Tuesday, February 13, 2018

#शब्दचिंतन


त्या दिवशी एक शब्द कानी पडला ,अन्  शब्दचिंतन करायला पुरेसा ठरला.
"दिठी" . ज्ञानेश्वरीत शब्द आलाय "दिठी" .  मराठीतील काही सुरेख शब्द  कालौघात अप्रचलित होत आहेत. नजर ,विचारसरणी या अर्थाने दृष्टी हा शब्द प्रचलित आहे पण याच शब्दाचे पर्याय  दिठी ,दिठ ,दिट हे शब्द फारसे प्रचलित नाहीत.

पालि भाषेत "दिठ्ठी " हा शब्द आहे . "सम्मा दिठ्ठी" म्हणजे सम्यक् दृष्टी. मराठीत ,संस्कृत भाषेत दृष्टी हा शब्द आहे.  संस्कृत भाषेत "दृश्" पहाणे या अर्थाचा मुळ धातू आहे. दृश् +क्तिन् प्रत्यय लागून तयार झालेला शब्द "दृष्टि" .  असं म्हणतात की संस्कृत ही उच्चारणाच्या बाबतीत फारच काटेकोर पण नैसर्गिक आहे . इथेच पहा ना . दृश्  या मूळधातूत क्तिन् प्रत्यय मिळताना दृश् +ति = असे होते.  या सर्व अक्षरोच्चारण  अक्षरशः  (द्+ ऋ+श् +त्+इ )  अशा प्रकारे होईल.
 द् = दन्त्य  म्हणजे दातापासून उच्चारण .
 ‎ ऋ =  मूर्धन्य म्हणजे मूर्धापासून उच्चारण  .
 ‎श् = तालव्य म्हणजे  तालुपासून उच्चारण
 ‎त् = दन्त्य  म्हणजे दातापासून उच्चारण .
 ‎इ= तालव्य म्हणजे  तालुपासून उच्चारण. या शब्दात श्  व त् बदलून अनुक्रमे ष् व ट् होतात.
 ‎
 ‎उच्चारणाच्या तांत्रिक बाजूंकडे न जाता साधारणपणे आपण कसा उच्चार करतो ते पाहू. दृष्टी कि दृश्टी ? यात दृष्टी हा उच्चार नैसर्गिक आहे . कां? तर ऋ,ष् आणि ट् यांचे उच्चारस्थान मूर्धा आहे. म्हणजे ट् म्हणताना जीभ जेथे लागते तेथेच ऋ आणि ष् च्यावेळी लावावी  लागते. उलट श् म्हणताना च् छ् म्हणताना जीभ जेथे लागते (तालव्य) तेथे लावावी लागते. आज आपण ष् चा उच्चारच विसरलोय. पण अशाप्रकारचे शब्दोच्चारण करताना संस्काराने नाही तर नैसर्गिक रित्या आपण बरोबर उच्चार  करतो. खरे तर श् ष् हे दोन वेगवेगळ्या उच्चारणाचे चिन्ह आहेत . असो.
 ‎तर दृष्टी या शब्दाचा आजच्या भाषेपर्यंत झालेला प्रवास मोठा रंजक आहे.
 ‎दृष्टी चे दिठ्ठी झाले पाली भाषेत. कारण पाली भाषेत 'श ,ष ' नाहीत . फक्त 'स ' आहे.  "ऋ" नाही , तसेच रफारही नाही . त्यामुळे दृ चे दि झाले श् तर नकोच होता म्हणून ठ्ठ झाला. हाही नैसर्गिक उच्चार आहे. दृष्टी म्हणताना जसा जोर पडतो तसाच दिठ्ठी म्हणतांनाही पडतो. आपण मराठी लोक ऋ चा उच्चार रु असा करतो तर हिंदीभाषक रि असा करतात. कदाचित तो योग्य असावा. म्हणून तर पाली भाषेत दृ चे दि झाले ना!
 ‎मग प्राकृत मराठीत दिठी झाले. याच दिठी चे दिठ वा दिट झाले. दिट लागणे ,बाळाची दिट काढणे असे वाक्प्रयोग ऐकिवात येतात. आज मात्र मराठीत दृष्टी हाच शब्द अधिकाधिक ऐकायला येतो. दिठी ,दिठ ,दिट मात्र मागे पडलेत.
 ‎आपली भाषा खरच मुळात श्रीमंत भाषा आहे . "आ नो भद्राः ऋतवो यन्तु विश्वत:"  या न्यायाने आपण अनेक शब्द जगातील अनेक भाषांमधून स्वीकारले. जसे दृष्टी साठी नजर ,व्हू ,साईट,नजरिया ,राय असे परभाषिक शब्द तर सहज उपयोगात आणतो. तर  मराठीमुशीतून तयार झालेले दिठी ,दिठ ,दिट तितकेसे प्रचलित कां करू शकत नाही ?
 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment