अर्थ-सार्थ--निरर्थ-अनर्थ.-व्यर्थ-स्वार्थ-परार्थ-परामार्थ-यथार्थ-कृतार्थ......वगैरे वगैरे...
एकाच मूळापासून तयार झालेले शब्द.अर्थ हा मूळ कृदन्त. "अर्थ्"या मूळधातूपासून झालेला.
त्या मुळधातूचा अर्थ "इच्छा करणे" हा आहे.
तसेही जिथे इच्छा असते त्यातच अर्थ असतो.
अर्थ चा एक अर्थ पैसा हाही आहे .अन् तो तर स्वत: सिद्धपण आहे. "जोवर पैसा तोवर बैसा" खरेच असते व्यवहारात. पैसा नाही म्हणजे काहीही अर्थ नाही.
शब्दांना अर्थ असावा ,ही जुनी,भाबडी समजूत आजकाल खोटी ठरतेय.
जुन्याकाळी 'नामकरण' करतांना अर्थपूर्ण नाव बघून मग ठेवायचे. आता 'नेट लावून'अर्थ शोधतात.....प्रगती...दुसरे काय?
देवादिकांपासून चराचरातील प्रत्येक नाव सार्थच होते. वानगी दाखल काही नामे पाहू.
राम- रम् म्हणजे रमणे ,ज्यात मन रममाण होते ,तो राम.
कृष्ण- कृष्-कर्ष् =ओढणे ,खिचणे . जो चित्त खेचून घेतो ,तो कृष्ण.
राधा-राध् म्हणजे ऐश्वर्य . जिच्यात ऐश्वर्य आहे ती राधा.
माधच-मा म्हणजे लक्ष्मी. धव म्हणजे पती. माधव म्हणजे लक्ष्मीपती.
विष्णु -विश् म्हणजे शिरणे. जो चराचरात शिरलाय ,,भिनलाय तो विष्णु.
शंकर -शम् म्हणजे शांत/कल्याण . जो शमन करतो,कल्याण करतो ,तो शंकर.
दुर्गा- "दुर् "उपसर्गाचा अर्थ 'कठिण' असा आहे. जी जाण्यास कठिण ती दुर्गा. (जिला पटवणे सोपे नाही, ती दुर्गा.)
खग- ख म्हणजे आकाश. ग म्हणजे जाणारा. आकाशातून जाणारा खग.
गंगा- जी सतत गतिशील आहे ती. समोर समोर जाणारी.
अरुन्धती -जिला कोणी अडवू शकत नाही , नि जी कोणासाठी अडत नाही.
अश्या प्रकारे पाहात गेले तर प्रत्येक शब्द सार्थ ठरतो. खरेच सार्थच असतात शब्द.फक्त समजून घ्यायला इच्छा -पात्रता असावयास हवी. अर्थाचेही तीन स्तर असतात.सामान्यांना पहिल्याही स्तरातील अर्थ कळला तरी त्यांचे आयुष्य "सार्थ" होऊ शकते.प्रत्येकाने सखोल असणे गरजेचे नाहीच.
तर अर्था सह म्हणजेच स-अर्थ म्हणजे सार्थ.
मग अर्था विना म्हणजे निर-्अर्थ म्हणजे निरर्थ.
अन्-अर्थ चा मात्र अर्थ संकट / धोका असा रूढ झालाय. अनर्थकारी चिंतन नकोच.
व्यर्थ- वि-अर्थ म्हणजे ज्यातून अर्थ निघून गेलाय तो.यावरही व्यर्थ कशाला चिंता ?
स्वार्थ- हा फ़ारच महत्वाचा. "स्व" म्हणजे आपण. स्व साठी अर्थ ,म्हणजे स्वार्थ . "आप मर गये, डूब गयी दुनिया"आपणच नसू तर कशालाच काही अर्थ नाही ना! म्हणून स्वार्थ पहिले साधावा...(काहींना उपजत जमतो.)
परार्थ- पर म्हणजे परका. दुस-यासाठी करणे म्हणजे परार्थच ना. परोपकार..
परमार्थ- परम् म्हणजे श्रेष्ठ . ज्यातून मोठा,गहन अर्थ निघतो, तो परमार्थ.
यथार्थ- यथा म्हणजे जसे अहे तसे. म्हणजे वास्तव. म्हणून यथार्थ ज्ञान गरजेचे.
कृतार्थ - कृत म्हणजे केलेले. जे केले त्यामुळे श्रेय मिळाले की कृतार्थ होणारच ना!
अर्थ शोधता शोधता इतके शब्दार्थ उकलले. अर्थात यासाठीच तर शब्दचिंतन आहे. शब्दांचा अर्थाशी सार्थ संबंध असतोच. अर्थाचे अनर्थ करण्यापेक्षा चिंतनातून प्रत्येकाने शब्दातील सार्थकत्व शोधावे. हा व्यर्थ खटाटोप नाही.
"केल्याने होत आहे रे ,आधी केलेचि पाहिजे. "!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment