#वज्रपंजरकवच .
धार्मिक वाङ्मय श्रद्धावन्तांच्या मनाला भक्कम आधार देतात. "मन चंगा तो करौटी में गंगा" असं जे म्हटल्या जाते ते योग्यच आहे. मनाचे संकल्प-विकल्प बरेच उलथापलथ करतात ; मानवी-समाजात. तर असे हे 'अचपळ' मन नेहमी सकारात्मक, सर्जनशील व क्रियाशील असावे , यासाठी धार्मिक वाङ्मय मदत करतात. कोणतेही धार्मिकवाङ्मय श्रद्धेने वाचावे , पण पूर्णपणे समजावून घेतल्यावर. या वाङ्मयाचे साहित्यिक मूल्य तर श्रेष्ठ असतेच शिवाय संपन्न आशय हे त्यांचे विशिष्ट . श्रद्धाळुंना त्यातून ईप्सितपूर्तीचा आनंद मिळतो.
गुढीपाडव्यापासून वज्रपंजर नामक कवचाचे यथाशक्ती स्पष्टीकरण केले. आज रामनवमीला या उपक्रमाची इतिश्री करतेय.
रामरक्षेतील हे अकरा श्लोक महत्त्वाचे आहेत. माझ्या क्षमतेनुसार या श्लोकांतील अर्थ , शब्दसौंदर्य , पदलालित्य उलगडून सांगितले आहेच.
आजच्या भागात , या कवचाचा आणखीन एक सर्जक उपयोग सांगणार आहे.
दरवर्षी घरातील सर्वांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण आजकाल फारच वाढले आहे. पहिला , सोळावा , पन्नाशी , साठी , पंच्याहत्तरावी , शंभरी वगैरे विशेष साजरी करण्यात येते. 'पश्चिमाभिमुख' मानसिकतेने केक आणून , तितक्या मेणबत्त्या लावून जन्मदिन साजरा करण्याचा प्रघात जनमान्य झाला आहे.
परिवार-सदस्यांच्या वाढदिवसाचे कौटुंबिक साजरीकरण नक्कीच करावे . पण अस्सल भारतीय पद्धतीने. कसे ? ते सांगते.
ज्याचा जन्मदिवस साजरा करायचा आहे , त्याला आरामशीर आसनावर (चौरंग , स्टूल , खुर्ची वगैरे) बसवावे. ती व्यक्ती जितक्या वर्षांची झाली , तितक्या संख्येत नाणे (१,२,५,१० वगैरे) तबकात घ्यावेत. त्या नाण्यांवर तुपाच्या फुलवाती लावाव्यात . त्या उजळवून अोवाळणी करावी. अोवाळताना प्रत्येकाने वज्रपंजर कवच सामुदायिक , उच्चरवाने म्हणावे. त्याचा जन्मदिन आहे , त्याने स्तोत्रात सांगितलेल्या प्रमाणे प्रत्येक अवयवावर हात ठेवत , त्या त्या अवयवाला श्रीराम स्वस्थ व नीरोगी करीत आहे , अशी भावना ठेवत , उच्चारण करावे. सर्वांनी अक्षवाण केले , की तबक देवासमोर ठेवावे. दिवे शांत झाले , नाणी थंड झालीत की नाणी साबणाच्या पाण्यात स्वच्छ धुवून सत्पात्री गरजूला दान करावी.
आजकाल जन्मदिना संबंधी जी काही गाणी आहेत , त्याहून किती तरी जास्त आशय व सद्भावना या वज्रपंजर कवचातून व्यक्त होतात. तर आता यापुढे जन्मदिवसाचा खराखुरा सोहळा साजरा करू या आणि त्या उत्सवमूर्तीचे मांगल्य चिंतू या .
भर्जनं भवबीजानां
अर्जनं सुखसंपदाम्।
तर्जनं यमदूतानां
रामरामेति गर्जनम् ॥
(जन्ममृत्यूचा फेरा संपवण्यासाठी) भवबीजाला भाजून काढताना , ऐहिक जीवन जगताना सुखसंपदा कमावीत असताना, (रामभक्तांसाठी साक्षात विष्णुदूत येतील , म्हणून)
यमदूतांची निर्भत्सना करताना ,'राम-राम' अशी गर्जना करावी.
दहाही भागांची ही मालिका तुम्हाला उपयुक्त ठरून आवडली असावी , ही सदिच्छा व्यक्त करून विराम घेते.
🙏 जय श्रीराम 🙏
© डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment