#सहजोक्त ~ भाग ३
काल दोन श्लोक झाले होते. आता पुढे पाहू.
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥3॥
जीभ , जिचे अस्तित्व वैखरी प्रकटीकरणासाठी महत्त्त्वाचे आहे. विद्यांचा संग्रह असलेला राम माझ्या जिभेचे रक्षण करो. 'जिभेवर सरस्वती नांदते' , असं हुशार व्यक्तीचे वर्णन करताना म्हणतात.
कंठ , ज्यातून चारही प्रकारची वाणी उत्पन्न होतात. परा ,मध्यमा , पश्यन्ती व वैखरी या त्या चार वाणी आहेत. भरत हा कैकेयीपुत्र होता. कैकेयीच्या कृतीला त्याची सहमती तर नव्हतीच. उलट तो तिला शिक्षा देऊ इच्छत होता. केवळ रामच्या आज्ञेने भरताने कैकेयीला सन्मानाने सांभाळले . मनात द्वेष , लोभ वगैरे काहीही न ठेवता केवळ कर्तव्यभावनेनी त्याने सांभाळ केला. नको त्या विकारांना कंठातच लुप्त करावे , चारही वाचांपर्यंत येऊच देऊ नये. म्हणून गळ्याचे रक्षण भरताकडून वंदिल्या जाणारा राम करतो.
स्कंध म्हणजे खांदे. भार सावरायला सहायभूत स्कंध असतात. खांदे मजबूत असेल तर कठीणातील कठीण जबाबदारी लीलया पेलता येते. राक्षसांवर यशस्वी विजय मिळविण्यासाठी दिव्य-आयुध मिळाले होते रामाला. रामाचे खांदे ते दिव्यत्व पेलण्यास समर्थ होते. दिव्यत्वाने दबून , भारावून जाणारे नव्हते. उलट स्वतःच्या आंतरिक क्षमतांनी दिव्यत्वाला बळकट करणारे होते. दिव्य-आयुधांचा उपयोग उठसूट करणारा हा नाही , हे माहीत असल्यामुळे तर रामाला दिव्यायुध मिळाले. प्रत्येकाला जबाबदारी असते , तसेच ती पार पाडायची आंतरिक क्षमतासुद्धा असते. तर जबाबदारीचे प्रतीक म्हणजे खांदे यांचे रक्षण दिव्य-आयुधांसह असलेला राम करो.
भुजा म्हणजे बाहु . समर्थ खांद्यांना जोड भक्कम भुजांची असते. भग्न+ईश+कार्मुक म्हणजे शंकराचे धनुष्य ज्याने सहज तोडले ते रामाचे बाहू माझ्या बाहुंचे रक्षण करोत.
🙏श्रीरामार्पणमस्तु🙏
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
भग्नेशकार्मुका चा अर्थ छान सांगितला.
ReplyDelete