झाडाख्यान .........
"निसर्ग लहरी झाला आहे ,बदलला आहे" ; अशा आशयाची वाक्य जेव्हा कानावर पडतात तेव्हा मी त्यांना "चेतनगुणोक्तिची" उदाहरणे मानते. मानवी भावभावनांचे आरोपण निर्जीव वस्तु वा निसर्गावर करणे म्हणजे चेतनगुणोक्ती.
निसर्ग कधीच बेभरोश्याचा ,लहरी नसतो. ही गुणवैशिष्ट्ये मानवाची असतात अन् तेच निसर्गावर अारोपित होतात.
"मानव हा बुद्धिमान प्राणी आहे ,निसर्गाची श्रेष्ठ कलाकृती आहे",असे म्हणत मानवच स्वतःची पाठ थोपटून घेतो कारण बाकी चराचर सृष्टी स्वसर्जनात इतकी मग्न आहे की मानव काय विचार करतो हे त्यांच्या गावी पण नसते.
किती तरी गुणं निसर्गाकडून आत्मसात करायला पाहिजेत. पहिले म्हणजे नैसर्गिक वागणे. शरीरधर्माला अनुसरून कुठेही दांभिकता ,वंचकता न करता सरळ सरळ जगणे.वाघ न् हरिणाचा भक्षक-भक्ष्य संबंध आहे . पण म्हणून वाघ चोवीसतास खायखाय करीत नाही ना सुटत ? किंवा दिसलं हरीण की खा ,असेही करीत नाही.
मुंगस न् साप यांचे हाडवैर आहे. क्षणोक्षणी वैरातून हिंसा वा कायम द्वेष यांच्यातही पहायला मिळत नाही.
"तडजोड तीही स्वतःला त्रास न करून घेता", हा ही मोठा गुण निसर्गाकडून शिकण्यासारखा आहे.
मानवी हव्यासापोटी जंगलकटाई,नद्या अडवून बांध वा धरणे बांधणे इत्यादी मानवी उपक्रमांमुळे खरे तर प्राणी ,झाडे निर्वासित होतात ,नद्यांची स्वाभाविक स्थिती बदलते. तरी तो निसर्गच आहे म्हणून पूर्ववत नाही पण प्राप्त परिस्थितीतही स्वधर्म (म्हणजे स्वाभाविक वर्तन ) न सोडता वागतो.
माझ्या अंगणात जुई (हिंदीत जुही) चा वेल आहे. अंगण छोटेच आहे न् त्यात जाई-मोगरा यांची कमान केली आहे. चमेलीचा वेल काढून टाकला ,गुलाबाचा वेल खुरटला होता म्हणून काढला. मात्र हा जुईचा वेल वाढवायला तशी जागा अपुरीच पडत होती. मग तो झाडासारखा कंपाऊंडच्या जाळीशी झुपका करून वाढू दिला. सहज कालपरवा पाहिले तर त्या नाजुक वेलाने सर्व अडथळे दूर करून भिंतीचा आधार घेत वरच्या गॅलरीवर स्वतःला प्रस्थापित केले. वा-याच्या झुळुकी सरशी छान डोलणारा तो वेल ,कालियामर्दनानंतर वेणु वाजवत निरागस हसणा-या बालमुकुंदाप्रमाणे वाटला मला !
वेलाला ना हात ना पाय ना डोळे तरी त्याची ती जिजीविषा (जगण्याची इच्छा) व विजिगिषा (जिंकण्याची) पाहून भारावल्या सारखे झाले.
बर ; जिंकण्याची इच्छा करत असतांना कोणालाही नमवावे ,हरवावे ही वृत्ती त्या वेलात दिसली नाही. हा वेल बहरला ,उंच झाला ,समोर गेला अशी असूया बाजूच्या मोठ्या जास्वंदीलाही वाटली नाही.
खरोखर झाडे ,पशुपक्षी ,एकूणच निसर्ग यांच्याकडून किती शिकण्यासारखे आहे ना ?
मानवाला उगाच वाटते की तोच चराचरातील सर्वोत्तम घटक आहे !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment