मराठी भाषा व संस्कृती अतिशय प्राचीन व समृद्ध आहे. तिचा अभिमान सर्वच मराठीजनांना असणे स्वाभाविक आहे.
हा अभिमान कोणी कसा जोपासावा न् व्यक्त करावा ? हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य !
शरीराचा ताप मोजायला तापमापक असते पण भावना मोजायचे यंत्र नसते. कधी-कधी हा भाषिक-अभिमान डोकेदुखी ठरतो. आजकाल "आम्ही म्हणू तीच मराठी, बाकीच्यांची अशुद्ध /भेसळयुक्त". हा भाव काहीजणांमध्ये फारच तीव्र असतो.
नुकतीच होळी , धुळवड व रंगपंचमी होऊन गेली. या दरम्यान , 'रंगपंचमी वेगळी , आपल्यात रंगपंचमीलाच रंग खेळतात , होळीचे दुसरे दिवशी हिंदीभाषक विशेषतः सिनेमाप्रभावाने रंग खेळतात' , वगैरे अर्थाच्या अनेक पोस्ट सोशलमिडियावर पडलेल्या पाहिल्या.
त्यावरून सहज विचार आले न् ते शब्दात मांडले.
मूळात भाषेतील शब्दांना अव्याप्ति-अतिव्याप्ती , सामान्यीकरण-वैशेषीकरण असू शकते.
जसे तेल म्हणजे तिळापासून बनलेले या मूळ-अर्थाने असलेल्या शब्दाचे सामान्यीकरण करून व्याप्ती वाढवत वाढवत खोबरेल-तेल , जवस-तेल वगैरे शब्द तयार झाले. मेथी+कैरी यांचा खाद्यपदार्थ मेथंबा झाला , त्याचेच सामान्यीकरण "पेरूचा मेथंबा" , या पदार्थाने झाले.
वर्षाऋतूपासून सुरू होणारे संवत्सर म्हणून वर्ष हा मूळ शब्द तयार झाला . त्याची अतिव्याप्ती होत , चैत्रापासून काय किंवा जानेवारीपासून काय , सुरु होणारे 'संवत्सर' जनरीतीने 'वर्ष'च ठरते.
तसेच काहीसे इथे आहे. होलिकादहन झाल्यावर दुसरे दिवशी तिथली राख अंगाला लावणे व होळीच्या निखा-यांवर पाणी तापवून स्नान करणे अशी जुनी रुढी होती. तिचेच उत्सवीकरण होऊन त्याच दिवशी परस्परांना पाण्याने भिजवणे , राख (आजकाल रंग) एकमेकांवर उडवणे (म्हणून धुळवड) सुरु झाले . यालाच सर्वसामान्य रंगपंचमी म्हणू लागले. "रंगपंचमी" या शब्दाचे इथे सामान्यीकरण झाले. "पंचमी" ही तिथी पौर्णिमेनंतर साधारणपणे पांच दिवसांनी येते वगैरे 'तिथी-वार-नक्षत्र' असे पंचांग सामान्यांच्या डोक्यात येत नाही. त्यामुळे 'आम्ही दुसरे दिवशी रंगपंचमी साजरी केली' , या वाक्यात गैर असे काही वाटून घ्यायची गरज नाही. होळीनंतर येणा-या पंचमीला लहानमुलांना गुलाल लावतात , अोवाळतात न् गाठी घालतात , त्याला 'शिवशिमगा' म्हणतात. मराठमोळ्या उत्सवांच्या विविध चालिरीती दर बारा कोसावर बदललेल्या आढळल्यास नवल ते काय ? वैविध्यपूर्ण , नांदती न् ऐश्वर्यवती सुसंस्कृती असलेली ही मराठीची नगरी आहे.
खरे तर कोणतीही "भाषा" मुळात बोली म्हणून जनमानसात रुजलेली असते. साधर्म्य बाळगणा-या अनेक बोलींचे प्रमाणीकरण करून एका बोलीला "प्रमाणभाषा" असा दर्जा दिला जातो. ती बोली ज्या भागातील असते , तिथल्या रीतिरिवाजांना एकप्रकारे प्राधान्य दिल्या जाते. म्हणजे "तीच बोली शुद्ध न् बाकीच्या तिच्या बाटिक" , असा दुराभिमान त्या बोलीकरांमध्ये बळावतो न् परिणामी इतर बोलीभाषांना सापत्न्यभाव , हीनपणा येतो . अर्थात हे त्यांच्या अर्धवट संस्कार व ज्ञानाचे द्योतक असते.
ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांच्या काळी सुदैवाने बोलींचे प्रमाणीकरण झाले नव्हते वा तसा गाजावाजा नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच स्वाभाविक बोलीत साहित्य निर्माण केले न् वर्षानुवर्ष ते साहित्य सर्वच मराठीभाषकांना मूर्धन्य झाले.
ज्ञानेश्वरीतही छप्पन बोलीभाषांचा उल्लेख आहे.
आज जे संत-पंत-तंत साहित्य वा लोकसाहित्य उपलब्ध आहे , त्याचे वाचन केल्यावर बोली-बोलींमधील फरक लक्षात येतो. व सहज कळते की तेव्हाच्या काळी ज्या त्या प्रांतातील कवी तेथील बोलीत साहित्यनिर्मिती करीत असे. बोलि-श्रेष्ठत्वाची न् बोली लादण्याची कल्पना नव्हती. म्हणून " मराठा तितुका मिळवावा" सोपे गेले.
मराठ्यांची सत्ता कटकेपासून ते अटकेपर्यंत सुखेनैव नांदती होती. नशीब , तेव्हा असे कट्टर भाषाभिमानी नक्कीच नसावे !
रंगपंचमी की धुळवड ? यावरून मराठीपण ठरविणारे कितेक जण आजकाल दिसतात. दर बारा-कोसावर जशी बोली बदलते तसे सणवार साजरे करण्याच्या रूढीही बदलू शकते , इतकं साधं समजून घेता येत नाही?
बारा बलुतेदारी , ग्रामीण-नागरी , विपन्न-संपन्न , अनवट-मुरलेले , स्त्री-पुरुष इत्यादी पोटभेदांसह प्रांता-प्रांताच्या चालीरीती या खरे तर "मराठीच्या" समृद्धतेचा पुरावा आहेत. त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवायचा प्रत्येक बोलीला अधिकार आहे . त्यावर अतिक्रमण करू नये न् त्यांना हीनपणा देऊ नये , इतकी तमा "प्रमाण-बोली-वर्चस्ववाद्यांनी" बाळगायला हवी.
मराठीच्या काही बोलींमध्ये प्रचलित असलेले काही शब्द हिंदीभाषेत सामान्यपणे योजतात. मग प्रमाण-भाषा अभिमानी "लोक्स" त्या शब्दाला न् ते शब्द योजणा-यालाही हिणवतात.
हिंदीभाषेतील वा इतर भाषेंतील एखादा शब्द असेल न् तोही मराठीने स्वीकारला तर बिघडलं कुठे न् किती ? पण नाही ; मराठीचे स्वयंभू कर्तेधर्ते सरसावून उठतात.
"फार फार जुन्या काळी पावाचा तुकडा विहिरींत टाकून गावेच्या गावे बाटवली होती" , असं लहानपणी वाचल्यावर बाटवणा-यांचा प्रचंड राग यायचा , आताशा "ते बाटले" हे स्वीकारणा-यांची कीव येते.
हाच दाखला मराठीभाषेलाही लागू आहे. विशिष्ट बोलीच्या सार्वत्रिक थोपवण्याच्या वृत्तीमुळे कितीतरी जणं अक्षरशः वाळीत पडले न् बाटगे होऊन परभाषक झाले , हे लक्षात येत कसे नाही ?
जसे बडोदा हे गुजराथेतील मराठी संस्थान , तसेच कर्नाटक , तेलंगणा , आंध्रप्रदेश , अोरिसा ,बंगाल , मध्यप्रदेश ,माळवा , छत्तीसगड , सिंध , पंजाब वगैरे प्रांतात मराठी साम्राज्य होते. मराठी संस्कृती तिथे रुजत होती. आजही यांच्यावर असलेली मराठी-छाप अवचित दिसून येते. या सर्वच ठिकाणी स्थानिक बोली न् ज्येते मराठा यांची मराठी बोली यांचा संकर होऊन मराठीची नवी बोली तयार होत होती , होत असावी.
नेमकी मराठीच्या या शुद्धीकरणाच्या नावानी त्या बोलींची मराठीशी असलेली नाळ सहज खुडण्याचे काम केले गेले कां ? हे बघायला हवे . त्याचा परिणाम म्हणून आज या प्रांतात "मराठी" नगण्य झाली की काय ? हा विचार करायला हवा. मराठी साम्राज्याला न् संस्कृतिला संकोचित करण्याचे काम अशा चळवळी हिरिरीने करतात की काय ? असे वाटले तर अजिबात चूक नाही.
भाषाप्रमाणीकरण म्हणजे काय ? तर सोप्या भाषेत , "अनेक बोलीभाषांचा कॉमनमिनिमम प्रोग्रॅम"! विविध बोलीभाषांमुळे संवादात अडथळा येऊ नये म्हणून एका बोलीचा स्वीकार करीत इतर बोलीतील शब्दांचा , मान्यतांचाही सादर समावेश करणे म्हणजे प्रमाणीकरण होय.
प्रमाणीकरण भाषेचेच होते असे नाही तर संकल्पनांचेही होते. जसे जुन्याकाळी ,"अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" म्हणत प्रत्येक कुटुंबात आठ मुलांचे प्रमाण समाजमान्य होते. नंतरच्या काळात चार / तीन वर हे प्रमाण आले. त्यानंतर ," हम दो हमारे दो" झाले . आता त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना प्रमाणित झाली.
तसेच भाषेतही अधुनिक गरजा लक्षात घेऊन नव्या बोलीशब्दांचा समावेश आदराने करायला हवा. "पुस्तक भेटलं , भाजी भेटली , चहा मांडला , येऊन राहिला " , इत्यादी रचना कानी पडल्यावर लगेच हिणवायची गरज नाही. भले तुम्ही तसे बोलू नका पण त्यांना चिडवू नका .
औपचारिक लेखन करताना ही वाक्ये नक्की प्रमाणित करून द्या (शुद्ध नव्हे! )परंतु बोलणा-याला न तोडता ! हे सांगणे काळाची गरज आहे , नाही ?
मराठा साम्राज्य आज केवळ महाराष्ट्रपुरते उरले आहे . त्यातही असे भेद करून प्रांतिक अस्मितेला बळ येऊन तिथली बोली प्रमाण करण्याच्या चळवळींना खतपणी आपणच घालत नाही ना ? याचा प्रत्येक मराठीचळवळींनी गांभीर्याने विचार करायला हवा.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.