Thursday, February 20, 2020

#चिंतनात्मक लेख.

#प्रणाली
 गुलाबाची कळी उमलताना बघितली कां ? चाफ़्याच्या फुलाला किती पाकळ्या असतात ,त्या नेहमी बदलत असतात कां ?  मुंग्यांची अोळ कण नेताना पाहिली ?  पक्षांचे थवे आकाश झाकोळून मावळतीला जाताना पाहिले ? वेगवेगळ्या वेळ-प्रसंगी कुत्रे कसे वेगवेगळे आवाज काढतात ? पाऊस पडल्यावर विविध ठिकाणी कुत्र्याच्या छत्र्या उगवतात ,ते नेमक्या कुठे व कां ? दूरवर  नेऊन सोडलेलं मांजरेचे पिलू न चुकता घरी कसे परतते ?  पहिला पाऊस पडल्यावर येणारा मातीचा सुगंध अनुभवलाय ? सूर्य बाराही महिने पूर्व दिशेला नि एकाच ठिकाणून उगवतो कां ? दिवसा चंद्र दिसतो कां ? इंद्रधनुष्य नेहमीच दिसत कां नाही ? ऊन्ह-वारा-थंडी-पाऊस कमी येवो अथवा जास्त , झाड त्याचे बहरणे सोडते कां? 



 आपल्याला रोजच्या झोप-जेवण-व्यायामादींच्या  निश्चित वेळा ठरल्या असतील तर त्या त्या वेळी ते काम झाले नाही तर अस्वस्थ होतो कारण शरीरात असलेले जैविक घड्याळ ! 

 विविध भौगोलिक वातावरणात उगविणा-या वनस्पती वा जगणारे प्राणी , हळूहळू परिवर्तीत केलेल्या वातावरणात सहज तग धरतात. इतकेच नाही तर त्यांची पुढील पिढी नव्या वातावरणार जोमाने वाढते.

 शिक्षकांसमोर सतत एकमेकांचे स्पर्धक वा  कट्टर विरोधक विद्यार्थी ,आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांशी छान जुळवून घेतात.

 समजा आपल्याला दिल्लीला जायचे आहे , आपण काय करणार ? पहिले तर आपलं गाव ते दिल्ली याचे अंतर शोधणार मग पर्यटन साधनांची माहिती घेणार ,मग तेथे कुठे, कसे किती दिवसांचे काम आहे त्यानुसार तेथील निवासाची व्यवस्था , तिथे जेवण-फिरणे आदींची व्यवस्था बघणार. दिल्लीतील परिचितांशी संपर्क करणार मग  आपल्या सोयीनुसार बस , रेल्वे , विमान आदींचे तिकिट काढायचा विचार पक्का करणार , होय ना ?


वर उल्लेखलेले अनेक प्रश्न वा दाखले व त्याची उत्तरे  मिळविण्यासाठी काही प्रक्रिया , विधी , व्यवस्था वा तयारी करून निरीक्षणे नोंदवावी लागतात , तिला साधरणपणे प्रणाली असे म्हणू शकतो. 
 जीवसृष्टी , निसर्गचक्र , जलचक्र , ऋतुचक्र , जीवसाखळी , अन्नसाखळी इत्यादी सर्व बाबी एका सुसूत्र प्रणालीने होत असतात.

मी > माझं अंतरंग > बाह्य विश्व > मानव निर्मित  कृत्रिम व्यवस्था ; असा  छोटा धांडोळा घेतला तर  प्रणाली म्हणजे नेमकं काय , ते लक्षात येईल.

 मानवी शरीर रचना व शरीर क्रिया या दोन मुख्य शाखांचा अभ्यास केला तर लक्षात येते की अस्थीसंस्था , स्नायुसंस्था , मज्जा संस्था , रक्त संस्था, चेता संस्था , हृदय कार्य , मेंदू कार्य , यकृत कार्य , मुत्रपिंडकार्य  इत्यादी एकेकाची नीट पारखणी  केली तर मानवी-जीवनात प्रणाली किती महत्वाची आहे , हे लक्षात येते. कोणती संस्था वा इंद्रिय , श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो उलट मानवी शरीरातील इतक्या गुंतागुंतीच्या अनेक संस्था वेगवेगल्या असूनही एकमेकांशी सुसंगत असतात.   निव्वळ मानवी शरीरच नाही तर कोणत्याही सजीवाची शरीररचना व कार्य यांचा अभ्यास केला तर प्रणाली म्हणजे काय हे नीट कळेल.
  परिपूर्ण विकसित मेंदू व हृदय असलेला मानव व मानवेतर सजीव यांच्यातही परस्पर  साहचर्य , समन्वय , सहसंबंध असतोच असतो.   "जीवो जीवस्य जीवनम्।",  "जियो अौर  जिने दो " असे सारे सजीव एकमेकांशी संबंध्द असतात.
  दोन व्यक्ती वा समुदाय यांच्यातही वेगवेगळी आंतरक्रिया घडत असते." दोन अधिक दोन म्हणजे चार " , हे गणितीय सत्य , मानवी वर्तनशास्त्रात फेल होते. परस्पर आंतरक्रिया कोणत्या प्रणालीवर आधारलेली आहे त्यावर उत्तर अबलंबून आहे .

बुद्धिमान व वर्तनवादी मानवाने स्वतःचे जीवन सुखी , आरामदायी व समाधानी करण्यासाठी विविध संस्थांच्या रूपानी अनेक प्रणाली विकसित केल्या आहेत. कुटुंब संस्था , विवाहसंस्था , समाजिक संस्था , शिक्षण संस्था , नागरी संस्था , न्यायसंस्था , वितरण संस्था , संरक्षण संस्था , सहकारी संस्था ,  धर्मादाय संस्था ,धर्मसंस्था ,  पर्यावरण संस्था , परिसंस्था , पशुपालन संस्था , वित्त संस्था इत्यादी इत्यादी अनेक संस्था व त्यांची कार्यप्रणाली यांच्या द्वारे मानवी-समाज-जीवन सुखकर होते. व्यक्ती-समाज वा देश यांचे यशापयश   प्रणालींची नीट मांडणी व अन्वयन यावर अवलंबून  असते.

कुठलेही काम करण्यापूर्वी त्या संबंधीचे सर्व पैलू समजून घेत काम करण्याचे तंत्र आत्मसात  करून व्यवस्थित राबवण्याच्या प्रक्रियेवर यशापयश ठरते. म्हणजे प्रणाली समजून घेत नीट काम करणे गरजेचे आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

6 comments:

  1. सुंदर चिंतन .विज्ञानाच्या काही संकल्पना सोप्या भाषेत लिहायला सुरुवात करा .गरज आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. सांगा सर , तुमच्या मार्गदर्शनाने लिहिल

      Delete