एक गोष्ट लहानपणी ऐकली होती. जगज्जेता अलेक्झँडर भारतात आला तेव्हा त्याच्या मिरवणुकी समोर एक फकिर वातडलेलं चामडं पायदळी तुडवायचा. त्या चामड्याचे एक टोक पायाखाली दाबले की दुसरे टोक वर यायचे . दुसरे टोक दाबले की पहिले वर यायचे. फकिराचे असे अनाकलनीय चाळे पाहून अलेक्झँडर रागाने त्याला सैनिकांकरवी पकडून स्वत: समोर उभे करवतो व जाब विचारतो. फकीर स्वत:त धुंद असा राख उडवायला लागतो. राजा अधिकच चिडतो. मग तो फकीर काहीतरी अगम्य बोलतो. राजाचा जाणता अमात्य अर्थ सांगतो ," तू इथे नियंत्रण करशील तर तिथे दुफळी माजेल. तेथे बंड शांत करशील तर येथे रण माजेल. सगळं ऐश्वर्य मिळेल पण चैन नाही. शेवट तर राख होणारच अाहेस ."
आज तंत्रज्ञानाने परिपूर्ण व अत्याधुनिक जीवन जगत असलेला नव्या युगातील मानवी समाज आज इतकां अस्थिर ,गोंधळलेला ,तृषार्त कां ?
कोणतेही क्षेत्र बघा ,आंतरिक असंतोष खदखदताना दिसतोय. कामाचा ताण ,कामामुळे दबाव ,शोषण ,पिळवणूक जास्तच होताना दिसतेय.
आपल्या क्षेत्रात सुखासमाधानाने जगताना कोणीच आढळत नाही.
उच्च वर्गीय असोत ,मध्यम वर्गीय असोत वा निम्न वर्गीय , जो तो मुखवटे धारण करूनच वावरतो.
राजकारण ,चित्रपट , समाजसेवा ,बौद्धिक क्षेत्र असो वा व्यापार . कोणतेच क्षेत्र समाधानी दिसत नाही. मनापासून अगदी आवडीने निवडलेल्या क्षेत्रातही जीवघेणी स्पर्धा हैराण करणारी ठरतेय. आरंभिक स्तरापासून ते चरम स्तरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रचंड अस्थिरता ,उथळपणा ,फोलपणा जाणवतोच .
माणसाला जगायला नेमकं काय लागतं ? हेच कळेनासे झालेय या गोंधळात.
सरोवरावर पसरलेला शेवाळाचा वा तेलाचा तवंग जसा सूर्यकिरणांना तळापर्यंत पोहचू देत नाही तसं जगात सवंग गट खरं ज्ञान ,खरं सुख ,खरं समाधान ज्यातून मिळेल ते सर्व लोकांपर्यंत पोहचूच देत नाहीत.
जिकडे तिकडे दबावगट ,लॉबिंग ,चाटुगिरी . . खरं ध्येय काय ? काय मिळवायचे ? तेच कळेनासं करतात हे असे तवंग !
बाहेर हा असा गोंधळ राहणारच पण किमान स्वतःला ,कुटुंबियांना व मित्रमंडळींना मात्र या दुष्टचक्रातून बाहेर काढावे . अन्यथा अलेक्झँडर होणे अटळच !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment