंगाली वळणाचीही वाटते. कारण व च्या ऐवजी ब, अन् यच्या ऐवजी ज चा उच्चार जास्त करतात. वीणा ऐवजी बीना ,यदि  ऐवजी जदि असे.

संस्कृतसारखी पण वाटते.  बहुवचनी क्रियापदांसाठी संस्कृतसारखं "अन्ती"  "अन्तु" असं योजतात.  अच्छन्ती (आहेत) ,नहन्ती (नाही अाहेत ) आसन्तु (यावे) ,बसन्तु (बसा)

वर्षानुवर्ष शब्दांचे वळण ,उच्चारण थोडे थोडे भिन्न करता करता काळाच्या अोघात वेगवेगळ्या भाषा तयार झाल्या असाव्यात ,नाही कां?
या संगोष्ठीसाठी भारतातील वेगवेगळ्या प्रांतातून लोक आले आहेत. त्यांचे संस्कृत उच्चारण त्यांच्या त्यांच्या प्रांतिक वैशिष्ट्याला धरून आहे. पण संस्कृतातून  संवाद होतोय. भारतीय भाषांमधिल भाषिक समानता या निमित्त्याने  प्रखरतेने   अधोरेखित होते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment