Monday, April 12, 2021

#सहजोक्त भाग २



नमस्कार . आज गुढीपाडवा. नवसंवत्सराचा पहिल‍ा दिवस.

आजपासून चैत्र-नवरात्र आरंभ होते. 

रामरक्षेतील वज्रपंजर नामक कवचातील काही श्लोकांचे  आजपासून नवरात्रभर  यथामती निरूपण  करणार आहे.  वज्रपंजरकवच मूळात अकरा श्लोकांचे आहे. त्यातील पहिला श्लोकार्ध हा असा 

*रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌* ।

सर्व प्रकारच्या पापांची शत्रू  असलेली तसेच सर्व इच्छा पूर्ण करून देणारी अशी रामरक्षा ; विद्वानांनी म्हणायलाच हवी.   ही अपेक्षा व्यक्त केल्यावर आता  डोक्यापासून ते पायापर्यंत एकेक अवयवाचे नाव घेत , रामानी त्या अवयवाचे रक्षण करावे असे पुढच्या साडेपाच अोळीत मांडले आहे. अवयवाचे नाव व रक्षण करण्यासाठी धावा करताना रामाचे एकेक विशेषण घेतले आहे. 

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥1॥

माझ्या  डोक्याचे /मस्तकाचे/ शिराचे रक्षण राघव म्हणजे रघुकुलात जन्मलेल्या रामाने करावे. भाल म्हणजे कपाळ. त्याचे रक्षण दशरथात्मज म्हणजे दशरथाचा पुत्र राम याने  करावे.


 मस्तक/शिर म्हणजे शरीराचे उत्तम अंग .  चांगले काही घडले की शिर अभिमानाने ताठ होते तर  चुकीचं  घडलं की शिर शरमेने झुकते.  रामाचा वंश  सूर्यवंशी इक्ष्वाकु असा होता. या वंशात अनेकानेक नरोत्तम र‍ाजे/महाराजे निपजले. रघुराजा ही याच वंशाचे न् रामाचे पणजोबा  होते. त्यांच्या अफाट पराक्रमाने इक्ष्वाकु वंश पुढे रघुवंश ठरला न् पुढच्या पिढ्या रघुची संतती म्हणजे र‍ाघव ठरली.  शरीरात जसे मस्तक महत्त्वाचे न् प्रतिष्ठित तसेच इक्ष्वाकुंमध्ये राघव राम ! म्हणून  शिरो मे राघवः पातु । 

भालप्रदेश म्हणजे ललाम म्हणजे कपाळ.  "काय लिहून ठेवले आहे भाळी , कळत नाही ? , असं म्हणतात. भाळ म्हणजे कपाळ ज्यावर जन्मल्याच्या पाचव्या दिवशी सटवाई नशीब लिहिते , असे मानतात.  कपाळ जसा दैवदर्शक म्हणजे भाग्य दर्शवणारा अवयव आहे तसाच शोभा वाढवणाराही भाग आहे. म्हणून तर कोणी सर्वोत्तम कामगिरी करणारा "ललामभूत" ठरतो.  तर हा अवयव नेमका दशरथात्मजाने राखावा.  कारण दशरथपुत्र र‍ाम चारही पुत्रांमध्ये स्वतःच्या त्यागादी आदर्श वागणुकीतून  ललामभूत ठरला .


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥2॥

दृष्टी मग ती आंतरिक असो वा बाह्य , तिचे रक्षण कौसल्यापुत्र रामाने  करावे .  तर श्रुती म्हणजे कान व श्रुती म्हणजे ज्ञान. कानांचे रक्षण विश्वामित्रांचा प्रिय शिष्य रामाने करावे.   सुयोग्य विशेषणांचे चयन कसे असावे ? याचा वस्तुपाठ ह्या   साडेपाच अोळी आहेत.

 प्रत्येकाने आईच्या डोळ्याने जगाकडे पाहिले तर जग कधीच वाईट नसेल.   म्हणूनच तर डोळ्यांचे रक्षण कौसल्यापुत्र रामाने करावे. विश्वामित्रांसारखा शिस्तबद्ध , ज्ञानी , वात्सल्यनिधी असूनही कर्तव्यकठोर असा गुरु लाभणं भाग्यातच असावं लागतं. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कसब अशा गुरुमुळे अनायास लाभते.  माहिती गोळा करण्याचा प्राथमिक स्रोत म्हणजे ज्ञानाचे प्रवेशद्वार  कान होत. म्हणून कानांचे रक्षण विश्वामित्राचा प्रियशिष्य र‍ाम करतो. 

 सुकुमार असे चारही र‍ाजकुमार  उपनयन संस्कारानंतर सुखासीन व सुरक्षित राजेशाही जीवन सोडून गुरुगृही आश्रमात गेले. तिथे गुरुच्या आज्ञेवरून  तपाचरणात विघ्न आणणा-या राक्षसांना  ठार केले.  श्वास ज्या अवयवाने घेतात ते घ्राण म्हणजे नाक. आश्रमसंस्कृतीचा श्वास म्हणजे यज्ञयागज्ञानदानादी कार्य . हे कार्य ज्या रामामुळे सुरळीत झाले तो मखत्राता (यज्ञ-रक्षक)  आमच्या नाकाचे रक्षण करो.   कौसल्या महाराणी होती तर कैकेयी पट्टराणी. सुमित्रा मात्र अनसूय सेवेकरी व ममतामूर्ती होती. पतीच्या नजरेत ,घरात-राज्यात कुठेही प्रथमप्राधान्य न मिळताही स्वतःला लाचार न करून घेता , सतत समाधानी रहाण्याचं व्रत सोप नाही. दोन्ही मुलगे दोन्ही सवतींच्या मुलांसह अतिशय वेगवेगळ्या परिस्थितीत असतानाही , चिंताक्रांत न होता संयमाने स्वतःसह आजुबाजूच्यांना धीर देण्याचे कठीण कार्य सुमित्रा करीत होती.  सामान्यांचा  चेहरा भोगलेले सुखदुःख दाखवून देतो , सुमित्रेचा नाही.  तर असा चेहरा सुमित्राचा लाडका पुत्र राम रक्षण करतो. 

॥ इति द्वितीयो भागः श्रीरामार्पणमस्तु॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



1 comment:

  1. रामरक्षा पाठ अाहे पण अर्थ फक्त शब्दाचांच लावत होती; अाज तो गवसला.खूप अप्रतिम 👌👌👌👏👏👏

    ReplyDelete