काही दिवसांपासून मनावर एक प्रकारचे मळभ अाले होते.वेगवेगळ्या कल्लोळांचे काहूर माजले होते. मग आतल्या आत वेगवान विचारांचे चक्र फिरू लागले.
सहज एकेक उदाहरणं आठवायला लागले. अवतारी कृष्ण ज्याच्यावर सगळे जण भरभरून प्रेम करायचे व ज्याने कोणावरही अन्याय होऊ दिला नाही त्याचा द्वेष करणारा पौण्ड्रराज होताच ना ! कृष्णाच्या पासंगालाही आपण पुरू शकत नाही हे माहित असूनही सारखे बरोबरी करीत हिरस करणे त्याने सोडले नाही. कृष्णाच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची जाणीव असूनही अनेकजण पौण्ड्रराजाची भलामण करीतच होते ना!
अखिल जगाला करुणा-मैत्री शिकविणा-या भगवान बुद्धाचा द्वेष त्यांचाच भाऊ देवदत्त अगदी लहानपणापासून करीत होताच ना ? भगवान बुद्धाच्याच हयातीत देवदत्ताने बौद्ध धर्माची वेगळी शाखा काढलीच . त्याही काळात भगवान बुद्धांना सोडून देवदत्ताकडे अोढा असलेले भिख्खू होतेच होते.
या जगात अकारण द्वेष वा राग करणारे लोकं असतातच . जसे परोपकारी वृक्षवल्लींतही विषारी झाडं निपजतातच . तसेच चांगल्या-भल्या मानवी समूदायात कोणी कोणाचा अकारण द्वेष करूच शकतात.
या द्वेषाचेही अजब गणित असते. त्या व्यक्तीचा चांगुलपणा माहित असून देखिल उगाच त्याच्याबद्दल समाजात मन प्रदूषित केल्या जाते. त्या व्यक्तीची व आपली कोठेच तुलना होत नाही ,तो आपल्या वाटेत आडवा येत नाही हे माहित असून तरीही अकारण त्याच्या बद्दल आकस ठेऊन त्याचा
पाण उतारा करणे ,त्याचा मानभंग करणे ,त्याला हीन वागणूक देणे ,त्याच्या बद्दल जनभावना कलुषित करून त्याला एकटे पाडणे ,त्याचे मनोबल खच्चीकरणे असे नाना लटपटी ,खटपटी केल्या जातात.
भगवान बुद्ध अशा प्रवृत्तीच्या लोकांनाही "मन प्रदूषक देवता" म्हणतात, मनाचा मोठेपण असावा तर असा.
जग अशा वेगवेगळ्या वृत्तीच्या लोकांनी कायमच भरलेले आहे. सद्वृत्ती नि असद्वृत्ती ,एकाच वेळी नांदत असते. बरे एकच व्यक्ती कायम वाईट वा कायम चांगला नसतो. सद्गुण समुच्चय जास्त वा कमी हे प्रत्येकातच असतात.
पण मानवी मन अलौकिक विभूतींच्या मनासारखे महान नाही ना ! जगासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वरही लोकांच्या विकृत वागण्यामुळे निराशून कुटीत कोंडून बसले होतेच ना! मग मुक्ता बाईने ,"जरी जग होता वन्ही ,संते सुखे व्हावे पाणी " असं समजावत ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हटलेच ना !
कधी तरी मन असं निराश होतं . पण ती त्याची सहजवृत्ती नाही. शांतपणे चिंतन करून त्या निराशेवर मात केल्याच जाते. पण "मनप्रदूषक देवतांमुळे" जो कालापव्यय होतो तो दैव म्हणून सोडून द्यावा कां?
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment